मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलनासाठी झाला. एकंदरीत आठ वेळा विमानानं उड्डाण केलं. त्यासोबत आठ वेळा लँडिंग सुद्धा झालं हे ओघानं आलंच.   

अमेरिकेतील दोन ठिकाणच्या टीमची भेट झाली. विल्मिंग्टनला एक ऑफसाईट झालं. ऑफसाईटमध्ये चांगली चर्चा झाली. इशा कार्यालयात भेटायला आली. बराच वेळ तिच्या अमेरिकन जीवनाविषयी बोलली.  निशांक, निऊकडे चार दिवस मस्त गप्पा मारल्या. निरंजना, शर्व, निशांकची बहीण ममता भेटले. होळीवरचा आशय तिथं भेटला, त्याच्यासोबत मस्त जेवण केलं. विल्मिंग्टनला शालेय वर्गातील अजय, नंदा भेटायला आले. त्यांच्या आणि कल्पेशसोबत (नंदाचे यजमान) सुद्धा चांगली चर्चा झाली. प्लॅनोला नवीन संघाशी ओळख झाली. तिथं भारतातून स्थलांतरित झालेले मित्र भेटले. झूमवर नेहमी बोलणारा फेमी पुन्हा प्रत्यक्षात भेटला. भारतीय आणि अमेरिकन रेस्टोरंटमध्ये स्वादिष्ट अन्नावर चांगला आडवा हात मारला. शनिवार सकाळी निऊसोबत कार्यसिद्धी हनुमान मंदिरात जाऊन आलो. योगायोगानं तिथं त्याचवेळा सुरु झालेल्या आरतीला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. 

विल्मिंटन कार्यालय, तिथले सहकारी, तिथलं हॉटेल ह्याची अगदी सवय झाली आहे.  सकाळी साडेसातला कार्यालयात जाऊन साडेचारच्या आसपास घरी निघण्यासारखं सुख नाही. थंड हवामान आणि स्निग्ध / दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केल्यानं चेहरा उजळला असे प्राजक्ता म्हणाली . मुंबईत आठवडाभरात तो पूर्वीसारखा दमलेला झाला ही गोष्ट वेगळी! अमेरिकेतील यंदाचा जेट लॅग माझ्यासोबत मित्रत्वाने वागला. मध्यरात्री एक वाजता जरी त्यानं मला उठवलं तरी नंतर दोन तासानं झोपू देण्याची कृपा त्यानं माझ्यावर केली. 

अमेरिकेत हॉटेलवरून निघताना तिथंच एक केबिन बॅग सोडून येण्याचा विसरभोळेपणा मी केला. पण त्यातील शर्ट आणि मोबाईल चार्जर परवा अमेरिका, हैदराबाद ते भारतातील ऑफसाईट अशा मार्गानं माझ्यासोबत पोहोचले. मूळ चार्जर परतल्याने भ्रमणध्वनीची कळी खुलली! 

नेहमीप्रमाणं ह्यावेळी कमी खायचं पासून सुरवात करत आता पुढील आठवड्यात फक्त गलका, दुधी, पडवळ खायचं अशी समजूत घालत विमानात आलेले बहुतांश सर्व पदार्थ हादडले. त्यात काही वेळानं आता इतकं खाल्लं तर अजून थोडं जास्त खाल्लं तर काय फरक पडतो अशा स्वतःच स्वतःच्या घातलेल्या समजुतीचा भाग होता. त्यामुळं तिथं निघताना जो काही फिट आदित्य होता तो विमानातील चोवीस तासांत जरा सुटला. 

गेल्या रविवारी शालेय मित्रांचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. अधिकाधिक लोकांनी आपलं मनोगत मांडल्यानं मोगॅम्बो खुश हुआ! व्यक्त होणं ही मनुष्याची आवश्यक गरज आहे हे आता अधिकाधिक लोकांना जाणवु / पटू लागलं आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे ते आता व्यक्त होण्यासाठी पुढं येऊ लागले आहेत.  बहुतांश मित्रमैत्रिणींनी मुद्देसूद विचार मांडले. परत आल्यानंतर आईला प्रथमच भेटल्यावर तिनं तब्येतीविषयी समाधान व्यक्त करतानाच  थोड्या सुटलेल्या पोटाकडं व्यायामाकडं दुर्लक्ष करू नकोस असा मोलाचा सल्ला दिला. 

