मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

दुरावलेली दिवाळी !





मौशी म्हणाली दिवाळीवर काहीतरी लिही. बरेच दिवस गुडी गुडी लिहुन काहीसं समाधानी वाटत नव्हतं. म्हणुन मग वाक्य लिहिलं 

"बालपणीच्या त्या रम्य आठवणींचा शोध दर दिवाळीत सुरुच आहे
ती रम्य दिवाळी अजून दुरवर जाण्याची प्रथा यंदाही चालूच आहे"

काहीजणांना लगेचच संदर्भ लागला, काहीजणांना नाही लागला आणि काही जणांनी मला माफ केलं. ज्यांना लागला त्यात मोठ्या भावाच्या मित्रानं FB वर दिलेली प्रतिक्रिया "अगदी मनातलं" लाखमोलाची. शाळेच्या ग्रुपवर मात्र मला रोखठोक प्रश्न विचारण्यात आला - 

बालपणची दिवाळी आणि आताची दिवाळी यात काय फरक आहे?
फराळ ,कंदिल, नातलग , मित्रमंडळ (अजून वाढल) सगळ तर तसच आहे 

आता प्रश्न रोखठोक होता. एखादं नाट्यमय वाक्य लिहुन फेसबुकवर लाईक घ्यायचे पण त्या वाक्याचं स्पष्टीकरण मात्र आपण ज्याच्या त्याच्यावर सोडायचं हे योग्य नव्हे. त्यामुळं हा प्रश्न विचारणाऱ्या अनघाचे आभार !

आता आज सोमवार सकाळ! त्यामुळं ४० - ४५ मिनिटांत जे काही सुचेल ते खरडवुन ही पोस्ट संपवावी लागेल, त्यामुळं ही पोस्ट अगदी थेट मुद्द्यांच्या रूपांत !

  1. पुर्वीच्या दिवाळीत घरात प्रत्येकाला मिळणारी जागा छोटी असली तरी त्यातील एकोप्यानं, माणसांच्या संख्येनं ते घर खुप मोठं बनुन जायचं. संपुर्ण घराचे अलिखित नियम असायचे आणि घरातील सर्वजण धाकानं नव्हे तर एका विशिष्ट श्रद्धेनं हे नियम पाळायचे. नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा ह्या दिवशी चार, साडेचारला उठणं हे सक्ती म्हणुन नव्हे तर त्या वर्षीच्या दिवाळीच्या आठवणीसाठी मनापासुन जमायचं. 
  2. वर्षात नवीन कपडे मिळण्याच्या मोजक्या प्रसंगांपैकी (बहुतेकांसाठी एकमेव प्रसंगांपैकी ) दिवाळी हा एकमेव प्रसंग असायचा. त्यामुळं आपण ह्या नवीन कपड्यात हे आरश्यात (fb वर नव्हे )कसे दिसतो पाहण्याची खूप उत्सुकता असायची. 
  3. भाऊबीजेच्या दिवशी सर्व आत्या, लग्न झालेल्या बहिणी घरी यायचे. माणसं, माणसांच्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या झाल्या नव्हत्या की भाऊबीजेच्या दिवशी सर्वांना एकत्र जमणं शक्य होऊ नये ! आजी, काका काकी, मामा मामी, आत्या आत्याजी, मावशी, सर्व भावंडं - आपल्या संपुर्णत्वाची जाणीव देणारी ही नाती. दिवाळीत ही सारी एकत्र यायची आणि आपल्याला मानसिक समाधानाच्या खूप खूप उंच पातळीवर घेऊन जायची. आता ही सारी एकत्र नाही भेटत.
  4. आमच्यासारख्या काही कुटुंबात लहानपणीचा काही काळ अगदी चुलीवर पाणी तापवुन आंघोळ करावी लागायची. ज्यांनी सकाळी चार वाजता उठुन पेंगत पेंगत चुलीवर स्वतःसाठी पाणी तापवलंय त्यांना त्यातील अवर्णनीय मजा माहितच असेल. 
  5. नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी सात वाजता आंघोळ आटोपल्याने प्रचंड मोकळा वेळ असायचा आणि लोक गावातील नातेवाईक, मित्रमंडळींकडे घरी बनविलेल्या फराळाचा आनंद घेण्यासाठी जायची. हल्ली सकाळी कसबसं सात वाजता उठुन आंघोळी आधी WA, FB शुभेच्छा पाठविण्याची पद्धती रुढ झाली आहे आणि नातेवाईक, मित्रमंडळींसोबत दिवसा भेटण्याची पद्धत दुर्मिळ होत चालली आहे. 
  6. सकाळी एकत्र केलेल्या फराळात बहुतांशी पदार्थ घरी बनविलेले असतं आणि एखाद - दुसरा मिठाईच्या दुकानातील असे. अजुनही घरी पदार्थ बनतात पण त्यातील बरेच पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळं त्यांचं दिवाळीपण मागे सरत चाललं आहे. आणि दुकानातील मिठायांनी फराळाच्या ताटातील मानाचं स्थान पटकावलं आहे. 
  7. पुर्वी मुलांना पोहणं, फटाके फोडणं हे शिकविण्यासाठी पालकांची सोबत लागत नसे. प्रत्येक परिसरातील मुलांचा गट जीवनावश्यक गोष्टींचं हे 'transition' नवीन मुलांना करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असे. त्यामुळं कोणतीही माळ बिनधास्त कशी फोडायची आणि फटाके संपत आले की लवंगी, केपा, टिकली वगैरे छुटपूट फटाक्यांकडे कधी आपला मोर्चा वळवायचा हे मुलांना लगेचच कळायचं. 
यादी अजुन वाढू शकते पण सोमवार सकाळ असल्यानं थांबायला हवं. पण ह्यात एक मुद्दा! हे सर्व काही लहानपणीच्या नजरेतुन ज्यावेळी जबाबदारी अगदी शुन्य असायची. त्यावेळी मोठ्या असलेल्या आपल्या आईवडिलांना, काका - काकुंना, आत्या, मावश्यांना पण ही दिवाळी आनंदमयी वाटायची का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न! पण आयुष्यात काही आदर्शवत वाटणाऱ्या गोष्टींचा जास्त उहापोह न करता त्यांचं आपल्या मनातील आदर्शपण तसंच कायम ठेवावं हेच योग्य अशी माझी भुमिका  ! दिवाळी redefine होतेय हेच खरं! कदाचित २०३७ साली मागे वळुन पाहिलं तर २०१७
सालची दिवाळी अगदी पारंपरिक वाटेल! 
कालाय तस्मै नमः !

