मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

नवं - जुनं


जे काही झालं ते नक्कीच भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीनं स्पृहणीय नाही. मुर्ती आणि सिक्का दोघंही कामगिरीच्या दृष्टीनं ह्या क्षेत्रात उत्तुंग शिखरं गाठलेली व्यक्तिमत्वे ! नक्की काय चुकलं ह्याचं खोल विश्लेषण करण्याइतकी आतल्या गोटातील बातमी माझ्याजवळ असण्याची शक्यता नाही. पण एकंदरीत दोन विचारसरणीतला जो फरक जाणवतो त्यावर आधारित ही पोस्ट !

१) संघटनेशी निष्ठा 

सिक्का हे आधुनिक पिढीतील आघाडीची कामगिरी बजावणाऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करतात. "मी जितका वेळ एखाद्या संघटनेत व्यतित करीन त्या वेळात मी माझं सर्वोत्तम योगदान त्या संघटनेस देईन. पण त्या बदल्यात मला महत्तम मोबदला मिळायला हवा. ज्या क्षणी माझी ह्या संघटनेतील  नव्यानं शिकण्याची / नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची प्रक्रिया थांबेल त्याक्षणी मी नवी आव्हानं स्वीकारायला तयार असेन!" ही नव्या पिढीची मानसिकता. 

मुर्ती हे इंफोसिसचे आद्य संस्थापक !  संघटनेकडे एक अपत्य म्हणुन पाहण्याची जुन्या पिढीची मानसिकता इथं दिसुन येते. संघटनेची मुल्य,  मुळ रुप ह्यांच्यात बदल करण्याची तयारी आहे पण हे बदल इतकेही नकोत ज्यामुळं संघटना तिच्या मुळ रुपापासून ओळखण्यापलीकडं जाईल. आणि एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त पैसा कमावणं हे सुद्धा ह्या विचारसरणीच्या काहीसं तत्वांच्या पलीकडचं !

२) संवादकला 

नवीन पिढीनं संवादकला चांगलीच आत्मसात केली आहे. संघटनेच्या कार्यासाठी ही संवादकला नक्कीच उपयोगी पडते पण ज्यावेळी ह्या पिढीच्या मनात आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना निर्माण होते त्यावेळी ह्या विकसित संवादकलेचा बऱ्याच वेळा आक्रमक वापर दिसुन येतो. उपलब्ध माहिती सोयीस्कररित्या कशी मांडावी ह्याची उत्तम उदाहरणं अशा वेळी दिसुन येतात. 

ह्याउलट जुनी पिढी संयत स्वरुपात संघटनेच्या कार्यासाठी संवादाचा वापर करण्यासाठी ज्ञात आहे. आपली स्वतःची प्रतिमा डागाळली जात असेल तर तात्काळ प्रत्त्युत्तर देणं ही ह्या पिढीची खासियत नाही. 

सारांश इतकाच की सिक्का ह्यांच्या राजीनाम्यानंतर आणि खास करुन सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या राजीनामापत्रानंतर  मुर्ती ह्यांची ज्या प्रमाणात प्रतिमा मलीन झाली ते योग्य नाही असं मला वाटतं. त्यांनी जे काही आयुष्यभरात साध्य केलं ते पाहता त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्यापैकी किती जणांना आहे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारुन पहायला हवा. माझं इतकंच मत - मुर्ती ह्यांच्या मनात इन्फोसिस ह्या नावाशी जी मूळ प्रतिमा निगडीत आहे त्या प्रतिमेपासुन, संस्कृतीपासुन एका विशिष्ट प्रमाणापलीकडं घेतलेली फारकत त्यांना सहन झाली नाही. आणि त्यामुळं एखाद्या वयस्क आजोबांप्रमाणं त्यांनी कंपनीच्या कारभारात दखल द्यायला सुरुवात केली. जरी व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसलं तरी ज्या क्षणी मुर्ती ह्यांनी सूत्रं आपल्या हातुन दुसऱ्याकडं सोपवली त्या क्षणी जर त्यांनी कंपनीचं नाव बदललं असतं तर हा सर्व प्रकार टाळता आला असता. मूर्तींच्या मनातील इन्फोसिसची प्रतिमा अबाधित राहिली असती आणि सिक्का ह्यांनासुद्धा ही कायापालटाची प्रक्रिया मनमोकळेपणानं राबवता आली असती. 

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु !



अखिल भारतीय पुरुष वर्गाला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याविषयी क्वचितच मी लिहावं असा सततचा आग्रह मित्रवर्गाकडुन धरला जातो. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आणि योग्य ती परवानगी घेऊन लिहलेली आजची ही पोस्ट ! 

