मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २५ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 3


आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/07/2.html

आपल्या बॉसचे या महत्वाच्या प्रकरणात लक्ष वेधून घेण्यासाठी बर्नीला बरेच कष्ट करावे लागले. एकतर ६८ वर्षापूर्वी शेवटी लॉगइन झालेले अकाउंटला आता पुन्हा लॉगइन केलं जातं म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे हे बर्नीला नीट समजावून सांगता येत नव्हतं किंवा त्याच्या बॉसला ह्या प्रकरणाचं गांभीर्य कळत नव्हतं. शेवटी एकदाचा  बर्नी आपल्या बॉसला आपलं म्हणणं पटवुन देण्यात यशस्वी झाला. 

मग मात्र बॉसने झटपट सूत्र हलवुन महाराष्ट्र पोलिसांच्या योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. शाल्मलीचा प्रवास वेगाने चालू होता. रस्त्यावरील वाहतुक एव्हाना काहीशी तुरळक झाल्यानं गाडी ऑटोपायलट मध्ये टाकण्यासाठी सुद्धा तिला संधी मिळाली होती.  त्यामुळे तिचं विचारचक्र जोरात सुरु होतं. तरीही बॅकमिरर मधुन सतत डोकावणाऱ्या गाडीनं तिला काहीसं विचलित करण्यास सुरुवात केली होती.  मग तिनं  स्वतः गाडीचा ताबा घेऊन थोडा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण ही कार तिला ओव्हरटेक करण्याच्या अजिबात घाईत नव्हती. 

शाल्मलीचा मेंदू एव्हाना खूपच जागृत झाला होता. तिने आपला पाठलाग केला जात आहे हे तिनं मान्य केलं होतं. आपला पाठलाग पृथ्वीवर तो सुद्धा काहीशा अपरिचित प्रदेशात होत आहे हे तिला पुरेसं धोकादायक वाटलं. काही केलं तरी ती चंद्राची नागरिक होती त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी चंद्रांच्या अधिकाऱ्यांकडे होती. तिनं पुन्हा एकदा गाडी ऑटोपायलट टाकून काही मेसेजेस पाठवले. 

शाल्मलीचा पाठलाग करणारा सामंत पुर्ण  उत्साहात आला होता. बऱ्याच दिवसांनी एखाद्या सनसनाटी कामगिरीत सहभागी व्हायची संधी त्याला मिळाली होती. परंतु सावजाचं लक्ष न वेधता पाठलाग करण्यात त्याला यश मिळाले नव्हतं. अचानक त्याचा फोन खणखणला.  "पाठलाग ताबडतोब थांबवावा!" हा संदेश मिळताच
 ठेवणीतले काही शब्द उच्चारून सामंतने पुढील उपलब्ध एक्झिट घेतला.  तेथील फूड मॉलमध्ये जाऊन तोआपला राग शांत करीत तो बसला. 

सामंतांचा बॉस असणाऱ्या  तळेकरचा मात्र भेजा खलास झाला होता. प्रथम 
अमेरिकेतून कॉल येऊन त्याला द्रुतगती मार्गावर त्याला आपल्या माणसाला पाठलाग करण्याचे  आदेश द्यावे लागले होते. पाठलाग अगदी रंगात येताच मात्र एका तासातच चंद्रावरून एक अशक्यप्राय व्यक्तीने त्याला हुकुमी स्वरात पाठलाग रद्द करण्याचे आदेश दिले होते. 

गाडी जशी दिसेनाशी झाली तसे शाल्मलीने सुटकेचा निश्वास टाकला. गुहागरला पोहोचेस्तोवर रात्रीचे दहा वाजले होते. तिनं तिथलं एक छोटेखानी पण चांगलं हॉटेल बुक केलं. फ्रेश होऊन कुतूहल न शमल्यानं शाल्मली पुन्हा नीलाच्या फेसबुक अकाउंटला लॉग इन करती झाली.  "हॅलो" नीलाच्या अकाउंटवर कोणीतरी तिला पिंग केले होते. "हाय" शाल्मलीने त्या पिंगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला खरा पण त्यानंतर आपण हे बरोबर केले का या विचारात ती पडली होती.  "या अकाउंटवर कोण लॉग इन आहे?" अशी समोरुन विचारणा झाली.  ह्या उद्धट माणसाला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असताना नीलाला प्रत्यक्षात ओळखणारे कोणीतरी अजूनही जिवंत आहे हा विचार तिला काहीसा दिलासा देऊन गेला. 

"मी आहे राजेश!" शाल्मलीने धडधडीत खोटं उत्तर दिलं.  "आपण कोण आहात?" शाल्मलीने राजेशच्या पडद्याआडून काहीसा धाडसी प्रश्न विचारला. थोडावेळ समोरून काही उत्तर आले नाही. मग आपण कुठे आहात हा प्रश्न तिने विचारला. "मी कोकणात गुहागरला आहे" ह्या उत्तराने तिच्या अंगावर शहाऱ्याची लहर पसरुन गेली. "मी सुद्धा.... " तिच्या तोंडात आलेले हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधी कोणत्यातरी अद्भुत शक्तीने तिला थांबविलं अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. 

काहीशा भितीनं तिनं घाईघाईनं लॉगआऊट केलं खरं पण  तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. तिनं पंधरा मिनिटांनी पुन्हा लॉगइन केलं. ती व्यक्ती ऑनलाइन नव्हती. शाल्मलीनं नीलाच्या अकाउंटची बारकाईनं तपासणी सुरू केली. आता ज्या व्यक्तीने पिंग केले होते त्या व्यक्तीचे आणि निलाचे बरेच सामायिक मित्र होते. त्या मित्रांच्या यादीवर लक्ष टाकताना एका नावाने तिचे लक्ष वेधून घेतले. सरंजामे नावाची एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीची आणि नीलाची फ्रेंड हिस्टरी पाहताना बऱ्याच गोष्टी शाल्मलीला उलगडत गेल्या होत्या. 