गुरुवार, शुक्रवार कंपनीतील सीनियर लोकांचं ऑफसाईट झालं. विविध विषयांवर चांगली चर्चा झाली, पुढील काही वर्षांच्या नियोजनाविषयी बौद्धिकं घेण्यात आली. ह्या चर्चेसोबत पुन्हा एकदा सुग्रास भोजन, नाश्त्याचे (दोन्ही वेळा) अगणित पर्याय आपल्याला मोहात पाडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. कौतुकाची बाब म्हणजे मी ह्यावेळी मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवलं. शुक्रवारी रात्री मुंबईला परतीसाठी मूळ वेळ पावणेअकरा असलेल्या विमानाची उड्डाणवेळ पाच वेळा पुढे ढकलली जात शेवटी ते पहाटे पाच वाजता मुंबईला निघालं. पण सोबत सात सहकारी असल्यानं सुरुवातीला आलेला संताप, चीड नंतर एका धमाल चर्चेत आणि गेम्समध्ये घालवलेल्या एका चांगल्या आठवणीत परिवर्तित झाले. 

शनिवारी सकाळी घरात परतल्यावर पुढील काही महिने तरी आपली भ्रमणकक्षा फक्त मुंबई, वसईपर्यंत मर्यादित ठेवणार असं आश्वासन मी दिलं. बघुयात !!! 

ह्या सर्व भ्रमंतीतील हे निवडक फोटो! 



 










































रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

विमानाच्या घिरट्या आणि त्रस्त मी !

अमेरिकेहून भारतात परतीचा प्रवास म्हटलं तर संयमाची कसोटी पाहणारा असतो. ह्या प्रवासात tail wind ची दिशा प्रवासाला अनुकूल असल्यानं भारतातून अमेरिकेला जाताना लागणाऱ्या वेळेपेक्षा परतीचा प्रवास लवकर होतो. असं असलं तरीही विमानतळावर तीन चार तास आधी पोहोचणे, मधल्या लंडनसारख्या ठिकाणी तीन चार तासाचा थांबा अशा प्रकारामुळं एकंदरीत प्रवास चोवीस तासांच्या आसपास होतो. 

त्यामुळं जेव्हा आपण भारताच्या जवळ येतो त्यावेळी विमानाबाहेर पाडण्यासाठी आतुर झालेलो असतो. काल रात्री माझं लंडनहुन मुंबईला येणारं विमान असंच अगदी मुंबईजवळ आलं होतं त्यावेळी समोरील स्क्रीनवरील चित्रपट सोडून मी विमानाचा मार्ग दर्शविणाऱ्या नकाशांकडे वळलो.  आपल्या गंतव्य स्थळाचे  अंतर ३१९ मैल आणि तिथं पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ५४ मिनिटं हे एकंदरीत ठीक गणित वाटलं.  

 

हे विमानाचे नकाशे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर सादर केले जातात. ते सर्व पाहत असताना थोडा वेळ गेला. त्यानंतर मी पुन्हा खालील नकाशा तपासला. आता गंतव्य स्थळ १०५ किमी आणि वेळ ३९ मिनिटं असं समीकरण सादर करण्यात आलं. विमानाचा वेग कमी झाला की काय असा विचार मनात आला. 


थोड्याच वेळात मला मोठा धक्का बसला. आता विमान पुन्हा अरबी समुद्रात शिरलं होतं. 

वैमानिक घोषणा तर व्यवस्थित करत होता, त्यामुळं त्याचं डोकं फिरलं की काय ही शंका घ्यायला फारसा वाव नव्हता. 


मग मात्र वैमानिकाचे डोके ताळ्यावर आले असावे. त्यानं कच्छ आखातात वळण घेतलं. वैमानिक गुगल मॅप वापरत असावा. मी सुटकेचा थोडा निःश्वास टाकला.  केबिनमध्ये जाऊन त्याच्याशी बोलायचा माझा विचार मी काही काळ स्थगित केला. 



वैमानिकाकडे थोडा वेळ लक्ष दिले नाही असा विचार करून मी ज्यूस वगैरे प्राशन करण्याकडे मोर्चा वळविला. पाच मिनिटं माझं दुर्लक्ष झालं आणि पुन्हा वैमानिकानं गोंधळ घातला. वैमानिक थेट महाराष्ट्रात खोलवर घुसला होता. संगमनेर वगैरे गावांच्यावर आमचे विमान होते. 


आता माझा संताप संताप झाला होता. वसईवरून विमान घेऊन मला माझ्या बॅगांसकट पॅराशूटमधून खाली उतरव असे सांगण्यासाठी त्याच्याकडं जावं असा मी विचार केला होता. पण पुन्हा एकदा वैमानिकाने वळण घेतलं.  


