मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

लेट गो ते मायेचे पंख !


बहुदा "लेट गो" हा आजच्या जीवनांचा मुलमंत्र असावा! कार्यालय अथवा कार्यालयाबाहेरील आपले वैयक्तिक, सार्वजनिक जीवन असो! हल्ली अप्रत्यक्ष संघर्षाचे प्रसंग वारंवार येत असतात. हल्ली कोणी थेट वाद घालत नाही. मोजक्या शब्दांतुन कटु संदेश दिला जाणं, महत्त्वाच्या बैठकी, समारंभ, चर्चा ह्यातुन वगळलं जाणं किंवा आपल्या उपस्थितीची दखल घेतली न जाणं अशा प्रसंगांना बऱ्याच वेळी जनांना तोंड द्यावे लागते. दुनियेत हल्ली वाचाळ अर्थात Loud जनांचे प्रमाण वाढत चालले आहे.  आपलं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी अशा मोठ्यानं आरडाओरडा करण्याच्या संस्कृतीचा प्रसार वेगानं होऊ लागला आहे. 

बहुतांशी संवेदनशील माणसे अशा अनुभवामुळे एकतर निराश होतात किंवा काही प्रमाणात खचुन जातात. या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक तर काही काळ जाऊ देण्याची किंवा कोणाच्या मानसिक आधाराची गरज लागते.  प्रत्येक वेळी अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काळ जाऊन देणे शक्य होत नाही. कारण अशा अप्रिय प्रसंगांची आणि आपली भेट वारंवार होत असते.  त्यामुळे आपल्याला मानसिक आधार देऊ शकेल अशा व्यक्तीची आपल्याला बऱ्याच वेळा गरज भासत असते. 

पुढील काळात लोकांशी केवळ बोलून त्यांना मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींना खूपच मागणी येईल असं मला वाटतं! मुळ मुद्द्याकडे परत वळूयात!  इथं बहुदा आपल्या या संवेदनशील स्वभावाकडं आत्मपरीक्षणाच्या नजरेतुन पाहणं इष्ट! आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विचार करावा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला उत्तर देण्यात आपली शक्ती खर्च करावी. त्यापलीकडे आपण डेटा पॉईंट तत्व लक्षात घ्यावे. 

आपल्या आयुष्यात असंख्य डेटा पॉईंट असतात. ह्यातील काही कार्यालयात, काही वैयक्तिक जीवनात आणि काही तुमच्या दररोजच्या प्रवासात येतात. यातील प्रत्येक डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला विजय मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हांला जर काहीसा अप्रिय अनुभव येत असेल तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनातील आपल्या विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये.  इथे हमखास आपल्या मनातील आपली ही प्रतिमा उंचावता येईल येईल असा एखादा डेटा पॉईंट निवडावा, स्वतःला चांगल्या मनस्थितीत आणावं आणि आयुष्यात पुढं जावं! नाहीतर इतक्या संघर्षपूर्ण जीवनामध्ये तुम्हांला सतत मानसिक त्रास सहन करावा लागेल. 

आता हे झालं सध्याच्या पिढीचे! पुढच्या पिढीचं कसं होणार याबाबतीत मात्र काहीशी चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या पिढीची त्यांच्या मनामधील स्वप्रतिमा कशी आहे याविषयी बरंच संशोधन व्हायला हवं! या नवीन पिढीतील बऱ्याच मुलांच्या मनात स्वतःच्या एका अवास्तव प्रतिमेचं भुत शिरलेलं असतं. ही आभासी प्रतिमा त्यांनी आणि कदाचित त्यांच्या पालकांनी बनवून ठेवलेली असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात या आभासी प्रतिमेचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य जाते. परंतु त्यानंतर मात्र ही आभासी प्रतिमा आणि आपण वेगळे आहोत याचे खडतर जाणीव त्यांना होऊन जाते. 

आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आपल्या कठीण काळात विनाअट त्यांच्या पंखाखाली घेतलं. आपण कधीकाळी संकटात सापडलो तर कशामुळे आपण संकटात सापडलो याची अजिबात चौकशी न करता unconditionally  त्यांनी आपल्याला आधार दिला. परंतु हीच घटना आपल्या आणि पुढील पिढीच्या बाबतीत मात्र कशाप्रकारे घडेल याविषयी मी साशंक आहे.  एकतर ही पुढील पिढी ज्यावेळी त्यांना मानसिक आधाराची  गरज असेल त्यावेळी खरोखर आपल्याला साद देईल का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. कदाचित दुसऱ्यांची (यात त्यांचे पालकसुद्धा समाविष्ट ) मदत मागणे  हे त्यांना कमीपणाचे वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा प्रसंग उद्भवला असता या पिढीला पंखाखाली घेणे हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारला हवा!  

