मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं !


एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील वर्षागणिक कामगिरीचा आलेख अभ्यासणे हा एक सखोल अभ्यासाचा विषय असु शकतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज हे संघ १९७० च्या सुमारास बलाढ्य मानले जाणारे संघ होते. परंतु १९९० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघाच्या कामगिरीस जी उतरती कळा लागली त्यातुन तो संघ अद्याप सावरु शकला नाही. त्या बेटांवरील तरुण बहुदा बास्केटबॉल सारख्या पर्यायी खेळांच्या किंवा इतर पर्यायांच्या मागे लागले असावेत असा एक विचारप्रवाह आहे. संगकारा आणि जयवर्धने ह्यांच्या निवृत्तीनंतर सुरु झालेला श्रीलंका संघाचा संघर्ष सुद्धा काहीसा असाच! कदाचित ह्यामागे स्थानिक क्रिकेटच्या दर्जात झालेली घसरण ह्यासारखी वेगळी कारणंअसावीत. देशांतर्गत अशांततेचा फटका पाकिस्तानच्या कामगिरीला बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही धोरणामुळं त्या देशातील काही गुणवान खेळाडूंनी इंग्लिश कौंटी क्रिकेटचा रस्ता धरला. kolpak deal ह्यावर थोडा शोध घेऊन पहा !

आता वळूयात ऑस्ट्रेलिया संघाकडे! ह्या संघाचा बलाढ्य गुणांक काही प्रमाणात घसरणीला लागला आहे! त्यांच्या संघाचे सरासरी वय पाहिलं तर ते तिशीच्या पलीकडं आहे. पुर्वीही हे असंच असायचं पण हे तिशीपल्याडचे खेळाडू त्यावेळी रथी - महारथी बनलेले असत. सध्याचे तिशीपलीकडील हे खेळाडु अजुनही आपल्या संघर्षाच्या कालावधीतच अडकुन बसलेले आहेत. ऑस्ट्रेलियन तरुण खेळाडु भारतीय युवा खेळाडूंच्या तुलनेनं अजुनही प्राथमिक शाळेत आहेत असे परवा ग्रेग चॅपल म्हणाला ते उगाच नव्हे! चौथ्या सामन्यात भारतानं एक अत्यंत रोमहर्षक विजय मिळविला त्यावेळी एकंदरीत सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या खेळाचे वर्णन त्यांचे काही माजी खेळाडु unaustralian  असे करत होते. पुर्वीचा तो आत्मविश्वास, ती मग्रुरी, तो एक जगज्जेत्याचा आविर्भाव कुठंतरी नाहीसा झाला आहे! कसोटी क्रिकेटमध्ये तर नक्कीच ! भारतीय मालकांच्या IPL संघातुन खेळण्याचा ह्यात किती हातभार हे देव जाणो !

ह्याउलट भारतातील परिस्थिती आहे ! इथं क्रिकेटने अगदी व्यावसायिक रुप धारण केले आहे. भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती, मनोबल ह्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाली आहे. रणजी, दुलीप करंडकांचे सामने ह्यावर लक्ष देणारा जाणता वर्ग अजुनही अस्तित्वात आहे. क्रिकेटच नव्हे तर एकंदरीत परंपरांचे जतन करणाऱ्या विनायक पंडित, रोहन गुरव ह्यांच्यासारख्या मंडळींचे कौतुक करावं तितकं थोडकं ! स्थानिक सामन्यांच्या वेळी जाणवणारी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांची उपस्थिती नक्कीच सुखावणारी असते! अशाने होतं काय की आंतरराष्ट्रीय संघांसाठी नवीन खेळाडूंचा सदैव पुरवठा होत राहतो! ह्या  स्वप्नाच्या मागे लागुन किती युवक आपल्या करियरचा बळी देत असतील हा वेगळा मुद्दा ! भारतातील जे गुणवान खेळाडु जसे की पुजारा, विहारी आणि आता अजिंक्य ज्यांना IPL मध्ये संधी मिळत नाही, पण ज्यांच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेमुळं भारताची मान जगभर उंचावली जाते अशा मंडळींना विशेष मोबदला मिळायला हवा! 

