मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २८ मार्च, २०२१

आदर्शवाद आणि वास्तविकता


आज सकाळी वसईतील थोर विचारवंतांनी एक सुवचन सर्वांसोबत शेयर केलं. 

(Degree of) Idealism increases in direct proportion to one's distance from the problem - John Galsworthy

आदर्शवादाचे प्रमाण तुमच्या मुळ प्रश्नापासूनच्या अंतराच्या समप्रमाणात असतं.  

खोलवर विचार करायला भाग पाडणारं सुवचन आहे हे ! आदर्शवाद ही काही वेळा चैनीची बाब असु शकते.  आदर्शवादी विधान करुन तुम्ही शांतपणे गोल्फ खेळायला जाऊ शकता किंवा चहाचे घुटके घेत आवडीचं संगीत ऐकू शकता.  अधुनमधून मी मराठीतील नामांकित वर्तमानपत्राच्या अग्रलेखावर नजर फिरवतो. इतिहासातील मोठमोठ्या तत्ववेत्त्यांच्या विधानांचा, मराठीतील जुन्या सुवचनांचा आधार घेत सद्यकालीन अधिकारपदावरील व्यक्तींवर टीकेचे आसुड ओढणे हा ह्या अग्रलेखकारांचा  आवडता छंद आहे. त्यांच्या वाचकांना सुद्धा त्यांचे हे शालजोडीतील वाचुन आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. 

आदर्शवाद आणि वास्तववाद ह्यात बऱ्याच वेळा मोठी दरी निर्माण होते. तरीही जगाचं रहाटगाडं व्यवस्थित चालण्यासाठी दोघांची आवश्यकता आहे. आदर्शवाद प्रत्येक व्यवसायात वेगवेगळ्या रुपात आढळतो. शाळातपासणीसाठी येणारे इन्स्पेक्टर, ऑफिसात येणारे ऑडीटर, काही घरातील पालक हे आदर्शवादाचे प्रतिनिधी! आदर्शवादाच्या Point Of View (दृष्टिकोनाचे) प्रतिनिधित्व करणारे ! काळानुसार ज्याची उत्क्रांती होते तो खरा आदर्शवाद ! नाहीतर त्या आदर्शवादाचं टिकुन राहणे कठीण राहते ! 

आपण व्यावसायिक क्षेत्रातील व्यवस्थापकाचे उदाहरण घेउयात ! इथं स्त्री व्यवस्थापकाचे उदाहरण घेतले आहे ! ही बिचारी वास्तविकतेच्या ओझ्यानं दबलेली असते. तिच्या बऱ्याचशा कृती विविध गट अगदी भिंगातुन निरखुन पाहत असतात.तिची  टीम जे काही आउटपुट देत असते ते विविध मापकदंडाच्या कठोर तपासणीखाली खरं उतरत आहे की नाही हे पाहण्यासाठी ऑडिटर लोकांचा संघ बसलेला असतो. तिच्या टीमने जी काही डिलिव्हरी केली आहे ती आपल्या requirement पासुन थोडीदेखील विचलित झालेली आढळली किंवा थोडी उशिरानं आली तर ग्राहकवर्ग तक्रार करण्यास तयारच असतो. हे सर्व काम करुन घेताना ही व्यवस्थापक आपल्या कर्मचारीवर्गाला चांगली वागणूक देत आहे की हे पाहण्यासाठी HR संघ सदैव जागृत असतो. ऑडिटर, ग्राहक, HR ही मंडळी त्या व्यवस्थापकाच्या व्यावसायिक जीवनातील आदर्शवादाची रुपं ! ह्या विविध आदर्शवादांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत वेळ उरलाच तर ती आपल्या घरगुती जीवनातील भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते ! पुरुष व्यवस्थापकाची गोष्ट काही ह्याहुन वेगळी नाही! बऱ्याच वेळा व्यावसायिक जीवनात आदर्शवाद अंमलात आणण्याचा प्रयत्न करताना आपल्या घरगुती जीवनात त्याला अपराधी भावनेनं जगावं लागतं !

