मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

वाट - हरवलेली , गवसलेली






२००६ सालची अमेरिका वास्तव्यातील गोष्ट! न्यु जर्सीतील रँडॉल्फ गावात आमचं वास्तव्य होतं. एका शनिवारी फ़्लैंडर्स गावातील बॉसने त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. हिवाळा असल्यानं साडेचारच्या आसपास सुर्यास्त होऊन अंधाराने आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. आम्ही हळुहळू निघण्याची तयारी सुरु केली. सकाळी येताना आम्ही व्यवस्थित आलो होतो त्यामुळे परतताना काही दिशा वगैरे विचारण्याची तसदी आम्ही घेतली नाही. 
एका ठिकाणी रूट १० आणि अजुन एक रस्ता ह्यामध्ये आमची गल्लत झाली. माझ्यासोबत प्राजक्ता, छोटा सोहम आणि राकेश होता. मागुन सुभाष आम्हांला फॉलो करत होता. आमचा रस्ता चुकला हे समजायला आम्हांला तीन चार मिनिटे गेली. तोवर आम्ही काहीसे पुढे आलो होतो. अमेरिकेच्या प्रथेप्रमाणे सहजासहजी परतीचा रस्ता पकडायला वाव नव्हता आणि त्यामुळे आम्ही पुढे पुढे जात राहिलो. अंधार आता पुर्णपणे स्थिरावला होता आणि आजुबाजूचा प्रदेश आपलं रूप झपाट्यानं बदलु लागला होता. जंगलसदृश्य भागाला सुरुवात झाली होती. ह्या अगदी सुनसान भागात अधुनमधून एखादं घर दिसायचं पण अशा घरात जाऊन बेल वाजविण्याची हिंमत करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही. हकनाक trespasser म्हणुन समजलं जाऊन बंदुकीच्या गोळीने जीव जायचा. मग एका ठिकाणी कार थांबविली. तिघांनी मिळून चर्चा केली. आता सुभाष पुढे आणि मी मागे असा क्रम ठरवला. थोडा वेळ परिस्थितीत काहीच फरक पडला नाही पण एका क्षणी त्या टेकडीवरुन खालुन जाणारा रुट १० दिसला. मग मात्र आम्ही मोठ्या सावधानतेनं तिथं जाण्यात यश मिळविलं. एकदा का रुट १० मिळाल्यावर मात्र आम्ही राजे होतो आणि व्यवस्थित घरी पोहोचण्यात आम्ही यश मिळविलं. 

अशीच आठवण अमेरिकेतील एका मित्राची! तो तर जवळजवळ २० किमी एकटा जंगलात भटकत होता. त्याच्यासोबत असणारी त्याची पत्नी आणि मुलगी झोपेत असल्यानं त्यांना हा प्रकार कळला नाही. बहुदा त्याच्या GPS ने त्याला दगा दिला असावा. त्याने अनुभवलेल्या प्रसंगाचं गांभीर्य नक्कीच आमच्या अनुभवापेक्षा जास्त होतं. 

आयुष्यात सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं नाही का? एखाद्या नात्याची रुळलेली वाट अचानक हरवुन जाते. आपल्या आयुष्यात अगदी महत्वाचे स्थान असलेली मंडळी अचानक दुरावली जातात. आपल्याला जायचं असतं रुट १० वर आणि एखादं वळणं असं येतं की आपल्यासमोर असलेल्या दोन पर्यायातील एक आपण निवडतो. 

कधी ह्या निवडीनं आपल्या आयुष्यातील ती महत्वाची व्यक्ती इतकी दुखावली जाते की मग पुन्हा कधी जवळ येऊ शकतच नाही. ह्या निर्णयाची तीव्रता अगदी छोटी ते कायमस्वरूपी परिणाम करणारी अशी असू शकते. मागं वळून पाहता कधी कधी वाटून जातं की आपण ह्या विशिष्ट् क्षणी हा निर्णय का घेतला हे स्पष्ट करण्याची संधी जर आपणास मिळाली असती किंवा तितकी तसदी आपण घेतली असती तर कदाचित ही वाट हरवली नसती. 