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

HeatMap


गेले कित्येक वर्षे HeatMap ह्या संज्ञेचा आणि माझा निकटचा संबंध आहे. एखाद्या टीमची विविध विषयातील तज्ञपातळी आलेख रुपात मांडण्यासाठी ह्या संकल्पनेचा बऱ्याच वेळा वापर केला जायचा आणि मग आलेखरुपात मांडल्यामुळं एक संघ म्हणुन ज्या काही कमकुवत बाबी आहेत त्या अगदी प्रकर्षानं डोळ्यासमोर उभ्या ठाकतात. 

आज मात्र काही वेगळ्या संदर्भात ही पोस्ट ! मंगळवारी रात्री म्हणजे धनत्रयोदशीच्या रात्री ऑफिसातुन वसईला येण्यासाठी ऑफिसच्या कॅबचा आधार घेतला. सहसा मी ही कॅब वापरत नाही, जवळपास दीड वर्षाने वापरली. मुंबई माणसांनी / वाहनांनी किती दाट भरुन गेली आहे ह्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर रात्री साडेआठ नंतर इनऑर्बिट मालाडच्या परिसरातुन बाहेर पडून दहिसर टोलनाक्याच्या दिशेने कुच करण्याचा प्रयत्न करावा. आपलं ड्रायव्हिंग आणि अशा कुशल लोकांचं ड्रायव्हिंग ह्यातील फरक लगेचच जाणवतो. त्यानं आतल्या रस्त्यानं वगैरे गाडी शिताफीनं पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणली. इथं आल्यावर मात्र त्याचा नाईलाज झाला. प्रचंड संख्येतील वाहनं वेगानं उत्तर दिशेला जात होती. जिथं कुठं थोडी मोकळी जागा मिळेल तिथं आपलं वाहन पुढे दामटायचा प्रयत्न करीत होती. हल्लीच्या पद्धतीनुसार माझे सहप्रवासी आपल्या भ्रमणध्वनीच्या स्क्रिनशी वार्तालाप करण्यात मग्न होते. मी जिथं बसलो होतो तिथुन मला ड्रायव्हरचे डोळे बरोबर दिसत होते. त्याच्या बुबुळांची अगदी वेगानं हालचाल होत होती. दोन्ही बाजूनं, मागुन येणाऱ्या वाहनांकडे तो नजर ठेवत होता. तीच परिस्थिती आजुबाजूच्या वाहनाच्या ड्रायव्हरची ! 

मनातल्या मनात मी दोन हीटमॅप काढले. त्या परिसरातील लोकसंख्येच्या घनतेचा आणि दुसरा त्या परिसरातील माणसांच्या तणावपातळीचा ! दोन्ही आलेख अगदी गडद लाल आले. बहुदा गुगल मॅपशी हे समप्रमाणात होते. दहिसरचेकनाका पार केला आणि मग वाहनं वेगानं पुढे सरकायला लागली. आतापर्यंत निमुटपणे सारथ्य करत असलेल्या ड्रायव्हरच्या नजरेत सुद्धा काहीसा मोकळेपणाचा भाव आला. थोड्या वेळानं मग कॅबने महामार्ग सोडला आणि वसईफाट्याचे वळण घेतलं. मग हवेतला थोडा थंडावा जाणवला म्हणजे तापमानाचा हीटमॅपसुद्धा सुद्धा हिरवागार होत चालला होता. 