आता मात्र वैमानिकाने थेट मुंबईच्या धावपट्टीकडे विमानाचा मोर्चा वळविला. आणि पुढील सात आठ मिनिटांत आम्ही मुंबईत उतरलो होतो. 
विमानतळावर उतरणाऱ्या विमानांची गर्दी असली का असा प्रसंग ओढवतो. आपल्या विमानाचा क्रमांक येईपर्यंत विमानाला अशा घिरट्या घालाव्या लागतात. विमानाच्या घिरट्या किती लांबवर असतात हे काल (आज भल्या पहाटे अनुभवलं) ते आपल्यासमोर मांडावं असं वाटल्यानं हा लेखनप्रपंच !

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

टोपणनाव - एक धावता ऊहापोह


टोपणनावांवरून उद्भवलेल्या वादळाच्या निमित्ताने टोपणनावांच्या उत्पत्तीचा आणि एकंदरीत टोपणनावांवरून व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न. 

टोपणनावाचे विविध प्रकार

१. नावांचे अपभ्रंश करून पडलेली टोपणनावे - जसे की परागचे पॅडी, सुनीलचे सनी,  संदीपचे सॅंडी. तुमची आडनावे सुद्धा तुमच्या टोपणनावाचे जनक असू शकतात. पाटील आडनावाच्या व्यक्तींना पाटला ह्या नावाने संबोधिणे हा भोवतालच्या सर्व व्यक्तींचा जन्मसिद्ध हक्क असतो. आडनावावरून काही उपहासात्मक काव्यंसुद्धा रचली जाऊ शकतात. 

यात अजूनही एक उपप्रकार म्हणजे तुमची इंग्लिशमधील आद्याक्षरे एकत्र करून बनवलेले तुमचे नाव जसे की AD, AP, CD वगैरे

२. शरीरवैशिष्ट्यावरून पडलेली टोपणनावे - उदाहरणार्थ घाऱ्या, लंबू वगैरे!  यातही एक उपप्रकार असतो तुमचे शरीरवैशिष्ट्य एखाद्या प्राण्याशी, पक्ष्याशी  मिळतेजुळते असेल तर त्यांचे नाव तुम्हाला पडू शकते

३. प्रसिद्ध व्यक्तीशी दिसण्यात किंवा इतर बाबतीत असलेले साधर्म्य - उदाहरणार्थ डावखुरा आणि चष्मा लावणाऱ्या मित्राला लॉईड म्हणून संबोधिणे. गबाळी केशरचना चित्रविचित्र आवाजात बोलणाऱ्यास शाहरुख वगैरे (ह्या वाक्यावरून माझा निषेध वगैरे होऊ शकतो) 

४. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत प्रेमाने संबोधण्यासाठी वापरण्यात येणारी टोपण नावे - जसे की माई, अक्का, बेबी, अण्णा.  हल्ली एकत्र कुटुंबपद्धती लयास जात असल्यामुळे ही टोपणनावे आता मागे पडली आहेत. 

५. स्वभाववैशिष्ट्यावरून पडणारी टोपणनावे -  जसे की चिडका, आगाऊ,  वॉल.  यामध्ये या विशेषणयुक्त टोपणनावापुढं त्या व्यक्तीचे नांव सुद्धा जोडले जाऊ शकते जसे की आगाऊ जॉन !

६. वयानुसार पडणारी टोपणनावे - बालक, आजोबा, काका, मामा. जेव्हा विविध वयोगटातील माणसे काही सामायिक गोष्टींमुळं एकत्र येत राहतात त्यावेळी त्यातील अल्पसंख्य वयोगटातील माणसांना त्यांच्या वयानुसार टोपणनावे पडू शकतात. 

७.प्रेमिकांमधील केवळ दोघांत वापरण्यासाठी टोपणनावे - बेब, सोना, डूड. ह्यावर जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतात

वर उल्लेखलेले टोपणनावाचे  प्रकार हे सर्वसमाविष्ट असतीलच असे नाही परंतु हे सर्वसाधारणपणे आढळणारे टोपणनावाचे प्रकार आहेत.  

आता आपण बघणार आहोत टोपणनाव पडण्याची आणि ती स्वीकृत होण्याची प्रक्रिया! 

प्रकार एक, तीन , चार आणि सहामध्ये आपल्याला पडलेल्या टोपणनावाविषयी आपल्याला सहसा फारसे वाईट वाटण्याचे किंवा राग येण्याचे कारण नसतं.  त्यामुळे अशाप्रकारे निर्मित झालेले टोपण नाव स्वीकारण्यास आपण खूप उत्सुक नसलो तरीही ते वापरले तरी आपण जास्त काही नाराज होत नाही.  टोपणनावांचा वापर होण्याची जी काही अनेक कारणे आहेत त्यात तुम्हाला उल्लेखण्यासाठी सोय हे एक कारण असलं तरी बऱ्याच वेळा तुम्हांला राग यावा अशी सुप्त इच्छा देखील असू शकते.  एक, तीन , चार आणि सहामध्ये  ज्याच्याविषयी टोपणनाव वापरलं जातं त्याला राग येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे टोपणनाव वापर वापरणाऱ्या समुदायाला त्यातून आसुरी आनंद फारसा  काही मिळत नाही.  