आपण चौथ्या कसोटीत ज्या अनुनभवी गोलंदाजांचा संच घेऊन खेळलो आणि तरीही विजय मिळवला हा एक चमत्कारच म्हणायला हवा ! सिराज,  शार्दुल, नटराजन, वॉशिंग्टन ही मंडळी सातत्यानं मारा करत राहिली. शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही! कोणतीही एक भागीदारी विशिष्ट मर्यादेपेक्षा मोठी न होऊ देण्याची कामगिरी ह्या मंडळींनी बजावली! खरंतर आपली पहिली पसंती असलेले उमेश अथवा सध्याचा इशांत ह्यापेक्षा नक्कीच नव्या दमाचे गोलंदाज खेळविणे केव्हाही इष्ट ! भारतभर आपल्या काहीशा उर्मट स्वभावानं प्रसिद्ध झालेल्या रवी शास्त्रीला ह्या भारतीय संघात निर्माण झालेल्या जिद्दीचा किती वाटा द्यावा हा प्रत्येक क्रिकेट रसिकाने सोडविण्याचा आपापला प्रश्न !

चौथ्या सामन्यातील कलाटणी देणारा एक महत्वाचा क्षण म्हणजे वॉशिंग्टन आणि शार्दुल ह्यांची पहिल्या डावातील एक मोठी भागीदारी ! ज्या सहजतेनं ह्या दोघांनी फलंदाजी केली त्यामुळं भारतीय संघाच्या मनोबलात कमालीचा फरक पडला आणि चौथ्या डावात भारतापुढं नक्की किती आव्हान ठेवावं ह्याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात काहीसा संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या भागीदारीने केलं ! पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर शुभनम आणि रिषभ ह्यांनी केलेली फलंदाजी पुढील कित्येक दशके भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चेचा विषय बनुन राहील ! शुभनमने ह्या मालिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळं भारतीय फलंदाजीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने रसिकांना पडु लागली आहेत ! 

ऑस्ट्रेलिया संघाचं नक्की काय चुकलं? 

१) पेन ही कर्णधार म्हणुन नक्कीच चुकीची निवड असे मला वाटत राहिले आहे. संघाला स्फुरण देऊन त्यांच्याकडुन स्फूर्तिदायक कामगिरी करुन घेण्यात त्याला कमालीचं अपयश आलं ! खरंतर स्मिथ हाच ह्या संघाचा कर्णधार असायला हवा होता. पण अधुनमधुन काही बेजबाबदार वर्तवणुक करुन त्यानं आपल्या प्रगल्भतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. 

२)गोलंदाजांची निवड हा सुद्धा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरला. स्टार्कच्या कामगिरीविषयी आणि एकंदरीत भवितव्याविषयी  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुर्णवेळ IPL खेळल्यामुळे कमिन्स चौथ्या कसोटीपर्यंत नक्कीच दमला होता. सिडनीत पाचव्या दिवशी ह्या सर्वांना अश्विन आणि विहारीने खुपच दमविलं होतं. तेही भारताच्या पथ्यावर पडलं. आणि शेवटी तुम्ही एकदा का तिशीच्या पलीकडे गेलात की एक वेगवान गोलंदाज म्हणुन तुमच्या कामगिरीत नक्कीच फरक पडतो ! 

३) वेड, ग्रीन, पेन ही मंडळी केवळ सरासरी / साधारण खेळाडु म्हणुन मालिकाभर वावरली.  स्टिव्ह वॉ, मकग्राथ, क्लार्क, पॉईंटिंग सारख्या खेळाडूंची उंची त्यांना गाठता आली नाही. प्रतिस्पर्ध्याला नॉक आऊट पंच देण्याचं एक शास्त्र असतं ते ह्या मंडळींना अजुन आत्मसात करायचं आहे.  भारतीय संघ सदैव सामन्यात आपलं आव्हान टिकवुन राहिला. त्यामुळं गोलंदाजांवर सदैव काहीसा दबाव राहिला. 

४) वरकरणी पाहता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने ऍडलेडचा अपवाद वगळता वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या नाहीत. मेलबर्न सारख्या ठिकाणी तर हल्ली ड्रॉप इन पिचेस वापरली जातात. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या धारदारतेत काहीशी उणीव निर्माण होते. कदाचित मुळ भारतीय गोलंदाजीचा संच पाहुन ऑस्ट्रेलियाने सुद्धा कदाचित धसका घेतला असावा. 

