मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

अहमदाबाद कसोटी - यारों की मैफिल

 


स्थळ - अहमदाबाद कसोटी मैदान 

दिनांक - २६ फेब्रुवारी २०२१

वेळ - सकाळी ७ वाजता 

रुट भल्या पहाटे जॉगिंगसाठी मैदानावर येतो.  तिथं विराट आधीच उत्साहानं मैदानाला फेऱ्या मारत असतो. रुट त्याला पाहुन मंदस्मित देतो. त्याला पाहुन विराट आपलं धावणं थांबवतो आणि त्याच्याजवळ येतो. 

विराट - "भिडु काय म्हणतोस?"

रुट - "काय म्हणणार साहेबा ! रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला !" 

विराट - "अबे काय झालं? झालं काय तुला ?"

रुट - "पाहुण्यांना वागविण्याची ही काय रीत झाली? लहानपणी आईनं सांगितलेल्या कोल्हा आणि बगळा ह्यांच्या खिरीच्या गोष्टीसारखा हा प्रकार झाला !"

विराट - (चेहऱ्यावर आलेलं हसु महत्प्रयासानं दाबुन ) "अरे तुझ्या आईनं पण तुला सांगितलेली ही गोष्ट !! मला नव्हती सांगितलेली माझ्या आईनं ! पण मागे एकदा अजिंक्यने संत्रा ज्यूसचे चार-पाच प्याले रिचविले तेव्हा त्याला चढल्यावर त्यानं ही गोष्ट सांगितली होती आम्हां सर्वांना !"

रुट आपलं सारे दुःख विसरुन खो खो हसु लागतो. 

विराट - "अबे हसतो काय ?"

रुट - "तुम्ही एक तर पार्टीत संत्राज्युस पिता आणि वर असल्या गोष्टी ऐकता !!"

विराट - "ती मुंबईची बाळबोध पोरं रे ती !ते जाऊ दे ! तुला इतकं तोंड मारुन बसायला काय झालं ? जिंदगीत पुन्हा कधी आठ धावांत पाच बळी मिळणार नाहीत हे लक्षात ठेव समजलं ?"

रुट - (हळुवार शब्दांत) "हो रे ! पण काही झालं तरीआपण कप्तान! वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी महत्वाची हो कि नाही?"

विराट - "हो ते ही खरंच !"

रुट - "पण विराटभाई मला एक सांग ! तू पण एक ओव्हर टाकुन बघायची नाही का ? जिंदगीत कसोटी सामन्यात विकेट मिळविण्याची ह्याहून उत्तम संधी मिळणार नाही कधी !"

विराट - "येडा समजला तु मला ! तुझ्या त्या बेन स्टोकचे टाळकं आधीच फिरलेले असते आणि मला समोर पाहुन सहा षटकार वगैरे मारले असते तर सामना फिरला नसता का रे भाऊ?"

रुट - "ते पण खरं रे !"

विराट - (हळुवार शब्दांत) - "खरं सांगु , माझ्या मनात तो  विचार आलेला रे मुळे !"

रुट - "मुळे कुठे आला इथं !"

विराट - "तुच रे तो ! पण हे अक्षर आणि अश्विन जबरदस्त लबाड ! सहाव्या चेंडूनंतर माझ्याकडं पाहतच नव्हते! थेट दुसऱ्याला चेंडु द्यायचे ! नाहीतर आयुष्यातील पहिली विकेट मिळाली असती ना रे भाऊ ! "

रुट - "हो असतात दुःख एकेकाची ! बाकी तुझं नशीब जबरदस्त रे भाऊ !"

विराट - "ते कसं काय ?"

रुट - "आख्या सामन्यात तुझ्या त्या पुजाराने ना एक धाव केली ना तुझ्या त्या बुमराहने एक बळी घेतला ! तरीही तु दहा विकेटने जिंकला ना रे ! तुझा तो रोहित काय खाऊन आलाय माहिती नाही !"

