मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

सरदार पटेल अभियांत्रिकी विद्यालय स्थापत्यशाखा स्नेहसंमेलन



काही वर्षांपुर्वी महाविद्यालयीन जीवनाचा नकोनकोसा वाटणारा निरोप घेऊन आम्ही सर्व मित्रमंडळी विविध दिशांना विखरलो. काहीजणांनी पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करला, काहीजणांनी नोकरी पत्करली. त्यानंतर आयुष्य आम्हां सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे भेटत राहिलं, आम्ही सुद्धा एकमेकांना छोट्यामोठ्या ग्रुपच्या स्वरूपात अधुनमधून जमेल तसे भेटत राहिलो. परंतु एकत्रितपणे भेटण्याचा योग आला नव्हता. 

ह्या वर्षी मात्र एकत्रितपणे भेटण्याचा विचार बऱ्यापैकी जोर धरु लागला.  सुरुवातीला साठ जणांच्या बॅचपैकी बरेचजण ह्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहु शकतील अशी आशा वाटली होती. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर या देशांमध्ये बरेचसे सहाध्यायी वास्तव्य करुन आहेत. ठरवलेल्या 10 ऑगस्ट ह्या दिवशी स्नेहसंमेलनाला उपस्थित राहणे काहीजणांना  जमत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांना जमतंय त्यांना एकत्र घेऊन या दिवशी हे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सतेज,  सुगंध, सचिन या मंडळींनी ठाणे येथील ब्ल्यू रुफ क्लब ह्या रिसॉर्टचं आरक्षण आदल्या शनिवारी भर पावसात केलं. बावीसजणांनी ह्या स्नेहसंमेलनासाठी आपला सहभाग निश्चित केला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या आमच्या या सर्व मित्रमंडळींनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ही सर्व मंडळी एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यातील अनुभवांविषयी बोलणं व्हावं ही कल्पना आशुतोषने मांडली. 

अभियांत्रिकी शिक्षण समाप्त झालं त्यावेळी आयुष्याच्या एका भव्य पटावर आम्ही सर्व उतरलो होतो. आयुष्य सुंदर असतं असं म्हटलं जातं ते खरं असलं तरी आयुष्याची ही सुंदरता सर्वांनाच काही सहजासहजी अनुभवायला मिळत नाही.  जसंजसं  प्रत्येकजण आपले अनुभव सांगू लागला तसतसं  "The journey has been sinusoidal" मंदारचे हे शब्द बहुतांशी सर्वांच्याच आयुष्याला लागू पडले आहेत हे आम्हांला जाणवत गेलं.  काहींचं या आयुष्याच्या आलेखाच्या शिखरावरील आगमन लवकर झालं तर काहींना शिखरावर पोहोचण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. 

या बावीसजणांच्या समुहाच्या अनुभवांची व्याप्ती खूप मोठी आहे. काहींनी आपल्या स्थापत्य अभियांत्रिकीशी बांधिलकी कायम राखत स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये आपले करियर प्रगतीपथावर नेले आहे.  यात Structural Engineering, Environmental Engineering, Geotechnical Engineering ह्या आणि अनेक स्थापत्यशाखेच्या उपशाखांचा समावेश होतो. 

धारिया जोडप्याने स्वतंत्रपणे व्यवसाय सांभाळत जी उंची गाठली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी ही बुद्धिबळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सहभाग घेते.  हे दोघेही आपल्या या व्यवसायाला सांभाळत तिच्यासोबत देशभर आणि विदेशात सुद्धा प्रवास करीत असतात. प्रवासात असताना सुद्धा आपल्या क्लायंटसना खोळंबुन राहायला लागु नये ह्यासाठी त्यांनी आपल्या व्यवसायात जे संगणकीकरण केले आहे, बहुतांशी निर्णय हे परदेशातूनसुद्धा एका माऊसच्या क्लिकवर घेण्याची क्षमता विकसित केली आहे ते ऐकून खूप आनंद झाला. 

ठाकूरदेसाई जोडप्याची मुलगी ही राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळते.  तिच्या बॅडमिंटन खेळातील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ठाकूरदेसाई जोडप्याने आपल्या करिअरमध्ये बऱ्याच तडजोडी केल्या आहेत. परंतु या तडजोडी कराव्या लागल्या असुनसुद्धा दोघेही आज उच्चपदस्थ आहेत. मुलीविषयी बोलताना आई कशी भावनाविवश होऊ शकते ह्याचा अनुभव आम्ही घेतला. 

