मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २७ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग ४

 
 काही वेळ मोहन शांतपणे विचार करत बसला. 
"मी तयार आहे!" त्याच्या तोंडच्या ह्या उद्गारांनी रुहीला फारसं आश्चर्य वाटलं नाही. 
"पण तू साधना बनून राहणार म्हणजे नक्की काय?" आपल्या मनातील शंका त्यानं बोलून दाखवली. 
"तिच्या शरीरात माझं वास्तव्य असणार. जोवर मी ठरवीन तोपर्यंत मी तिच्या शरीरात राहणार!" रुही थंडपणे म्हणाली. 
मोहनने मनातल्या मनात साधनाची माफी मागितली. 

मोहनचा होकार मिळताच रुहीने अजिबात वेळ दवडला नाही. 

"हे बघ ह्या विश्वातून बाहेर कसं पडायचं हे केवळ ऐकून मला माहित आहे! ह्या प्रवासात अनंत अडचणी येऊ शकतात. सध्या तांत्रिकदृष्ट्या तुझं भुतलावरचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं नाही.  त्या इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात तुझ्यावर उपचार अजूनही चालू आहेत ते तू पाहिलंच असशील!"

"आपल्या ह्या प्रयत्नात काहीही होऊ शकत. म्हणजे तू यशस्वीपणे भूतलावर परतशील आणि मी इथेच राहीन! ही झाली पहिली शक्यता. किंवा मी साधनाच्या देहात प्रवेश करीन पण तू इथेच अडकून बसशील!" ही झाली दुसरी शक्यता. ही शक्यता ऐकून मोहनच्या अंगावर काटा उभा राहिला.  त्या नंतरच्या दोन्ही शक्यता तो जाणून होता.

"पण तू ह्या दुनियेत कशी काय अडकलीस?" मोहन विचारता झाला. 

"नको त्या कटू आठवणी! माझ्या लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी बस ५० मैलावरील दरीत पडून आम्ही सर्वजण दगावलो. पण बहुदा माझ्या मनात ज्या काही इतक्या अधुऱ्या इच्छा राहिल्या होत्या त्यामुळे माझं असं झालं असावं! आणि माझा बाप - त्याला आपल्या पोरीची इतकी काळजी की तो सुद्धा माझ्या मागोमाग इथंवर येऊन पोहोचला"  रुही म्हणाली. 

"चल आपल्याला बोलण्यात वेळ घालवून चालणार नाही. आपला प्रवास चालू करूयात आपण! प्रवास बराच अडथळ्यांचा असणार आहे. मनोनिग्रह कायम ठेव! आणि मलाही मनोनिग्रह कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दे!" 

रुहीने तिचं बोलणं थांबवलं. आणि अचानक मोहनला कसंचच होऊ लागलं. एक वेगळीच जाणीव होती ती. एका अंधाऱ्या मार्गावरून त्याची वाटचाल सुरु होती. किट्ट अंधार होता. एखाद्या गुहेतून आपला प्रवास सुरु असावा असा त्याने कयास बांधला. आजूबाजूला पेटत्या मशाली भगभगत होत्या. भूतसदृश्य जीव बऱ्याच वेगाने आजूबाजूला उडत होते. कोणत्याही क्षणी ते आपल्या अंगावर येऊन आदळतील अशी भिती मोहनला वाटत होती. 

"आजूबाजूला पाहू नकोस, पुढे चालत रहा!" अचानक आलेल्या रुहीच्या आवाजाने मोहन दचकला. पण रुही कोठे दिसत नव्हती. "मी तुला दिसत नसले तरी मी तुझ्या सोबतच आहे!" तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मोहन पुढे निघाला. अचानक दूरवर उजेड दिसू लागला. मोहनची पावलं वेगानं पडू लागली. आणि दुसऱ्याच क्षणी तो एका मोकळ्या सपाट भागात खेचला गेला होता. 

तिथं आजूबाजूला असंख्य अर्धपारदर्शक आकृत्या भिरभिरत होत्या. मोहनला देखील अचानक हलकं हलकं वाटू लागलं. दुसऱ्या क्षणी आपण एका उंच खांबाच्या टोकाला टांगून असल्याची त्याला जाणीव झाली. डोक्याच्या वरच्या भागात खिळा ठोकून आपल्याला टांगवलं गेलं आहे हे ज्या क्षणी त्याला समजलं त्या क्षणी त्याचा भितीनं थरकाप उडाला. 