दोन आणि पाच या प्रकारात मात्र आपल्या मित्रांना चिडवण्याची खुमखुमी हा सुप्त घटक टोपणनावाच्या निर्मिती आणि वापरामागे दडलेला असतो.  त्यामुळे या प्रकारांतील टोपणनावांच्या स्वीकृतीची प्रक्रिया विविध स्थितींमधून जाते.  पहिली स्थिती म्हणजे नकाराची!  आपल्याला हे टोपणनाव देऊ नये अशी त्या व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया असते.  या प्रतिक्रियेतून संतापाचा आणि प्रतिकाराचा देखील उद्भव होऊ शकतो.  हळूहळू पर्याय नसल्याने कालांतराने या या नकाराचे रूपांतर स्वीकृतीमध्ये होऊ शकते.  परंतु यामध्ये सुद्धा अनेक अटी असू शकतात.  जसे की हे टोपणनाव कोणी आणि कुठे वापरावं यासाठी मार्गदर्शक संहिता निर्माण केली जाऊ शकते. या मार्गदर्शक संहितेचे उल्लंघन झाल्यास आणीबाणीचे प्रसंग उद्भवू शकतात. असे झाल्यास या टोपणनावाच्या निर्मात्याला आनंदाच्या उकळ्या फुटू शकतात.  

वेळेअभावी ही पोस्ट इथेच आवरती घेत आहे.  परंतु टोपणनावांच्या उगमामागे खूप मोठी सर्जनशीलता दडलेली आहे.  त्याची सर्वांना जाणीव असावी हा ह्या पोस्टमागील उद्देश. टोपणनावांच्या निर्मितीची प्रक्रिया अशीच पिढ्यानपिढ्या सुरू राहो आणि मनुष्यजातीतील सर्जनशीलता फुलत राहो ही सर्वशक्तीमानाकडे प्रार्थना. ह्या विषयावर जर का अजून कोणी डॉक्टरेट केली नसल्यास इच्छुकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा!


सोमवार, ८ जानेवारी, २०२४

खो गये हम कहाँ - Method to Madness


नव्या वर्षात काही नवीन गोष्टी ठरवून तर काही अचानक होतात. खरं तर 'खो गये हम कहाँ' हा माझ्या पठडीत बसणारा चित्रपट नव्हे पण थोडा वेळ हा काय वेडेपणा आहे हे पाहू असा विचार करत पहायला सुरुवात केलेल्या ह्या चित्रपटानं काहीसं मला धरून ठेवलं. दोन तीन दिवसात हा चित्रपट जवळपास पूर्ण पाहिला.  कर्मठ पद्धतीचा चष्मा घालून पाहिलं असता ह्यातील तिन्ही पात्रांची वागणूक मूर्खपणाची वाटते. पण काही वेळानं ह्या वेडेपणात एक सुसंगती आढळून येते. नव्या पिढीच्या जीवनात स्थिर होण्याच्या संघर्षाला, त्यांना सामोरे जावं लागणाऱ्या नात्यांमधील क्षणभंगुरतेला हा चित्रपट व्यवस्थित आपल्यासमोर सादर करतो. 

प्रत्येकानं यशस्वी व्हायलाच हवं असा सुप्त संदेश सर्वत्र पसरविणारं आजचं जग. पण प्रत्येकजण  जगाच्या व्याख्येनुसार यशस्वी होऊ शकणार नाहीत हे कटू सत्य. त्यामुळं आपण जगाच्या दृष्टीनं जरी यशस्वितेच्या सर्वोच्च पातळ्या गाठू शकलो नसलो तरी आपल्या क्षमतेनुसार सिद्ध करून दाखविण्याची ह्या वर्गाची धडपड हा चित्रपट सुरेखरित्या सादर करतो.  स्वतःची जिम उभारण्याची जिद्द बाळगून असलेला नायक. पर्सनल ट्रेनर म्हणून सन्मानाचे मोजके पण अपमानाचे अनेक क्षण झेलणारा! त्याची कुतरओढ कुठेतरी मनाला खिन्न करते. 