भारतीय पुरुषवर्ग आणि लग्नसमारंभ ह्यांचं म्हटलं तर नाजुक नातं आहे. अगदी लहानपणी आई जबरदस्तीनं लग्नाला घेऊन जाते त्यावेळी घरी एकटयाला सांभाळणार कोण असा प्रश्न असतोच (आमच्या लहानपणी एकत्र कुटुंबात हा प्रश्न नसायचा !). त्यावेळी मात्र लग्नसमारंभातील मांडवांचे खास आकर्षण असायचं. ओळखपाळख नसलेली समवयस्क पोरं दंगामस्ती करायला चालायची. पुर्वी अशा मस्तीत काय पडापडी, लुटूपुटीची मारामारी झाली तर मोठ्यांना येऊन सांगायची पद्धत नसायची, हल्ली चित्र थोडं बदललं आहे. असो! 

मग काही वर्षांनी चित्र बदलतं. सातवी, आठवीत मुलांना शिंग फुटतात. हे वय ते लग्न होईपर्यंतचा काळ हा मुलांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. आईने 'Give Up' करण्याचा काळ आणि मुलाच्या आयुष्यात 'Supreme Authority' येण्याचा काळ ह्यामधील ह्या कालावधीत मुलगा चक्क आपल्या मतानुसार वागु शकतो, आणि केवळ आपल्या हव्या असलेल्या लग्नांना हजेरी लावायचा हक्क बजावु शकतो. मग कधीतरी मुलगा सेटल होतो. हे सेटल होणं हा प्रकार म्हणजे नक्की काय आहे हे कोणालाच माहित नसावं.

मग कधीतरी मुलाच्या आयुष्यात त्याला हजेरी लावण्याची फार इच्छा असणारं लग्न येतं आणि मग सर्व चित्र पालटतं. नव्यानं लग्न झालेलं जोडपं म्हणुन, कधी सासरचे जवळचं म्हणुन तर कधी सासरचे अटेंड केलं म्हणुन घरचं लांबचं अशी अनेक लग्न हा मुलगा अटेंड करत राहतो. आणि मग त्याचा चक्क गृहस्थ बनतो. तो गृहस्थ बनल्यावर लग्नमांडवाला शोभा लावणं ही त्याच्या पुर्वजांनी पार पडलेली जबाबदारी त्याच्या शर्टी (अंगावर) येऊन पडते. 

इतक्या भल्या मोठ्या प्रस्तावनेनंतर आजच्या पोस्टचा मुख्य विषय ! रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ! हल्ली लग्न लागल्यावर साधारणतः एक तासानं रिसेप्शनची वेळ असते. वधुवरांवर अक्षता टाकल्यावर (आणि अक्षता टाकणं योग्य की अयोग्य ह्यातील द्वंद्वाला मनातल्या मनात सामोरं जाऊन) लग्न लागतं आणि मी स्थानापन्न होतो. 

आपण हजेरी लावत असलेली लग्न दोन प्रकारची असतात असं माझं म्हणणं ! एक ज्यात बहुतांशी लोक आपल्या परिचयाची असतात आणि दुसरं म्हणजे ज्यात फार थोडे लोक आपल्या ओळखीतले असतात. पहिल्या प्रकारात वेळ घालवणं हा मोठा प्रश्न नसतो, पण काही मंडळींविषयी आपण साशंक असतो; त्यांचं नक्की नाव काय, आपलं आणि त्यांचं नक्की नातं काय? काही वर्षांपुर्वी मंडळी मला थेट प्रश्न विचारायची; हल्ली नाही विचारत. पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगुन जातात. 
दुसऱ्या प्रकारात आपण पुर्ण हॉलला नजरेनं स्कॅन करतो आणि ओळखीचा माणुस शोधायचा प्रयत्न करतो. असा एखादा गृहस्थ दिसला की युसेन बोल्टच्या वेगानं त्याच्या दिशेनं जाऊन त्याच्याशी वार्तालाप करतो. ह्यावेळी अजुनही मंडपात वावरणारे नवरा- नवरी माझ्या डोळ्यात खुपसतात. ह्यांना तयारीला जायला काय होतं असले विचार माझ्या मनात घोळु लागतात. 

