मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

मुरांबा !




एका भरभक्कम खांबाला मजबूत जोराने बांधलेल्या बैलाची कल्पना करुयात ! बैल त्या खांबापासून मोकळा होण्यासाठी सुरुवातीला खूप धडपड करतो. त्या दोराला खूप मोठमोठे हिसके देऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु खांब आणि दोर यांची युती त्या बैलाला मुक्त होऊ देत नाही!

गेल्या रविवारी सोनी टीव्हीवर मुरंबा हा एक उत्तम चित्रपट पाहण्याचा योग आला. रविवारच्या दुपारच्या जेवणाच्या वेळी सुरू झालेला हा चित्रपट जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय सुरुवातीची जवळपास चाळीस मिनिटे चालला.  त्यामुळे आम्ही चित्रपटात गढून गेलो. 

चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, मिथिला पारकर आणि सुमित राघवनची पत्नी चिन्मयी सुमित यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट मला बऱ्याच गोष्टींसाठी आवडला. बेसिकली मला चित्रपट आवडण्यासाठी जास्त काही गोष्टी लागत नसाव्यात अशा निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो आहे! वेगाने पुढं सरकणारी कथा, मेंदुला जागं ठेवणारे बौद्धिक अथवा विनोदी संवाद, डोळ्याला सुखावणारा निसर्ग अथवा घरं ह्या काही महत्वाच्या गोष्टी !

चित्रपटातील एक आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण ज्या बंगल्यामध्ये झालं आहे तो बंगला सुंदर / प्रशस्त / भव्यदिव्य आहे. चित्रपटाचे जवळपास ८६ टक्के चित्रिकरण याच बंगल्यात झाले असल्याने चित्रपटाचा निर्मितीखर्च खूप कमी झाला असणार असा विचार येण्यापासून मनाला थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी तो विचार मनात आलाच!  बाकी मिथिला पारकरचे घरसुद्धा पॉश आहे असे सोहम म्हणाला. 

चित्रपटाच्या सुरुवातीलाच आमचं ब्रेकअप झालं आहे असे अमेय आपल्या आई-वडिलांकडे जाहीर करतो.  साहजिकच आईला खूप धक्का बसतो.  वडिलांचा संपर्क बाह्यजगताशी जास्त प्रमाणात येत असल्यामुळे काहीशी संयत अशी प्रतिक्रिया ते नोंदवितात. बहुदा वडिलांच्या मेंदूमध्ये पुढील काही वेळ विचारचक्र फिरत रहात असावं आणि त्यांच्या मनात एक योजना साकारते. आपल्या मुलाचा विरोध हुशारीने मोडून काढून ते पुढील काही गोष्टी अशाप्रकारे घडवून आणतात की चित्रपटाच्या शेवटी आपणा सर्वांना एक गोड अनुभव मिळतो. 

वरकरणी पाहायला गेलं तर एकमेकाला अगदी अनुरुप अशी अमेय आणि मिथिलाची जोडी! गेली तीन वर्षभर ते एकत्र फिरत आहेत. त्यामुळे डन डील नावाचा जो प्रकार असतो त्यानुसार मिथिला आता या घरची सून होणार हे दोन्ही बाजूच्या आई-वडिलांनी आणि त्यांच्या ओळखीतील सर्वांनी गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळी अमेय आपल्या ब्रेकअपची घोषणा करतो त्यावेळी साहजिकपणे त्यांच्या आई वडिलांना धक्का बसतो. 

चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसं चर्चेतून आणि फ्लॅशबॅकमधून खऱ्या कारणाचा आपल्याला उलगडा होत जातो. व्यावहारिकदृष्ट्या अमेय एक शिकलेला, देखणा तरुण असला तरी व्यावसायिक जगात जी काही तीव्र स्पर्धा आहे, त्याला तोंड देण्याची त्याची मानसिक इच्छा नाही. यामध्ये त्याची स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता नाही की इच्छा नाही या प्रश्नाचा खोलात जाऊन चित्रपट ऊहापोह करीत नाही. परंतु आपला होणारा नवरा हा स्पर्धेला तोंड देत नाही किंवा व्यावसायिक जगात यशस्वी होण्याची त्याची इच्छा नाही ही गोष्ट मिथिलाला खूपच खटकत असते. ती स्वतःच्या करिअरबाबत खूपच आग्रही आहे असे साधारणतः चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.  बाह्य जगतापुढे एक पिक्चर परफेक्ट प्रेझेंट करीत असताना प्रत्यक्षात मात्र हे दोघे या मुद्द्यावरून खूप चर्चा करीत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तणावही निर्माण होत असतो. एका क्षणी आपण Point of No Return ला पोचलो आहोत असा निर्णय हे दोघे जण घेतात. 