हल्लीच्या युगातील तरुण पिढीच्या नातेसंबंधातील संभ्रम सुरेखरित्या इथं सादर करण्यात आला आहे. दोन प्रेमिकांना केवळ प्रेम हा घटक सदैव एकत्र ठेवू शकत नाही. प्रेमाच्या अनेक छटा असतात, बऱ्याच वेळा लग्नबंधनाशिवाय एकत्र आलेल्या जोडप्यात एकासाठी  शारीरिक आकर्षण हा महत्वाचा मुद्दा असू शकतो, तर दुसऱ्यासाठी आर्थिक स्थैर्य! पण केवळ हेच घटक असतील तर ज्याच्या / जिच्याविषयी अधिक आकर्षण वाटू शकते किंवा जो / जी अधिक आर्थिक स्थैर्य देऊ शकते अशी व्यक्ती आयुष्यात आल्यास आधीचं नातं सहजासहजी तुटू शकतं. असं घडल्यास आपण केवळ वापरले गेलो आहोत, आपलं आयुष्यातील अयशस्वीपण आपल्या नातेसंबंधावर परिणाम करू शकतात असले अनेक विचार ह्या व्यक्तींच्या मनात येऊ शकतात. आत्मसन्मानाला मोठी ठेच लागू शकते. 

निर्माता / दिग्दर्शकाला खरोखर वरील संदेश द्यायचा होता की नाही हे माहिती नाही. पण मला हा संदेश मिळाला. केवळ एका विशिष्ट विचारसरणीने विचार करणाऱ्या मला ह्या चित्रपटाने मला काहीशी चपराक दिली. नवीन पिढीची मानसिकता समजून घेण्यासाठी जमल्यास हा चित्रपट बघा. अनन्या पांडेचा उल्लेख ह्यापुढील पोस्टमध्ये टाळला जाईल किंवा केल्यास आदरानं केला जाईल हा निर्धार सुद्धा मी केला आहे !

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

२०३० सालातील चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याची व्याख्या !



गेल्या काही दिवसातील घटनांमुळे खरा क्रिकेट रसिक हा भारतीय क्रिकेटपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे असे विधान मी फेसबुकवर केले.  मला सडेतोड प्रतिक्रिया देणाऱ्या एका मित्रानं तुला ही जाणीव होण्यासाठी इतका वेळ लागला याविषयी आश्चर्य प्रकट करत हे सारं गेल्या १८-२० वर्षापासून चालू आहे असे विधान केले. आज सकाळी एका निर्भीड मित्रांने  भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेल्या आयपीएल ने त्यांच्यावर लक्ष न देता परदेशी खेळाडूंवर वीस ते चोवीस कोटी रुपयांची गंगाजळी खर्च करणाऱ्या आयपीएल मालकांविषयी मत व्यक्त करा अशी मागणी केली.  त्यामुळे लिहिण्यात आलेली आजची ही पोस्ट!
 
आयपीएल ही भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेली  क्रीडास्पर्धा या विधानाशी मी सहमत नाही.  हा एक बाजार आहे हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.  बदलत्या काळात मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणून क्रिकेटकडे बघणारा जो बहुसंख्य क्रिकेट रसिक वर्ग भारतात निर्माण झाला आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आयपीएल हे निर्माण करण्यात आले.  या रसिक वर्गाच्या क्रयशक्तीवर आधारित एक मोठी बाजारपेठ आयपीएल निमित्ताने निर्माण करण्यात आली. स्टेडियममध्ये चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या कोक, बर्गर इत्यादींपासून ते आयपीएल सामन्यात दरम्यान ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये मोजण्यासाठी तयार असलेल्या तंबाखूच्या उत्पादकांपर्यंत या बाजारपेठेचे जाळे पसरले आहे.  त्यात भर पडावी  म्हणून प्रत्येक फ्रेंचाईसीने आपले टी-शर्ट आणि तत्सम वस्तूंची निर्मिती केली आहे. 

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे! गेल्या ४०-५० वर्षांपर्यंत चांगलं आणि सुसंस्कृत वागणं याविषयी प्रत्येक राज्यातील मध्यमवर्गाने आपापल्या विशिष्ट प्रतिमा उभ्या केल्या होत्या. ही चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याविषयीची प्रतिमा त्यांनी स्वतः काही निर्माण केली नव्हती तर ती त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळाली होती.  त्या प्रतिमेनुसार आपल्या मुलांनी वागत रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पूर्वजांना एक अनुकूल मुद्दा होता. पूर्वजांच्या बाबतीत अवतीभोवतीच्या वातावरणातील बदलांचा वेग नगण्य होता. त्यामुळे या प्रतिमेत काळानुसार बदल घडवून आणण्यास प्रत्येक पिढीला वेळ मिळत असे. परंतु गेल्या वीस-तीस वर्षांत ज्या वेगाने बदल झाले त्या वेगाला अनुसरून चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याच्या प्रतिमेत / संकल्पनेत बदलत्या कालानुरूप टिकू शकणारं रूप देण्यात भारतीय मध्यमवर्गीय समाज अपयशी ठरला.  या काळात अजून एक घटना घडली ती म्हणजे पुढील पिढीने आर्थिकदृष्ट्या मागच्या पिढीच्या उत्पन्नाइतकीच किंबहुना त्याहून जास्त मजल लहान वयातच गाठली. त्यामुळे मागील पिढी काहीशी अचंबित झाली. त्यांनी आपला पुढील पिढीला उपदेश देण्याचा अधिकार बजावण्याचा आत्मविश्वास काहीसा गमावला. 

