मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

Trapped - भाग ३



पुन्हा एकदा स्वतःला कोशात अडकवुन घेणं ओघानं आलं! आपलंच मन पुर्णपणे आपलं नाही ही सदैव बोचत राहणारी जाणीव! दुपारच्या वेळी जेवणं वगैरे आटोपली की फुरसत मिळायची. बेडरूमच्या खिडकीतून कॉलनीतला जाणारा रस्ता दिसायचा. दुपारच्या वेळी अगदी शुकशुकाट असायचा त्या रस्त्यावर! दोनच्या सुमारास मुलांना सोडणारी स्कुल बस आली की त्या रस्त्याला जाग यायची! पण ती बस निघून गेली की मात्र अगदी शांतता त्या वसाहतीला व्यापून टाकायची. अचानक एके दिवशी त्या रस्त्यावर तिला एक वेगळाच माणूस दिसला. फाटकी वस्त्रे घातलेला आणि बरेच दिवस अंघोळ न केलेला वगैरे! स्वतःशीच हातवारे करत तो रस्त्यावर फिरत होता. तिला अगदी भिती वाटून गेली आणि मग तिनं खिडकी घट्ट बंद करुन घेतली आणि डोक्यावर पांघरुण घेऊन डोळे बंद करुन ती पडून राहिली. तो वेडा होता! मनाशीच तिनं विचार केला. बाकीचे लोक पाहुन घेतील त्याला तिनं स्वतःशीच समजूत घालून घेतली. कधीतरी मग तिला डोळा लागला. 

असेच दोन तीन आठवडे गेले. सुरुवातीला फक्त कोशातच बंद करुन राहण्याची जिद्द करणाऱ्या मनाला तिनं समजावलं. ह्यातून कठीण का असेना मार्ग तर असणारच! बऱ्याच स्त्रियांना वेगवेगळ्या बंधनातुन जाऊन आयुष्यातील आपला मार्ग काढावा लागतच असणार. पण बहुतेक वेळा हा लढा त्यांच्या त्या एकटीनं लढत असल्यानं दुनियेसमोर येत नसणार. माझाही तसाच हा एक लढा आहे. जरा वेगळा असला म्हणुन काय मी तो लढणारच! महत्प्रयासानं तिनं स्वतःला समजावलं. 

दोन आठवड्यापुर्वीच्या त्या प्रसंगानंतर स्वामीसुद्धा काही काळ बदलल्यासारखा वाटला होता तिला! त्याच्या वागण्यात पुन्हा तोच यांत्रिकपणा आला होता. सायंकाळ झाली. स्वामी आला. नेहमीप्रमाणं तो ताजातवाना होऊन खुर्चीत बसेतोवर योगिनीनं चहाचा कप आणुन त्याच्यासमोर ठेवला होता.   

"स्वामी,  पण मलाच का तुम्ही निवडलंत? दुनियेत इतक्या असंख्य लोकांतुन तुम्ही माझीच आणि माझ्या खऱ्या स्वामीचीच निवड का केलीत तुम्ही?" योगिनीने प्रश्न विचारला खरा पण नक्की आपणच प्रश्न विचारला की हा स्वामीने आपल्याद्वारे हा विचारुन घेतला हे तिला कळेनासं झालं. स्वामीने ह्या प्रश्नावर उत्तर काही दिलं नाही. म्हणजे बहुतेक हा आपलाच प्रश्न असावा अशी तिनं आपली समजूत करुन घेतली. 

"आणि मग माझा खरा स्वामी गेला कुठं? हा देह तर त्याचाच ना!" आज योगिनीच्या अंगी बराच धीर एकवटला होता. समोर बसलेल्या स्वामीला बहुदा तिची दया आली असावी. "तो कुठं दूरवर गेला नाहीए! त्याला इथंच आम्ही दाबून ठेवलाय! " आपल्या डोक्याकडं खुणावत समोरचा स्वामी उद्गारला! "अगदी सूक्ष्म स्वरुपात! आमचा प्रयोग यशस्वी झाला ना कि त्याला कदाचित मुक्त सुद्धा करु आम्ही!" स्वामीच्या ह्या उद्गारांनी योगिनी अगदी थरारुन गेली ती दोन कारणांनी! पहिलं म्हणजे इथं कोणता तरी प्रयोग सुरु आहे आणि दुसरं म्हणजे आपला स्वामी परत यायला अजुनही वाव आहे तर!