आता इथं चित्रपट आपल्यासमोर दोन वेगवेगळ्या विचारधारा घेऊन येतो.  एक आहे ती आधुनिक पिढीची विचारधारा आणि दुसरी म्हणजे आयुष्य बऱ्यापैकी पाहिलेल्या मध्यमवर्गीय पिढीची विचारधारा! आधुनिक पिढीच्या विचारधारेतून पाहिलं असता दोघांची करिअर्स ही आयुष्यातील महत्त्वाच्या मोजक्या  बाबींपैकी एक बाब! जर याबाबतीत एकमत नसेल तर हे नातं पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करणारी!  यात अजून एक मुद्दा !!हल्ली इन-रिलेशनशिप आणि तत्सम मोठ-मोठाले शब्द आपण सेलिब्रिटींच्या बाबतीत सतत ऐकत असतो. कुठेतरी मनात आपल्यालासुद्धा हे शब्द आपल्याबाबतीत वापरण्याची संधी नवीन पिढी शोधत असते.  आणि त्यामुळे ब्रेकप झाल्याचं दुःख असतं परंतु हा शब्द आपल्याला वापरता येतो याच मनात कुठेतरी थोडासा आनंद सुद्धा होत असावा !

सचिन खेडेकर आणि मध्यमवर्गीय पिढीच्या दृष्टिकोनातून! आयुष्याचे सर्व कंगोरे या टप्प्यावर साधारणता पाहून झालेले असतात. Absolutely Perfect असं काही नसतं याची जाणीव किंवा खात्री बऱ्यापैकी झालेली असते. त्यामुळे ज्याच्याशी आपलं बऱ्यापैकी जमतं,  ज्या माणसाबरोबर आपण घरात शांतपणे राहू शकतो असा माणूस हा जिवनसाथी म्हणुन मिळाला तर भाग्य समजायला हवं अशी मानसिकता एव्हाना विकसित झालेली असते.  बाविशी ते पंचविशीच्या आसपास ज्या काही भव्यदिव्य आकांक्षा असतात,  त्या तशाच्या तशा व्यवहारात साकारणं शक्य नसतं हे एव्हाना समजलेलं असतं. आपल्याला जी काही गोष्ट समजली आहे ती गोष्ट आपल्याला पुढील पिढीला समजावता आली पाहिजे याची जी तयारी सचिन खेडेकर दाखवतात ते खरोखर उत्तम आणि ते चित्रपटाचा शेवटाला अमेयला जे ज्ञान देतात तेही उत्तम!! तुझ्या भल्यासाठी काहीसं कठोर होऊन तुला सल्ला देणारी मैत्रीण तुला एक जोडीदार म्हणून मिळत आहे तर केवळ तुझ्या पुरुषी अहंकारामुळे तू तिला गमवायची स्थिती ओढवुन घेत आहे हे अगदी उत्तम प्रकार अमेयला ते समजावतात!!

अमेय आणि मिथिला यांचे जे ब्रेकप लग्नाआधी झालं तशीच कारणे लग्नानंतर सुद्धा उद्भवू शकतात आणि हल्ली घटस्फोटाविषयीसुद्धा अगदी मुक्त विचार संस्कृती पसरल्यामुळे असे काही चर्चेच्या आधारे सोडवता येणारे प्रश्नसुद्धा गंभीर स्वरूप धारण करतात.  एकंदरीत नातं  तुटण्यास फारसा वेळ लागत नाही. चित्रपटातून सर्वात महत्त्वाचा घेण्यासारखा बोध म्हणजे हाच!! हल्लीच्या आयुष्यातील क्लिष्टता तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा उतरली आहे.  त्यामुळे सर्वच गोष्टी बाबत जोडीदारांची एकवाक्यता होण्याची शक्यता कमीच आहे.  न पटणाऱ्या गोष्टिंवर किती चर्चा करायची,  त्यांना किती ताणून धरायचं याचा सारासार विचार दोघांनी करायला हवा!!