मी सद्य समाजातील स्वघोषित सुजाण नागरिक आहे. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यात दोन पिढ्यांमधील संस्कारांचे यशस्वी हस्तांतरण ह्याविषयी माझी मते नोंदवून ठेवणे ह्याचा समावेश होतो असा माझा समज आहे. संस्कारांचे यशस्वी हस्तांतरणासाठी सद्य परिस्थितीत दोन गोष्टी व्हाव्या लागतील.  
१) दोन पिढ्यांमधील संवाद हा सुसंवाद बनायला हवा. हल्ली हा संवाद मोजक्या काही मिनिटांत संपतो. ह्या संवादाची मुख्य जबाबदारी जुन्या पिढीकडे आहे. त्यामुळं कदाचित नवीन पिढीशी संवाद कसा साधावा ह्यासाठी ह्या पिढीला एका  प्रशिक्षण वर्गाची गरज आहे. ह्या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमाची योग्य पद्धतीने आखणी समाजातील तज्ञांनी करावी. 
२) पुढील वीस वर्षांसाठी चांगलं आणि सुसंस्कृत ह्यांची कालानुरूप अशी व्याख्या तज्ञांनी बनवून त्यांचं सोशल मीडियावर अधिकाधिक प्रसारण करावं!

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

मुंबईचे, मुंबईकराचे खरे नाही!



मुंबईचे, मुंबईकराचे काही खरे नाही असे पत्नीला, मला  आणि समविचारी मित्रांना वाटत राहतं . समविचारी मित्रांची संख्या कमी असल्यानं एकंदरीत अशी विचारधारा असलेली लोक अल्पगटात मोडतात. बाकी वार्षिक सुट्टी सुरु असल्यानं माझ्या मनात असे असंबद्ध  विचार येऊ शकतात हे सत्य मी स्वीकारलं आहे. 

मुंबईचे, मुंबईकराचे खरं नाही असं मला का वाटतं? 
१.  पूर्वीच्या चार ते सात मजली इमारती पुनर्बांधणी कार्यक्रमाद्वारे तीस मजल्यापलीकडे परिवर्तित झाल्या / होत आहेत.  भोवतालच्या परिसरातील ओळखीची माणसं, शांतता गायब होत चालली आहे. लहान मुलांना अगदी सुरक्षितपणे इमारतीखाली जाऊन खेळता यायचं तो आज बऱ्याच वेळा मोठा इव्हेंट बनू लागला आहे ज्यात पालकांना तयार होऊन मुलांसोबत खाली उतरावं लागतं. आपल्या परिसरात आल्यावर माणसांना जे एक घरपण वाटत असे ती भावना ह्या गगनचुंबी इमारतीमुळं नाहीशी होत आहे. रहदारी अचानक वाढल्यामुळं वृद्ध माणसांना आपल्या शेजारच्या परिसरात चक्कर मारण्यासाठी जाणं सुद्धा तणावपूर्व वाटू लागलं आहे. दिवसातील अठरा ते वीस तास रस्त्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी बहुतांश घरात शिरकाव करत असल्यानं घरातील शांतता सुद्धा भंग पावत आहे. 
२. मुंबईकरांच्या आहाराविषयीच्या सवयी बहुतांश प्रमाणात बिघडल्या आहेत. गेल्या दहा पंधरा वर्षात एका प्रातिनिधिक मुंबईकराचे बाहेरील खाणे खूप वाढले आहे. त्याला / तिला जगभरातील विविध खाद्यसंस्कृतीची खूप माहिती झाली आहे. हातात खुळखुळणाऱ्या पैश्यामुळं हे सर्व मुंबईकरांना परवडू शकत आहे. स्टार्टर, मुख्य जेवण आणि डेझर्ट अशा क्रमाक्रमाने येणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेताना आपल्या शरीराला नक्की किती अन्नाची गरज आहे हे आपण विसरत चाललो आहोत. त्याचप्रमाणे झोमॅटो, स्वीगी मुळे आपण वारंवार घरी जेवण मागवू लागलो आहोत. 
३. वाढत्या आहाराला पचविण्यासाठी बरेच मुंबईकर आजकाल व्यायामशाळेत जातात. दररोज आवश्यक असलेला प्रोटीनचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही जण अंडी, चिकन ह्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात.  जड अन्न पचविणे, त्यासाठी व्यायाम करणे हे कुठंतरी शरीराला तणावदायक बनू लागले आहे
४. मुंबईकरांची  वैद्यकीय माहिती पातळी खूपच उंचावली आहे. नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढली आहे. परंतु एकदा का सगळ्या चाचण्यांचे निकाल सामान्य आले की आपण हवं ते खायला मोकळे असा समज काही जणांत पसरू लागला आहे. 
५. वरील दोन, तीन आणि चार मुद्द्यांमुळं आपण शरीराला सदैव सक्रिय ठेऊ लागलो आहोत. पाश्चात्य देशांतील लोकांचे अनुकरण करताना आपण दोन मुद्दे काही प्रमाणात विसरत आहोत. पहिला म्हणजे तेथील थंड हवामान ज्यामुळं कितीही जड आहार पचण्यासाठी तुलनेनं सोपा जातो. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी न्यूयॉर्क वगैरे वगळलं तरी बाकी शहरांत इमारतींच्या अवतीभोवती गुण्यागोविंदानं नांदणारा निसर्ग ! तसं म्हटलं तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सेंट्रल पार्क आहेच! 