सरंजामे आणि नीला कॉलेजच्या जीवनात प्रथम एकत्र भेटले होते. त्यानंतर बहुधा एकत्रही आले होते. परंतु काही कारणाने मध्ये अनेक वर्ष दोघांचा संपर्क नसावा असे एकंदरीत वाटत होते. अचानक २०१९ साली पुन्हा सरंजामे नीलाच्या संपर्कात आला होता. तिथून मग मात्र नीलाच्या जीवनात खळबळ माजण्यास सुरुवात झाली होती. शाल्मली इतक्या सर्व काही विचारात असताना " हॅलो!" पुन्हा एकदा समोरील व्यक्तीने पिंग केले! या व्यक्तीचे नाव होते जोशी. वय वर्षे ८५ म्हणजे नीला आणि शाल्मली या दोघांना जाणणारी सध्यातरी एकमेव व्यक्ती ! "मी इथे कोकणातच आहे,  मी उद्या गुहागरला येऊ शकतो!" राजेशच्या अवतारातील शाल्मली म्हणाली.  "सकाळी ११ वाजता!" शाल्मलीला आपला विचार बदलण्याची संधी न देता जोशी आजोबा म्हणाले आणि क्षणार्धात गायब झाले सुद्धा !

शाल्मलीला आता मात्र झोप येऊ लागली होती. पण इतक्यात तिला काहीतरी सुचलं ! तिनं एक मेसेज टाकला आणि पाचव्या मिनिटाला तिचा बॉस नॅथनची हॉलॉग्राफिक प्रतिमा तिच्यासमोर अवतीर्ण झाली होती. "शाल्मली, हा काय प्रकार सुरु आहे?" त्यानं काहीशा दरडावणीच्या सुरात विचारलं. "थोडंसं धाडस सुरु आहे इतकंच !" शाल्मली म्हणाली. तो बहुदा कामात खूप गर्क होता. "टेक केअर !" इतकं बोलुन तो गायब झाला ! आणि दमलीभागली शाल्मली सुद्दा दोन मिनिटात झोपी गेली! 

त्या छोटेखानी रेस्टाँरंटमध्ये जोशीआजोबांना शोधुन काढण्यास शाल्मलीला फारसा वेळ लागला नाही ! "राजेश!" त्यांच्यासमोर आत्मविश्वासानं जात, मिळवत आणि खुर्ची सरकवत आसनस्थ होत शाल्मली म्हणाली. 

"ओह आय सी !" आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपविण्याचा प्रयत्न करीत आजोबा म्हणाले. 

"तु निलाचे अकाऊंट हॅक का आणि कसं केलंस ?" आजोबांनी थेट मुद्द्याला हात घातला. 

"कोकणाविषयीच्या माझ्या आकर्षणामुळं मी नीलाताईंच्या अकाउंटपर्यंत पोहोचले ! आणि ... " 

"तू करतेस काय? " जोशीआजोबांनी  तिला अडवलं ते बहुदा तिच्याकडुन आपल्याला अकाउंटविषयी काही खरी माहिती मिळणार नाही ह्याची खात्री पटल्यानं !

"मी चंद्रावर असते ! आणि बाकी काही सांगु शकत नाही !" शाल्मली म्हणाली. 

जोशीआजोबांच्या चेहऱ्यावरील भाव पालटले होते ! 

"आपण नीलाताईंचे कोण ?" शाल्मलीने प्रश्न विचारला. 

"त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते!" जोशीआजोबा तुटकपणे म्हणाले. त्यांच्या डोक्यात विचारचक्र  सुरु होती ह्यात शंका नव्हती !

आता पुढं बोलायचं काय ह्याविषयी शाल्मलीला प्रश्न पडला होता !  
"त्यावेळचं कोकण किती छान होतं किनई !" तिच्या तोंडुन किनई शब्द ऐकुन जोशीआजोबांइतकीच तीही आश्चर्यचकित झाली होती. आजोबा काही बोलण्याच्या मुडमध्ये नसल्यानं तिचीच गडबड सुरु होती. खरंतर ती एक मितभाषी व्यक्ती होती. परंतु आज काहीतरी आगळंवेगळं घडत होतं!   आणि बोलताबोलता 

"हे सरंजामे कोण हो ?" हा प्रश्न तिच्या तोंडुन निघाला ! आजोबांच्या चेहऱ्यावरील भाव आता पुर्णपणे पालटले. त्यानंतर त्यांना आलेली खोकल्याची उबळ खोटी आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नव्हती ! त्याचं निमित्त करुन "मी आलो थोड्याच वेळात!" म्हणुन ते घाईघाईनं आतील कक्षात असलेल्या वॉशबेसिन मध्ये गेले ! 

का कोणास एका अनामिक भितीच्या भावनेनं शाल्मलीला स्पर्श केला होता. "U5435" तिनं नॅथनला मेसेज केला. "मला मदतीची तातडीनं गरज आहे " असा त्याचा अर्थ होता. नॅथन इतक्या त्वरित कशी मदत करणार ह्याविषयी तिच्या मनात शंका होतीच! घाईघाईनं तिनं रेस्टॉरंटमधुन काढता पाय घेतला.  

"गुड मॉर्निंग !" बाहेर उभ्या असलेल्या एका देखण्या युवकानं तिला साद दिली. साडेअकरा वाजता एकट्या दुकट्या तरुणीला पाहुन गुड मॉर्निंग करणाऱ्या तरुणांविषयी २०९० साली सुद्धा तरुणींच्या मनात काही सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता कमीच होती ! पण प्रसंग वेगळा होता. शाल्मली त्या तरुणासोबत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या कारकडं चालु लागली होती !