खरंतर ही चर्चा ज्याची त्यांनी करायला हवी आणि सामंजस्यपूर्वक निर्णय घ्यायला हवा.  परंतु तुमच्या बाबतीत असं होऊ शकत नसेल तर तुमच्या भोवताली तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींत एक सचिन खेडेकर असावा!! सचिन खेडेकर यांची व्यक्तिरेखा म्हणजे स्वतःच्या आयुष्यात बऱ्यापैकी समाधानी असणारा, प्रगल्भतेच्या काही पायऱ्या ओलांडलेला, दुनिया पाहिलेला असा माणूस! आपलं जे काही ज्ञान अनुभव आहे ते दुसऱ्याला शांतपणे शब्दरूपात मांडून सांगू शकणारा माणूस!! अशी माणसं तुमच्या भोवताली वावरत असतील आणि जर ती तुम्हाला ओळखता आली तर खरोखर उत्तम!! तुम्ही सुदैवी आहात !!

बाकी चित्रपटातील मिथिलाचे रुप लक्षात राहिले. क्वचितच ड्रिंक घेणारी, ऑफिसच्या कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावी लागणारी, घरी आलेल्या आपल्या मित्राला तूच फ्रीजमधलं उघडून त्यातलं पाणी घे आणि पी असं सांगणारी ! अशी ही बाह्यरुपी बंडखोर वाटणारी मिथिला, आपल्या भावी सासू-सासऱ्यांसमोर मात्र एका पारंपरिक सुनेच्या रुपात मनापासुन वावरते! तिचं आधुनिक रूप पचवण्याची ताकद तिला जीवनसाथी म्हणून वरु  इच्छिणाऱ्या तरुणांकडे असावी! हा संदेश पुढील पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे नाहीतर पुढील काळ कठीण आहे!!!

ते सुरुवातीचे खांब, दोर आणि बैल यांचा संदर्भ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बैल म्हणजे हल्लीची नातेसंबंध खिळखिळी करु पाहणारी भोवतालची परिस्थिती ! खांब आणि दोर म्हणजे नातं एकत्र ठेवू पाहणारा विश्वासाचा धागा!!!

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

बालदिन


विश्वाचे कारभार व्यवस्थित चालावेत म्हणून काही भुमिकांची निर्मिती करण्यात आली आहे.  जसे की घरामध्ये वडील, शाळा-कॉलेजातील  शिक्षक, रस्त्यावर पोलीस आणि ऑफिसमध्ये व्यवस्थापक वगैरे वगैरे!! आता या भूमिका बजावणारी माणसे सुद्धा माणसेच असतात. त्यामुळे सतत या भूमिकांमध्ये राहून कायदा आणि सुव्यवस्था शाबूत ठेवणे हे कधीकधी त्यांनासुद्धा त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे ही मंडळी सुद्धा आपल्या या कडकपणाच्या अधिकृत भूमिकेमधून पळवाट काढून काही वेळ आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होण्याची संधी शोधत असतात. 

पुर्वी ठीक होतं. या भूमिकांनी सतत आपला मुखवटा कायम ठेवावा अशीच त्यांच्याकडून अपेक्षा असायची. आणि या भुमिका बजावणाऱ्या माणसांनी या अपेक्षेपुढे चक्क शरणागती पत्करली होती. त्यामुळे पुर्वीचे वडील गंभीर म्हणजे गंभीरच दिसायचे! फारच झालं तर एखादी स्मितरेषा कधीतरी त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असे आणि ही स्मितरेषा ते माणूस असल्याचा पुरावा त्यांच्या मुलांना, पत्नीला देत असे.  कधीकधी केवळ एका या पुराव्याच्या आधारे आयुष्यसुद्धा काढावं लागत असे. 