हे मान्य की वर वर्णन केलेला वर्ग संपूर्ण मुंबईचे प्रतिनिधित्व करत नाही. पण त्यांचे प्रमाण नक्कीच वाढत आहे. माझी मुख्य चिंता हा वर्ग जेव्हा वयाची पंचावन्न / साठ वर्षे पूर्ण करेल तेव्हा बहुदा मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात राहणे त्यांच्यासाठी आनंददायी अनुभव नसेल ह्याविषयी आहे ! मुंबईबाहेर जाऊन राहणे तिथल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळं ह्या वर्गाला जमणार नाही! 

थोडक्यात मुंबईचे,  मुंबईकराचे खरे नाही!

तळटीप - मुंबई इंडियन्सचा कप्तान बदलण्याच्या घटनेचा आणि ह्या पोस्टचा तिळमात्र संबंध नाही!! 

रविवार, १० डिसेंबर, २०२३

झिम्मा २



समाजातील सृजनशीलता झपाट्यानं लोप पावत आहे किंवा माहितीमायाजालावरील माहितीच्या स्फोटामध्ये ती कुठंतरी दडून बसत आहे.  सहजरित्या उपलब्ध असलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतांना सृजनशीलतेच्या बाबतीत पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते. 

कोणत्याही कलाकृतीचा जीवनप्रवास ही खरंतर एक अभ्यासण्याजोगी घटना असायला हवी.  कथेतील मूळ कल्पनेचा उगम, तिचं विस्तारीकरण ह्यात लेखकांची प्रतिभा, त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेल्या भराऱ्या ह्याचे वाचक प्रत्यक्ष साक्षीदार नसले तरी त्या कलाकृतीचा आनंद घेताना संवेदनशील वाचकांना त्याची अनुभूती मिळायला हवी. इथंच खरं कथाकार आणि वाचक ह्यांचं एक अदृश्य, घट्ट नातं जुळतं. जेव्हा ही कथा नाटक, चित्रपटाच्या माध्यमांद्वारे आपणांसमोर सादर केली जाते त्यावेळी खरंतर दिग्दर्शकाच्या कौशल्याची कसोटी असते. मूळ कथेच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता नाटक, चित्रपट माध्यमांना योग्य अशा स्वरूपात  ही कलाकृती सादर करणे म्हणजे तारेवरील कसरत असते. 

आठवडाभर कार्यालयीन कामात जुंपून घेतल्यानंतर फुरसतीच्या वेळात वयानुसार निर्माण झालेल्या आवडीमुळे चांगल्या नाटक, चित्रपटाच्या शोधात असलेला मी ! खरा प्रश्न इथं आहे. चांगलं म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय आवडतं ह्यावर आपण फारसा विचार करत नाही. काल पाहिलेल्या झिम्मा २ ह्या चित्रपटाच्या कालावधीत  विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. चित्रपटाला कथा म्हणून काही नव्हतीच. लेक डिस्ट्रिक्टची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू! मी आणि प्राजक्ता चित्रपट संपल्यानंतर कथेच्या, त्यातील पात्रांच्या,  व्यक्तिमत्त्वांच्या किंवा चित्रपटातील नात्यांच्या खोलीविषयी बोलत होतो. काही इंग्लिश चित्रपटात कथेला मोठा जीव नसला तरीही त्यातील संवादातील आणि  नात्यांतील विविध छटांच्या सादरीकरणामुळं ते प्रेक्षणीय बनतात. आमच्या चांगल्या चित्रपटाच्या व्याख्येत ह्या बाबींचा समावेश होतो. 