स्वामीशी इतका वेळ सलग संवाद साधायला खरं तर योगिनीला भिती वाटायची पण तिच्या मनातील शंकेनं ह्या भितीवर मात केली. "प्रयोग? कुठला प्रयोग !" ती म्हणाली.  "आमच्या प्रजातीचा वंश पृथ्वीवर यशस्वीपणे वाढतो की नाही हे पाहायचं आम्हांला!" अगदी निर्विकारपणे स्वामी म्हणाला! त्याच्या ह्या उद्गारांनी योगिनी अगदी थरारुन गेली. आतापर्यंत तिनं ह्या शक्यतेचा विचारसुद्धा केला नव्हता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी ऑफिसात निघुन गेला आणि योगिनी अगदी निग्रहानं विचार करु लागली. केवळ तिच्या एकटीशी संबंधित असणारं हे लढणं सुद्धा तिला झेपत नव्हतं आणि त्यात ह्या नव्या शक्यतेची निर्मिती झाली होती. कोण्या अजाण जीवाला ह्यात आपल्यामार्फत गुंतवलं गेलं तर आपण कोणाची बाजू घेऊ ह्याची तिला शाश्वती वाटत नव्हती. "जर आपण ह्या स्वामीलाच संपवला तर!" तिच्या मनात विचार चमकुन गेला. क्षणभर ती अगदी उत्साहित झाली. आपल्याला ह्या सापळ्यातुन सुटकेचा मार्ग सापडला ह्या विचारानं! पण नंतर तिच्या लक्षात आलं. 

सध्याचा स्वामी म्हणाला होता 
"तो कुठं दूरवर गेला नाहीए! त्याला इथंच आम्ही दाबून ठेवलाय! " म्हणजे जर ह्या स्वामीला संपवला तर आपला स्वामी सुद्धा नाहीसा व्हायचा त्याच्यासोबत! आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा स्वामी जरी नाहीसा झाला तरी आपल्या मनावर ताबा घ्यायला ह्यांच्यातलाच दुसरा कोणी पुढं व्हायचा! 

आज तिच्या मनाच्या विचारांची तर्कसंगती सुसंगत चालली होती. जरी कोणी परका तिच्यावर अंमल ठेऊन होता तरी ज्या बाह्यरूपात तो तिच्या सामोरा यायचा ते रुप तिच्या लाडक्या स्वामीचं होतं. आणि नाही म्हणायला ह्या परक्याची सुद्धा तिला सवय झाली होती. त्याच्या वागण्याच्या तऱ्हा तिला कळल्या होत्या. चहाचा एक घुटका तिनं घेतला. आपण ज्यावेळी बाहेर जातो त्याचवेळी नेमकी आपली ह्या आठवणींची स्मृती कशी नाहीशी केली जाते ह्याचा छडा लावणं आवश्यक आहे हे तिला जाणवलं. जर त्या पद्धतीचा आपणास पत्ता लागला तर त्यावर आपण विजय मिळवु शकतो आणि मग आपली ही बाजू दुनियेसमोर मांडू शकतो. स्वामीशी अगदी चांगलं वागत राहायचं आणि ह्या पद्धतीचा शोध लावायचा असा मनोमन तिनं निर्धार केला आणि तिला खूप बरं वाटलं. 

सुधाताई आपल्या कोल्हापुरातील गावी गेले काही महिने अगदी बेचैन होत्या. खरंतर बेचैन व्हायचं काहीच कारण नव्हतं. दोन्ही मुलं संसाराला व्यवस्थित लागली होती. मुलाचा कोल्हापुरातच चांगला व्यवसायात जम बसला होता आणि मुलगी योगिनी परगावी असली तरी संसारात रमली होती. यजमान सुधीर निवृत्तीनंतर आपल्या मित्रपरिवारासमवेत अगदी मजेत दिवस व्यतित करत होते. योगिनीची आणि सुधाताईंची भेट म्हटली तर तशी कमीच व्हायची! म्हणुनच खरंतर परगावी मुलीला स्थळ शोधण्यात त्यांनी सुरुवातीला काहीसा विरोध केला होता. पण शेवटी चांगलं स्थळ म्हटल्यावर मात्र त्यांचा नाईलाज झाला होता. सुरुवातीला योगिनी अगदी मजेत आहे असं त्यांना वाटत असे. पण गेले काही महिने मात्र तिच्या वागण्यात त्यांना काहीसा बदल जाणवला होता. सुधीर ह्यांच्या भाच्याच्या लग्नात दोघीजणी पुण्याला दोन दिवस भेटल्या खऱ्या पण योगिनी अगदी अलिप्तपणे वागत आहे असंच त्यांना वाटत राहिलं होतं. त्यांनी आपली शंका मुलाला आणि सुधीर ह्यांना सुद्धा बोलून दाखवली होती पण दोघांनी तिला वेड्यात काढलं होतं. पण आईचं वेडं मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. खासकरुन स्वामीचा विषय काढला की योगिनी अचानक शांत व्हायची आणि विषयच बदलुन टाकायची असा त्यांना संशय आला होता. शेवटी न राहवुन त्यांनी एक धाडस केलं होतं. गिरगावातील बहिणीकडं जायचं निमित्त काढून त्या थेट योगिनीच्या घरी धडकल्या होत्या. 