"घाबरू नकोस! सर्व भय केवळ तुझ्या मनात आहे. ह्या विश्वातील तुझे शरीर इजा होण्याच्या पलीकडंच आहे. तुझ्यासमोर अनेक भास निर्माण केले जातील, पण जोवर तू मनावर नियंत्रण ठेवून माझ्याशी संवाद साधत राहशील तोवर आपल्याला आशा बाळगता येईल!" त्याच्या बाजूलाच त्याच्याच खांबाइतक्या उंच खांबाला टांगवून ठेवलेल्या अर्धपारदर्शक आकृतीतून हे बोल येताच तो काहीसा आश्वस्त झाला. ही आकृती रुही नाही असा संशय घेण्याचं त्याला कोणतेच कारण दिसत नव्हतं आणि त्यापलीकडे त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्गही नव्हता. 

साधना सर्व काही सोडून अतिदक्षता विभागातील मोहनच्या खोलीबाहेर बसली होती. दर पाच मिनिटांनी काचेतून मोहनकडे पाहिल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं. मध्यरात्र होऊन गेली होती. काही वेळ तिचा डोळा लागला असावा, अचानक जाग आली तेव्हा तिनं उठून पुन्हा मोहनच्या दिशेनं पाहिलं. मोहनचं शरीर अगदी जोरजोरानं हलत होतं. 

"डॉक्टर, डॉक्टर - मोहनला काय होतंय पहा ना!" मोठ्यामोठ्यानं ओरडतच ती डॉक्टरांकडे गेली. झोपेतून उठवल्यामुळे वैतागलेले डॉक्टर तयार होऊन येईस्तोवर मोहन पुन्हा शांत झाला होता. अगदी काही घडलंच नाही अशा प्रकारे! साधनाकडे एक नजर टाकून डॉक्टर परतले. 

साधना अगदी भयभीत झाली होती. मोहनची स्थिती बघता अपघातग्रस्त ठिकाणाहून मोहनला हलवणं योग्य ठरलं नसतं म्हणून त्याला जवळच्या गावातल्याच हॉस्पितळात ठेवलं होतं. साधना आणि अगदी जवळचे नातेवाईक तिथं तातडीने पोहोचले होते. 

अचानक बाहेर आवाज आला म्हणून साधनाने बाहेर येऊन पाहिलं तर तिचा गावाकडचा मामा सुद्धा आला होता. मामाला पाहताच साधनाला बरं वाटलं तशी ती चिंतेतसुद्धा पडली. मामाने आयुष्य फक्त गावातच काढलं होतं. त्यामुळे त्याच्याशी बोलताना आपण कोणत्या जुन्या जमान्यातील माणसाशी बोलतो आहोत असा तिला सदैव भास होत असे. ह्या क्षणी त्याचं अस्तित्व काहीसं गरजेचं होतं. 

मामाला घेऊन ती प्रतीक्षागृहात आली. तिथून मामानं मोहनकडे एक नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक पालटले. "झाड धरलंय! झाड धरलंय!" असं काहीसं तो पुटपुटला. तो जसा आला तसा दुसऱ्याच क्षणी वेगानं जवळजवळ धावतच बाहेर पडला. 

आजूबाजूच्या अर्धपारदर्शक आकृत्या अचानक शांत होऊ लागल्याचं पाहताच मोहन आश्चर्यचकित झाला. त्यानं बाजूला पाहिलं तर बाजूची आकृती अगदी ताणली गेली होती. 

"ह्या दुनियेतून बाहेर निघण्याचा विचार सुद्धा कसा मनात आणलास तू!" त्या पोकळीतील एका कोपऱ्यातून एक गंभीर आवाज आला. रुहीचं प्रतिनिधित्व करणारी आकृती शांतच होती. अचानक तिच्या अवतीभोवती दिवे पेटवले गेले. त्या दिव्यांच्या आगमनाने मात्र रुहीला असह्य असा त्रास होऊ लागल्याचं तिच्या विव्हळण्याच्या आवाजातून भासू लागलं. 
"तुम्हां दोघांना असंच असंख्य वर्षे वेदनेत ठेवणार आहोत आम्ही!" तो आवाज जणू काही आपला निर्णय सुनावत होता. 

मामा जसा वेगानं बाहेर पडला होता तसा काही मिनिटातच परतला. पण आता मात्र तो एकटा नव्हता. त्याच्या सोबत फक्त कमरेला वस्त्र गुंडाळलेला आणि अंगाला भस्म फासलेला एक मांत्रिक होता. त्या मांत्रिकाचे डोळे म्हणजे जणू काही आगीचे गोळे होते. त्या दोघांना आत येऊ देण्यास विरोध करणाऱ्या सुरक्षाकर्मींना मामाने आपल्या मजबूत बाहूप्रहारांनी केव्हाचंच जमीनदोस्त करून टाकलं होतं. 