ह्या दोन्ही प्रकारात आपला (किंवा माझा ) एक डोळा / कान जेवणाची व्यवस्था कोठे आहे, जेवण सुरु केलं आहे का ह्या गोष्टीवर असतं. पुर्वी बुफेच्या रांगेत पहिल्या पाचात असायला मला कसंस व्हायचं, हल्ली होत नाही. जेवण आटपुन मी पुन्हा हॉलमध्ये येतो. अजुनही परिस्थितीत फारसा काही फरक पडलेला नसतो. महिलावर्ग ऐतिहासिक परंपरेनुसार एकमेकींच्या साड्या, दागिने ह्यांचे निरीक्षण करण्यात दंग / गुंग असतो. मागील पाच समारंभात घातलेली साडी, ड्रेस ह्या लग्नात रिपीट झाला नसावा ह्या तत्वामुळं पानेरी, लाजरी, सुविधा वगैरे दुकानं निर्विघ्नपणे गेले कित्येक दशके चालु आहेत आणि चालु राहतील. पुरुषवर्ग भारताचे आर्थिक धोरण, भारत - पाक - चीन त्रांगडं ह्या विषयांवर आपली मतं नोंदवत असतो. ह्यातील काही माणसांचं अशा आंतरराष्ट्रीय विषयांवरील ज्ञान पाहुन ही लोक मोदींसोबत का नाहीत हे मला न उलगडलेलं कोडं असतं. मी मोठ्या निर्धारानं वेळ व्यतित करत असतो. क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणात दोन षटकाच्या मधील ३० सेकंदात सुद्धा जाहिरात देणाऱ्या जाहिरातदारांना अशा ह्या मधल्या वेळात बोलावुन मांडवात आपली जाहिरात करण्यास परवानगी द्यावी अशी माझी सुचना आहे. आणि ह्या सुचनेचं मी पेटंट घेऊ इच्छितो. 

जर पत्नीसोबत लग्नाला आलो असेन तर हळुच तिच्याकडं पाहुन मी नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी उगाचच आपण चर्चेत दंग आहोत असा भास निर्माण करण्याची कला तिला चांगली साधली आहे. मग नाईलाजानं मी व्हाट्सअँप आणि फेसबुकला शरण जातो. बराच वेळ गेलेला असतो. ह्या क्षणी आहेर असल्यास ते पाकीट दुसऱ्याकडं सोपवुन कलटी मारण्याचे किती गंभीर परिणाम होतील ह्याची मी मनातल्या मनात चाचपणी करत असतो. 

बहुदा देवाला माझी दया आलेली असते. सुस्त मांडवात अचानक हालचाल दिसु लागते. दोन तासांच्या तयारीनं सज्ज अशा वरवधू ह्यांचं मांडवात आगमन होणार अशी आतल्या गोटातील बातमी आली असते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तज्ञ मंडळीनी योग्य टोकाने रांगसुद्धा लावली असते.   मग मी सुद्धा त्यात सामील होतो. उत्सवमूर्तींचं अखेरीस आगमन होतं. आतातरी हे थेट स्टेजवर विराजमान होतील ह्या आशेवर दुष्ट फोटोग्राफरची टीम पाणी फेरते. मग मी 'Dig deep into संयम' चा वापर करुन रांगेत उभं राहणं चालु ठेवतो. ज्यावेळी खरोखर रांग पुढं सरकु लागते त्यावेळी आपल्यापुढं असलेल्या १५ लोकांचे दीडशे लोक कसे होतात हे मला न उलगडलेलं कोडं ! शेवटी एकदाचा मी वरवधूंचे अभिनंदन करायला पोहोचतो. वर जर चांगला परिचयाचा असेल तर "अरे वा झक्कास दिसतोयस; म्हणुनच दोन तास लागले वाटतं तयारीला !" असं मी म्हणतो. तो मनापासुन हसतो, नवरीच्या नजरेला नजर देण्याचं मी टाळतो! फोटोसाठी उभं राहताना नवरा मला आग्रहानं जवळ उभं करुन कानात म्हणतो, " अरे मी तर पंधरा मिनिटांत तयार होतो, हिच्याच त्या सात की काय लेयरच्या तयारीला वेळ लागला !" आमच्या मनसोक्त हास्याच्या खळखळाटाकडं वधू साशंक नजरेनं पाहत असते. मी नवऱ्याला म्हणतो, "Welcome to Navara Club"

राहिलेल्या दुपारी झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन सायंकाळी चहा पिताना मग प्राजक्ता म्हणते, "अहो ऐकलं का (हे माझ्या मनातलं), पुढच्याच्या पुढच्या रविवारी xxxx कडे लग्न आहे बरं का?" आम्ही संयममुर्ती हाच शर्ट त्या लग्नाला बहुदा चालेल असा विचार करुन लोकसत्तातील न समजणारा अग्रलेख वाचण्याचं नाटक करण्यात मग्न होतो. 