आपल्याकडे सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही. पंतचा झेल सुरुवातीलाच घेतला गेला असता तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं आणि कदाचित ही पोस्ट लिहली सुद्धा गेली नसती! पण जर तरला अर्थ नसतो असं म्हणतात ते उगीच नाही ! ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे भारतीय खेळाडु संबंध मालिकाभर जायबंदी होत राहिले ही स्वीकारणीय बाब नव्हती. ह्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जी जबाबदार मंडळी आहेत त्यांना ह्याचा नक्कीच जाब विचारायला हवा ! भुवनेशकुमार आठवतो का तुम्हांला ? हा गडी एक सामना खेळला की पुढील दहा सामने अनफिट असतो ! 

जाता जाता विराट की अजिंक्य ? सध्या सर्वांनी अजिंक्यचे गुणगान करावेत असा माहोल आहे. विराटच्या बाजुनं बोलायचं झालं तर ह्या संघात जी विजिगिषु वृत्ती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात श्रेय त्याला जातं. पण आता नक्कीच इंग्लंडविरुद्ध मायभूमीवर होणाऱ्या मालिकेत एक कर्णधार म्हणुन त्याच्या कामगिरीकडे सर्वजण बारीक लक्ष ठेवून असणार ! वेगळ्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्या ऍडलेडच्या सर्वबाद (शमी बाद ) ३६ धावांसोबत मालिकेतील भारतातील सर्व दुर्दैवांची मालिका सुद्धा संपली. त्यानंतर बऱ्याच गोष्टींत नशिबानं आपल्याला हात दिला.  म्हणायला गेलं तर ब्रिस्बेन इथं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पावसाच्या शक्यतेचा विचार करुन काहीसा आक्रमक खेळ करावा लागला. जर पुर्ण दोन दिवसाचा खेळ होणार आहे हे त्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी आपल्या डावाची आखणी वेगळ्या प्रकारे केली असती ! 

असो एका संस्मरणीय मालिका विजयाची नोंद भारतीय संघानं केली! शेवटी एक खरा क्रिकेट चाहता खेळाकडुन काय अपेक्षा ठेवून असतो? तर मधुर स्मृतींचा ठेवा ! ह्या मालिकेने ह्या मधुर स्मृती भरभरुन दिल्या! आणि अगदीच दृष्ट लागायला नको म्हणुन ऍडलेडच्या त्या सर्वबाद ३६ चा तीटसुद्धा लावला ! 

मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांवरील पोस्टच्या ह्या लिंक्स ! 

तिसरी कसोटी 

दुसरी कसोटी 




गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

सिडनी टेस्ट - सहेला रे ते सहना रे !



चांगला मुड असला की कधीतरी मी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्यातील खरं तर मला काही कळत नाही.तरीही ते ऐकताना प्रचंड छान वाटतं. किशोरी आमोणकर यांची सहेला रे आणि प्रभा अत्रे यांची जमुना किनारे मोरा गाव सावरे ...या रचनांपासुन सुरुवात करुन मग यु ट्युबच्या artificial intelligence च्या मी अधीन होतो. ह्या जाणकार गायिका ह्या स्वर्गीय रचनांद्वारे आपल्याला एका शब्दांपलीकडच्या  विश्वात घेऊन जातात.  एकेक रचना तासभर सुद्धा चालु राहते. मोजके शब्दच, वारंवार येत राहणारे! पण प्रत्येकवेळी त्यांच्या उच्चारात, सादरीकरणात वैविध्य असतं. जितका अधिक पट्टीचा कलाकार तितकी त्याची / तिची ह्या विशिष्ट शब्दरचना खुलवण्याची क्षमता जास्त! क्षमतेचा कलाकार आणि सोबतीला जाणता श्रोता असला की मैफिलीला रंग चढतो.

