मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

वैचारिक सुस्पष्टता


आपलं स्वतःच असं एक जग असतं.  या जगात आपण, आपला मेंदू, आपलं मन, आपलं  वैयक्तिक / व्यावसायिक जीवन सारं सारं  काही असतं.  जीवनात आपण काही गोष्टी मनापासून करत असतो तर बरंच काही एक व्यक्ती म्हणून आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडण्यासाठी करत असतो. जस जसं आपलं वय वाढत जातं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं.  

जबाबदाऱ्या तर सर्वांनाच असतात पण त्याचं ओझं बनवायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जबाबदारीचं ओझं बनणं हा एक प्रवास असतो. ह्या प्रवासाची  प्रामुख्याने दोन कारणे असतात.  पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या पार पडण्याची मनापासून इच्छा उरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पार पडण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक किंवा मानसिक ताकद आपण आपल्यापाशी नसते. जबाबदाऱ्यांनी त्रासलेली माणसं सदैव आपल्या भोवती दिसत असतात किंवा आपणच जबाबदाऱ्यांनी त्रासलेलो आहोत  हे आपल्याला जाणवत असतं. 

जर आपल्याकडे विचारांची सुस्पष्टता असेल तर जबाबदाऱ्यांचं ओझं बनवायचं आपण टाळू शकतो.  यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.  

१) पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासमोर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व एका कागदावर लिहून काढाव्यात.  यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांची यादी वेगवेगळी असावी.  

२) वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा विभागावा याची सुस्पष्टता सुरुवातीलाच आपल्याकडं असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ  वैयक्तिक जबाबदाऱ्यांना ६० टक्के वेळ आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांना ४० टक्के वेळ! ह्यात छंदाला वेगळा वेळ द्यायचा की नाही हा सुद्धा महत्वाचा निर्णय तुम्हांला घ्यायचा असतो. हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे, आयुष्यात आपल्याला नक्की महत्वाचं काय आहे ह्याचा निर्णय तुम्हांला घेता आला पाहिजे आणि आपण असा निर्णय का घेत आहोत हे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या  व्यक्तींना स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. 

३) त्यानंतर यातील दोन्ही यादीतील सर्व जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रमाच्या उतरत्या मांडणीने लिहून काढाव्यात.   म्हणजे सर्वात महत्त्वाची जबाबदारी आधी आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या उतरत्या क्रमाने! 

४)  हे सर्व लिहून झाले की मग या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती साधनं, तंत्रं  आणि मार्ग उपलब्ध आहेत याचीही यादी बनवावी.  एखादी जबाबदारी पार पडण्यासाठी जर आपल्याकडे विविध पर्याय  उपलब्ध असतील तर त्यातील नक्की कोणत्या तंत्राचा वापर करावा याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे.  

५)  बऱ्याच वेळा हा निर्णय न घेता आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उगाचच क्लिष्टता निर्माण होते.  योग्य वेळी निर्णय न घेता येणे आणि परिपूर्णतेचा अट्टाहास धरणे या दोन कारणांमुळे  आपल्या जबाबदाऱ्या बराच काळ आपल्या यादीवर तशाच कायम राहतात.  "Problems don't age well" असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं.  म्हणजेच आपण एखादी समस्या जर बराच काळ तशीच भिजत ठेवली तर ती गहन स्वरूप धारण करते. त्यामुळे एखादी जबाबदारी पार पडताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रमाणात अचूकता असल्याची  आपल्याला खात्री  झाली की तो निर्णय घेऊन मोकळ व्हावं. 

६) प्रत्येक माणसाच्या कुवतीनुसार तो आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपैकी काही विशिष्ट जबाबदाऱ्याच पार पडू शकतो. मुद्दा ३ मध्ये उल्लेख केलेला प्राधान्यक्रम काळानुसार बदलत जातो.  त्यामुळे ज्या जबाबदाऱ्यांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत त्या जबाबदाऱ्या त्या क्षणी आपल्या प्राधान्यक्रमाच्या नक्की कोणत्या स्थानावर आहेत आणि पार पडताना आपण बाकीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना हा या गोष्टीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  बऱ्याच वेळा प्राधान्य कामातील खालच्या क्रमांकावर असलेल्या गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे आवश्यक असते.  

७) सहाव्या मुद्द्याचं थोडं वेगळं रूप. ही जी तुम्ही प्राधान्यक्रमाची यादी बनवत असता  ती यादी बनवताना हा प्राधान्यकम केवळ वर्तमान काळाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्याची चूक करू नये. आपण  वर्तमानकाळातील घेतलेल्या बऱ्याचशा निर्णयांचे परिणाम दिसण्यासाठी भविष्यकाळ उजाडावा लागतो.  त्यामुळे एखाद्या जबाबदारीविषयी आज घेतलेला निर्णय हा भविष्यकाळाला डोळ्यासमोर घेऊन घेण्यात यावा.  आता तुम्ही म्हणाल की भविष्यकाळ कोणी पाहिला आहे आणि आजच्या निर्णयाची भविष्यकाळात काय परिणीती होणार आहे हे आम्ही आज कसे काय सांगू शकणार? मुद्दा अगदी बरोबर आहे.  परंतु एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांच्या परिणामांचे दायित्व सुद्धा घ्यावे लागते.  

हे सर्व वाचून जर तुम्हाला दडपण आले असेल तर ते दडपण काही प्रमाणात दूर करण्याचा सुद्धा माझ्याकडे मार्ग आहे. आतापर्यंत  आपल्या मागच्या अनेक  पिढ्यांनी  घेतलेले सर्व निर्णय काही अगदी अचूक होते असे नाही.  तरीही त्यांनी आपल्या परीने योग्य प्रयत्न करत आपलं आयुष्य जगत आपल्या पुढील पिढीसाठी जमेल तितके प्रयत्न केले.  

त्यामुळे तुम्ही लहान असा वा मोठे असा  प्रत्येक दिवशी तुम्ही नक्की काय करायचं याचा सकाळी विचार करा, त्यावर दिवसभर जमेल तितके प्रयत्न करा.  बाकी आयुष्यभर आपल्याकडून काय घडलं किंवा नाही घडलं त्याची काळजी करण्याची जबाबदारी त्या सर्व शक्तिमानावर सोडून द्या.  रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी ऐकत शांतपणे हे एक चांगलं  आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना! 


Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...