आता काळ बदलला आहे. माणसं आपल्या अधिकृत भूमिकेत कमीत कमी वेळ काढण्याची मनोवृत्ती बाळगुन आहेत.  ज्याक्षणी आपल्या अधिकृत भूमिकेची कालमर्यादा संपते, त्यावेळी ते झटकन स्विच मारुन आपल्या मूळरुपात (बालरुपात)  येतात व  विविध फोरमवर आपलं हे मूळ रूप दर्शवितात.  हे वेगवेगळे फोरम म्हणजे सोशल मीडिया,  मित्रांची बैठक वगैरे वगैरे!

आता हा प्रकार म्हणायला गेला तर माणुसकीशी सुसंगत! कारण या भूमिका निभावणारी माणसं सुद्धा माणसंच आहेत. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की या माणसांची अनधिकृत (हा चुकीचा शब्दप्रयोग - इथं अधिकृतेतर असं वाचावा) रूपे ज्या श्रोतावर्गांसमोर समोर येतात त्यांना या अधिकृत भूमिकांचे विरळ झालेले हे रुप किंवा कडकपणा पचवण्याची प्रगल्भता असायला हवी.  नाहीतर त्यांच्या मनात या अधिकृत भूमिकांचे हे मनमोकळे रुपच घर करून बसते.  

त्यामुळे या व्यक्ती ज्यावेळी परत आपल्या अधिकृत भूमिकांमध्ये येऊन मानवजातीच्या हिताच्या दृष्टीने अथवा व्यवहार बिनबोभाट चालावेत ह्या हेतूनं योग्य असे संदेश देऊ इच्छितात त्यावेळी त्यांच्यासमोरील श्रोतावर्ग हा काहीसा या संदेशांचे गांभीर्य ओळखण्याच्या पलीकडच्या मनस्थितीत गेलेला असतो. 

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने या गंभीर रुपातील भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींच्या बालरुपात जाण्याच्या हक्कांची जाणीव ठेवूयात!   त्यांच्यासमोरील त्यांच्या अधिकृत रुपातील सेवाग्रहण करणाऱ्या वर्गाला त्यांच्या अधिकृत आणि मनमोकळ्या भूमिकांमध्ये गल्लत न करणाऱ्या प्रशिक्षणाची गरज मान्य करुयात!

अजुन एक मुद्दा! आजच्या काळात काही पालक, शिक्षक,व्यवस्थापक तुम्हांला असेही मिळतील जे ह्या भुमिकांच्या पारंपरिक रुपांना पुर्णपणे छेद देणारे असतील! तेव्हा त्यांच्या बाह्यरुपावर न जाता त्यांनी दिलेल्या संदेशाकडं लक्ष द्या !!

काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ह्या भुमिकांमध्ये रोबो दिसतील त्यावेळी सर्वांच्याच बालपणाची कसोटी लागली असेल तेव्हा माणुसकीने बहुव्याप्त अशा शेवटच्या काही बालदिनांपैकी अशा एका आजच्या बालदिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा!!

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

बधाई हो !


चित्रपटाच्या कथानकाकडे आणि त्यातुन देऊ इच्छिलेल्या संदेशाकडं आपण नंतर येऊयात!  चित्रपट आम्हांला आवडला तो त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे, त्यातील खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे, देखण्या आयुष्यमानमुळे आणि सुंदर सनया मल्होत्रामुळे! ही पोस्ट मुक्तछंद आहे, जे काही आवडलं ते कोणताही विशिष्ट क्रम, मांडणी विचारात न घेता इथं मांडतोय !

चित्रपटातील दोन्ही घरं आवडली! आयुष्यमानचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर! ज्या घरात पाचजणांना मुक्तसंचार करता येत नाही असं हे घर! ह्या घराचं एक वास्तववादी चित्रण या चित्रपटात केलं जातं. याउलट सनयाचे एक नितांतसुंदर घर! त्यामधून ओसंडून वाहणारी श्रीमंती ही एका हॉलिवूडच्या चित्रपटाप्रमाणे एका कलात्मकदृष्ट्या दाखवण्यात आली आहे. इतकी श्रीमंत सनया इतक्या छोट्या ऑफिसात कशी (का) काम करत असेल हीच या चित्रपटातील एक न पटण्यासारखी गोष्ट!