द्वि / त्रिपदवीधर अशी मंडळीसुद्धा उपस्थित होती. त्यांची मनोगते ऐकून धन्य व्हायला झालं. विविध देशांतील आपल्या वास्तव्याचे सुरेख वर्णन जोशी आणि आफळे ह्यांनी नमुद केले. इतके वर्षांनीही आम्ही खेळकरपणा बाळगुन ठेवला आहे. त्यामुळे उगाच नडायला (खास कॉलेजचा शब्द!) म्हणुन परदेश सुंदर आहे तसा भारतही सुंदर आहे ह्याची प्रेमळ आठवण सुद्धा करुन देण्यात आली! गुंतवणूक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समितचे मनोगत सुद्धा अगदी प्रांजळ होते. प्रवासक्षेत्रात आपला व्यवसाय उभ्या करणाऱ्या माधुरीने आपले अनुभव नमुद केले. अंबानी कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून ज्याने काम केलं असं म्हणण्याइतकी जवळीक निर्माण करणारा मिश्किल राहुल आपले अनुभव सादर करत होता. गुण्यानं आपलं मनीचे मनिला मनोगत दिलखुलासपणे सादर केलं. आदल्या रात्री मनिलाहुन प्रदीर्घ प्रवास करुन आलेल्या सतीशचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यानं सादर केलेल्या काही स्टेप्सचा आज मी सराव केला.

सतेज आमच्यावर काही काळ नाराज झाला. ह्याची सुरुवात खरंतर मीच केली. बोलताना सहजपणे मी खरोखर स्थापत्यशास्त्र शाखेसाठी योग्य माणूस होतो का याविषयी शंका निर्माण केली.  अजुन एक दोघांनी त्याची री ओढली. हे सर्व ऐकणारा सतेज काहीसा नाराज झाला होता. आपल्या मनोगतामध्ये त्याने आपली ही खंत व्यक्त केली. बाकी कोणाला काही वाटो पण मला मात्र स्थापत्य शाखा नक्कीच आवडत होती अशा आपल्या भावना त्याने व्यक्त केल्या. एक व्यावसायिक म्हणून मुंबईत कार्यरत असताना येणारे वास्तववादी अनुभव त्याने अत्यंत सुरेखरित्या नमुद केले. 

बोलताना सतत खुर्ची मागे ढकलणाऱ्या मंगेशला पाहून त्याच्याविषयी वाटणाऱ्या काळजीपायी सुगंध सदैव बेचैन होत होता. शेवटी न राहवुन त्यानं मंगेशला थांबवलं! त्याची ही बेचैनी पाहून शेवटी मंगेश एका जागी स्थिरावला! बहुभाषिक वर्ग असला तरी बोलताना अधून मधून मराठीचा वापर होत होता, त्यामुळेच की काय गुजराथी भाषिक नीताने आपल्या पटेल या आडनावावर सुरेख कोटी केली. ती म्हणाली की माझे आडनाव पटेल असल्याने मी तुम्हां सर्वांकडुन बरीच आशा बाळगून होते! परंतु शेवटी तुम्ही सर्वांनी निराशा केलीत ! 

जेवण अत्यंत स्वादिष्ट होते. श्रावणी शनिवार असल्याने केवळ शाकाहारी पर्यायांकडे लक्ष देत जेवणाचा निखळ आनंद घेतला. जेवणानंतर आलेल्या आमच्या होस्टने आम्हांला काही मनोरंजक खेळ खेळायला लावून आमचं शैथिल्य नाहीसं केलं. त्यानंतर मग आमच्यात निर्माण असलेल्या नवचैतन्याचा फायदा घेत त्याने आम्हांला  जोडीनाच करावयास लावला.  इथं करावयास लावला हा शब्दप्रयोग सुरुवातीच्या काही क्षणापुरताच योग्य ठरेल. त्यानंतर मंडळी अगदी सुटलीच! लोकांनी धमाल नृत्य केली.  ह्या नृत्याच्या सार्वजनिक मीडियावरील प्रसिद्धीचे मर्यादित अधिकार आणि त्यासंबंधित अत्यंत कठोर अटी ह्यामुळं हा अप्रतिम नृत्याविष्कार इथं सादर करता येणार नाही. त्यामुळे वाचक वर्ग एका अप्रतिम सादरीकरणाला मुकला तरी माझा नाईलाज आहे!

