मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Being हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा !



प्रत्येक व्यावसायिक भुमिका आपली एक वेगळीच काठिण्यपातळी घेऊन येते.  आज आपण शिरणार आहोत चेतेश्वर पुजारा, हनुमंता विहारि ह्या गुणी खेळाडूंच्या भुमिकेत ! खंडप्राय अशा संपूर्ण भारत देशाचे लक्ष वर्षातील बहुतांश वेळा T20 व एक दिवसीय सामन्यांकडं लागुन राहिलेलं असतं. वर्षातील सात-आठ महिने ह्याच  प्रकारचं झटपट क्रिकेट खेळलं जातं! हे अगदी झगमगाटात खेळलं जाणारं क्रिकेट; जिथं सर्व देशातील क्रिकेट समजणारा, अर्धवट समजणारा चाहतावर्ग लक्ष ठेवून असतो! 

पण विशिष्ट महिन्यात कसोटी क्रिकेट सामन्यांना महत्त्व येतं! जसं की नोव्हेंबर ते मार्च हा भारतातील कसोटी सामन्यांचा मोसम! आता चेतेश्वर, हनुमंताच्या भूमिकेत जाऊन विचार करुयात ! हे दोघे वर्षातील सात-आठ महिने भारतीय संघाच्या क्रेंद्रिय गटापासुन (Core Group) पासून दुरावलेले असतात. बापुडे एकलव्याप्रमाणे आपला सराव चालू ठेवतात.  त्यांना सरावासाठी कोणत्या प्रकारचे गोलंदाज उपलब्ध असतील याविषयी फारशी आशादायक परिस्थिती नसावी.  सौराष्ट्र अथवा तेलंगणातील काही स्थानिक गोलंदाजांपुढे किंवा बॉलिंग मशीनपुढे पाच सहा महिने  महिने सराव करून अचानक मग ऑस्ट्रेलियात जाऊन हॅझलवूड, स्टार्क सारख्या दिग्गज गोलंदाजांपुढं आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सज्ज होणे हे  काही येरागबाळ्याचं काम नव्हे.  

त्यात सुद्धा दोन शक्यता निर्माण होतात.  फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर सामना खेळला जात असेल तर सलामीचे फलंदाज, तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मनसोक्त फलंदाजी करून घेतात. त्यामुळे हनुमंता विषयी मला जास्तच सहानुभूती वाटते.  फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याचा क्रमांक येण्यासाठी बराच वेळ जावा लागतो , ज्यावेळी त्याची फलंदाजी येते त्यावेळी बऱ्याच वेळा वेगाने धावा करण्याची सुद्धा गरज भासू शकते.  याउलट ज्या वेळी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असते त्यावेळी आघाडीचे फलंदाज नांगी टाकू शकतात. मग हनुमंता आणि पुजारासारख्यांना डाव सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते. 

ह्या पोस्टचा मुख्य मुद्दा असा की आपले सहकारी प्रसिद्धीच्या झोतात वर्षभर न्हाऊन निघत असताना या दोघांचा वर्षभरातील बराचसा काळ मात्र  एकलव्याप्रमाणे तपस्या करण्यात जातो. जगापुढे आपलं कौशल्य दाखवण्याच्या त्यांना फार मोजक्या संधी मिळतात. त्या मोजक्या संधी गमावल्या तर त्यांच्या कामगिरीवर टीका करण्यासाठी देशातील हजारो समीक्षक आणि लाखो चाहते आपल्या लेखण्या आणि समाजमाध्यमांचा आधार घेण्यासाठी सज्ज असतात. सद्यकालीन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जमान्यातसुद्धा पुजारा आणि हनुमंतासारखे साधक अस्तित्वात आहेत. त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही छोटीशी ब्लॉग पोस्ट! त्यांच्यापासुन काहीसा धडा आपण घेऊ शकतो! आपण आपलं काम मग ते  वलयांकित जगापासुन कितीही दूर असलं तरीही त्यावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी ! जगातील प्रत्येक काम हे महत्वाचं आहे; लाखोंनी त्याची नोंद घ्यायला हवी असा अट्टाहास नको ! नेकीनं केलेल्या प्रत्येक कामाची नोंद जगातील योग्य व्यक्ती घेतातच !  