सुरुवातीला सासू आपल्या सुनेचे छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाभाडे काढत असते. हे जसं काही घरात घडत असावं त्याप्रमाणे हुबेहूब चित्रित करण्यात आले आहे. आपण फस्त केलेल्या आंब्यांच्या फोडीचा हिशोब न ठेवता सुनेनं किती फोडी खाल्ल्या ह्याकडे लक्ष असणारी सासु लक्षात राहण्याजोगी!  स्त्रियांच्या किटी पार्टीतील वातावरण थोडक्यात दाखवण्यात आले आहे परंतु ते सुद्धा अगदी सुंदररित्या!

आयुष्यमान या चित्रपटात खरोखर भाव खाऊन जातो.  त्याची विविध  व्यक्तीरेखांसोबत असलेली नाती सुंदररित्या फुलवण्यात आली आहेत.  

सर्वप्रथम त्यांचे समवयस्क तीन मित्र! सुरुवातीला एकमेकांच्या मैत्रिणींवरून चेष्टा करणारे ते मित्र ज्यावेळी त्यांना आयुष्यमानच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागते त्यावेळी त्याची ज्याप्रकारे फिरकी घेतात ते पाहण्याजोगं! 

त्यानंतर आयुष्यमान आणि त्याच्या धाकट्या भावाचे एक सुंदर नातं! कोणताही गंभीर प्रसंग ओढवला की एका उंच भिंतीवर हे दोघेजण बसतात आणि आपली मन की बात बोलत राहतात! ह्या दोघांच्यातही अंतर तसं जास्तच१ त्यामुळं  काहीवेळा आयुष्यमान त्याला मोठ्या माणसाप्रमाणं सल्ला देत असतो तर काही वेळा दोघांची दुःख सारखे असल्यामुळे एका समवयस्क मित्राप्रमाणे दुःख वाटून घेत असतो. 

आयुष्यमान आणि त्याच्या आजीचं नातंसुद्धा पाहण्यासारखं! सुरुवातीला या नात्याला फुलायला वाव मिळत नसतो.  परंतु जसजशी परिस्थिती गंभीर होत जाते तेव्हा मात्र हे दोघे एकत्र येतात. प्रसंगी खेळकरपणे एकमेकांची चेष्टा सुद्धा करतात! 

आयुष्यमान व त्याचे वडील यांचं नातं मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा विशीतला तरुण आणि पन्नाशीतील बाप ह्याचं नातं कसं असावं त्याप्रमाणं असतं!  परंतु चित्रपटात एक कलाटणीचा क्षण येतो आणि त्या वेळेपासून आयुष्यमान आपल्या काहीशा बावळटपणाकडे झुकणाऱ्या मध्यमवर्गीय आई-बाबा आणि कुटुंबाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. त्याक्षणी तो एखाद्या वडिलांच्या मित्रांप्रमाणे त्यांच्या सोबतीला उभा राहतो!

चित्रपटात मला सर्वात जास्त आवडलेलं नातं म्हणजे आयुष्यमान खुराणा आणि त्याची प्रेयसी सनया मल्होत्रा ह्यांचं!  ह्या नात्यातील फुलवण्यात आलेले कंगोरे! आयुष्यमान नवीन पिढीतील एका तरुण मुलाचे प्रतिनिधित्व करणारा! आता आपण या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहुयात.  भारतीय पुरुष हे बऱ्याच अंशी कर्मठ म्हणता येतील. किंबहुना पुर्वीच्या पिढ्यांमध्ये त्यांचे अंतरंग आणि बाह्यरुप हे दोन्ही कर्मठ असायचं!
आता गेल्या एक पिढीमध्ये भारतीय पुरुषांचे बाह्यरुप बदललं आहे असं आपणास नक्कीच म्हणता येईल. परंतु ह्यांचं अंतरंग मात्र अजुनही पारंपरिक पद्धतीने विचार करतं असं कधी कधी वाटतं. पण नक्की काही सांगता येत नाही! कदाचित हा मुद्दा निघाला म्हणून असं होत असावं. बाकी सर्व मुद्द्यांच्या बाबतीत आयुष्यमान हा नक्कीच पुढारलेला आहे. अगदी विवाहापुर्वीचे  मैत्रीसंबंध कोणत्या पातळीवर न्यायचे या मुद्द्यावरसुद्धा! सनयाची व्यक्तिरेखा अगदी प्रगल्भपणे रेखाटण्यात आली आहे. आपली भावी सासू गरोदर आहे हे कळल्यावर ती फारशी काही आश्चर्यचकित होत नाही. याउलट आयुष्यमानने संभाव्य भावाला आपल्या लग्नात घोड्यावर बसवताना जो शब्द वापरला तो शब्द ऐकून अगदी खळखळून हसते.  बाकी मग ती या बातमीमुळे आयुष्यमानला नक्की कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. 