ह्यात मला एकच मुद्दा सांगावासा वाटतो ! दैनंदिन पातळीवरील व्यवहार चालु ठेवण्यासाठी वास्तविकता आवश्यक असते ! ही वास्तविकता ठरवुन दिलेल्या नियमांपासुन एका विशिष्ट प्रमाणाबाहेर ढळू देणार नाही ह्याची चिंता आदर्शवाद वाहतो ! आदर्शवाद मानवी मुल्यांचे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करीत राहतो.  हे हस्तांतरण स्वीकारण्यास दुसरी पिढी कितपत तयार आहे ह्यावर त्या समाजाचे स्वास्थ अवलंबुन असते! हे हस्तांतरण स्वीकारण्यास तयार नसलेला समाज काही उदाहरणांमध्ये आदर्शवादाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करतो. सध्या भोवताली जे काही चाललं आहे त्यात हेच घडत असावं असं वाटण्याजोगी परिस्थती आहे ! 

गुरुवार, २५ मार्च, २०२१

Making Of घरगुती मसाला!

मसाला शब्दाचा तसा माझा पुर्वापार संबंध ! 

१) लहानपणी शाळेत असताना एक आण्याची कोंबडी आणि चार आण्याचा मसाला ही म्हण ऐकली होती. त्यानंतर खरंतर ही म्हण विसरुन  गेलो होतो. पण मग पॉवरपॉईंट प्रेसेंटेशनने पुन्हा त्या म्हणीची आठवण करुन दिली. 

२) त्यानंतर २००८ साली कॅनडाचा सहकारी भारतात महिनाभर वास्तव्याला होता. प्रथेनुसार त्याला पंचतारांकित उपहारगृहात चमचमीत भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायची संधी देत असु. त्यानं सुद्धा तोंडदेखलं कौतुक करावं अशी आमची अपेक्षा ! पण एकदा तो म्हणाला, "आदित्य, तुम्हां लोकांना पदार्थाची मूळ चव कशी घ्यावी हे माहितच नाही ! तुम्ही तुमच्या मसाल्याच्या चवींनी पदार्थाची मुळ चव मारुन टाकता ! एखादा नदीतील गळ टाकुन पकडलेला मासा बेक / रोस्ट  करुन खाताना त्या माशाच्या मूळ चवीचा आस्वाद कसा तृप्त करुन टाकतो ! अतिथी देवो भव असल्यानं त्याच्याशी मी वाद घातला नाही! पण तु एकदा वसईतील बोंबील कालवण खाऊन बघच असे मनातल्या मनात नक्कीच म्हटलं ! बोंबलाची चव कशी आपसुक त्या कालवणाच्या थेंबाथेंबात उतरलेली असते !

३) त्यानंतर मात्र मसाल्याचा जो अनुभव आला त्यानं मला हादरवून टाकलं. एका साध्या ऑफिसातुन थेट ३०० कोटींचा मसाल्याचा उद्योग चालवला जाऊ शकतो ह्याचा साक्षात्कार ज्यावेळी मला झाला त्यावेळी cloud, cassandra, AI / MLसारं सारं काही निरर्थक वाटु लागलं मला ! कसाबसा मी त्यातुन सावरलो  ! 

पण गेले वर्षभर मसाला सतत घरात लुडबुड करत राहिला. भाजी बेचव झाली मसाल्यावर हमखास खापर फोडलं जायचं. आपण उगाचच इंग्लंडच्या फलंदाजांना दोष देत राहतो ! पण म्हटलं तर मुद्द्यात तथ्य होते. गेल्या वर्षी नेहमीचा मसाला मिळाला नव्हता ! इथुन सुरु झाला तो एक जिद्दीचा प्रवास ! मसाल्याविषयी खूप काही माहिती गोळा करण्यात आली. मसाला बनविणं हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे 