प्रतीक्षागृहातून अतिदक्षता विभागात शिरणाऱ्या ह्या दोघांना अडवायचा प्रयत्न करणाऱ्या साधनाचा प्रयत्न दोघांनी निष्फळ ठरवला. अतिदक्षता विभागाचे दार आतून घट्ट लावून घ्यायला मामा विसरला नाही. 

मोहनला सुद्धा एव्हाना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. अतितप्त लोखंडी कांब डोळ्यात घुसवावी, तलवारीच्या धारदार पात्यांनी बनविलेल्या शय्येवर उघड्या पाठीवर झोपायला लावावं आणि उलटं टांगवून एखाद्या  भट्टीवर लोंबकळत ठेवावं अशा सर्व प्रकारातील वेदना एकत्रपणे त्याला भोगायला लागत असल्याची जाणीव होत होती. रुहीचे बोलणे आठवत तो अजूनही भानावर राहायचा प्रयत्न करीत होता. "ह्या विश्वातील तुझे शरीर इजा होण्याच्या पलीकडंच आहे" हे वाक्य त्याला धीर देत होतं. 

"मोहन, मी तुझी क्षमा मागते रे! ही शक्ती माझ्या कल्पनेपलीकडची आहे! मी ह्यांचा मुकाबला करू शकत नाही! आपल्याला अशा मानसिक वेदनेतच अनंत काळापर्यंत राहावं लागणार!" बाजूची अर्धपारदर्शक आकृती त्याची माफी मागत त्याला सांगत होती. तिच्या ह्या बोलण्यानं मोहनचा उरलासुरला धीर संपत चालला होता, तेल संपत आल्याने विझू लागलेल्या पणतीप्रमाणे! 

दोन मिनिटातच मांत्रिकाने आपली मांडणी पुरी केली होती. दिवे पेटवायला व्यत्यय आणणारा पंखा आणि वातानुकुलीत यंत्र बंद करण्यास त्यानं मामाला केव्हाचच सांगितलं होतं.  

"अगदी थोडा वेळ आहे!" चिंतीत स्वरात त्यानं मामाला सांगितलं. 

(क्रमशः)
 

 दाखवली. 
 

 

सोमवार, २३ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग ३


 
 साधना आपल्या पुण्यातील घरात टीव्हीवर उगाचच चॅनेलशी चाळा करत बसली होती. चुकून मराठी बातम्यांची वाहिनी लागली. अंगावर काही कीटक वगैरे पडल्यावर जितक्या वेगानं आपण दूर होतो त्या वेगानं तिने ते चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला. जरा दोन सेकंद वेळ लागला तितक्यात एक बातमी पाहून तिची नजर खिळून राहिली. एका बसच्या अपघाताची बातमी दाखवली जात होती आणि अपघातग्रस्त बस मोहन ज्या बसने गेला होता त्याच कंपनीची होती. तिच्या मनात एका क्षणात नको त्या शंका चमकून गेल्या. तिने आपल्या भ्रमणध्वनीला हातात घेतलं. 
रुहीला अगदी जवळ येताना पाहून मोहन दचकला. "ही कोणती दुनिया आहे, मी कोणत्या रुपात आहे." त्याला काही कळेनासं झालं होतं. त्याला असं भांबावलेला पाहून रुही क्षणभर थांबली. 
"अगदी गोंधळून गेलास ना?" तिनं मोठ्या  आपुलकीने मोहनला विचारलं. "हो काही कळेनासं झालं आहे! तू कोण आहेस आणि माझं पृथ्वीवरील अस्तित्व संपलं की अजूनही मला परत जायची संधी आहे? हेच कळेनासं झालं आहे!" मोहनने आपल्या मनातील सर्व विचार बोलून टाकले. नाहीतरी ह्या सर्व प्रकारात रुही आता त्याला काहीशी माणसाळलेली वाटू लागली होती. इथून बाहेर पडायची शक्यता असेल तर त्यातून फक्त हीच आपल्याला मदत करू शकेल  असा पक्का ग्रह त्याच्या मनाने केला होता. आताच्या आपल्या देहाला त्याने हात लावून पाहिला. मघाचा शरीरविरहीत अवस्थेत केलेला प्रवास अजूनही त्याला छळत होता. 
"हो तुला अजूनही परत जायची संधी आहे! डोळे बंद करून एक क्षणभर बघ!" रुही म्हणाली. 
तिच्या सांगण्यानुसार मोहनने डोळे बंद केले. एका इस्पितळात त्याचा अजून एक देह अतिदक्षता विभागात होता. त्या खोलीच्या बाहेर त्याच्या सर्व नातेवाईकांची गर्दी जमली होती. आणि त्यात रडून रडून डोळे सुजलेली साधना सुद्धा होती. 
"ही तुझी खास मैत्रीण का रे?" रूहीच्या प्रश्नाचा रोख कोणाच्या दिशेने होता हे मोहनला तात्काळ कळलं. 
"हो!" डोळे उघडता उघडता तो म्हणाला. 
"बघ तुझ्या इच्छेविरुद्ध तुला ह्या दुनियेत डांबून ठेवायची माझी इच्छा नाहीये! पण तुला त्या दुनियेत परत पाठवायचं झालं तर ह्या दुनियेतील भल्या भल्या शक्तींचा सामना तुला करावा लागणार. आणि त्यांचा सामना करण्याइतका तू समर्थ नाहीये! तुला कोणाची तरी मदत लागणारच!" रुही एका दमात बोलून गेली. 
हळूहळू मोहनला तिच्या बोलण्याचा रोख लक्षात येऊ लागला होता. रूहीने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. 
"तू ह्या दुनियेत राहिलास तर माझा राहणार, पण तो तुझ्या इच्छेविरुद्ध! तुझी इच्छा तर त्या दुनियेत परत जायची आहे! आणि त्यासाठी तुला माझी मदत लागणार! पण त्यात माझा फायदा काय?" रुही म्हणाली. 
"तुझा फायदा?" तिच्या प्रश्नाचा रोख न समजल्याने मोहनने विचारलं. 
"अरे तू इतका साधाभोळा आहेस की साधेपणाचे ढोंग आणतो आहेस!" वैतागून रुही म्हणाली. 
"मला साधना बनून तुझ्या दुनियेत राहायचं आहे! तसं म्हटलं तर त्यासाठी तुला विचारायची सुद्धा मला गरज नाही! पण तुझ्या साधनावर जसं प्रेम करतोस तसं माझ्यावर मी त्या दुनियेत आल्यावर केलं पाहिजे!" रूहीने आपलं बोलणं चालूच ठेवलं. 
मोहनच डोकं गरगरायला लागलं होतं. आपल्या स्वार्थासाठी साधनाचे अस्तित्व मिटून टाकायचं का हा प्रश्न त्याच्यासमोर होता!