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

स्वच्छंदी मेंदु !




आपला मेंदु बराच वेळ पुर्णपणे आपल्याला सेवा देत नाही किंवा आपलं ऐकत नाही असं हल्ली मला जाणवु लागलं आहे. ऑफिसच्या काही अत्यंत महत्वाच्या मिटींग्समध्ये तो कदाचित आपल्या सेवेसाठी १००% उपलब्ध असावा. कारण आपण ज्या देहात वास्तव्य करत आहोत त्या देहाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी अर्थप्राप्ती करण्याची गरज आहे; ही अर्थप्राप्ती करण्यासाठी ह्या मिटींग्समध्ये ह्या देहाच्या मालकानं सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे; ह्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याला आपल्या साहाय्याची गरज आहे हे तो जाणुन असतो. 

बाकीच्या बऱ्याच वेळी हा मेंदु multitasking च्या नावाखाली गोंधळ घालत असतो. खरंतर एखाद्या १५ मिनिटाच्या विशिष्ट कालावधीत दोन गोष्टी करणं ह्याला आपण जे multitasking म्हणतो ते चुकीचं आहे. कारण त्यातील एका विशिष्ट क्षणी आपण ह्यातील एकच गोष्ट करत असतो. एका विशिष्ट क्षणाला मीटिंगमधील संभाषण पुर्णपणे ग्रहण करणं आणि त्याच क्षणी आपल्या बॉसला मी तुमच्या ह्या मताशी सहमत नाही हे कळवणं ह्याला खरं  multitasking म्हणतात!!!

आता ह्याबाबतीत खुप शास्त्र असतं. काही काळापुर्वी ज्यावेळी तुम्ही नियमित ऑफिसला जात होता त्यावेळी तुम्ही नेहमीच्या रस्त्यानं कार चालवत न्यायचात. त्यावेळी कारसारथ्य करताना तुमच्या मेंदुला फारसं काम पडत नसे कारण तुमची subconscious memory बहुदा तुम्हांला मदत करत असते. आता इथं subconscious memory किंवा दुसरी कोणती मेमरी ह्याविषयी मी खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही. पण मेंदुची बरीच क्षमता मोकळी राहत असल्यानं मेंदु बाकी दुसरा विचार करायला मोकळा असे! आता इथं मेंदु बऱ्याच वेळा ऑफिसातील गोष्टीचा विचार वगैरे करत असेल. पण हे विचार भरकटलेल्या ढगांसारखे असतात. त्यातुन काही ठोस निकाल लागण्यास क्वचितच मदत होते ! आता लॉकडाऊन संपल्यावर मेंदूला आणि जी कोणती मेमरी आहे तिला रस्ता आठवेल ना ह्याची चिंता करु नका कारण गुगल मॅप असेल !

काहीसा वेगळा प्रश्न रात्रीअपरात्री जाग आल्यावर निर्माण होतो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडे तीन नोटपॅड असतात. पहिला म्हणजे संगणकातील / भ्रमणध्वनीतील नोटपॅड अँप, दुसरा पुर्वी ज्याला नोंदवही म्हणत तो पेनाने नोंदी करण्याचा नोटपॅड आणि तिसरा म्हणजे तुमच्या मेंदुतील नोटपॅड ! होतं असं की मेंदुला ऑफिसातील प्रश्न कसे सुटू शकतील ह्याविषयी प्रचंड बुद्धिमान कल्पना नेमक्या ह्याच वेळी सुचतात! आता ह्यांची नोंद ठेवण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे पहिले दोन नोटपॅड ! परंतु अशा वेळी धडपड करत ह्या पहिल्या दोन नोटपॅडचा शोध घेणे हे गृहशांततेच्या दृष्टीनं धोकादायक असु शकतं ! त्यामुळं आपल्या तिसऱ्या नोटपॅडवर विश्वास ठेवत सकाळी सारे काही आठवेल अशी श्रद्धा बाळगणं इतकंच आपल्या हाती असतं ! आता मेंदुला ह्याच वेळी पुर्ण सक्रिय व्हायची गरजच काय हा माझा प्रश्न !

