मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

२०३० सालातील चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याची व्याख्या !



गेल्या काही दिवसातील घटनांमुळे खरा क्रिकेट रसिक हा भारतीय क्रिकेटपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे असे विधान मी फेसबुकवर केले.  मला सडेतोड प्रतिक्रिया देणाऱ्या एका मित्रानं तुला ही जाणीव होण्यासाठी इतका वेळ लागला याविषयी आश्चर्य प्रकट करत हे सारं गेल्या १८-२० वर्षापासून चालू आहे असे विधान केले. आज सकाळी एका निर्भीड मित्रांने  भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेल्या आयपीएल ने त्यांच्यावर लक्ष न देता परदेशी खेळाडूंवर वीस ते चोवीस कोटी रुपयांची गंगाजळी खर्च करणाऱ्या आयपीएल मालकांविषयी मत व्यक्त करा अशी मागणी केली.  त्यामुळे लिहिण्यात आलेली आजची ही पोस्ट!
 
आयपीएल ही भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेली  क्रीडास्पर्धा या विधानाशी मी सहमत नाही.  हा एक बाजार आहे हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.  बदलत्या काळात मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणून क्रिकेटकडे बघणारा जो बहुसंख्य क्रिकेट रसिक वर्ग भारतात निर्माण झाला आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आयपीएल हे निर्माण करण्यात आले.  या रसिक वर्गाच्या क्रयशक्तीवर आधारित एक मोठी बाजारपेठ आयपीएल निमित्ताने निर्माण करण्यात आली. स्टेडियममध्ये चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या कोक, बर्गर इत्यादींपासून ते आयपीएल सामन्यात दरम्यान ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये मोजण्यासाठी तयार असलेल्या तंबाखूच्या उत्पादकांपर्यंत या बाजारपेठेचे जाळे पसरले आहे.  त्यात भर पडावी  म्हणून प्रत्येक फ्रेंचाईसीने आपले टी-शर्ट आणि तत्सम वस्तूंची निर्मिती केली आहे. 

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे! गेल्या ४०-५० वर्षांपर्यंत चांगलं आणि सुसंस्कृत वागणं याविषयी प्रत्येक राज्यातील मध्यमवर्गाने आपापल्या विशिष्ट प्रतिमा उभ्या केल्या होत्या. ही चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याविषयीची प्रतिमा त्यांनी स्वतः काही निर्माण केली नव्हती तर ती त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळाली होती.  त्या प्रतिमेनुसार आपल्या मुलांनी वागत रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पूर्वजांना एक अनुकूल मुद्दा होता. पूर्वजांच्या बाबतीत अवतीभोवतीच्या वातावरणातील बदलांचा वेग नगण्य होता. त्यामुळे या प्रतिमेत काळानुसार बदल घडवून आणण्यास प्रत्येक पिढीला वेळ मिळत असे. परंतु गेल्या वीस-तीस वर्षांत ज्या वेगाने बदल झाले त्या वेगाला अनुसरून चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याच्या प्रतिमेत / संकल्पनेत बदलत्या कालानुरूप टिकू शकणारं रूप देण्यात भारतीय मध्यमवर्गीय समाज अपयशी ठरला.  या काळात अजून एक घटना घडली ती म्हणजे पुढील पिढीने आर्थिकदृष्ट्या मागच्या पिढीच्या उत्पन्नाइतकीच किंबहुना त्याहून जास्त मजल लहान वयातच गाठली. त्यामुळे मागील पिढी काहीशी अचंबित झाली. त्यांनी आपला पुढील पिढीला उपदेश देण्याचा अधिकार बजावण्याचा आत्मविश्वास काहीसा गमावला. 