गेले दोन दिवस मी मस्त दिवाळीची सुट्टी अनुभवत आहे. हिटमॅपच्या हिरव्यागार क्षेत्रात वावरत आहे. बघताबघता सुट्टी संपेल आणि मग पुन्हा गर्दीच्या मुंबईत जाणं भाग पडेल. एक गोष्ट लक्षात येते हिटमॅपच्या हिरव्यागार क्षेत्रात सतत राहण्याची क्षमता सुद्धा कमी झाली आहे. चार - पाच दिवस झाले की मुंबई पुन्हा खुणावते. 

पोस्टचा सारांश एकच - आपल्या सभोवतालच्या वातावरणातील घटकांचा अभ्यास करुन ज्यामुळं (ह्यात व्यक्ती, ठिकाणं वगैरे घटकांचा समावेश होतो) आपल्याला तणावसदृश्य भावना निर्माण होते त्याचा एक अदृश्य हीटमॅप मनातल्या मनात आखलेला असणं उत्तम असतं. एकदा का हे घटक माहित झाले की त्यांना कसं टाळायचं किंवा अगदी नाईलाजानं त्यांच्याशी मुकाबला करावा लागला तरी त्या लाल क्षेत्रातुन झटपट कसं बाहेर पडायचं किंवा त्यात राहूनसुद्धा कमीतकमी कसा त्रास करुन घ्यायचा ह्या विषयी शांतपणे विचार करणे आपल्याला सहजसाध्य होतं. 

(तळटीप - वसईत दिवाळीत फटाके वाजवले जाण्याच्या घटनेचा माझ्या हीटमॅपमधील माझं अस्तित्व हिरव्या क्षेत्रात असण्यावर काडीचाही फरक पडला नाही ) 

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

थोरत्व - कालपरत्वे



वेताळ  - " हल्ली  या पृथ्वीतलावर थोर लोकांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतंय असं तुलाही वाटतंय का?" 

वेताळाच्या ह्या अचानक आलेल्या ह्या प्रश्नानं विक्रम आश्चर्यचकित झाला. 

विक्रम  - "थोर ह्या शब्दाची नक्की व्याख्या काय?" विक्रमाने आपल्याला विचार करायला वेळ मिळावा म्हणुन तात्पुरता प्रश्न विचारला. 

विक्रमाची ही वेळकाढुपणाची चाल वेताळच्या ध्यानात आली होती. तरीही तो उत्तरला. 

वेताळ  - "थोरत्व हे दोन प्रकारचं असतं . एक जनांनी मनापासुन स्वीकारलेलं आणि दुसरं एखाद्या व्यक्तीनं स्वतःविषयी सोयिस्कररित्या मानलेलं ! पूर्वीच्या आणि सद्ययुगातील थोरत्वाची व्याख्या बदलत चालली आहे."

विक्रम - "तुम्ही  मला  तुम्हांला  हव्या असलेल्या  उत्तराच्या  दिशेनं  घेऊन  जायचा प्रयत्न  करीत  आहात !  तरीही मी  माझं  खरंखुरं मत  मांडु इच्छितो. थोर लोकांच्या विविध श्रेणी आहेत. भारतदेशी ज्याप्रमाणं विविध स्तरावर क्रिकेट खेळलं जातं तसंच  थोरत्वाचे सुद्धा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि अगदीच राहवलं नाही तर गल्लीस्तरीय असे अनेक प्रकार आढळुन येतात. 

वेताळ  - "असं  होय ?" (विक्रमला स्फुरण मिळुन त्यानं  अधिक  जोशात आपलं  म्हणणं पुढे चालु ठेवावं ह्यासाठी हा प्रयत्न होता.)

विक्रम  -  "थोरत्व मिळण्याचा निकष  पुर्वी फार कडक असायचा . आणि थोरत्व बहाल करण्याचा अधिकार त्या त्या क्षेत्रातील मोजक्या अधिकारी मंडळींकडे राखीव असे आणि  एखाद्या  व्यक्तीनं  विशिष्ट  क्षेत्रात अनेक दशके  सातत्यानं अभिजात कामगिरी केल्याशिवाय ही तज्ञ मंडळी त्या व्यक्तीला थोरत्वाच्या पहिल्या पायरीवर सुद्धा उभं करीत नसत. पण हल्ली मात्र असं होतं नसावं!"

वेताळ - "तुला असं का वाटतंय विक्रम?"