(क्रमशः)

 

रविवार, १५ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग २

मोहनचे विचारचक्र जोरात चालू झाले. शास्त्रीय दृष्टीकोनातून हे जे काही चाललं होतं ते स्पष्टीकरण देण्याच्या पलीकडच होतं. "समजा आपण दुसऱ्या एका विश्वात प्रवेश केला असेल तर तातडीने त्या विश्वाचे नियम समजावून घेणे आवश्यक आहे" त्या स्त्रीने खूण केलेल्या दिशेला असलेल्या मोरीत ठेवलेल्या तांब्यातील पाणी आपल्या चेहऱ्यावर हबकत तो विचार करू लागला. तो झोपडीच्या मुख्य भागात येतो तोवर त्याच्यासाठी पाट आणि पान घेऊन झालं होतं. आता पानावर बसणे इष्ट अशी मनाची समजूत घालीत तो पानावर बसला. पानात आधीच गरमागरम भाजी वाढलेली होती. आता ती स्त्री गरमागरम भाकरी घेऊन आली. भाकरी वाढायला ती जशी जवळ आली तसे तिच्या उलट्या पावलाच्या दर्शनाने त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ह्या दुनियेतील खाण्याने आपला मानवसृष्टीशी उरलासुरला संबंध तुटणार तर नाही असा मोहन विचार करत होता तितक्यात झोपडीचे दार पुन्हा कलकलले.
दरवाज्यात मगाचाच म्हातारा होता. मोहनला बघताच त्याची चर्या पालटली. "रुही, हा परका कोण आहे इथं?" अगदी कर्कश आवाजात तो ओरडला. "माझा पाहुणा" ठामपणे रुही म्हणाली. तिच्या ह्या खंबीर पवित्र्याने आश्चर्यचकित होऊन एक क्षणभर तो म्हातारा थांबला. मग मात्र अचानक कापसाच्या पिंजाऱ्यात परिवर्तित होऊन मोहनच्या दिशेने जोरात झेपावला. त्याची ही हालचाल बहुदा रुहीला अपेक्षितच होती. तिनेही आपल्या पांढऱ्या साडीसहित हवेत झेप घेतली. 
दोघांच्या ह्या झटापटीत मोहनच्या डोळ्यापुढे अचानक काळोखी पसरली. क्षणभरातच सावरून त्याने डोळे उघडले. आजूबाजूचा सर्व परिसर बदलला होता. भोवताली अंधाराचं साम्राज्य होतं. काहीशा उंचीवरून आपला प्रवास सुरु आहे ह्याची त्याला जाणीव होऊ लागली होती. आकाशात वर चांदण्या दिसत होत्या पण त्या नेहमीप्रमाणे स्थिर दिसत नव्हत्या. त्या एखाद्या ठिबक्याप्रमाणे स्वैरपणे आकाशात वावरत होत्या. त्यातील काही झपाट्याने खालीसुद्धा यायच्या. अशीच एक अत्यंत वेगाने मोहनच्या दिशेने आली. मोहनने दचकून बाजूला व्हायचा प्रयत्न केला आणि तो एकदम दचकुन गेला. त्याचं शरीर अस्तित्वात नव्हतंच. अस्तित्वात होती ती फक्त मोहन नावाची एक जाणीव. इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा आपल्या विचारांवर आपलाच ताबा आहे हीच एक काही ती जमेची बाजू होती. आता काहीसा वर्दळीचा भाग येत आहे अशी त्याला जाणीव होऊ लागली होती. पण प्रत्यक्ष काही दिसत नव्हते. मग त्याच्या दृष्टीला पडला तो एक वायूचा पुंजका. त्या वायूच्या पुंजक्यात कोणास ठाऊक कसे पण त्याला त्याच्या आजीचे अस्तित्व जाणवलं. तो पुंजका त्याच्या अगदी जवळून गेला तेव्हा मात्र त्याला "बाळ, कसा आहेस!" अशी अस्पष्टशी हाकही ऐकू आली. मग असे पुंजके येतच राहिले. अचानक आकाशात एका क्षणी त्याला थेट डोक्यावर खूप दूरवर त्याला एक चांदणी दिसली. आणि दुसऱ्या क्षणी तिच्या बाजूला असलेला एक वायूचा पुंजका अगदी स्पष्ट दिसला. मितीच्या सर्व संकल्पना धुळीस मिळत होत्या. ह्या अचानक दिसलेल्या पुंजक्यात त्याला काही वर्षापूर्वी अपघातात दगावलेल्या त्याच्या मित्राचा भास झाला. 