१) मसाल्याची कच्ची सामुग्री दर्जेदार असायला हवी. ह्याबाबतीत आमचे नातेवाईक असलेल्या होळीवरच्या घरत कुटुंबियातील मीनाताई आणि प्रतिभाताई ह्यांनी वाशीहून उत्तम मसाल्याची ऑर्डर देण्यात मदत केली ! त्या स्वतः वाशीला जाऊन प्रत्यक्ष तपासणी करुन मगच ऑर्डर देतात. ह्यातील काही कच्ची सामुग्री 




२)मसाला कोणत्या महिन्यात बनवावा ह्याविषयी सुद्धा सिद्धांत मांडण्यात आले आहेत ! एप्रिलपासुन आकाशात ढगांचे आगमन होण्यास सुरुवात होते. ज्यादिवशी मिरच्या सुकवाव्यात त्याच दिवशी जर ढगाळ हवामान असेल तर आली का पंचाईत ! त्यामुळं मसाला मार्चमध्ये बनवावा हा सिद्धांत!

३) मसाल्यात साधारणतः ३० - ४० विविध घटक असतात. तज्ञ लोक ह्या विविध घटकांचे प्रमाण गुप्त राखतात. मसाला अभ्यासाचा भाग म्हणुन अशा विविध तज्ञ लोकांच्या प्रमाणांची माहिती गोळा करण्यात आली. ३ किलोच्या मसाल्यासाठी इतकी सामुग्री तर दीड किलोला किती वगैरे त्रैराशिक मांडण्यात आली. मी त्यात थोडीफार मदत केली. पण सर्वच आकडेवारी मला बरोबर जमली असावी की नाही ह्याविषयी मी काहीसा साशंक आहे आणि त्यामुळं थोडं दडपण सुद्धा आले आहे! बाकी आम्ही सुद्धा हे प्रमाण गुप्त ठेवणार आहोत म्हणजे आपोआप तज्ञ लोकांत आमचा समावेश होईल ! 

४) मसाल्याच्या कच्च्या सामुग्रीत साधारणतः लोक तीन प्रकारच्या मिरच्या वापरतात. इथं पाच प्रकारच्या मिरच्या वापरण्यात आल्या आहेत ! हा ही एक मोठा निर्णय ! ह्या मिरच्या कशा सुकवाव्यात हे सुद्धा मोठं शास्त्र ! घराच्या गच्चीवर सुकवाव्यात म्हटल्या तर वाऱ्यानं उडुन जातील ही भीती !  ह्या दोन भितींमुळं त्या मिरच्यांवर पातळ फडका टाकून त्या सुकविण्यात आल्या आहेत !  सोशल मीडियावर व्हयरल झालेला हा मिरच्या सुकविण्याच्या प्रोसेसमधील फोटो ! 




शेवटी पत्र्यांवर मिरच्या सुकविण्यात आल्या आणि त्यात चांगलं यश मिळालं ! 

५) मिरच्या उन्हात सुकविल्या तरी बाकीची कच्ची सामुग्री तव्यावर खरपूस भाजुन घ्यावी लागते. हे काम आटोपण्यास दुपारी तीन ते साडेपाच ही उत्तम वेळ असं शास्त्रात म्हटलं आहे! 

६) मसाला दळून देणाऱ्या गिरण्यांना  ह्या हंगामात खास मागणी असते. काल सकाळी जाऊन ह्या गिरणीवाल्याची मी वेळ घेऊन आलो, प्रत्यक्ष मसाला दळताना ह्या लोकांना उगाचच प्रश्न विचारु नयेत. त्याचा राग ते मसाल्यावर काढू शकतात. 

अशा विविध प्रक्रियांमधून तावूनसुलाखून निघालेला हा मसाला ! 