विक्रम - " हल्लीसुद्धा ही तज्ञ मंडळी अस्तित्वात आहेत. पण त्यांचा आवाज / त्यांचं मत सोशलमीडियावरील कोलाहलात अगदी क्षीण झालेलं आहे. त्यामुळं जरी अभिजात थोरत्व बहाल करण्याचा अधिकार ह्याच मंडळींकडे असला तरीसुद्धा बाकीच्या पातळीवरील थोरत्व बहाल करण्यासाठी सोशल मीडियावरील थोरत्व अभिलाषी गुडघ्याला बाशिंग लावुन बसलेली मंडळी आणि त्यांचे समर्थक अगदी उतावीळच आहेत. आणि एकच गोष्ट सातत्यानं सांगितली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो ह्या उक्तीनुसार अशा नवथोर लोकांच्या संख्येत भर पडत चालली आहे."

वेताळ  - "हं  - तु आतापर्यंत अगदी एखाद्या विद्वानासारखं बोलतोयस , पण मला समजण्यासाठी काही प्रत्यक्ष उदाहरणं देशील  का ?"

विक्रम - " खरंतर कोणाची नावं घेणं  योग्य नव्हे! पण णुनु कपुर, महागुरू ह्यांच्याविषयी योग्य आदर बाळगुन सुद्धा त्यांना थोर  मानायला मनापासुन मी तयार नाही . ९० च्या कालावधीत ह्या दोघांची जी रुपं पाहिली होती ती लक्षात ठेवता आणि त्यामुळं त्यांनी हल्ली कितीही आव आणला तरी मन मात्र संपुर्णपणे त्यांना  थोर म्हणुन स्वीकारायला तयार होतं नाही ! सुहाना सफरमध्ये णुनु  ज्याप्रकारे आव आणुन आधीच्या काळच्या आठवणी आणतो ते पाहुन किंवा नवशिक्या कलाकरांना महागुरुंनी दिलेल्या टिप्स पाहुन कधी कधी त्यांच्या  self - proclaimed अर्थात स्वयंघोषित थोरत्वाविषयी शंका घ्यावीशी वाटते  "

वेताळ - " हं , म्हणजे  हा एकंदरीत  चुकीचा  प्रकार आहे  तर ! "

विक्रम - " अगदी पुर्णपणे  चुकीचा  म्हणता येणार नाही. कारण पुर्वी एखाद्या क्षेत्रात एका व्यक्तीनं आपलं थोरत्व सिद्ध केलं की मग त्या वटवृक्षाच्या छायेखाली कित्येकजणांचे कौशल्य संधीच्या अभावी पुर्णपणे भरारत नसे ! लोकांना एका क्षेत्रात केवळ एकाच थोर व्यक्तीची इतकी सवय होऊन जाई की बाकीचं कोणी ह्या क्षेत्रात काही चांगलं करु शकतो ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नसे ! जसे की पद्माकर शिवलकर अर्थात पॅडी  ह्यांची झाकली गेलेली कला !"

वेताळ- " असे हो! पण ह्या पोस्टच्या सुरुवातीला लेखणीचे चित्र कसे बरे ?"

विक्रम  - "आपली  ही गोष्ट  महाराष्ट्रदेशी  लिहिण्याचा प्रयत्न एक नवलेखक  करीत आहे. त्याच्या मनात ही भावना किमान गल्लीस्तरीय पातळीवर निर्माण झाली असावी . आणि त्यासाठी हे चित्र !"

वेताळ - "धन्यवाद विक्रम , पण तु आपलं मौन मोडलंस . मी हा निघालो !"

विक्रम  विक्रम वेताळ वेताळ ....  

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

मेंदुचे संरक्षण !


इथं दुचाकीवरुन प्रवास करत असताना हेल्मेट घालावं असा अर्थ अभिप्रेत नाहीय. हल्लीच्या काळातील बुद्धिजीवांची वाढती संख्या ध्यानात घेता त्यांनी आपला मेंदु सर्वोत्तम स्थितीत कसा कार्यरत राहील ह्याकडं लक्ष द्यावं ह्या अनुषंगानं हे काही शब्द! 

सकाळी आपण जेव्हा जागे होतो त्यावेळी आपला मेंदु सर्वोत्तम स्थितीत असायला हवा. जर तुम्ही सहाच्या आसपास उठत असाल तर तो अधिकच चांगल्या स्थितीत असतो असं माझं निरीक्षण ! अर्थात माझ्या मेंदुबाबत ! Make no mistake; पण आपल्या मेंदुची किमान ८५% आपल्या नोकरीधंद्याच्या / अर्थार्जनाच्या कामासाठी किंवा विधायक कामासाठी वापरण्यात यायला हवा. 

दिवस जसजसा पुढे सरकत जातो तसतसं जर तुम्ही सोशल मीडियावर गोंधळ घालण्यात वेळ घालवत असाल तर तुमच्या मुख्य कामासाठी तुम्ही आपल्या मेंदुची उपलब्ध क्षमता कमी करत असता. स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय कोणतीही समस्या वा घटना असो, जर त्यावर तुम्ही करणार असणारं भाष्य जर इतर शेकडो लोक करणार असतील तर तुमच्या भाष्यानं काही फरक पडणार नाही किंवा तुमच्या बौद्धिक क्षमतेविषयी असणाऱ्या इतरांच्या समजात काही फरक पडत नाही. 