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

एकचल रेषीय समीकरणे

आज आपण एकचल रेषीय समीकरणे अर्थात Linear Equations in One variable ह्या प्रकाराची प्रात्यक्षिक / व्यावहारिक उदाहरणं पाहुयात. 

एकचल रेषीय समीकरणांची व्याख्या 
जी समीकरणे ax+b = 0  ह्या स्वरुपात मांडता येतात त्यांना एकचल रेषीय समीकरणे असे म्हणता येईल.  ह्यात a आणि b हे constant आणि x हा चल अर्थात variable आहे. 

एकचल रेषीय समीकरणांच्या व्यावहारिक उदाहरणांचं खालील मुख्य प्रकारात वर्गीकरण करता येईल. अजुनही काही प्रकार असतील पण हे वरवर अभ्यास केला असता आढळलेले मुख्य प्रकार  . 

आधी सर्व प्रश्नांकडे एकत्रित स्वरुपात पाहुयात !

१) एका नैसर्गिक संख्येचा ४/५ भाग हा त्या संख्येच्या ३/४ भागापेक्षा ३ ने मोठा आहे. तर ती संख्या कोणती?

२) एका दोन आकडी संख्येच्या दोन्ही आकड्यांची बेरीज ९ आहे. त्या आकड्यांच्या स्थानांची अदलाबदल केली असता मिळणारी नवीन संख्या मुळ संख्येपेक्षा ४५ ने मोठी आहे? तर नवीन संख्या कोणती?

३) अजय आणि विजय ह्यांच्या वयाचे गुणोत्तर सध्या ७:५ असे आहे. १० वर्षांनंतर हेच गुणोत्तर ९:७ इतके होईल तर त्यांची सध्याची वये किती?

४) आनंदकडे २००० रुपये १० आणि ५ रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात आहेत. १० रुपयांच्या नाण्यांची संख्या ५ रुपयाच्या नाण्यांपेक्षा ५० ने जास्त असल्यास आनंदकडे ५ रुपयाची किती नाणी आहेत? 

५) एका स्पर्धात्मक परीक्षेत एकूण २०० प्रश्न आहेत. परीक्षार्थीला प्रत्येक अचुक उत्तरास ४ गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या / न दिलेल्या उत्तरामागे त्याचा एक गुण वजा होतो.  नंदनला एकंदरीत ५५० गुण मिळाले. तर त्यानं अचुक उत्तर दिलेल्या प्रश्नांची संख्या किती? 

आता त्यांची उत्तरे.  

१) एका नैसर्गिक संख्येचा ४/५ भाग हा त्या संख्येच्या ३/४ भागापेक्षा ३ ने मोठा आहे. तर ती संख्या कोणती?

ती नैसर्गिक संख्या x मानुयात. 
4x/5 - 3x/4 = 3

भाजकांचा लसावि २० आहे. म्हणून दोन्ही अपूर्णांकाना भाजक २० असलेल्या स्वरूपात परिवर्तित करुयात 

4*(4x)/4*5 - 5*(3x)/5*4 = 3

16x / 20 - 15x/20 = 3

(16x-15x)/20 = 3

x / 20 = 3

x = 60

वरील उदाहरण एकंदरीत सोपं आहे. पडताळणी करायची असल्यास ६० चा ३/४ भाग ४५ आणि ४/५ भाग ४८. आणि फरक ३. 
२) एका दोन आकडी संख्येच्या दोन्ही आकड्यांची बेरीज ९ आहे. त्या आकड्यांच्या स्थानांची अदलाबदल केली असता मिळणारी नवीन संख्या मुळ संख्येपेक्षा ४५ ने मोठी आहे? तर नवीन संख्या कोणती?

ह्या उदाहरणात महत्त्वाचं तत्त्व 
संख्या = एकक स्थानचा आकडा + १० * दशम स्थानचा आकडा  

मुळ संख्येत x एकक स्थानी मानुयात. 
म्हणुन दशम स्थानाचा अंक 9-x
संख्या = x + 10 * (9-x) = x + 90 - 10 x = 90 - 9x

आकड्यांची अदलाबदल केल्यानंतर 
एकक स्थान = 9 -x
दशम स्थान = x
नवीन संख्या =  10x + 9 - x = 9x + 9

नवीन संख्या - मूळ संख्या = 45
9x + 9 - (90-9x) = 45
18 x  - 81 = 45
18 x = 126
x = 7 

म्हणुन नवीन संख्या ७२.