(क्रमशः)

गुरुवार, २३ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 2



T O m A t O K e T c H u P 

लाल भगव्या रंगांच्या त्या अगडबंब अक्षरांनी neela.limayeabcd चे अकाऊंट लॉग इन झालं होते. "अय्या किती मस्त DP होता हिचा !" शाल्मलीच्या तोंडातुन आपसुकच शब्द बाहेर पडले !  शाल्मली हळुहळू त्या नीलाच्या विश्वात रंगत गेली. विसाव्या शतकातील हिरव्यागार कोकणच्या नयनरम्य फोटोंनी निलाची प्रोफाइल व्यापुन टाकली होती. "अरे वा ! " ती मनातल्या मनात म्हणाली. आपण ज्या कोकणच्या केवळ कथाच ऐकल्या ते प्रत्यक्ष फोटोतुन बघण्याची संधी तिला मिळाली होती !

हिचा जन्म किती सालचा असावा बरे ? हा विचार येण्याच्या एका मिनिटातच ती निलाच्या account information विभागात होती. २४-सप्टेंबर-१९६४ ही निलाची जन्मतारीख पाहुन तिच्या पायाखालील जमीन सरकल्याचा  तिला भास झाला. तरीही मनाची समजुत म्हणुन तिनं आपलं ID कार्ड पुन्हा एकदा निरखुन पाहिलं. शाल्मली सरपोतदार जन्मतारीख २४-सप्टेंबर-२०६४!

आता शाल्मली तिथुन बाहेर निघणं केवळ अशक्य होतं. त्यानंतर तिला पुढील एक धक्का मिळाला. नीलाच्या ह्या प्रोफाईलवर २०२२ सालानंतर  नोंदी दिसत नव्हत्या. नाही म्हणायला "तु आमच्या सदैव लक्षात राहशील!" "एक हसतं खेळतं दिलखुलास व्यक्तिमत्व !" वगैरे कॉमेंट्स होत्या ! ह्या नीलाला वाहिलेली श्रद्धांजली आहे हे कळायला शाल्मलीला वेळ लागला होता ! म्हणजे ह्या बाई अठ्ठावनाव्या वर्षी स्वर्गवासी झाल्या ! शाल्मली स्वतःशी म्हणाली ! 

शाल्मली थोडी अजुन पुढे सरकली तर एक विशेष गोष्ट तिच्या ध्यानात आली ! २०१९ सालापासून बऱ्याचशा पोस्टचे प्रायव्हसी सेटिंग Only Me असे होते.  आणि ह्या पोस्टमध्ये बरीचशी गुप्त माहिती नोंदवली गेली आहे हे शाल्मलीला सहजासहजी समजत होते. "कोण्याच्या अकाउंट मध्ये असं डोकावुन पाहणे चुकीचं आहे" हे तिच्या सद्सद् विवेकबुद्धीनं तिला समजावलं. तिने जवळपास लॉग आऊटचा पर्याय स्वीकारला होताच पण अचानक तिचं लक्ष गेलं, "तु मला का त्रास देतोयस ! मी तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा ताबा तुला दिलाय ना ?" ह्या प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या अजुन एका पोस्टकडे !

तो पुर्ण दिवस शाल्मली त्या अकाऊंटवरच होती ! प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या नोंदी तिला एका गूढ विश्वात घेऊन जात होत्या ! सायंकाळचे चार वाजले होते. आई वडिलांनी आफ्रिकेतुन केलेला कॉल तिनं धुडकावून लावला होता.  बरोबर चार वाजुन पंधरा मिनिटांनी शाल्मली सरपोतदार आपली आलिशान गाडी घेऊन मुंबई कोकण ह्या बारा पदरी आलिशान द्रुतगती मार्गावरुन निघाल्या होत्या ! 

सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये राहणारा आणि फेसबुकच्या जुन्या कर्मचारीवर्गापैकी एक बर्नी सकाळी आपल्या घरुन लॉगिन झाला होता. सर्व Health Check रिपोर्ट्सवर नजर टाकुन सर्वकाही आलबेल असल्याची खातरजमा करुन घेण्याची त्याची जबाबदारी होती ! लॉगिन केल्यानंतर बरोबर दुसऱ्या मिनिटाला त्याची चाणाक्ष नजर एका नोंदीवर पडली होती. गेले ६८ वर्षे निष्क्रिय असलेल्या अकाउंटवर कोणीतरी लॉगिन केले होते. ज्या गॅजेटमधुन हे लॉगिन झालं होते ते गॅजेट प्रतिताशी १५० किमी वेगानं अशा ठिकाणी जात होतं जिथं त्या अकाउंटने १९९० ते २०२२ सालांपर्यंत सक्रियता दर्शवली होती ! 

(क्रमशः )

पहिला भाग 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html 



मंगळवार, २१ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग १



साल - २०९० 

चंदावरील आपली आठ महिन्याची वार्षिक नेमणूक संपवून शाल्मली पृथ्वीवर परतली होती.  चंद्रावरून परत येण्याची ही तिची पहिलीच वेळ नसली तरी पृथ्वीवरील वेळेला सराव होण्यासाठी तिला एक आठवडा नक्कीच जात असे. वर्षातून आठ महिने चंद्रावर नेमणूक, पृथ्वीवर त्यानंतर तीन महिने सुट्टी आणि मग पृथ्वीवरून एक महिना कामाला सुरुवात असेच तिचे वेळापत्रक गेले सहा वर्ष सुरू होते. तिचे आई-वडील आफ्रिकेत वसवल्या गेलेल्या मराठी वसाहतीत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आफ्रिकेतील हवामानाला बरेचसे सरावले होते.  शाल्मली त्यांना महाराष्ट्र मुंबई भेटीला येण्याचा आग्रह करत होती. परंतु यावर्षी मात्र काहीसे तयार नाही असे तिला वाटु लागले होते. 