चित्रपटात विविध वयोगटातील भाराभर नायिका आणि मोजून दोन पुरुष व्यक्तिमत्वे आहेत. इंग्लिश व्यक्तिमत्वाला नायक म्हणायला  वाव नसल्यानं दोन नायक म्हणण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे,  इतकी सगळी पात्रं आपली भूमिका कशी उत्तम होईल ह्याकडेच लक्ष देत आहेत असं वाटत राहतं. त्यामुळं अधूनमधून येणाऱ्या शाब्दिक कोट्यावर आपण मनमुराद हसत राहतो. चित्रपट कोणत्याही क्षणी संपला असं सांगितलं तरीही आपल्याला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळं खरोखरच ज्यावेळी चित्रपट संपतो तेव्हाही आपल्याला काही वाटत नाही. पार्किन्सन ह्या गंभीर आजारासंदर्भात देण्यात आलेला सामाजिक संदेश ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. ना धड तो संदेश दिला जात नाही ना चित्रपटाच्या कथेला त्यामुळं वाव मिळतो / गती मिळते.  चित्रपट ही काही मिसळ वगैरे नाही ज्यात नामांकित कलाकार, निसर्गरम्य पार्श्वभूमी, सामाजिक संदेश वगैरे एकत्र आणलं की एक चांगली कलाकृती बनेल. 

मराठी चित्रपटांचे उभरत्या इंग्लिश कलाकारांना योगदान ह्या मुद्द्यावर ह्या चित्रपटाला गुण प्रदान करता येतील. झिम्मा ३ / ४ वगैरे भागात जर्मन, फ्रेंच, इटली वगैरे देशांतील कलाकारांचा विचार करता येऊ शकेल.  

असे चित्रपट शहरी भागातील स्त्रीच्या समस्यांना कितपत योग्य स्वरूपात सादर करतात ह्याविषयी मोठी साशंकता निर्माण होते. व्यक्तिरेखांच्या खोलीच्या अभावी ह्या स्त्रियांच्या समस्यांशी आपण फारसे जोडले जात नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या गावात अगदी तुटपुंज्या पैशात आपला संसार चालविणाऱ्या स्त्रियांविषयी झिम्मा ३ - ४ वगैरे यायला हवा असा विचार मनात येतो. 

बाकी इनऑर्बिट मॉलमधील चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. एक चांगला लेखक आणि एक यशस्वी लेखक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गालिब नाटकातील  वाक्य चित्रपटांना सुद्धा लागू होते असं वाटलं. पॉपकॉर्नची पाचशे रुपयांच्या वरील किमतीची पुडकी विकत घेऊन चित्रपटगृहात वचावचा आवाज करत खाणारी टाळकी मोजकीच होती. सिनेमागृहातील आवाजाची पातळी काही वेळा कर्कश होती. प्रेक्षकांच्या  श्रवणयंत्रावर, हृदयाच्या ठोक्यांवर विपरीत परिणाम करणारी अशी होती. ह्यावर कोणीही आवाज उठविलेला दिसत नाही. जाहिरातींचा अतिरेक झाला होता. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नव्हतं. मॉलच्या फूड कोर्टमध्ये खचाखच नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होती. पाश्च्यात्य देशांतील कंपनीमध्ये काम करून पैसा कमाविणारे बरेच लोक पाश्चात्य खाद्यपदार्थांवर पैसे खर्च करत होते.   मॉलमधून बाहेर पडताच मेट्रो स्टेशन आहे. त्याद्वारे प्रयेकी वीस रुपयांच्या तिकिटात दहा बारा  मिनिटांत वातानुकूलित ac डब्यात बसून घरी पोहोचलो.  रिक्षात बसून शंभर रुपये खर्च करत प्रदूषणात बसून घरी पोहाचण्यापेक्षा हे खूप बरं ! एकंदरीत देशाचे बरं चाललं आहेत. तुम्ही वर्तमानपत्रं, त्यातील अग्रलेख  न वाचता शहरात फिरत राहिलात तर लाईफ इज चकचकीत ! आयुष्य सुंदर आहे ! 

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...