जसं सोशल मीडिया तसंच हल्लीची येणारी जाडीजुडी वर्तमानपत्रे! बऱ्याच जणांना ही वर्तमानपत्रे इत्यंभूत वाचण्याची आणि त्यावर भलीमोठी चर्चा करण्याची सवय असते. मेंदुची क्षमता घरी येणाऱ्या वर्तमानपत्राचा कानाकोपरा वाचुन काढण्यासाठी एका मर्यादेपेक्षा जास्त वापरण्यात अर्थ नाही असं माझं मत ! आता मी ब्लॉग लिहिण्यात माझ्या मेंदुची काही क्षमता वापरतो आणि ती कामात वापरली तर असा तुमच्यापैकी काहीजण प्रश्न करतील तर त्याच्याशी काही प्रमाणात मी सहमत आहे. 

मेंदुला थोपटावं, त्याला विश्रांती द्यावी. आणि असा ताजातवाना मेंदु घेऊन सोमवारी सकाळी, दररोज सकाळी कार्यालयात लवकर जावं. बाकीची जनता येऊन मिटींग्स सुरु होण्याआधी अशा ताजातवान्या मेंदुने कार्यालयातील धोरणात्मक कामाचा फडशा पाडवा असे संत आदित्य म्हणतात.  

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

दडलेले सुखक्षण !



मोठमोठी लोकं एका वाक्यात तत्वज्ञान सांगुन जातात. माझ्यासारखे पामर मोठाल्या पोस्ट लिहितात. एक विद्वान माणुस सांगून गेला आहे, "माझ्याकडं मोजक्या शब्दात बोध देणारं वाक्य लिहायला वेळ नव्हता म्हणुन मी पानभर लिखाण केलं !"

असो परवा पेपर वाचता वाचता प्राजक्तानं सैफच्या वाक्याकडं माझं लक्ष वेधलं. 

Saif Ali Khan: In this digital age, relationships need open conversations. 

चांगलं वाक्य आहे म्हणुन मी दाद दिली आणि मग एका क्षणभरच्या नजरेला सामोरा गेलो. आता कळलं की हे वाक्य त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोच्या निमित्तानं घेतलेल्या मुलाखतीचा भाग होतं. 

त्याला नक्की काय म्हणायचं होतं ह्यावर मग आमची चर्चा झाली. म्हणजे मी श्रोता होतो. त्यातील काही मुद्दे आज इथं ! सोशल मीडियाच्या अलिखित नियमांपैकी एक म्हणजे चांगल्या गोष्टीची अतिशोयक्ती अलंकार वापरुन स्तुति करायची आणि न पटलेली गोष्ट सौम्य स्वरुपात मांडायची. सोशल मीडियावर हे ठीक असतं पण  सोशल मीडियातील  वापरात असणारा  हा प्रकार पतीपत्नीच्या संवादाच्या बाबतीत जेव्हा सुरु होतो त्यावेळी मात्र गडबड होऊ शकते. असा एकंदरीत आमच्या चर्चेचा सुर होता. कधीकधी बायकोचं ऐकुन फायदा होतो असा हा क्षण! 

मग मोकळा वेळ मिळाल्यानं मी स्वतः विचार करायला लागलो. मागचा मिठचौकीची पोस्ट हा open conversations चा  प्रकार आहे असं मला वाटुन राहिलं सॉरी वाटुन गेलं! (नको त्या मराठी मालिका बघितल्याने होतं असं कधी कधी ) खरंतर त्यातील मुद्दा अगदी छोटासा आणि ब्लॉगच्या माध्यमातुन मांडण्याच्या धाटणीचा नव्हे! पण मला वाटलं म्हणुन लिहिला आणि प्रसिद्ध केला. मला आणि चार - पाच जणांना मनापासुन आवडला. आपला पैसा वसुल !   

हा सुखक्षण जसा अचानक गवसला तसे एक दोन क्षण ह्या आठवड्यात आले. परवा सकाळी सहा वाजता बऱ्याच दिवसांनी मराठी अभंगांचे स्टेशन लावलं आणि "माझं माहेर पंढरी" हे भीमसेन जोशींचं गाणं ऐकुन मन तृप्त झालं. 
काल रात्री आदित्यसेनांनी घरी येताना विविधभारती लावलं आणि "अपलम चपलम " हे १९५५ सालीचे आझाद चित्रपटातील गाणं लागलं. लहानपणी आमच्या दिदीचे हे आवडतं गाणं ! पुन्हा एकदा मन आनंदी झालं. बोरीगाव केव्हा आलं हे समजलं सुद्धा नाही. 
असाच एक सहकारी ऑफिसच्या कँटीनमध्ये भेटला आणि नेहमीच्या औपचारिक गप्पांच्या सीमा पार करुन मनमोकळ्या गप्पा मारुन गेला. 