हँझलवुड, बुमराह अथवा कमिन्स ही मंडळी तासनतास आँफ स्टंपच्या बाहेर मारा करत रहातात वा करु शकतात. वरवर पाहता हे सर्व चेंडू आँफ स्टंपच्या बाहेर ह्या वर्गात मोडतात, पण त्यातला खरा फरक समोर उभ्या असलेल्या शुभनम अथवा रोहितलाच समजु शकतो. प्रत्येक चेंडूवर बळी मिळायलाच हवा असा आग्रह नाही. हळुवारपणे फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडण्याची कला म्हणजे कसोटी क्रिकेट. आँफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूपैकी काही झपकन आत शिरणारे, काही नाकासमोर बघत सरळ जाणारे तर काही फलंदाजांना मोहात पाडत हळुवारपणे बाहेर पडणारे ! शास्त्रीय संगीतातील जागांप्रमाणे ह्या सुद्धा गोलंदाजाच्या आपल्या जागा असतात. 

आधुनिक काळात End Result ला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे असं आपल्याला सदैव वाटत राहतं, जसं की परीक्षेतील गुण, एखाद्या कंपनीने मिळवलेला नफा ! हा अंतिम निर्णय जरी महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन विचार केला तर अंतिम निर्णय काय मिळाला ह्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिक तो कसा मिळविला गेला ही बाब महत्त्वाची ठरते. सातत्याने यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र, नैतिक मार्गाने वाटचाल करण्याची प्रबळ इच्छाशक्ती वगैरे घटक महत्त्वाचे ठरतात. कसोटी क्रिकेट म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला जीवनाविषयी खूप काही शिकवतात. अनिर्णित सामना हा लौकिकार्थाने विजय नाही पण सिडनीचा पराकाष्ठेने अनिर्णित ठेवलेला सामना अनेक विजयांपेक्षा रसिकांच्या ह्दयात वरच्या स्थानावर राहील. 

मागच्या पिढीतील अनेकांनी वसई विरार सारख्या लांबवरच्या भागातून चर्चगेटला येऊन आयुष्यभर नोकरी केली. पगार काही आताच्या पिढीइतका आकर्षक नसला तरीही त्यांनी एक शिस्तबद्ध आयुष्य जगण्यात, संस़्कारक्षम अशी दुसरी पिढी घडविण्यात आपल्या आयुष्याचे सार्थक मानलं. चर्चगेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकलमध्ये उडी मारुन पटकावलेली विंडो सीट दिवसातील समाधानाचा एक क्षण म्हणुन  त्यांना पुरेशी होती. गलेलठ्ठ बचत बँकेत नसली तरीही समाधानाची पुरेशी पुंजी त्यांनी बाळगली. कसोटी क्रिकेटसुद्धा काहीसं असंच! झटपट लोकप्रियता मिळवुन देणारं हे माध्यम राहिलं नाही, पण समाधान मात्र भरभरुन देऊ शकतं !

काही महिन्यांपूर्वी मी विहारी आणि पुजारावर एक पोस्ट लिहली होती. वर्षातील बहुतांश वेळ भारतीय संघापासुन दुर रहात एकट्याने सराव करणं, वर्षात पंधरा वीस मिळणाऱ्या फलंदाजीच्या संधीचं मोल करणं ह्यासाठी मोठा मनाचा निग्रह लागतो. हे दोघे तो भरभरून दाखवतात, आता त्यात अश्विन सुद्धा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

अजून एक गोष्ट! फलंदाज म्हणून अजिंक्य ह्या कसोटीवर आपला फारसा ठसा उमटवु शकला नाही पण त्याच्यासाठी संघातील प्रत्येकाने शत प्रतिशत योगदान दिले. मी घाईघाईने अनुमान बांधणार नाही पण कर्णधार असो वा व्यवस्थापक असो, जो आपल्या संघसदस्याला व्यक्त होण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक देतो त्याच्यासाठी सदस्य जिवापाड मेहनत करण्यास तयार असतात हा नेहमीचा अनुभव असतो