हल्लीची अजुन एक गोष्ट ! मी हल्ली पुजा करताना स्तोत्रपठण करतो. हे स्तोत्र दहा वेळा म्हणायचं असतं. परंतु देव्हाऱ्यातील देवांना गंध लावणं, फुलं वाहणे ह्या सर्वांमध्ये मी स्तोत्र कितीवेळा पठण केलं आहे हा आकडा बऱ्याच वेळा मी विसरतो. मग कमीवेळा पठण नको म्हणुन जास्तीचं म्हणतो. इथं मी माझ्या मेंदुच्या एकाग्रतेच्या अभावाला दोष देतो !  

एकंदरीत काय तर ह्या मेंदुच्या स्वच्छंदी वागण्यानं मी त्रस्त झालो आहे. ह्या मेंदुची आणि माझी बैठक ह्या आठवड्यात बोलविण्याचा माझा मानस आहे ! तुम्हांला माझ्या बाजुने काही मुद्दे सुचत असतील तर जरुर कळवा !

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

सई बिराजदार - एक मराठी मैत्रीण !







 

हल्ली सुरु असलेल्या मालिकांमध्ये सुसह्य अशी मालिका म्हणजे माझा होशील ना  ? सुसह्य अशासाठी की प्रेक्षकांना आपल्याकडं खेचुन घेण्यासाठी उगाचच ह्यात थिल्लर गोष्टींचा आधार सध्या तरी घेण्यात आलेला नाही.  मालिकेत चित्रित करण्यात आलेलं आदित्य आणि त्याच्या मामांचं घर हा एक संस्कृतीचा उत्तम ठेवा ! एका कुटुंबप्रमुखाच्या आज्ञेत बाकी सर्व मंडळी गुण्यागोविंदानं कशी राहु शकतात ह्याचं वास्तववादी  चित्रण इथं आढळतं. कुटुंबप्रमुख ह्या पदावरील व्यक्तीचं प्रत्येक मत, त्याचं वागणं कुटुंबातील सर्व व्यक्तींना पटत असतं असं नाही, किंबहुना पटत नसतंच ! तरीही सर्वजण एकत्र राहतात. एकत्र का राहायचं ह्याचा प्रश्न कोणाला पडत नाही. पुर्वीच्या काळी दुसरा पर्याय नव्हता म्हणुन एकत्र राहायचे सारे ! आजच्या काळात पर्याय आहेत म्हणुन बरेचजण विखुरले ! मागच्या काळातील एकत्र राहण्यातील ज्या ज्ञात चुका आहेत त्या ओळखुन पुन्हा जिव्हाळ्याच्या माणसांना एकत्र आणता येईल का?  असो हा दुसऱ्या एका लेखाचा विषय !

आजच्या पोस्टचा विषय - सई बिराजदार! मालिकेतील आदित्यची  मैत्रीण ! प्रत्येक मराठी युवकाला अशी एक मैत्रीण असावीच ! मालिकेतला आदित्यचं सध्याचं चित्रण मध्यमवर्गीय वर्गातील ! अनेक संस्कृतीप्रिय मामांसोबत एकत्र राहणारा आदित्य आपसुक शिस्तबद्ध बनलेला आहे. आपल्याहुन मोठ्या पिढीसोबत बराच काळ व्यतित करावा लागत असल्यानं त्याच्या स्वभावात काहीसं गांभीर्य आलं आहे. महत्प्रयासानं पहिली नोकरी मिळाली असली तरी तिथला खाष्ट बॉस त्याला पहिल्या नोकरीच्या आनंदाच्या भावनेपासुन वंचित ठेवत आहे. अशा वेळी अचानक भेटलेली सई !

एखाद्या सुंदर तरुणीकडं प्रेयसी म्हणुन पहायचं असेल तर आपलं घराणं, आपलं शिक्षण, आपला पगार हे घटक  तिच्या घराण्याच्या जावई म्हणुन असलेल्या अपेक्षांना पुऱ्या पडणाऱ्या असाव्यात ही बऱ्याच मराठमोळ्या तरुणांची विचारसरणी ! बहुदा मराठी मुलं आपल्या आईवडिलांच्या आणि इतर मोठ्या मंडळींच्या संसाराचं जरा जास्तच निरीक्षण करत राहतात. त्यामुळं प्रेम क्षणभर पण बाकीचं कर्तव्य आयुष्यभर हीच भावना त्यांच्या मनात प्रामुख्यानं राहते. इथंही आदित्य सईला मैत्रिण म्हणुनच स्वीकारतो तो बहुदा ह्या घटकांमुळं ! तिला आपण आयुष्यात सुखी ठेवू शकणार नाही ह्या त्यानं समज करुन घेतला आहे! मनानं आदित्य कदाचित वीस - तीस वर्षे मागच्या काळात वावरत असावा असं मानल्यास वावगं ठरणार नाही !