आता हा मसाला वर्षभर टिकवायचा म्हटला तर त्याची साठवणूक सुद्धा नीट करता यायला हवी. हा मसाला पाण्याशी अजिबात संपर्क येऊ न देता बरण्यांमध्ये बंद करता यायला हवा ! माझ्यासारख्या नवख्या लोकांना जी कामे अजिबात सोपवली जात नाहीत त्यात ह्या अशा बरण्यांमधून थोड़ा मसाला काढुन देणे ह्या कामाचा समावेश होतो ! 

आता खरी परीक्षेची घडी समोर आहे ! ह्या मसाल्याची चाचणी म्हणुन तो भाजीत येत्या एक दोन दिवसांत वापरला जाईल ! त्यावेळी पहिला घास घेतल्यावर चेहऱ्यावर कसे हावभाव असावेत ह्याविषयी संशोधन सुरु आहे ! काही टिप्स असल्यास सुचवाव्यात ! 

रविवार, २१ मार्च, २०२१

कुत्र्याचे गोंडस पिल्लु आणि POV (Point of View)

 



घराभोवतालच्या परिसरात काही भटकी कुत्री भटकत असतात. साधारणतः ही मोठी कुत्री असतात. त्यांचा तसा फारसा उपद्रव नसल्यानं त्यांच्याकडं आम्ही फारसं लक्ष देत नसतो. धाक असावा म्हणुन अधूनमधून जोरानं ओरडुन त्यांना पळवुन लावण्यापलीकडं ते आमचं लक्ष वेधुन घेत नाहीत. 

पण मध्यंतरी एक घटना घडली. ह्या गटामध्ये एक कुत्र्याचं पिल्लु सहभागी झालं. दिसायला गोंडस असं ! ह्या पिल्लाच्या चेहऱ्यावर कुतूहलभावना ओसंडुन वाहत असते. बहुदा त्यानं बरीच लाडीगोडी लावून ह्या मोठ्या कुत्र्यांच्या गटात आपला शिरकाव करुन घेतला असावा असा मला दाट संशय आहे. कुत्र्याचं पिल्लु ज्यावेळी आपल्या छोट्या पंजांनी मोठ्या कुत्र्यांच्या अंगावर लाडाने थापटी मारते त्यावेळचे मोठ्या कुत्र्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे ! 

हे सारं वर्णन कुत्र्याचं पिल्लु आणि पाटील कुटुंबीय गुण्यागोविंद्याने नांदु असा समज करु देणारे ! म्हणायला गेलं तर अधूनमधून त्याला पाहुन जोराने मारलेल्या बोंबेव्यतिरीक्त ह्या द्वैराष्ट्रीय संबंधात बाधा यावी अशी आगळीक पाटील कुटुंबियांकडून घडली नव्हती! जे काही घडलं त्याला सर्वस्वी हे कुत्र्याचे पिल्लुच जबाबदार असं विधान कुटुंबियांचा जबाबदार प्रतिनिधी म्हणुन मी करु इच्छितो. 

तर झालं असं ! घराबाहेरच्या परिसरात फिरण्यासाठी असलेली पादत्राणे आम्ही दरवाजाबाहेर ठेवतो. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे हो ती ! दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी किंवा रात्री साडेनऊनंतर सर्व काही सामसुम झाल्यानंतर ही टोळी परिसरात एक फेरफटका मारण्यासाठी येते. अशा वेळी जन्मजात असलेल्या कौतुहलभावनेनं ह्या पिल्लुच्या सारासारबुद्धीचा ताबा घेतला असावा. सर्वप्रथम आमचे जे दोन स्लिपर्सचे जोड आहेत त्याकडं ह्या पिल्लुचं लक्ष गेलं. निळ्या जोडातील एक आणि लाल जोडातील एक अशा दोन स्लीपर्स घेऊन त्यानं पलायन केलं. बहुदा मोठ्या कुत्र्यांनी त्याचा रंगशिकवणीचा वर्ग आयोजित केला असल्यानं त्याला दोन्ही रंगाचे एकेक स्लीपर्स हवे असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी गडबड उडाली. पण आता एक लाल आणि एक निळी अशा स्लिपर्सची आम्ही सवय करुन घेतली आहे. काल दुपारी घरी आलेल्या बाईंची चप्पल पळविली त्यानं ! नशिबानं परिसरात मिळाली ! 