मुंबईतील त्यांचा फ्लॅट प्रशस्त होता. इथं या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स मध्येच  शेती आणि दुग्धव्यवसाय विकसित केले गेल्यामुळे तिची याबाबतीत गैरसोय होण्याची शक्यता तशी कमीच होती. तिच्या लग्नाचा विषय तिच्यासोबत चर्चेला आणणं म्हणजे उगाच मनस्ताप करून घेणं याची तिच्या आईला आई-वडिलांना पूर्ण कल्पना असल्यानं हल्ली त्यांनी हा विषय तिच्यासोबत काढणार टाळलं होतं. मंगळावरील वसाहतीमध्ये कायम वास्तव्य करण्यासाठी आपला क्रमांक कधी लागतो याची ते वाट पाहत होते. 

अशाच एका रात्री झोपेची वाट पाहत असतानाच शाल्मलीने आपले जुने पुराणे फेसबुक अकाउंट उघडले. तिनं दहा वर्षापुर्वी उघडलेलं हे अकाउंट ती पृथ्वीवरील वास्तव्यात वापरत असे. पृथ्वीवरील मित्रमैत्रिणींशी थोडाफार संपर्क ठेवण्यासाठी हे अकाउंट कामास येत असे. चंद्रावरील मनुष्य आणि परग्रहवासी ह्यांच्या संयुक्त वसाहतीत असले उद्योग करणं तिला शक्य होत नसे. तिच्या मेंदुला आकर्षित करेल असला कोणताही अपडेट तिला पहिल्या नजरेत दिसला नाही. ती लॉगऑऊट करणार इतक्यात तिची नजर People You May Know ह्या विभागाकडं गेली. 

नीला लिमये ह्या व्यक्तीच्या प्रोफाईलकडे लक्ष जाताच तिच्या मनात काहीशी अस्पष्टशी बैचैनीची भावना जाणवुन गेली. असेल काही तरी अशी मनाची समजुत काढुन ती परत झोपण्याचा प्रयत्न करु लागली.  कधीतरी तिला झोप लागली. तिला अधुनमधून स्वप्नं पडत. आजही असंच काही स्वप्न पडत राहिलं. सुरुवातीला काहीसं सर्वसाधारण भासणाऱ्या स्वप्नानं मग मात्र काहीसं वेगळं रुप घेतलं. भोवताली अफाट विस्तार असलेली पोकळी तिच्यासमोर होती. त्या पोकळीत लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे कोणत्याही क्रमानं तिच्याभोवती वेगानं येत आणि निघुन जात होती. काही वेळ असंबद्ध वाटणारा ह्या क्रमात काहीतरी एक पॅटर्न आहे हे जाणवायला तिच्या कुशाग्र मेंदुला वेळ लागला नाही! Fibonacci series च्या क्रमातील अक्षरेच फक्त जर लक्षात ठेवली तर एक विशिष्ट शब्द तयार होतोय हे तिला समजलं. तो शब्द तिच्या मेंदूने कुठंतरी नोंदवुन ठेवला. ह्या शब्दांची ही कसरत थांबली तेव्हा अचानक @gmail.com ही शब्दसाखळी एक सेकंद तिच्या डोळ्यासमोर आली आणि सर्व काही शांत झालं. ह्या नंतर तिला कधी झोप लागली हे तिला समजलंच नाही !  

दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तिला जवळपास दुपारचे बारा वाजले होते. सर्व काही आटपुन ती फुरसतीत बसली नसेल तितक्यात तिच्यासमोर ती लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे पुन्हा एकदा पिंगा घालु लागली ! ती खरंतर कधी बैचैन होत नसे पण हा प्रकार तिला नक्कीच त्रासदायक होत होता. तिनं मग काही काळ नृत्य केलं, विविध प्रकारचं संगीत ऐकलं पण फारसा फरक पडत नाही हे तिला ध्यानात आलं. दमली भागली शाल्मली त्रस्त मनानं पुन्हा एकदा लॅपटॉपवर बसली.आजच्या दिवसात तिच्यासाठी काही ठीक घडावं असं नियतीला मान्य नसावं! फेसबुक उघडता क्षणीच तिच्यासमोर नीला लिमयेची प्रोफाइल आली! 

शाल्मली ह्या क्षणी आपलं संतुलन गमवून बसली. चंद्रावरील आपल्या अवतारात ती एक प्रसिद्ध संशोधक होती. तिचा मेंदु कसा विचार करेल ह्याचा तिलाही बऱ्याच वेळा थांगपत्ता लागत नसे. आपल्या मेंदुवर कोणी बाह्य शक्ती ताबा घेत असावी असा तिला दाट संशय होता. आताही असेच झालं. तिनं आपल्या अकाउंटमधुन लॉगऑऊट केलं आणि Login into new account हा पर्याय स्वीकारला. neela.limayeabcd  ह्यातील abcd हे वर्ष आपण का टाईप केला ह्याचा तिला विचार करायचा नव्हता. ई-मेलचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी ती गोंधळली ते क्षणभरच ! @gmail.com ची स्वप्नातील शब्दसाखळी तिच्यासमोर स्पष्टपणे झळकली होती ! 

आता प्रश्न होता तो पासवर्डचा ! लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे तिच्या चांगलीच लक्षात होती ! 
(क्रमशः )

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

दहावी परीक्षा - व्यावसायिक आयुष्यातील पहिली पायरी !



दहावी परीक्षांच्या ICSE आणि CBSE ह्या दोन परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. SSC बोर्डाचा लवकरच जाहीर होईल. माझ्या अनुभवावर आधारित हे दोन शब्द ! 

व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडं आवश्यक असलेल्या गुणांपैकी खालील हे असे गुण  ज्यांची दहावीच्या परीक्षांत सुद्धा चाचपणी  होते. 