दुसऱ्या क्षणी त्याला काहीसा परिचित भाग दिसू लागला. तो आपल्या प्रवासाचाच भाग असावा असे त्याला वाटत होते. आणि अचानक त्याला तिथे त्याची बस अगदी वेगाने दिमाखात चालली होती. दुसऱ्या क्षणी त्याला त्या बसच्या आतल्या भागातील दृश्य दिसले आणि त्याची स्वतःची रिकामी सीट सुद्धा दिसली. त्याची नजर जिमीला शोधत होती आणि ती ही सीट रिकामी होती. 
अचानक पुन्हा काळोख्या अंतराळातून त्याचा प्रवास सुरु होता. काही क्षण असा प्रवास चालू असताना अचानक आकाशातून मोठा प्रकाशझोत आला आणि त्यात मोहन खेचला गेला. अगदी वेगानं खेचलं जात असताना आपलं सर्व अवयव अगदी जोरात खेचले जायचा त्याला भास होऊ लागला. हे कसं शक्य आहे, कारण आपण तर शरीरविरहीत स्थितीत आहोत असा तर्कशुद्ध विचार त्याच्या मनात आला. ह्या विचारात जास्त गढून जायच्या आधीच तो आपल्या पूर्ण देहासहित पुन्हा एकदा त्या झोपडीत त्या पाटावर बसला होता. "अजून एक भाकरी देते हं!" रुही त्याला आग्रह करीत होती. तिच्या उलट्या पावलांकडे पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही. इतक्यात "मी जातो" अशा काहीशा कर्कश आवाजानं त्याचं लक्ष वेधलं गेलं. पुन्हा एकदा म्हाताराच होता तिथं. तो पूर्ण देहानिशी असला तरी केव्हाही तो कापसाच्या पुंज्यामध्ये रुपांतरीत होईल हा त्याचा अंदाज दुसऱ्या क्षणी खरा ठरला. 
दोघांची जेवण एव्हाना आटपली होती. जी गोष्ट इतका वेळ त्याच्या लक्षात आली नव्हती तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं. तो आता झोपडीत नसून एक राजेशाही प्रासादात होता. रुहीचं अस्तित्व त्याला खटकत असलं तरी मघाच्या म्हाताऱ्याच्या रौद्र अवतारातून तिनंच आपली सुटका केली ह्याची मात्र त्याला मनोमन खात्री होती. बहुदा जेव्हा आपली  शरीरविरहित अवस्थेतील सफर चालू होती तेव्हा तिने म्हाताऱ्याचा राग शांत केला असावा अशी त्याने स्वतःचीच समजूत काढून घेतली. त्या अलिशान प्रासादातील हिरेजडीत मंचकावर असले विचार करीत तो बसला होता आणि अचानक रुही त्याच्या बाजूला येऊन बसली. निसर्गाच्या नियमानुसार तिला आपल्याविषयी काही प्रमाणात तरी सहानभूती असणार अशी त्याने स्वतःची भाबडी समजूत करून घेतली होती. "तो म्हातारा मला पाहून इतका का खवळला होता?" आपण त्या म्हाताऱ्याचा असा एकेरी शब्दात उल्लेख केलेला हिला चालेल ना अशी भीती मनात बाळगतच त्याने रुहीला प्रश्न केला. रुहीचे डोळे पुन्हा एकदा मांजराप्रमाणे चमकले. "ज्यांनी मनुष्यजन्मात आणि त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या लाडक्या मुलीची इतकी काळजी घेतली; तिला आपल्यापासून कोणी दुरावून घेत आहे ही कल्पनाच मुळी त्यांना सहन होत नाही! प्रत्येक वेळी असेच वागतात ते! आणि मग मी मात्र राहते एकटीच! ह्या वेळी मात्र मी त्यांना त्यांच्याच प्रकारे समजावलं " रुही बोलून गेली. "प्रत्येक वेळी असेच वागतात ते!" ह्या वाक्याने हादरलेला मोहन रूहीने बिछान्यावर आपले उलटे पाय ठेवले तेव्हा अजूनच हादरला… 