इथं आपल्या ध्यानात येईल की १८ - ८१, २७-७२, ३६-६३, ४५-५४ अशा आकड्यांची बेरीज ९ असलेल्या संख्यांच्या जोड्या आहेत. आणि त्यातील फरक अनुक्रमे ६३, ४५, २७ आणि ९ इतका आहे.  

३) अजय आणि विजय ह्यांच्या वयाचे गुणोत्तर सध्या ७:५ असे आहे. १० वर्षांनंतर हेच गुणोत्तर ९:७ इतके होईल तर त्यांची सध्याची वये किती?

इथं तक्ता आखा 




सध्या 
१० वर्षांनंतर
अजयचे वय 
7x
7x + 10
विजयचे वय
5x
5x + 10
गुणोत्तर 
7:5
9:7

ह्या उदाहरणात महत्त्वाचं तत्त्व 
१० वर्षांनंतर मिळणाऱ्या गुणोत्तराच्या दोन पदांना वापरुन समीकरण बनवा 

(7x+10) / (5x+10) = 9/7

(7x+10)* 7 = 9 *(5x+10)

49x+ 70 = 45x + 90
4x = 20
x = 5



सध्या 
१० वर्षांनंतर
अजयचे वय 
35
45
विजयचे वय
25
35
गुणोत्तर 
7:5
9:7



४) आनंदकडे २००० रुपये १० आणि ५ रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात आहेत. १० रुपयांच्या नाण्यांची संख्या ५ रुपयाच्या नाण्यांपेक्षा ५० ने जास्त असल्यास आनंदकडे ५ रुपयाची किती नाणी आहेत? 

इथं नाण्यांची संख्या आणि किंमत ह्यांचा तक्ता आखणे महत्वाचं ठरतं. 




नाण्यांची संख्या
नाण्यांची किमंत 
१० रुपये 
X + 50
10 x + 500
रुपये 
x
5 x
2000

इथं  नाण्यांच्या किमतीची जी दोन पदे मिळतात ती वापरुन समीकरण बनवावे 

10x + 500 + 5x = 2000
15 x = 1500
x = 100

म्हणुन ५ रुपयांची १०० नाणी (५०० रुपये) आणि १० रुपयांची १५० नाणी (१५०० रुपये). 

५) एका स्पर्धात्मक परीक्षेत एकूण २०० प्रश्न आहेत. परीक्षार्थीला प्रत्येक अचुक उत्तरास ४ गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या / न दिलेल्या उत्तरामागे त्याचा एक गुण वजा होतो.  नंदनला एकंदरीत ५५० गुण मिळाले. तर त्यानं अचुक उत्तर दिलेल्या प्रश्नांची संख्या किती? 

इथं खालील तक्ता आखा 


संख्या 
गुण 
बरोबर उत्तरं 
X
4x
चूक / दिलेली उत्तरं 
200 –x
-1*(200-x)
550


एकुण गुणांची जी दोन पदे मिळतात त्यांच्या मदतीनं एक समीकरण बनवा 

4x - 200 + x = 550

5x = 750

x = 150

अचूक उत्तरं = १५० (गुण  ६००)
चूक / न दिलेली उत्तरं  = २०० - x = ५० (वजा झालेले गुण ५० )
अंतिम गुण  = ६०० - ५० = ५५० 

सारांश  - प्रत्येक प्रकारात एक महत्त्वाचं तत्त्व आहे. ते ओळखुन एकदा का तुम्हांला समीकरण मांडता आलं की उत्तराकडं तुमची आगेकुच सुरु झाली म्हणुन समजा . 

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

आम्ही शिफ्ट होतोय !


कालच आम्ही नवीन ऑफिसात स्थलांतर केलं. व्यावसायिक जगात भावनाविवश वगैरे कोणी होतं नाही पण आठवणी मात्र कोठंतरी जाग्या होतात. आमच्या ऑफिसात लोकांच्या Work Anniversary वगैरे साजऱ्या होताना ह्या माणसानं ह्या कंपनीत प्रवेश केला त्या वेळचं तंत्रज्ञान कसं होतं ह्याची आठवण सांगायची पद्धत आहे. अमेरिकेतील ऑफिसात लोक ३० - ३५ वर्षे आहेत त्यामुळं त्यांनी कंपनी जॉईन केली तेव्हा नुकताच मोबाईल आला वगैरे आठवणी सांगितल्या जातात. आम्ही इतके जुने नाही आहोत. पण हे ऑफिस बदलताना गेल्या सात वर्षातील आठवणी मात्र नक्कीच जागृत झाल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सात वर्षांपुर्वी आपण व्यावसायिक शिडीवर कोठे होतो, सध्या कोठे आहोत ह्याचं आपसुकच मनानं विश्लेषण केलं. 