आताच नव्यानं जिद्द निर्माण झालेली योगिनी आपल्या जागेवरुन उठायला आणि दाराची बेल वाजायला एकच गाठ पडली. समोर आईला पाहुन तिला आपला हुंदका आवरता आला नाही. क्षण दोन क्षणभर आईच्या मिठीत आपल्या साठवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन देत असतानाच तिला अचानक जाणवलं की आपल्याला अजुनही स्वामीची खरी बाजू आठवतेय आणि आपण आईला ती सांगू शकतोय! 

स्वामी ऑफिसात एका महत्वाच्या बैठकीत होता आणि तितक्यात त्याच्या मेंदूत एक अतिमहत्वाचा संदेश आला. "गुप्त रहस्य बाहेर सांगितलं जातंय! तात्काळ कृती करा!" ह्या संदेशाने स्वामी थरारला. हे सारं घडलं कसं ह्याचा विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. त्यानं तात्काळ योगिनीच्या मेंदुचा तो भाग गोठवण्याची आज्ञा दिली. 

"आई, माझ्या मेंदुवर परग्रहवासियांनी ताबा मिळविला आहे आणि स्वामी देखील त्यातला एक आहे! तू मला ताबडतोब इथुन बाहेर घेऊन चल! कोणत्याही क्षणी हे सारं काही मी विसरुन जाईन!" योगिनीने मोठ्या कळकळीनं हे वाक्य उद्गारलं! सुधाताईंना नाहीतरी आधीपासुन संशय होताच. त्यांनी तात्काळ योगिनीला जशी होती तशी घराच्या बाहेर काढली. घराला कुलूप लावायची सुद्धा तसदी न घेता त्या खाली उतरल्या आणि तात्काळ तिला रिक्षात बसवुन रिक्षा स्टेशनाकडं वळवली.  

 "आई, आई अगं तू कधी आलीस आणि आपण स्टेशनाकडं का जातोय!" योगिनी अचानक ओरडली. "स्वामीला रात्रीचं जेवण कोण देणार? वळवं पाहू रिक्षा घराकडं पुन्हा!" योगिनीचा त्रागा सुरुच होता. "मी मुंबईत आले होते आणि अचानक बाबांची तब्येत सिरिअस असल्याचा फोन आला मला!" आपल्याच यजमानांच्या प्रकृतीविषयी अशी थाप मारणं सुधाताईंच्या जीवावर आलं होतं पण परिस्थिती बघता त्यांच्याकडं दुसरा पर्यायच नव्हता. 
आपल्या वडिलांच्या तब्येतीची ही बातमी ऐकून योगिनी हादरली आणि शांतही झाली. 

इथं स्वामी आणि त्याच्या कंपूत मात्र प्रचंड कोलाहल माजला होता. सुधाताई कोणतीही पुर्वसुचना न देता योगिनीसमोर आल्या होत्या आणि योगिनीने त्या दोन मिनिटात त्यांच्यासमोर रहस्याचा उलगडा केला होता. सुधाताईंचं आता करायचं काय  ह्याविषयी त्या कंपूत जोरदार चर्चा सुरु होती. जी काही कृती करायची ती तात्काळ आणि कोणालाही संशय न येऊ देता करणं आवश्यक होतं!

(क्रमशः)

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

Trapped - भाग २



अंतरिक्षयान पाहिल्यानंतर बरेच दिवस योगिनी आपल्याच विश्वात मग्न होती. स्वामीच्या वागण्यातील काही विशिष्ट खासियत सापडते का ह्याचा ती अभ्यास करत होती. आपल्याकडून संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होती. स्वामी जर खुश झाला तर त्याच्या आपल्याबरोबरच्या वागण्यात काही फरक पडेल का ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत होती. 