विराट - (डोळे विस्फारुन पाहत) - "खरंच की रे भाऊ ! "

रुट - (पुन्हा एकदा हळुवार स्वरात ) "विराट, ते ढोकळे तयार झाले असतील का रे ! मगाशी इथं यायच्या आधी पहिला कॅटीन मध्ये जाऊन आलो ! तर तो म्हणाला थोडा वेळानं ये !"

विराट - "काय माहिती! मी पण जाऊन पाहून आलेलो ! जरा जास्त जातील म्हणुन मैदानाला अधिकच्या दोन फेऱ्या मारल्या रे ! इतकं खिदीखिदी हसायला काय झालं !"

रुट - "तेच म्हटलं, भाऊ सामना जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी इतक्या लवकर मैदानावर आला कसा ?"

विराट - "काय सांगु ! त्या अनुष्काला ब्रेकफास्ट काय जमत नाय रे आधीच  ! इतके दिवस लॉकडाऊन मध्ये कसे काढले माझे मलाच माहिती ! आणि आता वामिका आल्यावर तर काय बघायलाच नको ! त्यामुळं जितके दिवस बाहेर आहे तोवर चांगलं दणकुन ब्रेकफास्ट करतो म्हणतो !"

रुट - "विराट भाऊ, तुझं गणित कसं आहे रे ?"

विराट - (रागानं ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"

रुट - दचकुन - "सॉरी तसं नाही रे माझं गणित जरा कमकुवत आहे म्हणुन म्हटलं विचारावं !"

विराट - "ठीक आहे ठीक आहे ! मॅटर काय आहे ! म्हणजे आपलं गणित थोडं कच्चं असलं तरी आपला आत्मविश्वास सॉलिड आहे !"

रुट - "म्हणजे ह्या पिंक बॉलचा आणि  वर्गमूळ  / वर्गचा काही संबंध तर नाही ना !"

विराट - "समजेल असे बोल रे मुळ्या !"

रुट - "म्हणजे बघ ! ऍडलेडला तुम्ही छत्तीसला सर्वबाद झालात !"

विराट - (अगदी भडकुन ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"

रुट - "ऐकुन तर घे रे कोहली ! म्हणजे बघ आम्ही सुद्धा इथं ८१ ला सर्व बाद झालो ! तुम्ही एकही गडी न गमावता ४९ धावा करुन जिंकलात !"

विराट - (थोडा शांत होत) "मग ह्यात काय मोठं ?"

रुट - "ते मला पण समजलं नाही पहिल्यांदा भाऊ ! पण काल रात्री आमचा तो संख्यातज्ञ मला सांगत होता ३६, ८१, ४९ बघा हे सारे पुर्ण वर्ग ! हा स्कोर पिंक बॉलच्या सामन्यातच का होत असावा ?"

विराट - "पुर्ण वर्ग ! ओह हो !"

रुट - "समजलं नसेल तर इथं थेट बोलायचं रे ! नाटकं करायला ही पत्रकार परिषद नाहीये !३६ म्हणजे सहा गुणिले सहा ! ८१ म्हणजे नऊ गुणिले नऊ ! ४९ म्हणजे सात गुणिले सात !"

विराट - "ओह माय गॉड ! ओह माय गॉड !"

रुट -" तो अजुन एक म्हणाला भारताची पहिल्या डावातील संख्या १४५ = १२ चा वर्ग + १ चा वर्ग ! तुमच्याकडे कोणी आहे की नाही संख्यातज्ञ वगैरे !"

विराट - ताठ मानेनं - "आहेत ना ! बरेच आहेत ! पैसेवाले बोर्ड आहे आमचे !मसालाडोसा खाल्यावर माझी सरासरी किती आणि इडली खाल्ल्यावर किती ह्याचे सॉलिड डिटेल्स आहेत आमच्याकडे ! पण आम्ही शेअर नाही करत ! सॉलिड सीक्रेट आहे ते !" 

रुट - "कामाचे काही सांगतात का ते ?"

विराट - "अचानक दुःखी होत - त्याला अक्कल नाही ! नको ते आकडे त्यानं रवी अंकलला दाखविले आणि इतका दहा विकेटने सामना जिंकुनसुद्धा रवी अंकल मला ओरडले ! "

रुट - (खुश होत) "काय म्हणाला तो?"