१) मुळ संकल्पनांची समज 
मेहनत तुम्हांला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. निर्विवाद यश मिळविण्यासाठी मुळ संकल्पनांची समज अत्यावश्यक आहे! 
२) कॉमन सेन्स 
मेहनत, मुळ संकल्पनांची उमज ह्या घटकांसोबत प्रत्यक्ष कामगिरी (आपल्या उदाहरणात परीक्षेचा पेपर) करत असताना कोणता तरी surprise factor तुमच्या समोर उभा ठाकणारच ! अशा वेळी उपलब्ध माहिती आणि पुर्वानुभव ह्यांच्या आधारावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे कॉमन सेन्स !
३) जिद्द, चिकाटी - Never Give Up Attitude  
दहावी, बारावी म्हणा किंवा आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा टप्पा म्हणा ! ही वर्ष - दोन वर्षे , अनेक वर्षांची मेहनत असते. ह्या दीर्घ प्रवासात तुम्हांला निराशेचे क्षण येणारच ! एखाद्या किंवा दोन  - तीन सराव परीक्षांत कमी गुण मिळु शकतात. पण ज्या परीक्षेतील कामगिरी खरोखर गणली जाते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करणे आवश्यक असते. त्यामुळं जोवर ती परीक्षा झाली नाही तोवर काहीही बिघडलं नाही हे स्वतःला समजावत रहा ! 

आता वळुयात बाकीच्या मुद्यांकडे ! 
शिकवणी वर्गाशिवाय खरंतर  काहीच अडत नाही. ते तुमचा उगाचच वेळ घेतात. दररोज घरी येऊन जो विद्यार्थी नियमितपणे एक धड्याचा स्वतःहुन अभ्यास करतो, स्वतःच्या नोट्स काढतो त्याला शिकवणीची गरज नाही ! बरेचसे शिकवणी वर्ग मुलांना दमवितात. शाळा आणि शिकवणी मिळुन साधारणतः १० तास खर्च होत असतील तर स्वअभ्यास करण्याची संधीच मुलांना मिळत नाही. 

शाळेत बऱ्याच वेळा तुम्हांला शिकवणी वर्गात सर्व काही शिकवलं गेलं आहे असं गृहीत धरलं जातं शाळेत काही (आगाऊ) विद्यार्थी असतात ज्यांना आपल्याला समजलं आहे हे उगाचच सर्वांसमोर दाखवुन द्यायचं असते त्यामुळं त्यांनी गणितं सोडवुन दाखवली की बाकी सर्वांना सुद्धा ती समजली आहेत असं सोयिस्कर गृहितक बरेचसे शिक्षक करतात. त्यामुळं केवळ यांत्रिकदृष्या काही मुलं गणिताच्या स्टेप्स मांडतात पण मुळ संकल्पनांचा आनंदी आनंदच असतो ! "सर मला हे समजलं नाही ! परत समजावुन सांगा ! " हे भरवर्गात सांगायचे धारिष्ट्य जो मुलगा / मुलगी दाखवु शकतो त्यांनी व्यावसायिक जगात आवश्यक असणारा एक अत्यंत महत्वाचा गुण आत्मसात केला असे म्हणता येईल ! 

पुर्वी (मराठी माध्यमाच्या - हे माझ्या अनुभवावर आधारित!)  उत्तरपत्रिकांचे परीक्षण करताना जणु काही प्रत्येक उत्तर विविध पैलुंवर तपासुन पाहिलं जात असावं. उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ही गोष्ट तुम्हांला पुर्ण गुण मिळवुन देण्यासाठी पुरेशी नसे. ते योग्य क्रमानं मांडले गेले आहेत का, शब्दांचा योग्य वापर केला गेला आहे की नाही, शुद्धलेखन वगैरे अनेक घटकांची तपासणी केली जात असे. त्यामुळं नव्वद टक्क्यांच्यावर जाणं तितकंसं सोपं नसायचं. हल्ली बहुदा उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ह्या एकमेव निकषावर पुर्ण गुण मिळत असावेत. त्यामुळं सरासरी गुणवारीचं प्रमाण वाढलं आहे! आणि त्यामुळं स्वअभ्यास करुन घवघवीत यश मिळु शकते ह्या संकल्पनेस जोरदार पुष्टी मिळते !

सायन्स, सोशल सायन्स ह्या विषयांसाठी स्वतःच्या नोट्स  बनविणे हा घटक शेवटच्या दोन महिन्यात आणि परीक्षेच्या कालावधीत फार महत्वाचा ठरतो! 

साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी पुर्ण पेपर सोडविण्यास सुरुवात करावी. व्यावसायिक जगात कोणताही प्रश्न सोडविताना Top Down आणि Bottom Up असे दोन दृष्टीकोन स्वीकारले जातात. का कोणास ठाऊक पण संपुर्ण पुस्तकांचा अभ्यास करुन परीक्षा देणे हा Bottom Up दृष्टिकोन आणि आधीच्या बऱ्याच वर्षांच्या पेपरचा अभ्यास करुन परीक्षेसाठी सज्ज होणे हा Top Down दृष्टिकोन असे मला वाटतं. ह्या दोन्ही दृष्टिकोनांचे योग्य मिश्रण साकारता यायला हवे ! 

आयुष्याकडं बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. दहावी, बारावी, पदवी परीक्षा, व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य हे आयुष्याचे ढोबळमानाने महत्वाचे टप्पे आपण मानु शकतो ! लेखाच्या आरंभीस नमुद केलेले तीन (आणि तत्सम) गुण  ह्या सर्व टप्प्यांत वारंवार परिक्षले जातात. दहावीतील यश - अपयश गुणांच्या निकषावर न पाहता ह्या वरील तीन गुणांपैकी आपण कोणते गुण प्रदर्शित करु शकलो, ह्या अनुभवातून काय शिकू शकतो ह्याचं परीक्षण करणे योग्य ठरेल. आयुष्य प्रत्येकाला अनेक संधी देत राहणार! दहावी - बारावी ह्या सर्व संधींपैकी  सुरवातीच्या दोन संधी आहेत हे लक्षात ठेवणं योग्य ठरेल ! 

सोमवार, १३ जुलै, २०२०

भेंडीचे पडले झाड !