हे सर्व वाटतं तितकं सोपं नव्हतं. स्वामीच्या स्वभावातील विक्षिप्तपणा मधुनच उफाळून येई! अशावेळी आपला शांतपणा कायम ठेवण्यासाठी तिला कसोशीनं प्रयत्न करावा लागे. पण ह्या सर्व कठीण परिस्थितीतुन तिनं आपले प्रयत्न सुरुच ठेवले होते. स्वामीच्या आवडीचा स्वयंपाक करणं, त्याला आवडणारं संगीत लावणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तिनं आपले प्रयत्न सुरु ठेवले होते. बाहेरच्या जगाशी संपर्क साधताना आपल्याला हे सारं काही आठवत नाही ह्याविषयी मनःस्ताप करणं सुद्धा तिनं हळूहळू सोडुन दिलं होतं. म्हणायला गेलं तर आपल्या विश्वातील इतका मोठा बदल तिनं जवळजवळ पुर्णपणे पचवुन टाकला होता. अचानक एके दिवशी तिच्या मनात विचार आला, "असंच आयुष्य जगायला काय हरकत आहे?" मग मात्र ती खडबडुन जागी झाली. सहजासहजी अशी हार मानणाऱ्यातील ती नव्हती. 

स्वामीच्या वागण्यात काहीसा फरक तिला जाणवु लागला होता. त्याचं वागणं पुर्वीइतकं निष्ठुर राहिलं नव्हतं. एकदा तर तिला अंगात किंचित ताप असताना त्यानं चक्क तिला चहा बनवुन दिला होता. हळुहळू तिचा धीर वाढू लागला होता. असंच एके दिवशी रविवारी सकाळी दोघं चहा शांत बसले होते. आपला खरा स्वामी अशावेळी आपल्या सोबत असता तर, ह्या विचाराला तिनं प्रयत्नपूर्व दूर लोटलं. सारं धैर्य एकवटून तिनं त्याला विचारलं, "स्वामी माझ्या मनावर तू कसं नियंत्रण करतोस?" मागील साऱ्या महिन्यातील आपली चांगली वागणुक तिनं ह्या प्रश्नाद्वारे पणाला लावली होती. जर स्वामी संतापला असता तर त्याच्या प्रतिक्रियेच्या संतप्तपणाने कोणतीही परिसीमा गाठली असती. आपल्याला हे सारं कळलं आहे हे स्वामीला आपल्या तोंडाने सांगण्यात फार मोठा धोका आहे असं ती समजत होती. 

स्वामीनं एक मोठा निश्वास घेतला. तो क्षणभराचा शांततेचा काळ योगिनीला एका युगासारखा वाटला. "मी तुझ्या मनावर कसं नियंत्रण करतो हे मी तुला सांगू शकत नाही! पण जे काही चाललं आहे ते तुला समजतं आहे हे मी जाणुन आहे!" आफ्रिकेवरुन परतल्यानंतर इतक्या महिन्यांच्या कालावधीनंतर स्वामी सलगपणे इतकं काही बोलला होता. हा संवाद सुरु करण्यासाठी आणि तो कसा होईल ह्याविषयी विचार करुन करुन योगिनीनं इतका तणाव घेतला होता की ह्यापुढं संवाद चालू ठेवणं तिला शक्य झालं नाही. 

दिवस पुढं चालले होते. मागचा तो संवाद म्हणजे ह्या दोघांच्या विश्वातील एका मोठं पाऊल होतं. स्वामीने त्या दोन वाक्यांत बऱ्याच गोष्टींची कबुली दिली होती. योगिनी पुढील काही दिवसात त्या संवादाच्या छायेतुन बाहेर निघाली होती. तिला हल्ली एका गोष्टीचं बरं वाटू लागलं होतं. घरी एकटं असताना विचार करण्याची तिची क्षमता आता पूर्वीइतकी प्रभावी झाल्याचं तिला जाणवु लागलं होतं. 

अशाच एका संध्याकाळी योगिनी आपल्या विचारशक्तीच्या स्पष्टतेबद्दल स्वतःशीच आनंद व्यक्त करत बसली होती. नेहमीप्रमाणं स्वामी घरी परतला. तो चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसला होता. अचानक काय झालं ते योगिनीला समजलं नाही पण तिच्या तोंडुन उद्गार निघुन गेले, "स्वामी मला असं हे नियंत्रित विचारशक्तीचं जीवन जगुन वैताग आला आहे. मी माझं जीवन संपवायच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले आहे!"  स्वामीच्या चेहऱ्यावर तिला काही खास आश्चर्याचे भाव दिसले नाहीत. त्यानं आपला चहाचा कप संपवायला नेहमीइतकाच वेळ घेतला. 
" तू ह्या पृथ्वीवरील आपलं जीवन संपवुन माझ्या नियंत्रणातून मुक्तता मिळवु शकशील असा तुझा समज असेल तर तो पुर्ण चुकीचा आहे!" चहाचा कप टेबलावर ठेवत तो म्हणाला. आणि मग त्यानं काही क्षण योगिनीकडे रोखुन पाहिलं. 