सई ! सुंदर, श्रीमंतीचा आत्मविश्वास बाळगुन असणारी पण गर्व नसणारी, रोखठोक बोलणारी,  पारंपरिक संस्कारांविषयी आदर बाळगणारी सई ! आपल्या मनाविरुद्ध आपले आईवडील ज्याच्याशी आपलं लग्न लावुन देत आहे अशा श्रीमंत डॉक्टरला स्पष्ट नकार देणारी बंडखोर सई !आदित्य भेटल्यावर आपण त्याच्या प्रेमात  पडलो आहोत हे तिला तात्काळ कळलंय ! मुली ह्या बाबतीत मुलांपेक्षा स्मार्ट असतातच म्हणा ! पण तिच्यावर संस्काराचा अदृश्य प्रभाव आहे ! तिचे वडील जरी तिच्या आईच्या सईसाठी श्रीमंत वर शोधण्याच्या प्रयत्नांना वरवर साथ देत असले तरी ते बहुदा संस्कारप्रिय आहेत. मुलींचा स्वभाव काहीसा वडिलांवर जात असल्यानं सईसुद्धा संस्कारी ! आपल्याला आदित्य जरी आवडत असला तरी तो ह्या क्षणी प्रेमाचा इजहार (वजनदार उर्दु शब्द) करण्यास तयार नाही ह्याची तिला जाणीव आहे. तिला त्याविषयी घाई नाही ! तो आपल्याशी मोजकं बोलला, अधूनमधून दिसला तरी तिला ते पुरेसं आहे ! 

सई खट्याळ आहे. फार काळ हा खट्याळपणा दाबुन ठेवणं तिला जमणारं नाही! त्यामुळं गंभीर-गंभीर आदित्याची ती अधुनमधून खोडी काढते! ह्या आठवड्यात तर तिनं हद्दच केली ! शिस्तप्रिय आदित्यला तिनं एक दिवस एकदम बिनधास्त वागायला पटवलं ! खुप धमाल केली त्या दोघांनी ! त्रास देणाऱ्या बॉसची सुद्धा त्यांनी फिरकी घेतली!  
पण मग बॉसनं ओरडल्यावर आदित्यचं हे बिनधास्तपणाचं उसनं अवसान गळुन पडलं ! त्याच्यातल्या कर्तव्यदक्ष भावनेनं त्याच्यावर पुर्ण ताबा मिळविला. उगाच सईच्या नादी लागुन आपण हा मस्तीखोरपणा केला असं त्याला वाटलं ! मग त्याच्या तब्येतीची काळजी करत त्याला ऑफिसला जाऊ नको असं सांगणाऱ्या सईला तो वाटेल ते बोलला! चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तात्काळ तिथुन निघुन गेली ! पण तो चक्कर येऊन पडला हे कळताच तात्काळ धावत त्याच्या घरी आली ! 

ह्या मालिकेच्या पट्कथाकारांचं, निर्मात्यांचं अभिनंदन ! ह्या क्षणापर्यंत त्यांनी एका सुंदर, मराठी संस्कृतीशी नातं राखणाऱ्या कलाकृतीची निर्मिती केली आहे ! पुढं आदित्य - सईचं काय होईल ? लग्न झालं तर हे नातं असंच सुंदर राहील का? अशा प्रश्नांचा उगाच विचार करायला नको ! काही गोष्टी, काही क्षण गोठवुन ठेवावेत असे असतात, अशाच वळणावर असलेली ही मालिका! 
नितांतसुंदर अभिनयाबद्दल सई, आदित्य आणि मामा मंडळींचं खूप अभिनंदन ! 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