वसईत पाऊस स्थिरावला आहे. स्थिरावला आहे म्हणजे बऱ्यापैकी दिवसभर लागुन राहत आहे. मंडळींनी पंखा बंद करायला हरकत नाही इतका गारवा आला आहे. अधुनमधून सोसाट्याचा वाराही सुटतो. घरासमोरील कंपाऊंडपलीकडे काही मोठाली झाडे आहेत. 

आज सकाळपासुन ऑफिसचे कॉल सुरु होते. सकाळी अकरा वाजता एक फांदी तुटल्याचा आवाज आला. कॉल सुरु असल्यानं फारसं लक्ष देता आलं नाही. आवाज भेंडीच्या झाडातुन आला की अंबाडीच्या ह्याचा सुगावा लागला नाही. कॉल सुरु राहिले आणि तो आवाज काहीसा विसरला गेला. 

पावणेचार वाजता मात्र आवाजांची वारंवारता वाढली. जणु काही कोणीतरी झाडावर कुऱ्हाड चालवत आहे की काय असा भास होत होता. अंगणात जाऊन पाहिलं तर आवाज भेंडीच्या झाडातूनच येत आहे ह्याची खातरजमा केली. मी सोहमला जाऊन झाड पडत आहे तर पाहायला चल असे सांगितलं. तो आपला लॅपटॉप सोडुन आला. आता तर दार दहा पंधरा सेकंदाला आवाज येऊ लागले होते. 

आणि मग एक मोठाला आवाज झाला ! भेंडीचं इतकी वर्षे अंगणाच्या पलीकडं असलेलं झाड जमीनदोस्त झालं. झाड पडलं की का कोणास ठाऊक मनाला खंत वाटते. लहानपणापासुन पाहिलेली झाडं अशी पडली की अजुनच खंत वाटते. प्रत्यक्ष पडताना पाहिलेलं हे पहिलंच झाड ! सकाळी पहिला आवाज आला त्यावेळी जागरुकतेने हालचाल करुन योग्य व्यक्तींना बोलावुन झाडाला आधार वगैरे देता आला असता का असे विचार मनात आले ! कोरोना काळात हे फारसं शक्य नाही ह्याची मनाला जाणीव होतीच !

कॉल पुनःश्च सुरु झाले. पुन्हा एकदा पुर्वीपेक्षा थोडा कमी आवाज करत झाडाचा उर्वरित भाग पडला. ह्यावेळी कुंपणावरून अंगणात पडला ! भेंडी आणि अंबाडीच्या झाडांनी अंगणात सावली आणली होती. त्यामुळं अंगणातील झाडं सूर्यप्रकाशाअभावी जास्त जोर धरीत नाहीत असं मोठ्या माणसांना  लहानपणापासुन  बोलताना ऐकलं आहे त्याची आठवण झाली ! आंबाही सूर्यप्रकाशासाठी ईशान्येकडे जास्तच झुकला आहे ! आता तो सरळ वरती जाईल, मी मोठ्या माणसासारखा सोहमला म्हणालो ! 

काहीही असो भेंडी तु पडायला नको होतो! आज खिडकीपलीकडं पडलेली भेंडी आहे. Long Live Bhendi !! 



ह्या झाडाविषयी अधिक माहिती विकिपीडियावरुन साभार ! 

भेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.[१]
मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारतश्रीलंकाअंदमानबांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबईचेन्नईकोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.
भेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.
आणि ही लिंक 

रविवार, १२ जुलै, २०२०

जुन्या आठवणी!



सध्या लॉकडाऊन मध्ये वसईला राहण्याची संधी मिळाली आहे. घरी ज्येष्ठ मंडळींसोबत बैठक बसली की जुन्या आठवणी ऐकायला मिळतात. त्यातील ह्या काही नोंदी !

बर्मा टाईम  
ही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची आठवण ! त्यावेळी इंग्रज लोकांनी भारतात बर्मा टाइम अंमलात आणला होता. म्हणजे आपली घड्याळं बहुदा एक तास पुढं गेली असावीत. म्हणजे सकाळी सहा वाजण्याऐवजी सात वाजत असत. त्यामुळं मोठीआईच्या वडिलांना, नानांना आपल्या कामकाजासाठी बाहेर पडण्यासाठी घाई करावी लागत असे ही मोठी आईनं सांगितलेली आठवण !

हवाई हल्ल्याचं भय 
ह्या अनुषंगानं तिनं सांगितलेली अजुन एक आठवण म्हणजे काही लोकांनी जमिनीखाली आडोसा घेण्यासाठी बनविलेल्या संरचना ! 

रात्रीच्या वेळी नागरी वस्ती कुठं आहे हे शत्रूपक्षाच्या विमानांना कळू नये ह्यासाठी एकतर दिवे लावण्यास मनाई असे किंवा दिव्यांचा प्रकाश बाहेर जाऊ नये ह्यासाठी खिडक्यांची तावदाने काळ्या कागदाने झाकुन ठेवली जात असत ! 

भारताच्या ह्या भागापर्यंत हवाई हल्ले होण्याची शक्यता कमीच असल्यानं लोकांनी हा खटाटोप का केला असावा हे समजत नाही. 

खिडक्यांची तावदाने काळ्या कागदाने झाकुन ठेवण्याचा प्रकार १९७१ सालच्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात सुद्धा ऐकिवात होता. त्यावेळी म्हणे लोकल गाड्यांच्या पुढे सुद्धा अशी कागद लावली जात असत !

१९४७ चे वादळ 
१९४७ साली महाभयंकर वादळ आले होते. त्यानं मोठीआईंच्या मुळगावच्या घराची बहुतांशी कौले उडुन नेली होती. घराच्या छोटया भागात कौलं शिल्लक राहिली होती तिथं मोठी आई आणि लहान भावंडं आसऱ्यासाठी एकत्र आली होती. नानांनी मग त्यांच्या मुलांना एका मजबुत पलंगाखाली लपविले होते अशी माहिती प्रकाश मामा ह्यांनी दिली !
दुसऱ्या दिवशी गावातील मंडळी कुऱ्हाडी घेऊन बाहेर आली आणि त्यांनी सर्वप्रथम कुऱ्हाडींनी रस्त्यात पडलेली झाडं कापुन काढुन रहदारी सुरु केली होती. 