त्यानं केवळ पाटील कुटुंबियांवर लक्ष केंद्रित केलं आहे असं नाही. शेजाऱ्यांच्या पादत्राणांना सुद्धा त्यानं योग्य न्याय दिला आहे. आज सकाळी गेटबाहेर त्यानं आणुन टाकलेलं हे असंच एक चप्पल ! 


त्याच्या ह्या कारवायांना वैतागुन त्याला दुषण देणं हा झाला मनुष्याचा दृष्टिकोन (Point Of View). पण आपल्याला त्या पिल्लुचा दृष्टिकोन सुद्धा लक्षात घ्यायला हवा ना ! ईश्वरानं त्याला ह्या पृथ्वीवर जन्म दिला ! जन्मासोबत कुतूहलभावनासुद्धा दिली ! त्याच्यासाठी ह्या रंगीबेरंगी स्लीपर्स किंवा बाकी चपला ह्या एक प्रकारे खेळणं असणार ! आपल्या संदर्भाने हे आम्हांला आमचं घर वाटत असणार तर त्या पिल्लुच्या आणि कुत्र्यांच्या संदर्भाने तो त्यांचा भुभाग असणार ! मग ह्या स्लिपर्स गायब होण्याच्या प्रकारात त्याची पुर्णपणे चूक म्हणता येणार नाही ना ! 

थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्यात ज्या ज्या वेळी आपला दुसऱ्या जीवांशी, वृक्षांशी संबंध येत असतो त्या त्या वेळी त्यांचा सुद्धा एक दृष्टिकोन असतो हे ध्यानात असलं पाहिजे ! जीवन एकांगी दृष्टीकोनातुन नसावं त्यात सहजीवनाची भावना असावी ! 

ह्या साक्षात्काराबद्दल धन्यवाद पिल्लु !

(तळटीप - ह्या पोस्टसाठी त्याचा फोटो असावा म्हणुन आज सकाळपासुन मी त्याची वाट पाहत होतो. शेवटी मगाशी काही वेळापुर्वी त्याचं अंगणात आगमन झालं. मी जवळ जाऊन त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर ते पळालं. आता लोक म्हणतात शस्त्रांनी केलेले वार भरुन निघतील पण शब्दांचे नाही ! त्याचप्रमाणे कदाचित पिल्लु म्हणाले असेल एकवेळ दगड मारला तर चालेल पण बोंब नको ! )

शनिवार, ६ मार्च, २०२१

तुमच्या, आमच्या, सर्वांच्या कार्बन पाऊलखुणा !!!

 

माणसं निरागसतेनं सोशल मीडियावर वावरत असतात. म्हणजे ते आपल्या निरागसतेविषयी स्वतःला ठामपणे बजावत असतात. आपला सोशल मीडियावरील वावर हा मनात कोणताही वाईट हेतु न बाळगता असतो असं सर्वांनाच वाटत असतं. परंतु खरोखर पाहता असला काही प्रकार असतो का ह्याविषयी मी साशंक आहे !! 

प्रत्यक्ष जीवनात जसा आपल्या उपस्थितीने काहीजणांना आनंद होतो तर काहींना नाही! तसलाच काहीसा प्रकार सोशल मीडियावरसुद्धा असतो. तुमच्या किमान तटस्थ उपस्थितीची एक लक्ष्मणरेषा असते; तुम्ही जोवर त्या मर्यादेत असता तोवर तुमचं अस्तित्व कोणालाच खटकत नाही. पण विविध कारणास्तव लोक ही मर्यादा ओलांडतात. 

कधी आयुष्याच्या एका टप्प्यावर लोकांचा आत्मविश्वास बळावतो आणि ते जगापुढे सादर होतात. काही उदाहरणांत लोकांना आपल्या भिडस्तपणावर मात करण्यात यश मिळते आणि मग ते सातत्यानं जगापुढं सादर होऊ लागतात. 