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

Happening जागा, गोष्टी वगैरे वगैरे



बहुसंख्य वर्गापासुन आपणाला वेगळं दाखविण्याची मानसिकता कदाचित पुर्वीपासुन अस्तित्वात असेल. हल्ली ही मानसिकता अधिक प्रकर्षानं व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळं सहजगत्या जाणवु सुद्धा लागली आहे. Happening Places चे मुळ उदाहरण बहुदा  Page ३ वर अवतीर्ण होणाऱ्या पार्ट्या हे असावं. सेलिब्रिटी / वलयांकित माणसं वेगळी आणि आपण वेगळे ही मानसिकता पुर्वी अस्तित्वात असायची. मग आपण सुद्धा Happening Places च्या स्थानिक आवृत्त्या का निर्माण करु नयेत हा विचार जनमानसात जोर धरु लागला. इथं मग बहुसंख्य वर्गापासुन दुर पळता पळता बहुसंख्य वर्गच Happening Places / थिंग्स मध्ये समाविष्ट होण्याची, त्यांचं वेगळेपण नाहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली.   

Happening Places / Things ची बहुसंख्यांनी अंगिकारलेली उदाहरणे आजुबाजूला मुबलक प्रमाणात सापडतात. निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, दीर्घ पल्ल्याच्या शर्यती, सामाजिक कार्य, आपत्कालीन जनसमुदायाला मदत, विशिष्ट नैसर्गिक घटनेला भेट ह्या खरंतर खरोखरीचा निर्मळ मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टी! पण आपण Happening Places/ Things मध्ये समाविष्ट आहोत हे  दर्शविण्याचा हेतू ज्यावेळी ह्या गोष्टींत शिरतो त्यावेळी मात्र मग त्यातील निर्मलता काही प्रमाणात गढुळ बनते. ह्या गोष्टी करणारे सर्वचजण केवळ ह्या हेतूने ह्यात शिरकाव करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, तरी पण !!!

Happening Places / Things ची अजुन एक आवृत्ती म्हणजे आपल्या पाल्यांचा आयुष्यातील Happening Path !! विशिष्ट बोर्डात शालेय / महाविद्यालयीन शिक्षण, IIT किंवा तत्सम संस्थेत प्रवेश, परदेशशिक्षण वगैरे वगैरे ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश म्हणजे काय ह्याचा आपण एक बिंदु ठरवुन दिलेला आहे! ह्या विविध टप्प्यावरील बिंदूंना जोडुन काढलेली रेषा म्हणजेच हा Happening Path! ह्या रेषेपासून आपलं अंतर थोडंजरी वाढलं की बेचैन व्हायला होतं आपल्याला ! पण गंमत पहा ना ! शिक्षण संपल्यावर हा Happening Path तुम्हांला / तुमच्या पाल्याला एका शिखरावर सोडुन देतो आणि मग पुढं काय होऊ शकतं ह्याविषयी कोणीही खात्रीलायक मार्ग सांगु शकत नाही!

आपल्याला ह्या Happening गोष्टींचं इतकं वेड का असतं? आपण इतरांच्या नजरेतुन कुल व्हावं म्हणुन कदाचित ! गंमत अशी झालीय मित्रांनो, आपण सर्वचजण ह्या शर्यतीत उतरल्याने ह्यात न उतरणारे आता कुल वाटु लागलेत ! परवा एक मित्र भेटला, अगदी सहजपणे तो म्हणाला, अरे मी फेसबुक, व्हाट्सअँप, ट्विटर अगदी कुठेही नाही आणि त्यावाचुन माझं काही अगदी अडत नाही ! मला इतका कुल वाटला तो सांगु !!!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील आव्हानं !


नुकत्याच येऊन गेलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील असणाऱ्या आव्हानांचा आढावा घ्यावा असे आमचे नातलग संदेश राऊत यांनी सुचविले. 

शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात हे पुर्वी म्हटलं जायचं, लोकांच्या मनात खरोखरीची ती भावना असायची! त्यावेळी शाळा-कॉलेजातील वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी याचा आपण विचार करुयात.  गुरुवर्य हा भगवंतासमान ही विचारधारणा घेऊन बहुतांशी विद्यार्थी शाळा-कॉलेजात जात असत. यामागं बहुदा घरातील शिकवण, संस्कार कारणीभुत असावेत. शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळतं त्यामुळं मुलं मार्गाला लागतात, शिक्षकांकडुन मुलांवर जीवनावश्यक संस्कार होतात ही धारणा त्यावेळी पालक बाळगुन असत.  

शिक्षकांना योग्य आर्थिक मोबदला देणं हे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हतं. परंतु आपल्या परीने शेतातील पिकणारं धान्य, आपल्या व्यवसायातील उत्पादित होणाऱ्या वस्तु ह्या शिक्षकांना भेट देऊन शिक्षकांप्रती आपल्याला असलेला आदर व्यक्त केला जात असे.  ज्ञानधारणेसाठी विद्यार्थी बहुतांशी शिक्षकांवर अवलंबुन असत. ग्रंथवाचन वगैरे मार्ग महाविद्यालयात गेल्यावर उपलब्ध होत असत, परंतु सर्वानाच ते सहजासहजी उपलब्ध नसत. शिक्षकांना फी दिली म्हणजे त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचा आपला हक्क आहे ही भावना जी आज मुळ धरु लागली आहे,  ती त्या काळी अस्तित्वात नव्हती. 