अग्निहोत्री - इंग्रजांच्या काळात एक अग्निहोत्री नावाचा अधिकारी होता. त्याला इंग्रजांनी गोळीबाराचे आदेश जरी करण्याची सुचना दिली होती. ती पाळावी लागु नये म्हणुन त्यानं आजारी असल्याचा बहाणा करुन परिचितांकडे आसरा घेतला होता. 

मद्यधुंद मासे 
शेजारच्या  काकूची गावठी दारुची भट्टी होती. जमिनीत खड्डे करुन त्यात किण्वन प्रक्रियेने (fermentation) प्रकियेने दारु बनवली जात असे. बाहेरुन कोणाला कळु नये म्हणुन त्यावर केळीची पाने (खोले) वगैरे टाकुन हा सर्व प्रकार झाकला जात असे. परंतु इतक्या कडेकोट बंदोबस्त असतानाही एकदा पोलिसांची धाड पडणार अशी बातमी आली. त्यामुळं नाताळ काकूने सर्व पिंप बावखलात रिती केली. त्या रात्री बावखलातील मासे बसले! आणि त्यांनी जोरदार पार्टी केली. परंतु मदिरेचा इतका डोस त्यांना सहन होऊ शकला नाही, सकाळी ते सारे झिंगलेल्या अवस्थेत बावखलाच्या किनाऱ्याला लागले. छोट्या दाजींना आजीनं ते पकडुन आणायला सांगितले.  ते मासे खाऊन समस्त पाटील कुटुंबियांवर काय परिणाम झाला ह्याची नोंद उपलब्ध नाही !  

मावटी 
पुर्वीच्या काळी सर्व पुरुष मंडळी बैलगाडीनं गावंढयाला (मुंबई अहमदाबाद मार्गावरील आणि अन्य वसई बाहेरील परिसरात असणाऱ्या शेतजमिनी) जात असत. इथं जायला सोयीचं पडावं म्हणुन ही पुरुषमंडळी गटागटानं जात. रात्री तिथल्या बेण्यावर वास्तव्य केलं जाई. आजुबाजुला असणारा झरा पाण्याची सोय भागवत असे. तिथं चुल पेटवुन रात्रीचा स्वयंपाक केला जाई ! हा स्वयंपाक करण्यास सोयीचं पडावे म्हणुन महिला वर्ग त्यांना एक छोट्याशा टोपलीत स्वयंपाकासाठी लागणारी सर्व सामुग्री देत असे. ह्यात प्रामुख्यानं कांदा, बटाटे, सुके बोंबील, वांगी, आगपेटी वगैरे जिन्नसांचा  समावेश असे ! त्या काळातील पुर्ण नैसर्गिक वातावरणातील झऱ्याच्या पाण्यात, चुलीवर शिजवलेलं अन्न किती रुचकर असेल ह्याची कल्पना करुनच जिभेला पाणी सुटतं! पण एकंदरीत ते जीवन खुप कष्टदायक होते. रात्री त्या मोजका आडोसा देणाऱ्या बेड्यात थंडी पावसात वास्तव्य करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे ! 

वसईचे वास्तव्य अजुन काही काळ असल्यानं अजुन ज्या काही आठवणी गोळा होतील तशा इथं मांडत जाईन !


ही पोस्ट ऐकीव माहितीवर आधारित असल्यानं चूक भुल द्यावी घ्यावी ! 

शनिवार, ४ जुलै, २०२०

मराठी - पुढील प्रवास !




एका मराठी उदयोन्मुख लेखकांच्या गटावर काही महिन्यांपुर्वी मला आमंत्रित केलं गेलं. ह्या गटावरील वास्तव्य मला मनापासुन आनंद देऊन जात आहे. विविध विषयांवरील लिखाण, त्यावरील अभ्यासपुर्ण आणि थोड्या प्रमाणात मिश्किलतेकडं झुकणाऱ्या प्रतिक्रिया वाचण्यात एक समाधान आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वी आणि मराठीत व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असलेली व्यक्तिमत्वं इथं आहेत ! इथले ऍडमिन लोक जबरदस्त आहेत, आठवड्याभरात प्रसिद्ध केल्या गेलेल्या लेखांचं अभ्यासपुर्ण विश्लेषण ते नियमितरित्या प्रसिद्ध करतात. 

ह्या गटाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे हा गट तुम्हांला तुमच्या लेखावर टिप्पण्या देऊन सदैव प्रोत्साहन देतो. मी ह्या बाबतीत आळशी किंवा काहीसा स्वकेंद्रित आहे. आपलं लिहुन झालं की मी मोकळा असा काहीसा स्वार्थी दृष्टिकोण मी बाळगतो. त्याचं समर्थन करावयास कामाची सबब आहेच. 

आज ह्या गटाचा  चौथा वाढदिवस ! त्यानिमित्त एक झुम बैठक आयोजित करण्यात आली आहे. तिथं य धमाल केली जाईल ह्याविषयी मी निःशंक आहे ! कारण मंडळी आहेतच उत्साहाचा झरा म्हणुन ओळखली जाणारी ! 
ह्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासमोर काहीसा गंभीर विषय मांडत आहे ! (नाहीतरी माझ्याकडुन दुसरी काय अपेक्षा करावी? ) प्रारंभ मराठी भाषेपासून करत उगाचच व्यावसायिक जगात चक्कर मारुन मी अखेरीस त्या गटाकडं येईन ! त्या समुहापुढं मांडलेलं हे मनोगत ! 