मी सद्य समाजातील स्वघोषित सुजाण नागरिक आहे. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यात दोन पिढ्यांमधील संस्कारांचे यशस्वी हस्तांतरण ह्याविषयी माझी मते नोंदवून ठेवणे ह्याचा समावेश होतो असा माझा समज आहे. संस्कारांचे यशस्वी हस्तांतरणासाठी सद्य परिस्थितीत दोन गोष्टी व्हाव्या लागतील.  
१) दोन पिढ्यांमधील संवाद हा सुसंवाद बनायला हवा. हल्ली हा संवाद मोजक्या काही मिनिटांत संपतो. ह्या संवादाची मुख्य जबाबदारी जुन्या पिढीकडे आहे. त्यामुळं कदाचित नवीन पिढीशी संवाद कसा साधावा ह्यासाठी ह्या पिढीला एका  प्रशिक्षण वर्गाची गरज आहे. ह्या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमाची योग्य पद्धतीने आखणी समाजातील तज्ञांनी करावी. 
२) पुढील वीस वर्षांसाठी चांगलं आणि सुसंस्कृत ह्यांची कालानुरूप अशी व्याख्या तज्ञांनी बनवून त्यांचं सोशल मीडियावर अधिकाधिक प्रसारण करावं!

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

मुंबईचे, मुंबईकराचे खरे नाही!



मुंबईचे, मुंबईकराचे काही खरे नाही असे पत्नीला, मला  आणि समविचारी मित्रांना वाटत राहतं . समविचारी मित्रांची संख्या कमी असल्यानं एकंदरीत अशी विचारधारा असलेली लोक अल्पगटात मोडतात. बाकी वार्षिक सुट्टी सुरु असल्यानं माझ्या मनात असे असंबद्ध  विचार येऊ शकतात हे सत्य मी स्वीकारलं आहे. 

मुंबईचे, मुंबईकराचे खरं नाही असं मला का वाटतं? 
१.  पूर्वीच्या चार ते सात मजली इमारती पुनर्बांधणी कार्यक्रमाद्वारे तीस मजल्यापलीकडे परिवर्तित झाल्या / होत आहेत.  भोवतालच्या परिसरातील ओळखीची माणसं, शांतता गायब होत चालली आहे. लहान मुलांना अगदी सुरक्षितपणे इमारतीखाली जाऊन खेळता यायचं तो आज बऱ्याच वेळा मोठा इव्हेंट बनू लागला आहे ज्यात पालकांना तयार होऊन मुलांसोबत खाली उतरावं लागतं. आपल्या परिसरात आल्यावर माणसांना जे एक घरपण वाटत असे ती भावना ह्या गगनचुंबी इमारतीमुळं नाहीशी होत आहे. रहदारी अचानक वाढल्यामुळं वृद्ध माणसांना आपल्या शेजारच्या परिसरात चक्कर मारण्यासाठी जाणं सुद्धा तणावपूर्व वाटू लागलं आहे. दिवसातील अठरा ते वीस तास रस्त्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बहुतांश घरात शिरकाव करत असल्यानं घरातील शांतता सुद्धा भंग पावत आहे. 
२. मुंबईकरांच्या आहाराविषयीच्या सवयी बहुतांश प्रमाणात बिघडल्या आहेत. गेल्या दहा पंधरा वर्षात एका प्रातिनिधिक मुंबईकराचे बाहेरील खाणे खूप वाढले आहे. त्याला / तिला जगभरातील विविध खाद्यसंस्कृतीची खूप माहिती झाली आहे. हातात खुळखुळणाऱ्या पैश्यामुळं हे सर्व मुंबईकरांना परवडू शकत आहे. स्टार्टर, मुख्य जेवण आणि डेझर्ट अशा क्रमाक्रमाने येणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेताना आपल्या शरीराला नक्की किती अन्नाची गरज आहे हे आपण विसरत चाललो आहोत. त्याचप्रमाणे झोमॅटो, स्वीगी मुळे आपण वारंवार घरी जेवण मागवू लागलो आहोत. 
३. वाढत्या आहाराला पचविण्यासाठी बरेच मुंबईकर आजकाल व्यायामशाळेत जातात. दररोज आवश्यक असलेला प्रोटीनचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही जण अंडी, चिकन ह्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात.  जड अन्न पचविणे, त्यासाठी व्यायाम करणे हे कुठंतरी शरीराला तणावदायक बनू लागले आहे
४. मुंबईकरांची  वैद्यकीय माहिती पातळी खूपच उंचावली आहे. नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. परंतु एकदा का सगळ्या चाचण्यांचे निकाल सामान्य आले की आपण हवं ते खायला मोकळे असा समज काही जणांत पसरू लागला आहे. 
५. वरील दोन, तीन आणि चार मुद्द्यांमुळं आपण शरीराला सदैव सक्रिय ठेऊ लागलो आहोत. पाश्चात्य देशांतील लोकांचे अनुकरण करताना आपण दोन मुद्दे काही प्रमाणात विसरत आहोत. पहिला म्हणजे तेथील थंड हवामान ज्यामुळं कितीही जड आहार पचण्यासाठी तुलनेनं सोपा जातो. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी न्यूयॉर्क वगैरे वगळलं तरी बाकी शहरांत इमारतींच्या अवतीभोवती गुण्यागोविंदानं नांदणारा निसर्ग ! तसं म्हटलं तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सेंट्रल पार्क आहेच! 