(क्रमशः)




 

















 

 पलीकड

शनिवार, १४ मार्च, २०१५

अनोखी रात्र - भाग १

 
त्या अगदी निर्जन रस्त्यावर अवेळी बंद पडलेल्या त्या बसमधून खाली उतरण्याचे धाडस फक्त मोहनच करू शकत होता. ठरलेल्या मार्गापासून हे भलतेच वळण घ्यायचा निर्णय त्या आगाऊ गटाने ज्यावेळी घेतला होता त्यावेळी मोहनने त्याला कडाडून विरोध केला होता. पण त्यांच्या बेबंदशाही वागण्याला काहीसं घाबरून त्याला कोणी पाठिंबा दिला नाही आणि आता ही वेळ आली होती. 
काही वेळापूर्वी मावळलेल्या भास्कराची काही किरणे आकाशात अगदी उंचावर दिसत होती. त्या किरणांनी गुलाबी छटा प्रदान केलेले काही मोजके ढगच मोहनला ह्या सर्व वातावरणात जिवंतपणाचे लक्षण दर्शवित  
होते.  बसमधून उतरताना त्याने सोबतीला कोणी येत आहे का ह्यासाठी आशेने सर्वांकडे पाहिले होते पण सर्वांनीच नजरा फिरवल्या होत्या. अर्ध्या तासाआधी बस बंद पडल्यावर ह्यातील काहीजण खाली उतरले होते पण ज्यावेळी बसचालकाने बस चालू होण्याची शक्यता नसल्याचे जाहीर केले त्यावेळी मात्र सर्वजण चुपचाप बसमध्ये येऊन बसले होते. त्या आगाऊ 
गटाचा म्होरका सनी अजूनही काहीसा जोशात होता. "काही लोकांनी ह्या रस्त्याने येताना कटकट केली म्हणून ही परिस्थिती उद्भवली, नाहीतर लेण्यांचे दर्शन व्यवस्थित झालं असतं " असे काहीसं तो पुटपुटत होता. त्याच्याशी पुन्हा एकदा हुज्जत घालण्याची उबळ महत्प्रयासाने मोहनने दाबून ठेवली. 
बसमधून उतरल्या उतरल्या थंड हवेचा एक झोत त्याच्या अंगावर आला होता. त्यामुळे मन काहीसं प्रसन्न झालं होतं. आकाशात चंद्राचा मागमूसही नव्हता आणि मग त्याला अचानक त्याला आठवलं की आज अमावस्या होती. भय नावाचा प्रकार त्याला माहित नसल्याने किंवा त्याचा तसा समज असल्याने त्याने थोडं पुढे जायचं ठरवलं. आकाशात एव्हाना चांदण्यांनी बराच जम बसवला होता. थोडंसं पुढे चालता चालता रस्त्याच्या आजूबाजूची झाडी वाढत आहे ह्याची त्याला जाणीव होऊ लागली होती. 
अजूनही भय वाटत नसलं तरी उगाच पुढे जाण्यात काही अर्थ नाही ह्याची जाणीव होऊन परत फिरण्याचे त्याने ठरवलं. 
चालता चालता त्याने एक वळण घेतलं होते. एव्हाना तो परत त्या वळणावर आला होता. आणि समोरचे दृश्य पाहून त्याची दातखीळ बसली. त्याच्या बसच्या मागून एक घोंगडे पांघरलेल्या म्हाताऱ्याची आकृती येताना त्याला दिसत होती. म्हातारा त्याच्या वयाला न शोभणाऱ्या वेगानं चालत होता. ह्या अशा निर्जन भागात असा चपळ म्हातारा पाहून मोहनच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिथेच आडोश्याची जागा पाहून तो लपून पुढे काय होतेय ते पाहू लागला. तो म्हातारा एव्हाना बसपाशी पोहोचला होता आणि खिडकीतून डोकावून पाहत होता. बसमधल्या लोकांचं एव्हाना त्याच्याकडे बहुदा लक्ष गेले होते आणि बसमधून किंचाळ्याचा जोरदार आवाज येऊ लागला होता. म्हातारा एव्हाना बसच्या पुढे गेला आणि त्याने बस एका धक्क्याने लोटली होती.  ती बस मागे ढकलली जाऊ लागली होती. आणि काही क्षणातच ती बस दिसेनाशी झाली होती. दरी वगैरे नसताना देखील बस दिसेनाशी झाली आणि हो म्हातारा सुद्धा दिसेनासा झाला होता. 
शास्त्रशुद्ध विचारसुद्धा काही काळ बाजूला ठेवावे लागतात ह्याची मनाला समजूत घालत मोहनने दुसऱ्या दिशेला धाव ठोकली ती त्या दिशेला असलेल्या गर्द झाडीचे भय न बाळगता! काही मिनिटे भरधाव वेगानं धावता धावता धाप लागल्याने मोहनने वेग कमी केला. अचानक त्याच्या पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला. डोळे अगदी मोठे करून त्याने पाहिलं तर एका बऱ्यापैकी मोठ्या तळ्याच्या काठी तो उभा होता. 
क्षणभर विचार करून मोहनने त्या पाण्याची ओंजळ भरली आणि मनसोक्त पाणी प्याला. चेहऱ्यावर सुद्धा त्याने पाण्याचे तीन चार हबके मारले. भयात ताजातवाना होण्याची भावना जाणवत नसल्याचे त्याला समजून चुकले.  
हा रस्ता इथेच संपला हे त्याला कळून चुकलं. त्याने सभोवताली नजर फिरवली. उजव्या दिशेला एक झोपडी त्याच्या नजरेस पडली. खरंतर अंधारात ही झोपडी दृष्टीस पडणे कठीण होते. पण त्या झोपडीच्या मोडक्या भिंतीतून येणाऱ्या मंद दिव्याच्या ज्योतीने त्याचे लक्ष तिथे वेधलं गेलं होतं. 
दुसरा कोणताही पर्याय नसल्याने वास्तववादी आपलं मन आपल्या पावलांना त्या झोपडीच्या दिशेनं घेऊन जात आहे की एखादी कोणती शक्ती आपल्याला तिथे घेऊन जात आहे हे त्याला समजत नव्हते. झोपडीच्या दाराशी येऊन उभं राहिल्यावर क्षणभर त्याने विचार केला. एका क्षणात त्याला गेल्या तासाभरातील घटना आठवल्या. आपल्या मनावर अजूनही आपलंच नियंत्रण आहे ही जाणीव त्याला काहीशी सुखावून गेली. सगळा धीर एकवटून त्याने झोपडीचं दार लोटलं. आतमधून चुलीवर भाजल्या जाणाऱ्या गरमागरम भाकऱ्याच्या वासाने तो सुखावला. चुलीवर एक बाई पाठमोरी बसून भाकऱ्या थापीत होती. त्याची चाहूल लागताच ती लगेचंच उठून उभी राहिली. "धनी, आज इतका उशीर केलासा! या लवकर मी पानं घेतलीसा!" तिच्या ह्या उद्गारांनी मात्र शास्त्रीय बुद्धीचा मोहन नक्कीच चकित झाला. 

(क्रमशः)     

सोमवार, ९ मार्च, २०१५

क्षणभंगुर आनंदाच्या शोधात!!