सुरवात करुयात ती पुढील पन्नास वर्षानंतर मराठी साहित्याचं काय  चित्र असेल ह्या मुद्द्यापासुन ! दहा वर्षांपुर्वी मराठीत काही चांगलं नवीन लिहिलं जात नाही म्हणुन एक खंत व्यक्त केली जात होती आज तो प्रश्न नाहीय . कारण गुणवंत मराठी लोकांना लिहिण्याचं माध्यम माहितीमायाजाळाने, ब्लॉग्सने उपलब्ध करुन दिलं आहे. लोक ही माध्यमं आत्मविश्वासानं वावरत सुद्धा आहेत ! 

पन्नास वर्षानंतरची  (२०७० साल) मराठी मंडळी इतक्या मोठ्या संख्येनं, विविध विषयांवर मराठीत व्यक्त होतील का?  प्रश्नाचे दोन पैलु आहेत. मराठी भाषेत व्यक्त होऊ शकणारी मंडळी त्यावेळी अस्तित्वात असतील पण त्यांचा आत्मविश्वास दांडगा असेल का? आणि आत्मविश्वास दांडगा असणारी मराठी मंडळी मराठीतुन व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असतील का ? ह्यामागं मराठी माध्यमातील शिकणाऱ्या मराठी मुलांचं कमी होणारं प्रमाण हा कळीचा मुद्दा ! मराठी माध्यमातुन शिकणं ही समस्या नाही, सोबत गुणवान मुलांचा सहवास न मिळणं आणि पुर्वीइतके दर्जेदार शिक्षक उपलब्ध नसणं ही मुळ समस्या आहे. 

आता वळूयात ते Definition of Success म्हणजे समाजाने मान्य केलेल्या यशस्वितेच्या व्याख्येकडे ! International School मध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देणाऱ्या पालकांची मानसिकता कोणती असावी?  आपल्या पाल्याने एक यशस्वी कारकीर्द बनवावी, त्यासाठी अनुकूल व्यक्तिमत्व बनवावं  ह्यासाठी ह्या International School मदत करतील हा ह्यामागचा  प्रामुख्यानं विचार असतो. माझा जो काही अनुभव आहे त्यावरून ह्या शाळा तुमच्या मुलांना एक उत्तम बाह्यरूपी पॅकेज बनविण्यासाठी उपयुक्त आहेत. पण संकल्पनांचा जो उत्तम गाभा विकसित करावा लागतो त्यात मात्र ह्या शाळा बऱ्याच अंशी कमी पडतात असं माझं वैयक्तिक मत आहे. हा उत्तम गाभा एकतर नैसर्गिकरित्या तुमच्यात असावा लागतो आणि त्यावर तुमच्या पालकांनी सुरुवातीच्या जडणघडणीच्या वर्षांत संस्कार करायला हवेत. अशी गुणवान  मुलं ज्यावेळी ह्या शाळांच्या नजरेत सातवी - आठवीत येतात  त्यावेळी ह्या शाळा त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात कारण त्यानंतर येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी  ,  संभाषणकला विकसित करणे वगैरे गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध असते. परंतु ह्या इयत्तांपर्यंत जर तुमच्याकडं पाया विकसित झाला नसेल तर मात्र तुमची मुलं दहावी, बारावी ह्या टप्प्यांत हरवु शकतात कारण ह्या केवळ बाहयरूपी अस्तित्वात असलेल्या आकर्षक पॅकेजचा पर्दाफाश ह्या स्थितीत होतो. 

साधारणतः १९८० च्या आसपास बनविलेल्या यशस्वितेच्या व्याख्येचे पुनर्परीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी अभियंता, डॉक्टर ह्या पासुन सुरु झालेली यशस्वितेची व्याख्या मध्यंतरीच्या काळात माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियरपर्यंतच विस्तारली गेली.  माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियर ४० -४५ च्या वयोगटापलीकडं टिकविण्यात केवळ २० -२५ % टक्के लोकांनाच यश येते हे आजचे सत्य आहे. ह्यास काही अंशी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांनंतर व्यवस्थापकीय भुमिकांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती कारणीभुत आहे. २०२० सालातील घटनांमुळं एक वलयांकित नसलेलं पण मनःशांती देऊ शकणारं  करियर, एक नेकीनं करता येण्यासारखा उद्योगधंदा ह्या गोष्टी यशस्वितेच्या व्याख्येत समाविष्ट व्हायला हव्यात. ह्या गोष्टी समाविष्ट झाल्या की त्या पिढीचे संसार सुखाचे होतील, त्यांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळ मिळेल ही माझी भोळीभाबडी आशा ! 

आता ह्यात हा उदयोन्मुख मराठी लेखकांचा गट काय करु शकतो? २२२२ साली (हो २२२२ साली ) ज्या वेळी मागील दोन शतकांतील मराठी साहित्याचा आढावा घेतला जाईल त्यावेळी ह्या गटानं  मराठी भाषेत जी मोलाची भर घातली असेल त्याची नोंद घेतली जावी. मराठी साहित्यातील सद्यकाली अस्तित्वात असणारे साहित्यप्रकार अधिक सुदृढ करणे, नवीन साहित्यप्रकारांची निर्मिती करणे ह्यासारख्या गोष्टींमध्ये ह्या गटानं मोलाचा वाटा उचललेला असावा ! सर्वांत महत्वाचं म्हणजे मराठी संस्कृतीत तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी नम्रतेची कास धरुन राहण्याची जी वृत्ती कित्येक पिढ्या अस्तित्वात आहे.  तिला कसं टिकवुन धरावं ह्यासाठी ह्या गटानं कामगिरी बजावलेली असावी! हे शक्य होण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणात कालानुरूप बदल घडवत ते कसं टिकविता येईल आणि यशस्वितेच्या नव्या व्याख्येत बसणारी मुलं मराठी माध्यमाच्या शाळा कशा प्रकारे घडवु शकतील ह्यावर किमान चिंतन तरी घडवुन आणावं ! 

ह्या अपेक्षा त्या गटाकडुनच नव्हे तर प्रत्येक सुजाण मराठी नागरिकाकडून बाळगाव्यात असं मला वाटतं !

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...