योगिनीला अचानक ग्लानी येऊ लागली होती. तिचे डोळे मिटले गेले आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र येऊ लागलं. तिचे सर्व नातेवाईक शोकाकुल होते. हे सर्व शोकाकुल का आहेत ह्याचा विचार करत असतानाच तिला पांढऱ्या कपड्यात आच्छादलेला आपला निष्प्राण देह खोलीच्या एका कोपऱ्यात दिसला. तिथं बाजुलाच स्वामीसुद्धा बसला होता. हे सर्व पाहत असताना ती खरोखर त्या चित्रात शिरली. तिथल्या योगिनीच्या देहातून ती बाहेर पडली होती आणि प्रचंड वेगानं ती एका प्रचंड अंधाऱ्या पोकळीत तिचा प्रवेश झाला होता. शरीरविरहित असं आपलं अस्तित्व तिला जाणवत होतं. आपल्या मनातील विचारांशिवाय तिला कोणाचीच सोबत नव्हती. अगदी स्वामीची सुद्धा! त्या विचारानं तिला अगदी हायसं वाटलं होतं आणि त्याच क्षणी तिला आपल्या बाजुला एक वायुमय अस्पष्टशी आकृती दिसली होती. आणि तिनं योगिनीशी संपर्क साधला होता. इतक्या प्रचंड आणि कोणत्याही मितीचं अस्तित्व असल्याचं खुण नसलेल्या ह्या विश्वात ही आकृती कोण असावी असा विचार करतानाच हा स्वामीच आहे हे तिला त्या संदेशावरुन समजलं होतं आणि तिला भयंकर धक्का बसला होता. 

"समजलं, ह्या विश्वापलीकडं सुद्धा मी तुझ्यावर कसं नियंत्रण ठेवू शकेल ते? सोफ्यावरुन उठत स्वामीनं तिच्या पाठीवर हलकंसं धोपटत तिला म्हटलं होतं. 

ह्या अनुभवातून बाहेर येण्यासाठी योगिनीला बरेच दिवस लागले होते. तिचा आत्मविश्वास काहीसा कोलमडला होता. आणि ज्या वेळी ती काहीशी सावरली होती त्यावेळी तिला जाणवलेली पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपण विचारलेला हा प्रश्न 

"स्वामी मला असं हे नियंत्रित विचारशक्तीचं जीवन जगुन वैताग आला आहे. मी माझं जीवन संपवायच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले आहे!

खरंतर हा आपण विचारलेलाच नव्हता. स्वामीनेच तो आपल्या तोंडुन वदवून घेतला होता. त्याच्या क्षमतेची आपल्याला जाणीव करुन देण्यासाठी! प्रचंड उद्वीगतेनं तिनं टेबलावर आपली मूठ आपटली होती. 
ह्या जीवनातच नव्हे तर त्यापलीकडील विश्वात सुद्धा आपण अडकून गेलो आहोत ह्या प्रचंड वेदनादायक भावनेनं तिला व्यापुन टाकलं होतं. 
 
(क्रमशः)

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

Trapped - भाग १


स्वामी आला. योगिनीनं जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं होतं आणि सर्व पदार्थ नुकतेच गरम करुन शेजारीच मांडून ठेवले होते. अंगात कणकण होती म्हणून बिछान्यावर पडली आणि नेमका डोळा लागला. 

"आई गं !" डोक्यात एक सणकून कळ गेली तशी योगिनी कळवळली. तापाने लालसर झालेले डोळे तिनं उघडले तर स्वामीने तिच्या डोक्यावर रोखून धरलेली टॉर्च तिच्या नजरेस पडले. त्यातील किरणांनी तिच्या मस्तकात ही कळ निर्माण केली होती. अंगातला ताप वगैरे विसरुन योगिनी झटकन उठली. भात, भाजी, वरण सर्व काही स्वामीला हवं तसं गरम आहे ना ह्याची तिनं खातरजमा करुन घेतली आणि मगच ताट वाढलं. 

एखाद्या वाघासमोर बांधलेल्या शेळीनुसार स्वामी जेवेस्तोवर योगिनी त्याच्या बाजुलाच बसुन होती. "कोणी मेल्यागत असला रडका चेहरा का घेऊन बसलीस माझ्यासमोर! " स्वामी कडाडला. एका क्षणात योगिनीच्या चेहऱ्यावर ओढुनताणून आणलेलं हसु होतं. "ऑफिसात सर्व काही व्यवस्थित होतं ना आज?" तिनं प्रश्न विचारला. "ह्या वर्षात ८२ वेळा हा प्रश्न विचारुन झाला आहे. आजची ही ८३ वी वेळ!" स्वामीने निर्विकार चेहऱ्यानं तिला जाणीव करुन दिली. भाजी त्याच्या अगदी मनासारखी झाली असावी म्हणून त्यानं असा निर्विकार प्रश्न विचारला असावा, योगिनीने मनाची अटकळ बांधली. 