सारांश  - मन  प्रसन्न  होण्यासाठी  लागणारे सुखक्षण  असेच अवतीभोवती विखुरलेले असतात . जणु काही गवतांच्या  पानाखाली दडलेल्या दवबिंदूंप्रमाणे ! नेहमीच्या  चाकोरीच्या  रस्त्यानं  जाताना  सुद्धा  ते कधीमधी दिसतात  पण थोडं  वाट  बदलुन गेलं की ते सामोरे येण्याची शक्यता थोडी अधिक वाढीस  लागते . 

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

मीठचौकीचा तारणहार ??



एक आटपाट नगर होतं. नगरातील लोक म्हटली तर सुखी होती. कष्ट करायची तयारी असेल तर प्रत्येकाला नगरीत कामधंदा मिळायचाच! नगरीत सगळं काही आलबेल होतं असं नाही. कामधंद्याची ठिकाणं वास्तव्याच्या ठिकाणांपासून बऱ्याच वेळा दुरवर असायची. त्यामुळं लोक चालत कामधंद्याच्या ठिकाणी जाऊ शकत नसत. त्यामुळं त्यांना अश्व, रथ वगैरे साधनांचा वापर करुन कामाच्या ठिकाणी जावं लागत असे. 

नगराचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतशी रस्त्यांची, नाक्यांची संख्या सुद्धा वाढत गेली. नाक्यांच्या ठिकाणी एकमेकांना काटकोनी दिशेत प्रवास करणाऱ्या सारथ्यांमध्ये विवादाचे प्रसंग वारंवार ओढवू लागले. मी मोठा मातब्बर त्यामुळं माझाच रथ आधी गेला पाहिजे वगैरे वगैरे. ही गोष्ट राजाच्या कानांवर पडुन सुद्धा त्यानं कानाडोळा केला होता. पण एकदा स्वतः राजाच ह्या वर्दळीत सापडला. 

ह्या नगरात मिठचौकी नावाचा मोठा नाका / चौक होता. सर्वसामान्य जनता जिथं अधिक प्रमाणात राहायची  त्या बोरीगावला जिथं उद्योगधंदे व्यापक प्रमाणात आहेत त्या मनोभूमी ह्या भागाला जोडणारा रस्ता मिठचौकीतुन जायचा. त्याला काटकोनी दिशेतून जाणारा रस्ताही तसा वर्दळीचा होता. तिथं एके दिवशी सकाळी ११ वाजता राजाचा रथ प्रचंड वाहतुक कोंडीत सापडला. वाहतुककोंडीतुन बाहेर पडता पडता राजाच्या आणि त्याच्या सारथ्याच्या नाकी नऊ आले. 

झालं. राजानं मोठी सभा भरवली. प्रधान, सेनापती, विदुषी झाडुन सर्वांना बोलावण्यात आलं. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर मिठचौकीत नवीन नियंत्रणव्यवस्था बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सातासमुद्रापलीकडील राज्यात वापरात असणारी सिग्नलव्यवस्था मिठचौकीत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी विदुषींचे शिष्टमंडळ त्या राज्यात जाऊनसुद्धा आलं. 

सिग्नलव्यवस्था बसविण्यात आली. वाहतुक अगदी नियंत्रणात आली. बोरीगावातुन मनोभुमिला कार्यासाठी जाणारे  आदित्यसेन वगैरे मंडळी अगदी खुशीत आली. पण सगळं काही आलबेल असेल तर कसं काय चालणार? ह्या मिठचौकीत अधुनमधुन विपरीत घटना होऊ लागली. राज्याचा एक शिलेदार व्यवस्थित चाललेल्या सिग्नलला स्वतःहुन नियंत्रित करु लागला. बोरीगावाहून येणाऱ्या वाहनांची लांबच्या लांब रांग लागली असताना पश्चिम दिशेनं येणाऱ्या अश्वांना आणि रथांना तो चार - चार मिनिटं मोकळी वाट देऊ लागला आणि उत्तरेच्या बोरीगावाहून अथक प्रयत्न करुन आलेल्या आदित्यसेनसारख्या मंडळींना मात्र आठ- दहा रथ पार पडताच सिग्नल बंद पडतो हे पाहण्याची वेळ आणु लागला. 

आदित्यसेनसारख्या मंडळींच्या मनात संताप, मनःस्ताप वगैरे भावनांनी घर केलं. पक्षांच्या गुंजनातुन राजाला टॅग करुन त्यांच्या कानावर आपली समस्या घालण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला. पण खुप महत्वाच्या कामांत गर्क असलेल्या राजाला आदित्यसेनच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. आता भविष्यात होऊ घातलेल्या उड्डाणपुलाची स्वप्नं पाहण्यात आदित्यसेन आणि मंडळी समाधान मानत आहेत. 