कधी हा निर्णय इतका गहन असतो आपण दुसऱ्या एका व्यक्तीला हे स्थान देऊन टाकतो. आणि मग पहिल्या व्यक्तीची ही वाट पूर्णपणे बंद होऊन जाते. 

काही आप्त, मित्रमंडळी ह्यांच्याकडे आपलं आयुष्याच्या एका टप्प्यावर सतत येणंजाणं असतं. आणि मग आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक मग्न होत जातो; आपला प्राधान्यक्रम बदलतो आणि मग हे सारं एकत्र येणं कमी होतं जातं. 
 
जरी व्यवहारात आपण ह्या वाटांवरून प्रवास करु शकत नसलो तरी ह्या वाटा आपल्या मनात कोठेतरी दडून बसल्या असतात. आणि ह्या वाटांवरुन प्रवास करतानाचे आपलं रुप सुद्धा आपल्या लक्षात असतं. आयुष्याचा प्रवास आपल्याला अंतर्बाह्य बदलवून टाकतो पण आयुष्यातील आधीची आपली काही रुपं आपल्याला हवीहवीशी वाटतात. एखाद्या भावुक क्षणी ह्या रुपात परतण्याची इच्छा सुद्धा होते पण आज ते शक्य नसतं. आणि त्या रुपाची निरागसता आपल्याला पेलवेल ही रास्त शंका सुद्धा आपल्या मनात असते. 

नात्यांच्या वाटा जशा हरवतात तशा कधी त्या आयुष्याच्या एका वळणावर अचानकपणे सामोऱ्या सुद्धा येतात. ह्यातील काही जुन्या असतात तर काही नव्या! कधी कधी जुन्या वाटा नवं रुप घेऊन आपल्यासमोर येतात. प्रत्येक वेळी त्यांनी नवं रुप घेतलेलंच असतं असंही नव्हे! आपली बदललेली दृष्टीच आपल्याला त्या नात्यांचं नवं रुप दाखवतं. आपल्या नात्यात किंवा अगदी ऑफिसात सुद्धा आपल्या आजुबाजूला दीर्घकाळ वावरणारा एखादी व्यक्ती असते. तिचं अस्तित्व आपण गृहित धरलेलं असतं पण एखादा प्रसंग असा येतो आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाचा एखादा आपणास पुर्णपणे अज्ञात असलेला पैलु आपणासमोर येतो आणि मग नवीन नातं, एक नवीन वाट गवसते. 

ह्या वाटा जशा व्यक्ती व्यक्तींमधील नात्यांमध्ये असतात तशाच त्या व्यक्ती आणि एखादी वास्तू, एखादं स्थळ किंवा एखादा लाडका प्राणी ह्यांच्यात सुद्धा असु शकतात. गावातील एखाद्या छोट्याशाच देवळाच्या परिसरात बसुन अनुभवलेली सायंकाळ आणि मनात सामावुन घेतलेली शांतता; लहानपणाच्या निरागस जीवनात समुद्रकिनारी मावळत्या सुर्याच्या साक्षीने बांधलेले किल्ले, शालेय जीवनात आपलं अगदी आवडतं असणारं कुत्र्याचं पिल्लू - हे सारं काही आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडुन बसलेलं असतं आणि त्या आठवणींकडे जाणाऱ्या वाटा अधुऱ्या का होईना पण अस्तित्वात असतात! 

बऱ्याच वेळा हरवलेल्या वाटांच्या सुरेख आठवणी आपल्या मनात असतात आणि आयुष्य कधी कधी पुन्हा ह्या वाटांवर प्रवास करण्याची संधी देतं. आणि आपण मोठ्या अपेक्षांनी ह्या वाटांवरील पुर्नप्रवासाला जातो आणि कदाचित आपला भ्रमनिरास सुद्धा होऊ शकतो. संदर्भ बदललेले असतात, आपण बदललेलो असतो आणि मग ह्या वाटेवरुन पुन्हा आलोच नसतो तर बरं झालं असतं किमान त्या रम्य आठवणी तरी कायम राहिल्या असत्या असं वाटुन जाऊ शकतं ! 

अशा ह्या वाटा! काही हरविलेल्या तर काही गवसलेल्या!! 

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...