थोड्या वेळातच जेवण वगैरे आटपून स्वामी गाढ झोपी गेला सुद्धा! पण योगिनी मात्र तळमळत जागीच होती. 

त्यांच्या लग्नाला आता तीन वर्षे होत आली होती. सुरुवातीला राजाराणीचा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा चालला होता. अगदी मनासारखा पती लाभला म्हणुन योगिनी अगदी "सातवे आसमान" वर होती. पण एकदा ऑफिसच्या कामानिमित्त म्हणुन स्वामी आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला. सुरुवातीला आठवडाभराचा म्हणुन असणारा दौरा चांगला तीन महिने लांबला. 

तीन महिन्यांच्या विरहानंतर स्वामी परतणार म्हणून योगिनी अगदी आनंदात होती. स्वामी परतला तो मध्यरात्री दोन वाजता! काहीतरी बदलल्याची जाणीव नक्कीच योगिनीला झाली होती, पण तीन महिन्यांच्या प्रवासाचा शीण आल्यानं स्वामी मूडमध्ये नसेल आणि आपण सुद्धा झोपेत असू म्हणून आपल्याला असं वाटून गेलं असणार अशी तिनं मनाची समजूत काढली होती. 

पण तिची ही समजुत क्षणिक होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासुन योगिनीचा हा बंदिवास सुरु झाला होता. जे काही चाललं होतं ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं होतं. शरीर स्वामीचच असलं तरी तो नक्कीच स्वामी नव्हता. तीनच महिन्याचा कालावधी झाला असला तरी योगिनी आपल्या स्वामीला चांगली ओळखुन होती. आणि आफ्रिकेच्या प्रवासानंतर परतलेला स्वामी म्हणजे त्याच्या देहात वास्तव्य करणारी दुसरीच कोणी व्यक्ती आहे ह्याची योगिनीला पूर्ण खात्री होत होती. 

पहिले काही दिवस आपला हा संशय जवळच्या कोणाला तरी बोलुन दाखवावा असं तिला वाटत होतं. पण असा संशय बोलून दाखवावा तर आपल्यालाच लोक वेड्यात काढतील अशी तिला भिती वाटू लागली होती. हा भूतांखेतांचा प्रकार असावा असा विश्वास ठेवण्यास तिचं आधुनिक मन तयार होत नव्हतं. शेवटी एक दिवशी स्वामी ऑफिसात गेला असताना तिनं मनाचा हिय्या करुन आपली धाकटी बहीण नमिता हिला भ्रमणध्वनीवरुन आपला संशय मेसेज करुन सांगायचं ठरवलं. तिनं जसा मेसेज टाईप केला आणि तो पाठविण्यासाठी send बटन दाबायचा प्रयत्न केला तसं अचानक सर्व अक्षरे एका मागोमाग एक नाहीशी होताना दिसू लागली. जसं कोणी backspace बटणं दाबावीत तसं! 

योगिनी अगदी हादरुन गेली होती. त्या दिवशी सायंकाळी परतलेला स्वामी आपल्याकडे काहीसा खुनशी नजरेनंच पाहतो आहे हे तिला जाणवलं होतं. तीन दिवसानंतर तिनं आईला फोन करुन हे सांगायचं ठरविलं तर अचानक तिच्या मोबाईलच कव्हरेजच बंद झालं होतं. योगिनीचा हा बाह्य जगताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अजुन काही दिवस चालला होता. पण प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी कोणतीतरी अज्ञात शक्ती तिचा हा प्रयत्न हाणुन पाडत होती. 

अजून एक भयाण वास्तव तिच्यासमोर आलं होतं. स्वामीने सुरुवातीचे काही दिवस काहीतरी बहाणा करुन तिचा सार्वजनिक प्रसंगातील वावर अगदी किमान ठेवला होता. आणि जेव्हा त्यानं तिला अगदी मनसोक्तपणे समारंभात वावर करण्याची मुभा दिली होती तेव्हा मात्र तिच्या स्मरणशक्तीचा काही ठराविक भाग तिला अज्ञात बनत होता. आपलं भय, संशय तिला अशा प्रसंगी अजिबात आठवत नसे. आणि मग सर्व काही आटपून घरी परतल्यावर मात्र तिला आपण अशी नामी संधी वाया घालवली ह्याची हळहळ लागुन राही. आणि स्वामीच्या चेहऱ्यावरील ते छद्मी हास्य तिची अगतिकता अजुनच वाढवी. 