हल्ली हाय टी  नावाचा प्रकार प्रमाणाबाहेर प्रचलित होऊ लागला आहे! कुठं उंचावर चहाची किटली ठेवून त्यातील चहा तुम्हांला प्राशन करायला भाग पाडत असावेत असा तुमचा जर समज होत असेल तर तुम्ही कदाचित एकटे नाही आहात! यामध्ये चहासोबत तुम्हाला एक किंवा अधिक नाश्त्याचे  पदार्थ दिले जाता.  काल पेश करण्यात आलेला बटाटवडा चविष्ट होता. आमच्यातील जी काही मंडळी दीक्षित वगैरे फॉलो करत होती (अथवा करत असावीत असा आम्हांला संशय आहे ) त्यांनी कालच्यापुरता आपला नित्यक्रम बाजूला ठेवला होता! परंतु बटाटवडा नक्कीच चविष्ट होता. 

त्यानंतर राहुलने सर्वांना वर्तुळाकार मांडणीमध्ये बसून आपला आवडता चित्रपट आणि त्यानंतर कोणत्याही चित्रपटातील आवडते संवाद सांगण्यास सांगितले. हे सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारे होते. राहुल हा महाविद्यालयीन  जीवनापासुन हिंदी / इंग्लिश चित्रपटांविषयी उत्तम व्यासंगी म्हणुन प्रसिद्ध आहे. मंडळी एव्हाना बरीच मनमोकळेपणाने गप्पा मारु लागली होती. त्यामुळं दोन रुपये तिकीट दर असलेल्या चित्रपटाला आपण कसे दररोज हजेरी लावत होतो वगैरे चर्चा ऐकावयास मिळाल्या! आजही कॉलेजातील शेवटच्या बाकावर बसुन केलेल्या धमालीची आठवण येते हे सांगताना नीताच्या डोळ्यात अश्रुंनी प्रवेश केला. 

त्यानंतर चर्चा पर्यायी व्यवसायांकडे वळली.  ही देखील एक उत्तम चर्चा झाली. आर्थिक प्राप्ती आणि मानसिक समाधान या दोन घटकांमध्ये कुठेतरी पर्यायी व्यवसायांचे निर्णय घुटमळत असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जडणघडणीनुसार आणि आयुष्यातील सद्यस्थितीनुसार हा निर्णय घेत असावी.  

खरंतर साडेपाच-सहा होत आले तरी तिथून पाय काढायची इच्छा होत नव्हती. परंतु घोडबंदर सु(?)प्रसिद्ध ट्रॅफिक जॅमच्या  भयाने आम्ही तिथून सहा वाजता काढता पाय घेतला!  एका संस्मरणीय स्नेहसंमेलनाची सांगता झाली! सायंकाळी केलेल्या चर्चेनुसार पुढील स्नेहसंमेलनासाठी अजुनइतका दीर्घकाळ आम्ही नक्कीच थांबणार नाहीत हा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला !

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

संसार से भागे फिरते हो !



एका निवांत अशा शनिवार सकाळी आज फुरसतीने जाग आली. कोणालाही शाळा ऑफिसात जायचे नसल्यामुळे जाग येऊन सुद्धा घड्याळाकडे पाहण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु ज्यावेळी उठून घड्याळाकडे पाहिलं, त्यावेळी सव्वासात वाजलेले पाहून काहीसं आश्चर्यच वाटलं. पावसाळी ढगांनी अंधार केला असल्यामुळे इतके वाजून गेले तरी कळलंच नाही. 

प्रत्येक शनिवारी सकाळी मनात काहीशी संभ्रमाची परिस्थिती असते.  पुढील दोन दिवस नक्की काय करावं म्हणजे मनाला समाधान वाटेल हा विचार शनिवार सकाळी चहा पिताना प्रकर्षानं वावरत असतो. ह्या क्षणी आपल्यासमोर काही पर्याय असतात. वसईला एखादी फेरी मारावी, सर्व कुटुंबियांना भेटुन यावे, मुंबईतील नातेवाईकांना भेटावं  हा पहिला विचार डोक्यात घोळत असतो. 

कार्यालयीन कामांमध्ये विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासारख्या काही बाबी असतात. पाचही दिवस यावर सखोल विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला नसतो.  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यासाठी काही वेगळा वेळ काढून मनातील विचार सुसंगतपणे मांडावेत, ते योग्य लोकांपुढे ई-मेल द्वारे पोहोचवावे हा विचार प्रामुख्यानं मनात येतो. 