जीवनगाणे गातच राहावे

यंदा लॉकडाऊन आणि त्याच्या अनुषंगानं आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे वसईत राहण्याची सुवर्णसंधी लाभली.  मे महिन्यापासूनअंगणात नियमितपणे झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे साधारणतः  जून महिन्यात पहिल्या पावसानंतर उगवणाऱ्या अनेक इवलीशी रोपटी मे महिन्यातच जमिनीबाहेर डोकावली होती. बहुदा हा नियमित पाणी देणारा कोण हे कुतूहल त्यांनी बाळगलं असावं. एकदा ही छोटी मंडळी आपल्या विश्वासावर जमिनीबाहेर आली की मग पाऊस पडेस्तोवर त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी होती. त्यांना असंच सोडणं इष्ट नव्हतं. 

मग जूनमध्ये सुरू झालेल्या पावसाने या बालमंडळींची चांगली काळजी घेतली.  सर्व घटक जुळून आल्यामुळं तेरड्याला जून महिन्यातच पहिलं फूल आलं. यंदा पाऊस खूप नियमितपणे पडत राहिला.  त्यामुळे सर्व फुलझाडं, मोठाले वृक्ष बहरत गेले.  यातील काही कायमस्वरूपी झाडं तर काही हंगामानुसार आपलं सौंदर्याविष्कार करुन सर्वांना प्रफुल्लित करुन गायब होणारी किंवा फुलांचा बहर आवरता घेणारी ! अशाच तीन झाडांची यावर्षी कॅमेरामध्ये टिपलेली ही वेगवेगळी रुपं!

तेरडा 

जुनमधील पहिलं फुल ! 


ऑगस्ट पहिल्या आठवड्यातील पुर्ण बहर 


आज सकाळ !  त्याला बिचाऱ्याला जोरदार पाऊस आणि आता सुरू झालेला प्रखर उन्हाचा तडाखा झेपला नाही !  


Well Played तेरडा ! पुढील वर्षी पुन्हा भेटु !

लीली सदैव बारा महिने अंगणात असेल. पण तिचा फुलांचा बहार संपत आला आहे! लिलीच्या रोपट्यांना जुलैमध्ये आलेला पहिला बहार !



फुले येण्यासाठी ह्या लिलीमधून एक लांबवर दांडा येतो. एका दांड्यातून चार ते पाच लिलीची फुलं उमलतात. ही फुलं दोन तीन दिवस राहतात. मग फुलं कोमेजतात. 



लिलीचे ऑगस्टमधील बहारदार रुप !


आता आज सकाळी पाहिलेलं बहुदा या पावसाळ्यातील हे शेवटचं फुल!



लीलीसोबत अंगणात असलेली गुलाबी पिवळ्या फुलांची इवली इवली रोपटी! त्यांना वॉटर लीली म्हणतात असं मनु म्हणाली!


पाणी नियमित दिलं तर ही छोटुली  बहुधा अशीच राहतील. आता त्यांच्या बिया या प्रकर्षानं दिसू लागल्या आहेत. निसर्गक्रम सुरु राहायला हवा ना !


मन काहीसं उदास होतं. तेरडा, लिली,  वॉटरलिली ही सर्व मंडळी आता पुढील पावसाळ्यापर्यंत दिसणार नाहीत म्हणून! पण हा तर निसर्गाचा जीवनक्रम नाही का? जन्माला आलेला प्रत्येक जीव आयुष्य जगुन एक दिवशी या भुतलावरील आपलं अवतारकार्य समाप्त करुन सर्वांचा निरोप घेणारच ना?

आता पुढील काही दिवसांत लक्ष वेधले जाणार आहे ते बाकीच्या फुलझाडांकडे आणि काही  रानटी झुडपांकडे! हे पहा एक जास्वंदीचे फूल!जणू काही आयपीएल सामन्यातील समालोचकापुढे माइक धरावा तसे ते माझ्या पुढे येऊन राहिलं !!




आज सकाळी एक  मशरूम छत्री अचानक माझ्या नजरेस पडली! 



पोस्टच्या शेवटी एक हे अस्सल रानटी झुडुप ! नाव वगैरे नाही पण त्यामध्ये एकवटलेलं रानवट सौंदर्य!


जीवन चलने का नाम !  

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...