विराट - "कोणाला सांगणार नसशील तर सांगतो !"

रुट - "नाही सांगणार ! देवाशप्पथ !!" 

विराट - "तो म्हणाला पहिल्या डावात इंग्लंड ७४ ला २ अशा स्थितीत होते. तिथुन ११२ ला सर्वबाद आणि दुसऱ्या डावात ८१. म्हणजे  ७४ ला २ नंतर नंतर पहिल्या डावातल्या आठ आणि दुसऱ्या डावातल्या दहा अशा अठरा विकेट केवळ ११९ धावांत गेल्या !"

रुट -" xxx - आमचे फलंदाज इतके भयंकर आहेत आता कळलं मला ! पण ह्याच्यात तुला ओरडण्यासारखे काय होते ?"

विराट - "ते रवी अंकल ! आधीच ड्राय स्टेट मध्ये असल्यानं टाळकं फिरलंय त्यांचं ! पुढे काय होणार माहिती नाही ! ते म्हणाले, तुला अक्कल नाही विराट!  इशांतची शंभरावी कसोटी म्हणुन त्याला मानाचं एक षटक देऊन पहिल्या डावात सुद्धा अश्विन / अक्षरलाच पुर्ण गोलंदाजी द्यायची नाही का?"

रुट - "पॉईंट आहे ते म्हणाले त्यात !"

विराट - (रागाने) "काय ?"

रुट - (उभा राहत, पवित्रा घेत) "तुला अक्कल नाही विराट! ह्यात पॉईंट आहे ! आणि जोरात पळत सुटतो !"

विराट - "गेला एकदाचा ! आता अनुष्काला फोन लावतो नाहीतर पुन्हा ओरडा बसायचा !" 

कसाबसा त्याचा फोन लागतो आणि तो ऐकून घेणं सुरु करतो तितक्यात रुट धावत धावत येतो !

रुट - "कोणाशी बोलतोयस?"

विराट - खुणेनेच - अनुष्काशी 

रुट - (मुद्दाम मोठ्यानं) - "विराटभाई मस्त ढोकळा बनलाय कॅन्टीनमध्ये ! घरी गेल्यावर खायला मिळणार नाही असा ढोकळा ! ये लवकर !" 

विराट - "हॅलो हॅलो ! .... तोवर फोन कट झालेला असतो !"

विराट हताश होऊन त्या भव्य मैदानाकडं पाहत बसतो !

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

माझा होशील ना - अनामिक पत्र !




प्रति निर्माता / दिग्दर्शक,

माझा होशील ना मालिका !

महोदय,

आपली माझा होशील ना ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे ह्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आनंद व्यक्त करु इच्छितो. अशा ह्या लोकप्रिय मालिकेच्या आमच्या व्यवसायांना  महत्वाचं स्थान मिळाल्याबद्दल आम्ही प्रारंभीस आनंदित झालो होतो. परंतु जसजशी मालिका पुढं प्रवास करत गेली तसतसं ह्या मालिकेत केल्या गेलेल्या आमच्या व्यवसायांच्या विपर्यस्त चित्रणामुळं आम्ही व्यथित झालो असुन आमची व्यथा ह्या पत्राद्वारे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. 

१) बाऊन्सर्स - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर बाऊन्सर्सचा मारा करुन त्यांना जायबंदी केलं होतं. जरी त्या बाऊन्सर्सचा आणि आमचा बादरायण संबंध नसला तरी काही अज्ञानी लोकांनी त्या दौऱ्यापासून आमच्याकडं संशयानं पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळं आम्ही आधीच दुःखी मनःस्थितीत होतो.  त्या व्यथेत ह्या मालिकेने भर घातली आहे. 

अ - आदित्यला आम्ही व्यवस्थित चोप दिल्यावर सुद्धा तो केवळ दोन दिवसांच्या त्याच्या मामांनी केलेल्या घरगुती उपायानंतर पुन्हा सईचा नाद धरतो हे केवळ अशक्य आहे. प्रत्यक्ष जीवनात आम्ही चोप दिल्यानंतर असे आशिक किमान आठवडाभर इस्पितळात राहतात. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. पण ह्या मालिकेतील चित्रीकरणानंतर काही मजनु मंडळींचा आत्मविश्वास उगाचच बळावून त्यामुळं त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग ओढवला तर त्याची नैतिक जबाबदारी आपली राहील. 