नवीन ऑफिसात जरा वेगळी संरचना आहे. आधी असलेली Cubicle संरचना बदलुन टाकुन सर्व काही मोकळं मोकळं करण्यात आलं आहे. आपल्या वरिष्ठतेचा चुकून तुम्हांला आभास झाला असेल तर तो आपोआप दुर होण्यास ह्या संरचनेमुळं मदत होते. आणि मुख्य म्हणजे आपल्या ऑफिसातील चोपड्या, कागदावळी ठेवण्यास अगदी मोजकी जागा पुरविण्यात आली आहे. त्यामुळं गेल्या आठवड्यात मागील सात वर्षात जमलेल्या सर्व कागदपत्रांची बऱ्यापैकी विल्हेवाट लावावी लागली. जी कागदपत्रे shred करण्याचा निर्णय घेण्यास गेली सात वर्षे चालढकल केली होती त्यांचा निर्णय एका मिनिटात घेतला गेला किंवा घ्यावा लागला. "तु काही न घेता आला आहेस आणि काही न घेता जाणार आहेस !" ह्या आयुष्यातील एका महत्वाच्या तत्त्वाची ह्या निमित्तानं आठवण झाली.  

काळ बदलत चालला आहे हे खरं ! पण आपण दोन वेगळ्या विश्वात वावरताना दिसत आहोत. शहर आणि गांव ह्या दोन ठिकाणी हा फरक अगदी प्रकर्षानं जाणवतो. मुंबईतील लोकांची मानसिकता हळुहळू सदैव बदलांसाठी अनुकूल अशी होत चालली आहे आणि त्यामुळं खास करुन नवीन पिढीला कोणत्याही गोष्टीविषयी फारसे भावबंध निर्माण होताना दिसत नाही. सतत नवीन विश्वाशी Catch up करण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. ह्याउलट गावात अजुनही अशी पिढी आहे जिनं आपलं संपुर्ण आयुष्य एका विशिष्ट पद्धतीनं व्यतित केलं आहे. आपल्या तत्त्वांशी, संस्कृतीशी असलेली पाळंमुळं अगदी घट्ट पकडुन ठेवली आहेत. शहरांतील लोकांना हे करायचं नाही असं नाही पण ते बाह्य परिस्थितीपुढं हतबल आहेत. सतत बदलाला तोंड देण्यासाठी त्यांना सदैव झटत राहावं लागतं. 

शहर असो वा गांव ! दोन्ही ठिकाणच्या जीवनपद्धतीत काही सुखद घटक आहेत तर काही प्रतिकुल ! जे काही चांगलं आहे त्याची जाणीव ठेवणं आणि जीवनमार्गात चालताना त्यातील जमेल तितकं वेचुन घेणं हेच आपल्या हाती आहे. जाता जाता MT च्या सात वर्षांच्या आठवणींना सलाम ! 

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

किंवा Versus आणि !


मानवी जीवनाशी क्लिष्टता जसजशी वाढत चालली तसतसं माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीचं काम कठीण होत गेलं. पुर्वी एखादी गोष्ट एकतर चांगली असायची किंवा वाईट! मधली नसायची. त्यामुळं चांगली माणसं चांगल्या गोष्टी करत, वाईट माणसं वाईट गोष्टी करत. आळशी माणसं आळस करीत आणि उद्योगी माणसं कामात गर्क राहत. म्हणजे तुम्ही एकतर चांगले असायचात किंवा वाईट! उद्योगी असायचात किंवा आळशी !
आयुष्य कसं सोपं असायचं. म्हणजे एकदम सोपं नसायचं .. कधी काय व्हायचं की माणसाच्या आयुष्यात एखादी मोठी घटना घडायची आणि मग एखादा वाईट माणुस अचानक सुधारायचा आणि चांगला बनायचा वगैरे वगैरे !