एकटी बसली असताना मग ती ह्या सर्व घटनांची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करीत असे. आपण एका जाळ्यात अडकलो आहोत आणि आपला हा लढा केवळ आपल्यालाच लढायचा आहे हे ती समजुन चुकली होती. सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपल्या मेंदूवर ताबा मिळवु शकणारा स्वामी आपल्याला एकटी असताना मात्र मुक्तपणे कसा विचार करुन देतो ह्याचंच तिला राहूनराहून आश्चर्य वाटत होतं. हे स्वातंत्र्य जितका वेळ आहे तोवर त्याचा पुरेपूर वापर करुन घेतला पाहिजे ह्याची देखील तिला जाणीव होती. 

स्वामीच्या देहात वावरणारा नक्की आहे तरी कोण ह्याचा छडा लावणं हे योगिनीच्या जीवनाचं एकमात्र ध्येय बनून राहिलं होतं.  

योगिनीचं असं विचारचक्र सुरु असतानाच तिला त्यांच्या बंगल्याच्या बागेमध्ये काहीशी चकाकणारी गोष्ट दिसली. रात्रीच्या वेळी बागेत असं चकाकणारी कोणती गोष्ट आली म्हणून योगिनी बाहेर उठून पाहावयास गेली तर एका क्षणार्धात वस्तु तिच्या नजरेआड झाली होती. पण त्या काही मिलीसेकंदात त्या वस्तूचा आकार तिच्या मनः पटलावर कायमचा नोंदला गेला होता. शालेय जीवनात वाचलेल्या परग्रहवासियांच्या गोष्टी तिच्या चांगल्याच लक्षात होत्या. आणि त्यातील अंतरिक्षयान आज काही वर्षांनी तिच्या मनःपटलावर पुन्हा एकदा नोंदलं गेलं होतं. तिचा मेंदू जागरुक होता म्हणुन ती एका क्षणार्धात बिछान्यावर झोपून गेली. 

तिचा संशय खरा ठरला होता. स्वामी अगदी खडबडत उठला होता. धावत जाऊन त्यानं बागेत जाऊन नजर टाकली होती. तिथल्या मोकळ्या जागेकडं पाहून तो अगदी वैतागला होता. मग पुढील पाच मिनिटं तो संशयानं अगदी रोखुन झोपलेल्या योगिनीकडं पाहत राहिला होता. एकदाचा तो जाऊन पुन्हा झोपला तेव्हा कुठं तिनं सुटकेचा निश्वास टाकला होता. 

आपला स्वामी म्हणजे परग्रहवासी आहे की काय ? कृष्णपक्षातील उशिरानं उगवलेल्या चंद्राकडं पाहत योगिनी आपल्या मनातील संशयाच्या वादळाला आवर घालायचा आटोकाट प्रयत्न करत होती 

(क्रमशः) 

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

श्रोता

पुर्वी चांदोबा हे मासिक यायचं. त्या मासिकातील गोष्टी कशा मस्त असायच्या! आरंभी सर्व काही सुरळीत असायचं, मध्ये थोडंफार संकट वगैरे आणि मग शेवटी सर्वकाही आलबेल! दोन तीन पानांची छोटीशी गोष्ट! पुर्वीची मध्यमवर्गीय आयुष्यं सुद्धा अशीच असावीत असं म्हणायचा मला मोह होतोय. 
पुर्वीचा वेळ - तणावपातळी आलेख  (एकक - दिवस) 
सकाळी माणूस अगदी शांतपणे उठत असावा. दुपार होईतोवर कामाचा थोडाफार तणाव आणि मग सायंकाळचे पाच वाजले की तणाव मुक्ती! 


हल्ली मात्र हे असं काही होत नाही. माणसाच्या तणावाची पातळी सायंकाळी शुन्यावर येतंच नाही! 

Image result for linear graph
हल्लीच वेळ - तणावपातळी आलेख  (एकक - आयुष्य)
माणसं आयुष्यातील तणाव असाच सदैव पुढे पुढे नेत राहतात. मध्ये वार्षिक सुट्ट्यांमुळे काहीसा खंड मिळतो तितकाच मग पुन्हा मात्र ये रे माझ्या मागल्या! 