आँस्ट्रलियानं आपला दुसरा डाव सहा गडी बाद असतानाच घोषित केला होता. डाव घोषित कधी करावा ही कसोटी क्रिकेट मधील एक खास जागा ! कधी उगाचच डाव लांबविला असा दोष कप्तानाच्या माथी येऊ शकतो तर कधी उगाचच आक्रमकता दाखवली जाऊन सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. दोन कसोटीआधी ज्या संघाला छत्तीस धावांत गारद केले त्यांच्यापुढे तीनशे साडेतीनशेच्या पलीकडे लक्ष्य ठेवण्यात काय हशील आहे असा विचार नक्कीच पेनच्या मनात आला असणार. पण त्यांनं अँडलेड आणि सिडनीच्या खेळपट्टींमधला फरक बरोबर जाणला. जर तर ला खरोखरच अर्थ नसतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोहितला हुकचा फटका मारून बाद होण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर किंवा पंत अजून तासभर टिकून राहिला असता तर चारशेचे लक्ष्य चौथ्या डावात सुद्धा सहज गाठले असते असं ज्याप्रमाणे आपल्याला वाटु शकतं त्याचप्रमाणे पेनने मोक्याच्या क्षणी झेल सोडले नसते तर विजय आँस्ट्रलियाच्या अगदी समीप होता. धावफलक फसवा असतो, त्यानं भारतानं दुसऱ्या डावात केवळ पाचच बळी गमावले असं दाखवलं असलं तरी जाडेजा जायबंदी होता आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कमिन्स आणि मंडळींना बहुधा सात आठ षटके पुरेशी ठरु शकली असती. हे लक्षात घेतलं तर अश्विन आणि विहारी ह्यांच्या खेळीचं महत्व ध्यानात येतं. 

Sledging मुळे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रमाणात आपले नुकसान होऊ शकते हा धडा जरी पेनला जरी मिळाला असला तरी आजच्या काळात आपण सर्वांनी तो लक्षात घेण्यास काही हरकत नसावी. आपले काम योग्य प्रकारे करत रहावे, उगाचच दुसऱ्याला चुका करायला भाग पाडण्यासाठी आपली शक्ती वाया घालु नये. 

ज्या क्षणी सामना अनिर्णित घोषित झाला त्यावेळी विहारीने शर्ट काढून गोलगोल फिरवला नाही किंवा अश्विनने पेनला शेलक्या शब्दांत चार गोष्टी सुनावल्या नाहीत. हे सारं करण्यासाठी त्यांच्या अंगी त्राण उरलं नव्हतं हे जरी खरे असले तरी एरव्ही सुद्धा त्यांनी हे अजिबात केलं नसतं. Cricket is a Gentleman's Game ह्या उक्तीवर विश्वास ठेवणारी ही मंडळी !

भारतीय खेळाडूंनी ह्या सामन्यात जी जिद्द दर्शवली त्याला तोड नाही.  विहारी, पुजारा, अश्विन, जडेजा ह्यांनी आपल्या जखमांची / दुखापतींची पर्वा केली नाही. एकशेचाळीसच्या वेगानं सातत्यानं तुमच्या अंगावर फेकले जाणारे चेंडूचा सामना करत असताना आपल्या एकाग्रतेत भंग होणं खरं तर स्वाभाविक! पण त्यांनी आपल्या विकेटला खुप जपलं. पंत हा एक विवादाचा मुद्दा बनला आहे. त्यानं सोडलेल्या झेलांची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली. पण चौथ्या डावात आक्रमणाच्या पुर्ण तयारीत असणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचं धाडस ह्या पट्ठ्यानं दाखवलं. 

खेळपट्टी बनविणाऱ्या अनामिकाला सुद्धा अभिवादन ! पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राच्या शेवटापर्यंत खेळपट्टी उत्तमरित्या टिकली. केवळ फलंदाजांना धार्जिणी अशी ही खेळपट्टी नव्हती, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना ह्या खेळपट्टीनं पुरेसं साहाय्य केले. 

आता थोडं प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या कामगिरीविषयी! स्मिथ आणि लाबूशेन ह्यांनी एकदा का खेळपट्टीवर जम बसविला का गोलंदाजांची खैर नसते. विशेषतः भारतीय गोलंदाजांची ! स्मिथचा फलंदाजीचा पवित्रा, काही फटके विशेष प्रेक्षणीय नसले तरी धावांची टांकसाळ उघडण्यात तो माहीर आहे. लाबूशेन हा भविष्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भार समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहील ह्याविषयी शंका नाही. बाकी कमिन्स, हॅझलवूड ही गोलंदाज मंडळी प्रचंड गुणवत्ता बाळगणारी! त्यांच्यासमोर एखादा चेंडु खेळायला मिळावा अशी इच्छा मी बाळगुन आहे. स्टार्क बहुदा आता उतरणीला लागला असावा असा माझा कयास आहे. वॉर्नरला ह्या सामन्यात आपला खास प्रभाव दाखवता आला नाही. 