पुढे काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झालं, यश आणि पैसा ह्यांच्या व्याख्या एकत्रित होऊ लागल्या आणि मग सगळ्या गोष्टीतील सीमारेषा धुसर होऊ लागल्या. चांगुलपणा, उद्योगीपणा, हुशारी हे गुण आपल्याजवळ असणं किंबहुना त्याचा भास निर्माण करणं आवश्यक आहे ह्याची जाणीव सर्वांना झाली. चांगुलपणाच्या वर्तुळात खरोखरीची चांगली माणसं आणि चांगुलपणाचा भास निर्माण करणारी माणसं एकत्र आली. तीच गोष्ट बाकी सर्व सद् गुणांच्या  बाबतीत झाली.  त्यामुळं मग ह्या गुणांच्या ठिकाणी गर्दी झाली. मग तिथं आधीच वास्तव्य करणारी माणसं गोंधळून गेली. पुर्वी त्यांना ह्या गुणांच्या शुद्ध रुपात यश साध्य करता यायचं. आता केवळ यश पुरेसं नसुन त्याचं पैसा मिळविण्याच्या क्षमतेत रुपांतर करणंसुद्धा त्यांना आवश्यक वाटू लागलं. मग काही काळापुरता ही मंडळी सद् गुणांचे वर्तुळ सोडुन आपला कार्यभाग आटपुन परत स्वगृही परतु लागली. म्हणजे काय झालं की किंवा  चे रुपांतर आणि / हे सुद्धा मध्ये झालं.  

हे सर्व सुचायचं कारण की एका Leadership प्रशिक्षणात Or Versus Both/And  ह्या तत्वाची ओळख करुन देण्यात आली. कार्यालयात तुम्हांला तुमच्या दररोजच्या कामाचा रगाडा तर वाहायचा आहेच पण त्याच वेळी तुम्हांला नवीन तंत्रज्ञानसुद्धा आत्मसात करायचं आहे. बऱ्याच वेळा तुम्हांला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. तुमच्या समोरील असलेल्या दोन पर्यायातील कोणता एक बरोबर नसतो; दोन्हीतील चांगल्या गोष्टी निवडुन पुढं जायची तारेवरची कसरत तुम्हांला पार पाडायची असते. ह्या उदाहरणांद्वारे मला पहिल्या परिच्छेदातील वागण्याचं समर्थन करायचं नाहीय. पण त्यामागची मानसिकता विशद करायची आहे. हीच गोष्ट तुमच्या मुलांच्या संगोपनात सुद्धा लागु होते. संस्कृतीचं शिक्षण आणि आधुनिकतेशी जोड ह्यांचा शक्य तितका योग्य मिलाफ तुम्हांला घालायचा असतो. 

हे सर्व काही ठीक पण एकंदरीत मनुष्यजमातीच्या उत्क्रांतीच्या दृष्टीनं विचार केलात तर एक चिंतेची बाब नकळत घडत आहे. चांगुलपणाच्या व्याख्येच्या शुद्धतेचे  Baseline (पायाभुत पातळी) काहीशी धुसर होत आहे. म्हणजे समजा आमच्या पिढीनं जी काही चांगुलपणाची शुद्धता लहानपणी पाहिली त्यात काही प्रमाणात तडजोड करण्याची मानसिकता आम्ही दाखविली. ह्या तडजोडीनंतर नवनिर्मित अशी शुद्धता आताच्या पिढीची मुलभूत पातळी बनली. आणि ह्या शुद्धतेच्या विरळीकरणाचा वेग झपाट्यानं वाढला. 

आपल्या पुर्वजांनी कलियुग येणार असं म्हणुन ठेवलं आहे. ते काही अचानक एके दिवशी उजाडणार नाही. शुद्धतेच्या पायाभुत पातळीच्या विरळीकरणाची प्रक्रिया हळुहळू हे कलियुग आपल्या भोवती आपल्या नकळत आणुन ठेवत आहे. आणि आपण मात्र आपल्याला Both / And चा Concept समजला म्हणुन मनातल्या मनात आनंदी होत आहोत. 

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

अगम्य , अज्ञात ...

गेल्या रविवारी मन्मथच्या आईवडिलांनी लोकरंगमध्ये मन्मथला पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या पत्रातुन बऱ्याच गोष्टी समजल्या किंबहुना बरीचशी गृहितकं बनवली होती ती दूर झाली. त्या पत्रामुळं ही पोस्ट प्रेरित असली तरी ह्या पोस्टचा विषय मन्मथ हा नाहीय. ज्यांच्या बाबतीत ही घटना घडते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रसंगी डोकावुन पाहण्याचा आपल्या कोणालाच हक्क नाही.  

बऱ्याच वेळा पोस्ट लिहिताना अजाणतेपणी आपणास सर्व काही समजलं आहे आणि आपण वाचकांस उपदेश करीत आहोत अशी भावना निर्माण होण्याची शक्यता असते. बाकी पोस्टच्या वेळी ठीक आहे पण इथं खास खुलासा की अशी भावना अजिबात माझ्या मनात नाहीय. मी केवळ काही ठोकताळे इथं मांडत आहे. आणि ह्या विषयाची व्यापकता लक्षात घेता इथं ह्या विषयातील हे केवळ काही मुद्दे आहेत. 