गांभीर्यानं बोलायचं झालं तर मिठचौकीला आपल्या मर्जीनं सिग्नलचा कालावधी नियंत्रित करणाऱ्या वाहतुकपोलिसांनी आपलं लॉजिक जनतेसमोर सादर करावं ही मागणी मी करत आहे. ह्यामुळं होणारी विनाकारण वाहतुककोंडी नक्कीच कमी करता येईल  !!

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

निःशब्द !


गेल्या शुक्रवारच्या घटनेनं मन खुपच सुन्न झालं. जगभरात अनेक दुर्दैवी घटना होत असतात. कधी निसर्गाचा कोप होतो म्हणुन, कधी कोणी माथेफिरु निष्पाप जीवांवर हल्ला करतो म्हणुन तर कधी अपघात होतो म्हणुन. पण चेंगराचेंगरीची घटना ह्यापेक्षा काहीशी वेगळी आहे. केवळ काही क्षणांतच समुहाचे मानसशास्त्र अचानक कावरेबावरे होऊन अशी चेंगराचेंगरी होते. 

कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीची शक्यता सदैव काही प्रमाणात अस्तित्वात असते. व्यवस्थापनाच्या दृष्टीनं पाहिलं तर ही शक्यता एका विशिष्ट प्रमाणाबाहेर जाऊ न देणं ही जबाबदारी प्रशासन आणि नागरिक ह्या दोघांनी मिळुन घेणं आवश्यक आहे. ह्या घटनेपासुन बोध घेऊन त्यावर उपाययोजना आखताना काही तात्काळ आणि काही दीर्घकालीन उपाय आखणे आवश्यक आहे. 

१. वाढती लोकसंख्या - लोकसंख्या नियोजन हा गेले कित्येक वर्षे आपल्या देशाच्या प्राधान्यक्रमावरील विषय नाहीय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाच्या विविध भागात वाढणाऱ्या लोकसंख्येला उदरनिर्वाहासाठी केवळ मोजक्या महानगरांमध्ये यावं लागतं. 
देशाच्या विविध भागांत उद्योगधंद्यांची व्याप्ती वाढविणं ही साधीसोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड प्रशासनीय जिद्दीची आवश्यकता आहे. उद्योगधंद्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ महानगरे सोडुन सहजासहजी छोट्या शहरात वास्तव्याला जाणार नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होणारी महाविद्यालये निर्माण करावी लागतील, नियमित विद्युतपुरवठा, कायदा आणि प्रशासनाची ग्वाही, मनोरंजनाची साधने अशा अनेक बाबी पुढे येतील आणि हे सर्व करायला जावं तर पर्यावरणाचा बळी द्यावा लागेल. ह्या सर्व समस्या आहेत म्हणुन हे करुच नये असं नाही. देशातील मोठाल्या उद्योगसमुहांना विशिष्ट क्षेत्रे काही काळासाठी देऊन तिथं त्यांना सुनियोजित शहरं निर्माण करावयास देणं हा एक पर्याय असु शकतो. 
दुसरी गोष्ट म्हणजे एकापेक्षा अधिक अपत्यास परवानगी न देण्याचा निर्णय सरकारनं घेण्याची वेळ खरोखर आली आहे. एका विशिष्ट बिंदुनंतर देशाचं  हित बाकीच्या सर्व घटकांपेक्षा वरचढ ठरायला हवं. 

परंतु वरील पर्याय हा दीर्घकालीन आहे आणि त्याचे परिणाम दिसायला काही काळ द्यावा लागेल. त्यामुळं काही उपाय तत्पर आखायला हवेत. 

अ) गुगल मॅप आपल्याला हल्ली रस्त्यावरील वाहतुकीची घनता दाखवितो, आणि त्यानुसार आपण कोणता रस्ता निवडायचा हे ठरवितो. त्याचप्रमाणं शहरातील विविध भागातील मनुष्यघनतेची चित्रं प्रशासनास उपलब्ध असावीत. सध्यातरी आपण रेल्वेस्थानकांवर लक्ष केंद्रित करुयात. कोणत्याही रेल्वेस्थानकावरील पुलांवर वर जाण्याचा आणि खाली उतरण्याचा मार्ग दुभाजकाने वेगळा केलेला असला पाहिजे. आणि खरंतर तिकीट टाकल्याशिवाय ह्या मार्गाचे प्रवेशद्वार उघडता कामा नये. आणि हे प्रवेशद्वार केवळ एकाच दिशेनं उघडायला हवं. सद्यकालीन डेटाच्या आधारे मुंबईसारख्या महानगरातील सर्वात जास्त गर्दीच्या स्थानकांवर सर्वप्रथम असल्या उपायांचा अवलंब करायला हवा. 

ब ) आता ह्या उपायामुळं फलाटावरील गर्दी अर्थात वाढणार. मग अशावेळी गुगल मॅप प्रमाणं मनुष्य मॅपचा आधार घ्यावा. जर फलाटावरील मनुष्यसंख्येची घनता एका विशिष्ट प्रमाणाबाहेर असेल तर स्थानकात येणारी नंतरची गाडी रोखुन ठेवायला हवी. जोवर स्थानकातील गर्दी स्थानकाबाहेर जात नाही तोवर नवीन गाडी स्थानकात फलाटावर येऊ नये. 