त्याचप्रमाणं ही बाहयकरणी बलदंड दिसणारी मंडळी फक्त इतकाच चोप देऊ शकतात हे पाहुन ह्या व्यवसायात येऊ पाहणारी होतकरी मंडळी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करु लागतील. त्यामुळं ह्या व्यवसायाला कदाचित योग्य मंडळींचा तुडवडा भासु शकतो. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? आम्ही काय त्या डॅडू आणि मामा लोकांना बाऊन्सर्स म्हणून घ्यावं काय?

ब - ज्याप्रमाणं आदित्य आणि त्याच्या बाजुच्या अनाहुत पाहुण्यांनी मालिकेतील बाऊन्सर्स उपस्थित असताना देखील लग्नमंडपात प्रवेश केला त्या प्रसंगात बाऊन्सर्सच्या बौद्धिक क्षमतेवर अप्रत्यक्षरित्या आघात करण्यात आला आहे अशी आमची भावना झाली आहे. त्या मामाची पंजाबी बायको काहीही बरळते आणि बाऊन्सर्स तिला आत जाऊ देतात. हे केवळ अस्वीकारणीयच नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. अशा चित्रीकरणामुळं आम्हांला भविष्यात मिळणाऱ्या व्यावसायिक संधींवर मर्यादा येऊ शकतात ह्याची आपल्याला जाण आहे काय? 

२) डॉक्टर्स - सुयशला डॉक्टर दाखवुन आमच्या व्यवसायाचा घोर अपमान करण्यात आला आहे. मालिकेला आता एक वर्ष होईल. ह्या तथाकथित डॉक्टरने एक वैद्यकीय संज्ञातरी व्यवस्थित उच्चारली आहे का ह्याचा खुलासा आम्ही तुमच्याकडं मागत आहोत? कोणताही डॉक्टर आपल्या होणाऱ्या किंवा झालेल्या बायकोसाठी इतका वेळ देऊ शकत नाही ही सत्यपरिस्थिती असताना ह्या बोगस डॉक्टरनं एक पुर्ण वर्ष सईच्या मागे धावण्यात वाया घालवलं आहे.  वर्ष वाया घालवलं तर घालवलं आणि तरीही त्याला सई मिळाली नाही. जर तुमचे गुन्हे आम्ही माफ करावेत असं तुम्हांला वाटत असेल तर तुमच्या कथानकात योग्य फेरफार करुन सुयशला न्याय मिळवुन द्यावा अशी आमची मागणी आहे. नाहीतर भविष्यात ह्या व्यवसायाकडं वळणाऱ्या मराठी युवकांची संख्या कमी होऊन त्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल ! 

३) वेटर - सुयशने ज्या प्रमाणात मालिकेत खलनायकपणा केला आहे ते पाहता त्याला वेटरचा ड्रेस घालु देणे हे योग्य नव्हे. त्यामुळं आमच्या व्यवसायाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन झाली आहे. आणि तो मामा वेटर बनुन जो गोंधळ घालतो ते कसे काय शक्य आहे? असा कोणीही ऐरागैरा माणुस वेटरचे रुप नाही घेऊ शकत?

४) खानसामा / घोडेवाला - आम्ही आमची निष्ठा पुर्णपणे नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाप्रती वाहिलेली असते. ह्या मालिकेत आम्ही नवऱ्या मुलाच्या लग्नात अडथळे आणतो हे जे काही चित्रीकरण करण्यात आले आहे ते चुकीचे आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो.  

आमच्या ह्या तक्रारींची योग्य दखल घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. नाहीतर उद्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सई आणि आदित्यच्या लग्नात आम्ही मोर्चा काढु असा निर्वाणीचा इशारा आम्ही देत आहोत. 


आपले निषेधकर्ते 

बाऊन्सर्स / डॉक्टर्स /  वेटर्स / खानसामा / घोडेवाला

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...