एकंदरीत जुन्या मुल्यांवरील विश्वास पक्का करणारी ही कसोटी ! पैशाचा बाजार मांडणाऱ्या IPL मुळे संघातील महत्त्वाच्या खेळाडुंच्या फिटनेसची काय वाताहात झाली आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत. आखातात घाईघाईनं IPL  भरविण्यात काय अर्थ होता हा प्रश्न विचारण्याची हिंमत अथवा इच्छाशक्ती कोणीच दर्शवली नाही, दोन महिन्यांपुर्वी मांडला गेलेला हा बाजार पुन्हा एप्रिलमध्ये मांडला जाईल. पण ह्या दोन बाजारांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांचा अगदी रसिकतेने आनंद लुटूयात. फलंदाजाला बाद करण्यासाठी पहिल्याच चेंडूत याँर्करच टाकायला हवा असे नाही, त्याला तीन चार उसळते चेंडू टाकून, मनात धडकी भरवुन मग अचानक याँर्कर टाकून त्याला बाद करता येऊ शकते. गोलंदाजाला सतत चौकार, षटकार मारणे आवश्यक नाही तर नवा चेंडू तासभर खेळून काढून मग दमलेल्या गोलंदाजाला नंतर नामोहरम करता येतं हे मोलाचे धडे कसोटी क्रिकेट आपल्याला शिकवतं. हे सारे धडे वरवर पाहता कदाचित समजणार नाहीत,. त्यासाठी खोलवर जायला हवं. आयुष्यात सुद्धा असंच असतं नाही! सारं काही एका समाधानी आयुष्यासाठीचे आवश्यक घटक ! Long live Test Cricket !

रविवार, ३ जानेवारी, २०२१

Have you been to Tristan da Cunha?

 


जगातील सर्वात दुर्गम किंवा बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन दुर असलेली अशी मानवी वसाहत कोणती असावी असा शोध माहितीजालावर ह्या आठवड्यात घेतला. असा शोध घेण्याचा विचार माझ्या मनात का यावा असा प्रश्न निरर्थक आहे. असा शोध घेतला असता Tristan da Cunha हे नाव पहिल्या पाच नावांत येतं. बाकीच्या वसाहतींपेक्षा ही वसाहत खास लक्षवेधक ठरली ती बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन तिच्या असलेल्या दूरवर अंतरामुळं ! दक्षिण अटलांटिक महासागरात असलेलं हा ज्वालामुखीने निर्मित बेटांचा समुह आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन  शहरापासुन साधारणतः २३०० किमी अंतरावर, सेंट हेलेनपासून २१०० किमी अंतरावर आणि फॉकलँड बेटांपासून ३४०० किमी अंतरावर असणारा हे बेटांचा समुह ! आता फॉकलँड बेटं अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्यांच्यात कधीकाळी झालेल्या युद्धामुळे माहिती आहेत, पण सेंट हेलेनचा संदर्भ कशासाठी तर ज्ञात मनुष्यवस्तीच्या कोणत्याही बिंदुपासुन हा बेटांचा समुह दूर आहे आणि तिथं गुण्यागोवींदाने मनुष्यवस्ती नांदत आहे ह्या साठी ! ह्या बेटांवर उतरण्यासाठी धावपट्टी अस्तित्वात नाही. त्यामुळं बाकीच्या पृथ्वीवासीयांशी संपर्क साधायचा असेल तर दक्षिण आफ्रिकेपासून सहा दिवसांच्या बोटीच्या प्रवासाव्यतिरिक्त पर्याय नाही. आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वर्षातुन केवळ नऊ वेळा ह्या बोटीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो. ह्या बेटांचा शोध कसा लागला आणि विविध शतकांमध्ये ह्या बेटाला धाडशी खलाशांनी कशी भेट दिली ह्याची मनोरंजक माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहेच पण ह्या बेटांच्या वेबसाईटवर तुम्हांला इथल्या रहिवाशांविषयी, ह्या बेटांच्या समुहातील प्रत्येक बेटाविषयी, इथं कसं यायचं ह्या सर्वांची इत्यंभुत माहिती मिळु शकते. सध्याची लोकसंख्या २४४ आहे आणि बेटांवर नवीन रहिवाशांना कायम वास्तव्याचा पर्याय उपलब्ध नाही. एक पर्यटक म्हणुन तुमचं स्वागत नक्कीच आहे. पण ज्या बोटीनं आलात त्या बोटीनेच बहुदा परतावं लागतं. 