हे मान्य की वर वर्णन केलेला वर्ग संपूर्ण मुंबईचे प्रतिनिधित्व करत नाही. पण त्यांचे प्रमाण नक्कीच वाढत आहे. माझी मुख्य चिंता हा वर्ग जेव्हा वयाची पंचावन्न / साठ वर्षे पूर्ण करेल तेव्हा बहुदा मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात राहणे त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव नसेल ह्याविषयी आहे ! मुंबईबाहेर जाऊन राहणे तिथल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळं ह्या वर्गाला जमणार नाही! 

थोडक्यात मुंबईचे,  मुंबईकराचे खरे नाही!

तळटीप - मुंबई इंडियन्सचा कप्तान बदलण्याच्या घटनेचा आणि ह्या पोस्टचा तिळमात्र संबंध नाही!! 

रविवार, १० डिसेंबर, २०२३

झिम्मा २



समाजातील सृजनशीलता झपाट्यानं लोप पावत आहे किंवा माहितीमायाजालावरील माहितीच्या स्फोटामध्ये ती कुठंतरी दडून बसत आहे.  सहजरित्या उपलब्ध असलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतांना सृजनशीलतेच्या बाबतीत पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते. 

कोणत्याही कलाकृतीचा जीवनप्रवास ही खरंतर एक अभ्यासण्याजोगी घटना असायला हवी.  कथेतील मूळ कल्पनेचा उगम, तिचं विस्तारीकरण ह्यात लेखकांची प्रतिभा, त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेल्या भराऱ्या ह्याचे वाचक प्रत्यक्ष साक्षीदार नसले तरी त्या कलाकृतीचा आनंद घेताना संवेदनशील वाचकांना त्याची अनुभूती मिळायला हवी. इथंच खरं कथाकार आणि वाचक ह्यांचं एक अदृश्य, घट्ट नातं जुळतं. जेव्हा ही कथा नाटक, चित्रपटाच्या माध्यमांद्वारे आपणांसमोर सादर केली जाते त्यावेळी खरंतर दिग्दर्शकाच्या कौशल्याची कसोटी असते. मूळ कथेच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता नाटक, चित्रपट माध्यमांना योग्य अशा स्वरूपात  ही कलाकृती सादर करणे म्हणजे तारेवरील कसरत असते. 

आठवडाभर कार्यालयीन कामात जुंपून घेतल्यानंतर फुरसतीच्या वेळात वयानुसार निर्माण झालेल्या आवडीमुळे चांगल्या नाटक, चित्रपटाच्या शोधात असलेला मी ! खरा प्रश्न इथं आहे. चांगलं म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय आवडतं ह्यावर आपण फारसा विचार करत नाही. काल पाहिलेल्या झिम्मा २ ह्या चित्रपटाच्या कालावधीत  विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. चित्रपटाला कथा म्हणून काही नव्हतीच. लेक डिस्ट्रिक्टची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू! मी आणि प्राजक्ता चित्रपट संपल्यानंतर कथेच्या, त्यातील पात्रांच्या,  व्यक्तिमत्त्वांच्या किंवा चित्रपटातील नात्यांच्या खोलीविषयी बोलत होतो. काही इंग्लिश चित्रपटात कथेला मोठा जीव नसला तरीही त्यातील संवादातील आणि  नात्यांतील विविध छटांच्या सादरीकरणामुळं ते प्रेक्षणीय बनतात. आमच्या चांगल्या चित्रपटाच्या व्याख्येत ह्या बाबींचा समावेश होतो. 