बहुतांशी शिक्षक वर्ग हा विषयाशी संबंधित संदर्भग्रंथांचं खोलवर वाचन करीत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा शालेय / महाविद्यालयीन वर्गांमध्ये मुलांना एका अमर्याद अशा ज्ञानदालनाची आनंददायी सफर घडत असे! केवळ शब्दांनी आणि शिक्षकांच्या आदर्श वर्तवणुकीच्या माध्यमातुन मुलांची आयुष्य घडत, त्यांच्यावर जन्मभराचे संस्कार होत असत. मुलांचा मेंदु हा ज्ञानग्रहणासाठी शाळा-कॉलेजात आल्यानंतरच सक्रिय होत असे.  घरी असताना त्यांच्याकडं ज्ञानग्रहणासाठी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त फारसे स्त्रोत उपलब्ध नसत. त्यामुळं शिक्षकांसमोर ज्ञानासाठी आसुसलेला विद्यार्थीवर्ग उपलब्ध असे. 

शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीतून पाहिलं असता बऱ्याचवेळा त्यांना शिक्षक ह्या भुमिकेच्या जोरावर वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांपासुन काहीशी सुटका मिळत असे. एकंदरीत शिक्षकानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायलाच हवं असं दडपण नसे ! शिक्षकांना दैवत्वाच्या गाभाऱ्यात बसवुन त्यांच्याप्रती असलेलं आपलं आर्थिक दायित्व झटकुन टाकायला समाज मोकळा होत असे. 

काळ खुप बदलला. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांची मानसिकता बदलली. 
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं  बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं.  त्यामुळे उत्तम शिक्षकांना या पेशाकडे कायमचं टिकवून धरणे कठीण होत चाललं आहे! ज्ञानधारणेपेक्षा गुण मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढु लागला. त्यामुळे शिक्षक म्हणजे गुण मिळवून देणारे एक साधन आणि आपण त्यासाठी फीचे मोल मोजणारे उपभोक्ता ही अत्यंत चुकीची भावना काही प्रमाणात निर्माण झाली.  

त्याचप्रमाणे घरामधील संवादांमधुन शिक्षकांविषयी दिसण्यात येणारी आदरभावना सुद्धा संपुष्टात येत चालली आहे.  ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असंख्य स्त्रोत निर्माण झाले आहेत. पुर्वी  शिक्षक मिळालेल्या माहितीची वैधता तपासुन घेऊन त्यानंतरच ते विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. ती अचुकतेची शक्यता विद्यार्थ्यांपुढे आज उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांच्या बाबतीत खरी ठरत नाही. इंटरनेटच्या माध्यमातुन मिळालेलं  बरेचसं ज्ञान हे जरी शंभर टक्के अचूक नसलं तरी त्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसण्याची शक्यता जास्त असते. या सहजासहजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उगाचच बळावतो.  पुर्वी एखाद्या विषयाबाबतीत कोरा करकरीत मेंदु घेऊन शिक्षकांपुढे येऊन बसणारा विद्यार्थीवर्ग आज उरला नाही. हा विद्यार्थीवर्ग आधीच काही बरोबर आणि काही चुक अशा संकल्पनांचं ओझं घेऊन शिक्षकांपुढं बसतो. अशावेळी त्यांच्या मेंदुतील चुकीच्या संकल्पनांना दुर करुन योग्य संकल्पनांना त्या मेंदुत जागा करण्याची वाढीव जबाबदारी शिक्षकवर्गापुढं आहे! 

शिक्षकांकडून आपल्याला संस्कार, जीवनज्ञान मिळतं अशा काही संकल्पना अस्तित्वात आहेत याची जाणीवच या विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांशी वर्गांमध्ये संवाद साधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे काहीसं  मित्रत्वाकडे झुकणारे असावं ह्या अधिकच्या ओझ्याचे बोजे शिक्षकवर्गावर आहे. 

कुठंतरी एक मोठी चुक घडत आहे. गुरुजनांविषयी असणारा आदर पुढील जीवनातील व्यक्तीच्या संस्कारी वर्तवणुकीचा पाया बनत असे. आयुष्यात केव्हाही आपण चुकीचं वागल्यास आपल्या शिक्षकांना काय वाटेल हा विचार सदैव मनात राही! आज ह्या विचाराचं बंधन विद्यार्थ्यांवर नाही! 

राहता राहिला शिक्षकवर्ग! दैवत्वाच्या गाभाऱ्यात अजुनही त्यांनी राहावं ही पालकवर्गाची अपेक्षा, उच्चशिक्षणाच्या आपल्या महत्वाकांक्षांना त्यांनी येनकेनप्रकारे बळ द्यावं ही विद्यार्थीवर्गाची अपेक्षा आणि शेजारच्या घरातील कमावत्या माणसाप्रमाणे त्यांनीही पैशाचा ओघ सुरु ठेवावा ही घरातल्या माणसांची अपेक्षा!  ह्या पुर्णपणे भिन्न दिशांना तोंड करुन असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत जमेल तितकं ज्ञानग्रहणाचे आणि ज्ञानदानाचे कार्य हा शिक्षकवर्ग आजच्या काळात बजावत आहे !

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...