जगापुढं एखाद्या व्यक्तीनं सादर होण्यास सुरुवात करणे ही एक विश्लेषण करण्यास योग्य अशी घटना आहे. सोशल मीडियावर सादर होणाऱ्या माणसांसाठी सोशल मीडियाने आधीच काही विशिष्ट विशेषणांची यादी बनविलेली असते. सोशल मीडियावरील तुम्ही निर्माण केलेल्या काही डेटा पॉईंट्सच्या आधाराने त्यातील काही विशेषणे तुमच्याशी जोडली जातात. बऱ्याच वेळा वेगवेगळे गट तुम्हांला वेगवेगळ्या विशेषणांशी जोडतात. 

आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होण्याच्या गरजेला प्राधान्य द्यावं की आपण कोणत्या विशेषणांशी जोडले जात आहोत ह्याची चिंता करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न! सोशल मीडियावर व्यक्त होण्याची गरज काही जणांच्या बाबतीत अगदी तीव्र असते. त्या क्षणाला व्यक्त झाल्याशिवाय चैन पडत नाही अशी ही अवस्था असते. 

व्यक्त होणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा दोन शक्यता संभवतात. काहीजण आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या विशेषणांची चिंता करत असल्यानं घाबरत-घुबरत व्यक्त होतात तर काहीजण विशेषणांची अजिबात चिंता करत नाहीत आणि अगदी मुक्तपणे व्यक्त होतात !  

पोस्टचे शीर्षक काहीसं गैरसमज निर्माण करणारे आहे. काहीजणांचा सोशल मीडियावरील वावर बऱ्याच जणांना आनंददायी असतो. त्यामुळं सरसकट त्याला कार्बन पाऊलखुणा संबोधणे योग्य नाही. तरीही तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालात तर नक्कीच कोणाला तरी तुमच्या वावराचा काहीसा त्रास झाला असेल ही शक्यता निर्माण होते! 

त्यामुळं दररोज रात्री झोपण्याआधी स्वतःशीच खालील काही वाक्यं म्हणणे इष्ट !

हे सर्वशक्तिमाना !

सोशल मीडियावरील आज माझ्या अल्पमतीला अनुसरुन मी काही प्रमाणात वावर केला !

ह्या वावराने जाणता अजाणता भूतलावरील प्रेमळ व्यक्तींना कष्ट पोहोचले असू शकतात.  

ह्या घटनेबद्दल मला नक्कीच वाईट वाटतंय ! 

ह्या कष्टनिर्मितीचे अचुक विश्लेषण जर मला प्राप्त झालं तर नक्कीच मी माझ्या वावरात बदल घडवुन आणीन!!!

सोमवार, १ मार्च, २०२१

सावर रे सावर रे !!

मध्यंतरी काही प्रतिकुल म्हणाव्या अशा गोष्टी एकत्र घडल्या. म्हटलं तर प्रतिकुल; म्हटलं तर नाही! म्हणजे झालं काय तर कार्यालयीन विश्वात  एक असं किचकट काम पदरात पडलं ज्यात मेहनतीच्या पलीकडं एका अनोळखी प्रांतातील ज्ञान आवश्यक होते, वसईतील थंडीनं बराच जम बसविला, मी ऑनलाईन बुद्धिबळाच्या आहारी गेलो (अजुनही त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय !) आणि त्यात भर म्हणुन बागकामासाठीचा पंप बंद पडला. गेले महिनाभर विविध तज्ञ लोकांना विनंती करुन सुद्धा अजुन तो काही दुरुस्त झाला नाही. बहुदा नवीन घ्यावा लागेल ! 