पोस्टचा खरा विषय वेगळाच आहे! अशा बेटांवर जगण्याचा अनुभव कसा असावा? जगाची सध्याची लोकसंख्या जवळपास ७८० कोटी. त्यातील फक्त २४४ लोकांपैकी आपण एक ही भावना कशी असावी? बाकीच्या ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपासुन आपण दुरावले गेलो आहोत. जगाची प्रगती किती वेगानं होतं आहे आणि आपण मात्र असेच ! आपली मुलंसुद्धा प्रगतीपासुन वंचित राहणार! मनोरंजनाची मोजकी साधने, एकमेव पब वगैरे वगैरे ! आता हा दृष्टिकोन (Point of View) खरोखरी तिथल्या लोकांचा की त्यांच्यापासुन हजारो मैलांवर जगातील सर्वांत गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या शहरात आपलं बहुतांशी आयुष्य व्यतित करणाऱ्या आदित्यचा ? बहुदा केवळ आदित्यचा !

यु ट्युबवर ह्या बेटावरील एका तरुणाची मुलाखत पाहिली. ही बेटं इंग्लंडशी संलग्न! त्यामुळं बहुदा शिक्षणासाठी वगैरे ह्यातील काही तरुण मंडळी इंग्लंडला वगैरे जात असावी ! पण ह्या तरुणाला इंग्लंडमधील नियमांनी बांधलेलं जीवन आवडलं नव्हतं ! माझं स्वातंत्र्य मी तिथल्या वास्तव्यात गमावुन बसलो असा काहीसा त्याच्या बोलण्याचा सूर वाटला ! त्यानंतर  Tristan da Cunha  संबंधित काही व्हिडीओवरील टिपण्णी वाचल्या. भौतिकसुखाच्या मागे लागलेल्या त्या बहुतांशी ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपेक्षा ह्या शांत जीवन जगणाऱ्या २४४ लोकांपैकी एक बनायला मला आवडलं असतं असे बरेच लोक म्हणताहेत ! पण आता दोन आठवड्याच्या सुट्टीनंतर ज्या स्थितीत मी आहे त्यावरुन मला तरी Tristan da Cunha चे वास्तव्य जमलं नसतं असं वाटतंय. Tristan da Cunha जमायला तुम्ही बहुदा तिथंच जन्म घ्यायला हवा ! पुढील जन्म Tristan da Cunha वर होवो हे मागणं परमेश्वराकडे मागावं की नाही ह्याचा आज विचार करतोय !

मुलभूत गरजा पुर्ण झाल्यानंतर काही न करता जर माणसाला स्वस्थ बसता आलं तर मनुष्य बराच सुखी होऊ शकतो असं कधीतरी वाचलं होतं. हा काही न करता स्वस्थ बसु शकण्याचा  प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असु शकतो. काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्षे आणि कदाचित पुर्ण आयुष्यभर ! ह्यात आपण काय कमावतो आणि काय गमावतो ? शेवटी हिशोब शुन्यच असतो ! 

प्रेम धवन ह्यांचं १९७० च्या पवित्र पापी चित्रपटातील गाणे ह्या निमित्तानं आठवलं. "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं बहुत दुर बहुत दूर चला !" त्यांना जर Tristan da Cunha माहिती असतं तर कदाचित त्यांनी "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं Tristan da Cunha चला !" अशी शब्दरचना केली असती ! आणि खट्याळ किशोरकुमार ह्यांनी तिला नक्कीच उचित न्याय दिला असता !

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...