चित्रपटात विविध वयोगटातील भाराभर नायिका आणि मोजून दोन पुरुष व्यक्तिमत्वे आहेत. इंग्लिश व्यक्तिमत्वाला नायक म्हणायला  वाव नसल्यानं दोन नायक म्हणण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे,  इतकी सगळी पात्रं आपली भूमिका कशी उत्तम होईल ह्याकडेच लक्ष देत आहेत असं वाटत राहतं. त्यामुळं अधूनमधून येणाऱ्या शाब्दिक कोट्यावर आपण मनमुराद हसत राहतो. चित्रपट कोणत्याही क्षणी संपला असं सांगितलं तरीही आपल्याला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळं खरोखरच ज्यावेळी चित्रपट संपतो तेव्हाही आपल्याला काही वाटत नाही. पार्किन्सन ह्या गंभीर आजारासंदर्भात देण्यात आलेला सामाजिक संदेश ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. ना धड तो संदेश दिला जात नाही ना चित्रपटाच्या कथेला त्यामुळं वाव मिळतो / गती मिळते.  चित्रपट ही काही मिसळ वगैरे नाही ज्यात नामांकित कलाकार, निसर्गरम्य पार्श्वभूमी, सामाजिक संदेश वगैरे एकत्र आणलं की एक चांगली कलाकृती बनेल. 

मराठी चित्रपटांचे उभरत्या इंग्लिश कलाकारांना योगदान ह्या मुद्द्यावर ह्या चित्रपटाला गुण प्रदान करता येतील. झिम्मा ३ / ४ वगैरे भागात जर्मन, फ्रेंच, इटली वगैरे देशांतील कलाकारांचा विचार करता येऊ शकेल.  

असे चित्रपट शहरी भागातील स्त्रीच्या समस्यांना कितपत योग्य स्वरूपात सादर करतात ह्याविषयी मोठी साशंकता निर्माण होते. व्यक्तिरेखांच्या खोलीच्या अभावी ह्या स्त्रियांच्या समस्यांशी आपण फारसे जोडले जात नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या गावात अगदी तुटपुंज्या पैशात आपला संसार चालविणाऱ्या स्त्रियांविषयी झिम्मा ३ - ४ वगैरे यायला हवा असा विचार मनात येतो. 

बाकी इनऑर्बिट मॉलमधील चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. एक चांगला लेखक आणि एक यशस्वी लेखक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गालिब नाटकातील  वाक्य चित्रपटांना सुद्धा लागू होते असं वाटलं. पॉपकॉर्नची पाचशे रुपयांच्या वरील किमतीची पुडकी विकत घेऊन चित्रपटगृहात वचावचा आवाज करत खाणारी टाळकी मोजकीच होती. सिनेमागृहातील आवाजाची पातळी काही वेळा कर्कश होती. प्रेक्षकांच्या  श्रवणयंत्रावर, हृदयाच्या ठोक्यांवर विपरीत परिणाम करणारी अशी होती. ह्यावर कोणीही आवाज उठविलेला दिसत नाही. जाहिरातींचा अतिरेक झाला होता. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नव्हतं. मॉलच्या फूड कोर्टमध्ये खचाखच नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होती. पाश्च्यात्य देशांतील कंपनीमध्ये काम करून पैसा कमाविणारे बरेच लोक पाश्चात्य खाद्यपदार्थांवर पैसे खर्च करत होते.   मॉलमधून बाहेर पडताच मेट्रो स्टेशन आहे. त्याद्वारे प्रयेकी वीस रुपयांच्या तिकिटात दहा बारा  मिनिटांत वातानुकूलित ac डब्यात बसून घरी पोहोचलो.  रिक्षात बसून शंभर रुपये खर्च करत प्रदूषणात बसून घरी पोहाचण्यापेक्षा हे खूप बरं ! एकंदरीत देशाचे बरं चाललं आहेत. तुम्ही वर्तमानपत्रं, त्यातील अग्रलेख  न वाचता शहरात फिरत राहिलात तर लाईफ इज चकचकीत ! आयुष्य सुंदर आहे ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...