चित्रपटातील कलाटणीचा क्षण तसा एकच म्हणता येणार नाही. सुरुवातीला ती बातमी जाहीर झाल्यावर जसा हा कलाटणीचा क्षण येतो तसा तो मग नंतर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसे कुटुंबातील एका सदस्याच्या बाजूंना कशी उभी राहतात तेव्हासुद्धा येत राहतो. 

नीना गुप्ताच्या सासुबाईच्या बाबतीत हा क्षण एका लग्नाच्या वेळी आपल्या सुनेवर बाकीच्या सुना ज्यावेळी या गोष्टीमुळे टीका करत असतात त्यावेळी येतो! आणि मग ती अगदी ठामपणे आपल्या सुनेच्या मागे उभी राहते 

तसाच हा क्षण आयुष्यमान च्या बाबतीत ज्यावेळी त्याची भावी सासू त्याच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वाची जाणीव नसताना ज्याप्रकारे त्याच्या कुटुंबावर टीका करते आणि आपल्या मुलीला तिच्यावर पडणाऱ्या संभाव्य जबाबदारीची जाणीव करून देते त्यावेळी येतो! मग त्याला आपण आपल्या कुटुंबाच्या मागे कसं ठामपणे उभं राहिलं पाहिजे ह्याची जाणीव होते!

मला हा चित्रपट आवडला तो ह्याच कारणास्तव! मध्यमवर्गीय कुटुंबात एक जे टीम स्पिरीट असतं ते सर्वसाधारणवेळी अदृश्य होऊन राहिलेलं असतं.  भोवतालच्या परिस्थितीनं आपल्या सामान्यत्वाची सतत जाणीव करुन दिल्यामुळं आलेल्या एक प्रकारच्या नैराश्यामुळं कदाचित हे होत असावं. परंतु ज्यावेळी अडचणीची परिस्थिती येते त्यावेळी हे टीम स्पिरीट उफाळून येतं आणि एका प्रचंड संघभावनेने सर्वजण उभे ठाकतात.  याचं एक उत्तम चित्रीकरण या चित्रपटात आपणास पहावयास मिळतं. 

नीना गुप्ताचा अभिनय सुंदरच! जे काही घडलं त्याविषयी आता इलाज नाही परंतु उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला ठामपणे सामोरे जाण्याची जिद्द एक स्त्रीच दाखवू शकते. ते तिनं संपुर्ण चित्रपटात सुरेखरित्या आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. या प्रकरणामुळे आयुष्यमान आणि त्याच्या प्रेयसीच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे हे समजायला तिला वेळ लागत नाही.  ती आपल्या मुलाकडून सर्व तपशील जाणून घेते आणि आपल्या मुलाला तिच्या आईची माफी मागण्याचा सल्ला देते. 

आयुष्यमान आपल्या संभाव्य सासूच्या घरी येतो त्यावेळी ती असासुसुद्धा अगदी मौनव्रत धारण करते, एकदम डिफिकल्ट अॅक्ट करते.  परंतु त्यावेळी मनातल्या मनात मात्र तिने या मुलाच्या चांगुलपणा विषयी आपला निग्रह पक्का केलेला असतो. सायंकाळी सनया परतल्यावर तिच्याशी आईने साधलेला संवाद हृदयस्पर्शी!

आता वेळ आली आहे ती या चित्रपटाच्या मुख्य विषयाविषयी लिहिण्याची! परंतु ह्या विषयावर या ब्लॉगमध्ये आपली मत मांडण्याइतका  मी अथवा हा ब्लॉग पुढारलेला नाही त्यामुळे असु देत!!

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...