घरातील पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत क्वालिटी टाइम व्यतित करावा हाही विचार मनात असतोच! परंतु आपण ज्यावेळी क्वालिटी टाइम व्यतित करण्याच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी त्यांनीसुद्धा त्याच मूडमध्ये असणे आवश्यक नसते. अशाप्रकारे चहा संपेपर्यंत मनामध्ये ह्या सर्व आदर्शवादी विचारांची यादी अस्ताव्यस्त स्वरुपात का होईना पण तयार झालेली असते!

शनिवार हळूहळू पुढे सरकत जातो. दैनंदिन व्यवहारातील गोष्टी बऱ्याच वेळा प्राधान्यक्रमात आदर्शवादी विचारांच्या वरती जात राहतात. या सर्व प्रकारात अजून एक गोष्ट होत राहते. शनिवारचे इतके तास गेले तरीही आपण ठरवलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट सुरु केली नाही ह्याविषयी काहीशी अस्वस्थता मनात निर्माण झालेली असते. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आधी जे काही घडून गेलं ते विसरून जाऊन उपलब्ध असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा उर्वरित प्रत्येक मिनिट आणि तास ह्यांचा आपण मुळ उत्साहाने आदर्शवादी गोष्टींवर काम करण्यासाठी वापर करू शकतो. 

या आठवड्यात एका रात्री परत येताना मीनाकुमारीची बरीचशी गाणी कारमध्ये ऐकण्याचा योग आला. त्यामध्ये आधी ऐकलेलं, पुन्हा आवडून गेलेलं "संसारसे भागे फिरते हो भगवान को क्या पाओगे " हे गाणं पुन्हा ऐकलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी ते युट्युबवर पाहिलं, व्हाट्सअप स्टेटसवर टाकून दिलं! व्हाट्सअँप स्टेटस किती दिवसांनी, मिनिटांनी बदलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? शेवटी भगवंत हा काही केवळ मंदिरात, तीर्थक्षेत्रातच वास्तव्य करत नाही. आपली जी काही कर्तव्यं आहेत ती कर्तव्यं व्यवस्थितपणे पार पाडत असताना, पार पाडल्यावर जी काही कर्तव्यपूर्तीची भावना वा समाधान मनात निर्माण होते ते सुद्धा भगवंताचे एक रूप होय! त्यामुळे आपल्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेकडे प्रत्येकाने योग्य लक्ष देणे हे आवश्यक आहे. 

आता परत वळुयात ते शनिवार सकाळच्या चहाच्या वेळी बनवलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनातून बनवलेल्या आपल्या टुडू लिस्ट मधील गोष्टींकडे! शनिवार पुढे सरकत जातो, शनिवारी रात्री थोडं उशिरा झोपुन विकेंडला अजून जास्त लांबवल्याचं समाधान मानता येतं! 
ह्या सर्वात कधी एकदाचा रविवार उजाडतो ते समजत नाही! एकदा का रविवार उजाडला की रविवारचे सर्व व्याप आटपून सायंकाळ कधी उजाडते हेही समजत नाही! मग मनात उतरते ती एक असमाधानाची भावना!! शनिवारी सकाळी बनवलेल्या आदर्शवादी यादीतील फार कमी कामे पूर्ण झालेली असतात, एका अत्यंत व्यग्र अशा सप्ताहाची चाहूल तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत राहते!

परंतु याच गोष्टीकडं तुम्हांला दुसऱ्या प्रकारे पाहता येईल. तुमच्यापुढं व्यग्र राहण्यासाठी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,  तुमच्याभोवती तुमच्याकडून अपेक्षा असणारी बरेच माणसे आहेत! हे सर्व घटक तुम्ही दुनियेतील काही सुदैवी माणसांपैकी एक असल्याचे प्रतिक आहे.  त्यामुळे रविवार संध्याकाळी केवळ एकच गाणे ऐकावे संसार से क्या भागे फिरते हो !

जाता जाता आज सकाळी पडणाऱ्या धुंद पावसाचं एक छायाचित्र ह्या पोस्टच्या सुरुवातीला ! पावसामुळं काही कामं टाकुन घरात बसणाऱ्या मला माझे ऑफिसात गेलेले मित्र कदाचित "बारिश से क्या डरके बैठे हो !" म्हणत असावेत !!

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...