प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं एक खरंखुरं व्यक्तिमत्व असतं. जसजसं आपण मोठं होतं जातो हे मूळ व्यक्तिमत्व आपल्याला काही प्रमाणात झाकून ठेवावं लागतं. ह्यातील काही झाकणं वैयक्तिक जीवनातील असतात तर काही व्यावसायिक जीवनातील! वेगळ्या शब्दात मांडायचं झालं तर आपण आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वावर पुटं चढवतो, जेणेकरुन आपण बाह्यजगात वावरावयास योग्य बनतो. 

आयुष्यातील तणाव हा सदैव ह्या पुटांवर, थरांवर मारा करत राहतो. तणावाची महत्तम पातळी, त्याची वारंवारता आणि ह्या पुटांची क्षमता हे  तीन घटक माणूस किती काळ तणाव सहन करु शकतो हे ठरवतात. एकदा का ही पुटं गळून पडली की मग माणसाचं खरंखुरं व्यक्तिमत्व, त्यातील उणिवा लोकांसमोर उघड्या पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि केवळ ह्या शक्यतेचा विचार करुनच माणसं हबकतात. 

अशा वेळी आपणास गरज भासते ती एखाद्या चांगल्या श्रोत्याची! हा श्रोता कसा असावा?
१> आपल्या हळव्या क्षणी आपल्या मनातील सर्व काही ऐकुन घेणारा असावा! हळव्या क्षणी आपलं मन अगदी खुप वाईट शक्यतांचा विचार करतं. कधी कधी मनात दुष्ट विचार सुद्धा येतात. हे सर्व काही आपल्याला ह्या श्रोत्यासमोर मांडता येण्याचा विश्वास मनी असावा. 

२> हळव्या क्षणी आपल्या अंगी असलेल्या अनेक गुणांविषयी सुद्धा आपल्या मनात शंका निर्माण झालेल्या असतात. कोणीतरी आपल्याला आपल्याच ह्या गुणांची पुन्हा खातरजमा करुन देण्याची गरज असते. आपल्या कथनातुन ही आपली गरज व्यक्त होते, कधी उघडपणे तर कधी अप्रत्यक्षपणे! आपला हा श्रोता आपली ही गरज योग्य क्षणी ओळखणारा आणि त्याक्षणी आपणास आपल्या ह्या गुणांची आठवण करुन देणारा असावा. 

३> कधी कधी आपण अगदी वाईट परिस्थितीत अडकलेलो असतो. पण आपलं मन हे मानण्यास तयार नसतं. अशा वेळी छोट्या छोट्या विधानातुन हा श्रोता आपल्याला हळुहळू वस्तुस्थितीची जाणीव करुन देणारा असावा. सध्याचा एक लढा हरलास तरी आयुष्यात अशा अनेक संधी मिळणार आहेत हे समजावुन सांगणारा असावा 

४> आपण काही काळानंतर कठीण प्रसंगातुन बाहेर पडतो. आपला चांगला काळ येतो आणि अशा वेळी आपणांस आपल्या कठीण काळाच्या स्मृती नकोशा झालेल्या असतात. आणि अशा वेळी हा श्रोता आपली ही गरज ओळखतो. त्या वेळी आपण जे काही ह्या श्रोत्यासमोर बोललो तो त्याचा पुन्हा कधी उच्चारसुद्धा हा श्रोता कधी करत नाही. कधी कधी आपण इतके स्वार्थी बनतो की आपण ह्या श्रोत्यांची सांगड आपल्या वाईट काळाशी घालतो आणि त्यामुळं श्रोत्यासमोर जाणं सुद्धा टाळतो जेणेकरून त्या कठीण कालावधीच्या आठवणी सुद्धा पुन्हा यायला नकोत. श्रोत्याला हे उमगतं, त्याला काहीशा वेदना सुद्धा होत असतील पण तो निर्विकारपणे आपलं आयुष्य जगत राहतो. पुन्हा कधी आपल्याला त्याची गरज लागली तर तो सदैव उपलब्ध असतो. 

वरील दोन आलेखावरुन हे नक्की सिद्ध होते की तणावाची पातळी हल्ली खूप वाढली आहे. आणि त्यामुळं हल्ली उत्तम श्रोत्यांची गरज सुद्धा खुप आहे. परंतु तणावमुक्तीचा हा एक सोपा मार्ग बऱ्याच जणांना माहित नसतो. तर नक्कीच ह्या पोस्टपासुन बोध घेऊन हा मार्ग अवलंबा!

होय ना! मग तुम्ही नक्की काय करणार ? एका उत्तम श्रोत्याचा शोध घेणार की एक उत्तम श्रोता बनणार?

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...