क ) आता ह्या उपायामुळं लोकलचे वेळापत्रक कोलमडुन पडणार. आता इथं एक क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागणार. लांब पल्ल्याच्या गाड्या विरार / कल्याण वगैरे स्थानकांच्या पलीकडे शहरात येताच कामा नयेत. त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्या स्थानकांत उतरुन लोकलने प्रवास करावा किंवा ओला / उबेर करावीत. ह्यात नक्कीच त्यांची गैरसोय होणार पण प्रवाशांच्या जीवापेक्षा हे नक्कीच महत्वाचं नाही.

ड ) आता उपनगरीय लोकलचे व्यवस्थापन करणाऱ्या मंडळींना ह्या स्थानकात महत्तम लोकल गाड्या चालविण्यास पुर्ण स्वातंत्र्य द्यावं. 

वर उल्लेखलेली अ, ब , क आणि ड ही उपायांची मालिका परिपुर्ण नसेलही, पण मी इथं एकच मुद्दा अधोरेखित करु इच्छितो - नेहमीचे तात्पुरते उपाय योजुन काही होणार नाहीये. मनुष्यजीव हा सर्वात महत्वाचा घटक हे डोळ्यासमोर ठेवून तज्ञांनी उपायांची योजना करावी. आता इथं बुलेट ट्रेनचा मुद्दासुद्धा चर्चेला घेऊयात. उपलब्ध निधी वापरण्यासाठी पहिला पर्याय लोकलवासियांचा सुरक्षित प्रवास हा असावा. ते एकदा साध्य केलं की बुलेट ट्रेनसुद्धा आणा आणि ती विरारलाच थांबवा. 

अजुन एक मुद्दा वाचनात आला. घरुन काम करण्यास परवानगी देणं अथवा कार्यालयांच्या वेळा थोड्या वेगवेगळ्या ठेवणं. बऱ्याच कंपन्या अगदी दुरच्या स्थानकापर्यंत बससेवा पुरवितात किंवा कॅबने रात्री कर्मचाऱ्यांना सोडतात. ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती ठीक असेल अशा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अशा सेवा पुरविणे बंधनकारक करायला हवं. ज्या कंपन्यात घरुन काम करायला परवानगी आहे तिथं घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ह्या मुद्द्यावर बरीच चर्चा होते आणि त्यामुळं हा मुद्दा थोडा काळजीपुर्वक हाताळायला हवा. 

आता आपण नागरिकांच्या जबाबदारीच्या मुद्द्याकडे वळुयात. सार्वजनिक ठिकाणी सामंजस्याने वागायला हवं ह्याचं शिक्षण देणं ह्या बाबतीत आपणास बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. रस्त्यावर थुकण्याच्या किळसवाण्या सवयीपासुन सुरुवात करत सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना धक्काबुक्की करायच्या सवयीपर्यंत कित्येक सवयी एक समाज म्हणुन आपल्याला मोडायच्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावून अशा लोकांना समज देण्यात यावी. आर्थिक दंड केवळ सतत ह्या बाबतीत कायदाभंग करणाऱ्या लोकांना करावा. 

ह्या चेंगराचेंगरी, गर्दीचा सामना न करावा लागणारा सुद्धा एक उच्चभ्रु वर्ग अस्तित्वात आहे. आपल्या आर्थिक शक्तीच्या आधारे ह्या वर्गानं स्वतःला ह्या सर्व समस्यांपासुन दूर नेऊन ठेवलं आहे. 

ह्या पोस्टचा एकच उद्देश! एक समाज, एक प्रशासन म्हणुन आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे. सामान्य माणसाचं आयुष्य आपल्यासाठी किती महत्वाचं आहे? जर ह्या घटनेनं आपल्याला खरोखरीच खंत वाटली असेल आणि आपल्याला सामान्य मनुष्याचं आयुष्य प्राधान्य क्रमावर घ्यायचं असेल तर काही तात्काळ क्रांतिकारी उपाय योजायला हवेत. वर सुचविलेले उपाय बहुतेक प्रॅक्टिकल नसतील,पण तज्ञांनी काही वास्तववादी उपाय शोधावेत. हे बहुदा क्रांतिकारी असतील आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची जिद्द (willpower) एक समाज, एक प्रशासन म्हणुन आपणास दाखवावी लागेल. नाहीतर मुंबईतील सामान्य माणसाचं आयुष्य धोक्यात घालणाऱ्या आधीच लांबलचक असणाऱ्या यादीत चेंगराचेंगरी ह्या अजुन एका  गोष्टीची भर घालुन आपण शांत होऊ !

२०२४ अनुभव - भाग २

१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त...