सद्यकालीन समाजाचे निरीक्षण केले असता समाजाचा काही भाग हा अल्पकालीन कौतुकाच्या शोधात सदैव असल्याचे जाणवते. सोशल मीडियावर आपण जर का वावरत असाल तर अशा व्यक्तींचे प्रमाण जास्त असल्याचा भास होण्याची शक्यता असते. ह्यातही दोन वर्ग आहेत, एक वर्ग जो आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडून मग थोडा वेळ क्षणिक आनंद मिळविण्यासाठी ह्या सोशल मीडियावर येऊन जातो. परंतु काही व्यक्तींना ह्या पूर्ण चित्राचे आकलन होत नसल्याने ते आपल्या दिवसाचा बराच भाग ह्या क्षणिक आनंदाच्या शोधात घालवत असल्याचे चित्र दिसते. 

एकंदरीत आपला संपूर्ण समाजाचा बहुतांशी घटकसुद्धा दीर्घकालीन चित्र डोळ्यासमोर न ठेवता क्षणिक आनंद, प्रगती डोळ्यासमोर ठेऊन वागत असल्याची काही उदाहरणे खालील प्रमाणे 
१> खेळाडूंच्या खऱ्या कौशल्याची परीक्षा पाहणाऱ्या कसोटी सामन्यांना दुर्लक्षित करून IPL च्या जत्रेत सहभागी होणे. 
२> वैयक्तिक फायद्याच्या शोधात शहरांचा विपरीत वेगाने प्रसार करून निसर्गाची हानी करणे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता ह्या गोष्टी पोलिस, सरकार ह्यांच्या नियंत्रणापलीकडे जाणे.  
अ) गेल्या आठवड्यात वाचलेलं एक उदाहरण अगदी अंतर्मुख करून गेलं. ज्या लहान मुलांना घरी स्वच्छ स्वच्छतागृहांची सवय असते त्यांना शाळेत जर अस्वच्छ स्वच्छतागृह असतील तर ते त्यांचा वापर करण्याचे दिवसभर टाळतात. आणि त्यामुळे त्यांना Urine infection सारख्या व्याधींचा सामना करावा लागला. 
ब) मैदानांची संख्या कमी झाली म्हणून लहान मुलांनी मॉल, आयपॅड, मोबाईल सारख्या पर्यायी बैठ्या साधनांचा सहारा घेतला. त्यांच्यातील स्थुलत्वाचे प्रमाण वाढीस लागलं. 
क) प्रत्येक शहरात विशिष्ट ठिकाणी स्त्रियांनी एकटीने प्रवास करण्यासारखी ठिकाणे राहिली नाहीत.   
३> भारतराष्ट्राला पुढील पन्नास वर्षात किती अभियंते, डॉक्टर ह्यांची गरज आहे ह्याचा विचार न करता केवळ धनदांडग्या लोकांच्या हितासाठी वाटेल तितकी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये उघडणे. 
४> आधुनिकतेच्या खोट्या व्याख्येच्या मागे लागून वर्षोनवर्षे चालत आलेल्या गौरवशाली भारतीय कुटुंबसंस्थेचा पाया खिळखिळा करणे. 

उदाहरणे अनेक आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा की . जोवर आपल्यात जोष आहे तोवर आपण हवा तसा आनंद घेऊ शकतो, पण एका क्षणी आयुष्यातील जबाबदाऱ्या आपल्यासमोर उभ्या होऊन ठाकतात. त्यावेळी त्यांच्यापासून पळणे शक्य नसते. प्रत्येकाला आयुष्य हे पूर्ण जगावेच लागते आणि त्यातील बहुतांशी भाग हा जबाबदारीने व्यापलेला असतो, त्यामुळे महत्वाचा मुद्दा असा की क्षणिक आनंदाच्या शोधाची व्याप्ती क्षणिक काळभरच ठेवा!!

आपण काळाच्या एका अशा टप्प्यावर आहोत जिथे आपण भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे गोडवे गात आहोत. 
ह्या प्रगतीच्या आधारावर आपण परदेशात जाऊन स्थिरस्थावर होत आहोत. 
मुख्य कारण काय तर भारतात आमच्या गुणवत्तेला योग्य तसा न्याय मिळत नाहीत. 
भारतात गुणवत्तेला योग्य असा न्याय मिळत नाही कारण भारतात गुणवत्ता भरपूर उपलब्ध आहे. 
भारतात गुणवत्ता भरपूर उपलब्ध का आहे तर आमची लोकसंख्या बेफाट आहे आणि आपला पारंपारिक कृषीव्यवसाय सोडून आम्ही सर्वजण शिक्षणक्षेत्राच्या मागे धावत सुटलो आहोत. 

जोवर बेफान वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि कृषीक्षेत्राला योग्य संधी ह्या दोन मुलभूत समस्यांचा आपण रोखठोकपणे सामना करत नाही तोवर एक राष्ट्र म्हणून आपण क्षणभंगुर आनंदाच्या शोधात आहोत असेच म्हणावं लागेल!
 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...