ह्यात झालं असं की बाग सुकू लागली. थंडी, कार्यालयीन काम आणि बुद्धिबळ ह्या घटकांमुळे मी काहीसा उदासीन झालो. दररोज ही सुकणारी छोटी झाडं पाहुन मन दुःखी व्हायचं, पण का कोणास ठाऊक जिद्द कमी पडत होती. थोडीफार मोठी झाडं जशी की काही वर्षांची जास्वंदी वगैरेनी पाण्याअभावीसुद्धा टिकाव धरला. पण गेल्या एक जूनला लावलेली जास्वंदीची फांदी, 



इतके महिने सतत पाण्याची सवय झालेल्या दुर्वा वगैरे बिचाऱ्या पाण्याअभावी झुरू लागल्या. 


त्यातल्या काही अगदी सुकल्या देखील ! 


ब्राह्मी आणि लिलीच्या हिरवेगारपणा काहीसा लयीला गेला ! 



अचानक गेल्या आठवड्यात काही घटना घडल्या. थंडीचा जोर कमी झाला, कार्यालयीन काम काहीसं आटोक्यात आलं. आणि मग शनिवारी अचानक मुड सुधारला. विहिरीला दाजींनी नवीन रस्सी सुद्धा आणली. 


मग ऍमेझॉनवरील आणलेली झारी घेतली. हाताने विहिरीचे पाणी उपसुन झाडांना पाणी देण्याचा उद्योग सुरु केलाय. य चांगलं वाटतंय ! 



गेले दोन दिवस ह्या सर्व इवल्या झाडांना दररोज पाणी देतोय! त्यांची नाराजी दूर व्हायला खुप वेळ लागणार ! गेले काही दिवस मी बाजुने जाऊन सुद्धा मी पाणी देत नाही हे पाहुन सुद्धा त्यांना कसं वाटलं असेल ?  त्यांनी माझ्याविषयी गमावलेला विश्वास मी परत मिळवु शकेन का? आता माझा आशावाद कायम राहो ही अपॆक्षा !  आज सकाळी दिसलेल्या दुसऱ्या बहरातील जांभळाच्या फुलाचा फोटो ! 



पोस्टचा मुख्य मुद्दा ! ह्या सर्व प्रकारात ऑनलाईन बुद्धिबळाच्या आहारी जाणं हा खुप चिंताजनक प्रकार वाटतोय मला ! माझ्यासारख्या एका जीवनात स्थिरावलेल्या माणसाच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार होऊ शकतो !माझं  chess.com वरील मानांकन १४२५ वर जाऊन मग ह्या काळात ते १२५० च्या आसपास घसरले. मनःस्थिती चांगली नसताना ह्या पातळीवरील खेळाडूंशी सतत खेळु नये हे कळुन सुद्धा वळत नव्हते ! जगातील माणसं सतत तुमच्याशी खेळायला तयार असतात. सामना हरला की पुढील सामना जिंकायला हवाच ही एक वेगळीच भावना तुमचा ताबा घेते. ह्यात खिलाडुभावना कमी आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची खुमखुमी जास्त असते. प्रतिस्पर्ध्याला हरविण्याची खुमखुमी सतत तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला आव्हान देत असते. आभासी दुनियेतील हा झाला एक प्रकार. दुसरा एक प्रकार ज्या बाबतीत मी काहीसा नशीबवान ठरलो तो ऍमेझॉन प्राईमचे अंगी ओढवुन घेतलेले सदस्यत्व ! इथंही जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय विविध मालिका, चित्रपट सतत तुमच्यासमोर येत राहतात. ह्याच्यापासुन स्वतःला वाचविणे हे भविष्यकाळातील सर्वांपुढं आणि खासकरुन तरुण पिढीपुढं मोठं आव्हान ठरणार आहे. 

निसर्गाची आवड, छापलेल्या पुस्तकवाचनाची ओढ आणि चांगल्या मित्रांची संगत ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच पुढील काळातील मानसिक स्वास्थ्याचा आशेचा किरण ठरणार आहेत ! आपण ऑनलाईन दुनियेतील एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो आहोत हे मान्य करणे हा ह्यातून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...