आपण भोवतालच्या समाजाचे खरोखर घटक आहोत की नाही (Do I really belong here? ) ह्याविषयी प्रत्येक माणसाच्या मनात एक मुलभूत भावना असते. ह्या भावनेच्या आधारे आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या माणसांचं दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. 

पहिल्या प्रकारातील माणसं, मुलं भोवतालच्या समाजाचे घटक बनण्यासाठी धडपडत असतात. ह्या समाजानं आपल्याला पुर्णपणे स्वीकारावं ह्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली असते परंतु आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे आपण समाजापासुन इतके दूर गेलो आहोत की कितीही प्रयत्न केले तरी ह्या आयुष्यात मुळ प्रवाहात स्वच्छ प्रतिमेसकट येणं अशक्य आहे असा समज त्यांनी करुन घेतला असतो. आणि हा समज दुर करण्यासाठी, त्यांचं म्हणणं ऐकुन घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणी श्रोता नसतो. 

आता दुसरा प्रकार ! हा प्रकार असा असतो की बहुदा सामान्यत्वाचा ह्यांना वीट आलेला असु शकतो. ह्यांची बुद्धी प्रखर असण्याची शक्यता अधिक असते. मानवी देह धारण करुन एका आयुष्यात ज्या काही महत्तम गोष्टी साधता येणं शक्य आहे ह्याचं ह्या लोकांनी आपल्या अफाट कल्पनाशक्तीद्वारे चित्र रेखाटून ठेवलं असतं. आणि हे चित्र त्यांना फारसं मोहित करत नाही. संपुर्ण आयुष्य जगुन केवळ इतकंच साध्य करायचं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असं त्यांना वाटत असावं. त्यामुळं ह्या मानवी देहातुन बाहेर पडून त्यापलीकडं जे काही विश्व आहे त्यात आपल्याला आकर्षित करण्यासाठी काही आहे का ह्याचा शोध घ्यावा अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होत असावी. आणि त्यामुळं मानवी देहाचं बंधन झुगारून देण्यासाठी ते हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असावेत. इथं माझा एकच मुद्दा - एखादा माणुस कितीही बुद्धिमान असला तरी मनुष्यजातीकडं एकत्रित संघ म्हणुन इतकं ज्ञान आहे की त्या बुद्धिमान माणसाला एक आयुष्य ज्ञानसंपदा आणि त्यातील कण वेचायला कमी पडेल.  

 ह्या विषयावर मित्रगणांशी आणि प्राजक्ताशी चर्चा करताना दोन मुद्दे आले. 
पहिला मुद्दा म्हणजे मैदानी खेळ ! मुलांनी मैदानी खेळ नक्कीच खेळावेत, शारिरीक फिटनेससाठी तर हे महत्त्वाचं आहेच पण त्याहून अधिक म्हणजे पराभव स्वीकारण्याची मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी हे आवश्यक आहे. सोबत्यांकडुन पराभव स्वीकारावा लागल्यावर कधीमधी खेळकर टोमणे सुद्धा मिळतात. आयुष्यात कणखर बनण्यासाठी पराभवाचे हे डोस अत्यावश्यक आहेत.  
दुसरा मुद्दा ! आईवडिलांपलीकडील इतर नातेवाईकांशी जवळचा संवाद, जवळचं नातं हा एक अजुन एक मुद्दा ! आधुनिक पालकांच्या बालसंगोपनाच्या पद्धतीत बऱ्याच वेळा आढळणारी उणीव म्हणजे  सर्व काही परिपुर्ण आहे असा समज आपल्या पाल्यासमोर उभा करण्याचा अजाणतेपणी प्रयत्न त्यांच्याकडून होतो. कोणतेच पालक इतके समर्थ नाहीयेत की ते आपल्या पाल्याचं संपुर्ण आयुष्य परिपुर्ण करु शकतील. त्यामुळं आयुष्यातील इतर अनुभवांचं ज्ञान ज्यांच्याकडून मिळण्याची शक्यता जास्त आहे अशा नातेवाईकांसोबतचा सहवास महत्त्वाचा ! 

सारांश म्हणजे सामान्यत्वात समावेश होत नसल्याची अतीव खंत अथवा सामान्यत्वाचा उबग आल्यानं विशेषत्वाकडं झेप घ्यायची ओढ  ही दोन प्रमुख कारणे ! आधी म्हटल्याप्रमाणं हे केवळ ठोकताळे! प्रत्येक उदाहरणात प्रत्यक्ष काय घडलं असावं हे इथं बसुन लिहीत असताना समजणं अशक्य आहे. 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...