मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

The Sun Does Shine


 

ऍंथोनी रे हिंटन ह्या गृहस्थाचं हे आत्मचरित्र. आपण न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगात व्यतित करताना आयुष्यातील अनमोल असं सारं काही गमावल्याची खंत जरी ह्या पुस्तकातुन सतत जाणवत असली तरी आपण निर्दोष असल्याची जाणीव लेखकाला सतत लढा देण्याची जिद्द देते. १९८५ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी तुरुंगात गेलेला रे २०१५ साली एकोणसाठाव्या वर्षी मुक्त होतो ! 

रे चे बालपण अमेरिकेतील अलाबामा राज्यातील ग्रामीण भागात गेलं. श्वेतवर्णीयांचे बाहुल्य असलेल्या ह्या भागात एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. द्रारिद्र्य पाचवीला पुजलं म्हणावं अशी परिस्थिती ! खाणीत काम करणाऱ्या वडिलांचा तिथल्याच  एका अपघातात मृत्यू झाल्यावर साऱ्या भावंडाना वाढविण्याची जबाबदारी आई घेते. आईनं दिलेल्या संस्कारांची वर्णनं आणि त्यांनी रे ला इतक्या काठिण्यपुर्ण काळात दिलेल्या मानसिक बलाचे संदर्भ पुस्तकात येत राहतात. 

श्वेतवर्णीयांचं बाहुल्य असलेल्या अमेरिकेच्या ग्रामीण भागात कृष्णवर्णीयांना कसं संघर्षपुर्ण जीवन जगावं लागत असायचं किंबहुना अजुनही जगावं लागतं असेल ह्याची कल्पना सुरुवातीच्या प्रकरणांतून येते. अमेरिका हा भौगोलिकदृष्टया प्रचंड मोठा देश ! कार नसल्यावर इथलं जीवन प्रचंड कठीण! अशा वेळी दूरवर असलेल्या शाळेमध्ये रे आणि त्याचा धाकटा भाऊ चालत जात असत. चालत जाताना - येताना निर्मनुष्य भाग आला आणि एखादी कार रस्त्यानं येताना दिसली की त्या चालकाच्या नजरेस आपण पडु नये ह्याची त्यांना जी धडपड करावी लागायची ते वाचुन अंगावर काटा येतो ! कारण काय तर चालक जर डोकेफिरु निघाला तर जीवावर बेतण्याची पाळी यायची ! रे हा बेसबॉलचा तरबेज खेळाडु, परंतु एका सामन्यात होम रन करताना त्याच्या आईसमोर संपुर्ण स्टेडियमनं निगर म्हणुन त्याला संबोधिल्याचं आणि सामना जिंकुनसुद्धा मनातुन पराभव बाळगावं लागण्याचं शल्य रेच्या पदरी येतं. त्याची आई त्याला सदैव श्वेत लोकांशी कसं काळजीपुर्वक वागावं, त्यांच्या अपमानास्पद बोलण्यानं संतापुन न जाता मनावर कसा संयम ठेवायचा ह्याचं शिक्षण देत राहते ! 

शाळेनंतर खाणीतील नोकरी स्वीकारण्याची पाळी रे वर येते. खाणीत ज्यांनी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत त्या कामगारांच्या ढासळलेल्या तब्येती तो आपल्या डोळ्यांनी पाहत असतो! अंधाऱ्या खाणीत असुरक्षित वातावरणात काम करताना ज्या भयावह स्थितीचा सामना करावा लागतो त्याचं वर्णन लेखकानं अत्यंत तंतोतंत केलं आहे. ह्या अंधारातील श्रीमंतीपेक्षा उजेडातील गरिबी मी स्वीकारीन असं म्हणत रे ही नोकरी सोडुन देतो ! 

तारुण्याच्या भरात रे कडुन काही चुका होतात. भावंडं उज्ज्वल भवितव्याच्या शोधात रे आणि आईला सोडुन वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याआधी बऱ्याच तरुणींच्या सोबत त्याची मैत्रीही होते. त्यात एकाच वेळी त्यानं  मैत्री जोडलेल्या बहिणी आणि त्यापायी त्यातील छोट्या बहिणीशी मैत्री जोडण्यास इच्छुक असलेल्या तरुणाशी त्यानं पत्करलेल्या वैमनस्याचा उल्लेख येतो. कारशिवाय आईचं काठिण्यपुर्ण जीवन पाहता न आल्यानं रे कारची चोरी करतो आणि काही काळानं पकडला जातो.  रे ला आपली चुक उमजते. आईला आणि आपल्या जवळच्या मित्राला पुन्हा अशी चुक न करण्याचं आश्वासनसुद्धा तो देतो!

ह्या काळात सिल्विया नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री जुळते. आणि तिच्यासोबत आयुष्य व्यतित करण्याची स्वप्नं तो पाहु लागतो. एका गॅरेजमध्ये त्याच्या रात्रपाळीची नोकरी सुरु होते. त्या कालावधीत त्या शहरात दोन खुन होतात आणि तिसऱ्या खुनाचा अयशस्वी प्रयत्न होतो. पोलीस आपल्या चौकशीचे सत्र सुरु ठेवतात. वाचलेला व्यवस्थापक आपल्यावर हल्ला करणाऱ्या युवकाचे वर्णन करतो. छोट्या बहिणीच्या प्रेमात रे ने ज्याच्याशी वैमनस्य पत्करलेलं असतं तो सूडानं पेटलेला युवक ह्या वर्णनाशी मिळताजुळता असा युवक मला माहिती आहे हे पोलिसांना सांगतो. त्यानंतर सुरु होते ती रे ची तीस वर्षांची स्वतःला निर्दोष शाबित करण्याची धडपड ! 

ज्या दिवशी तिसऱ्या खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळी खरंतर रे आपल्या रात्रपाळीच्या कामावर असतो. ज्या गोळ्यांनी आधीचे खुन झालेले असतात त्या गोळ्या आणि रे च्या आईचे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिस्तुल ह्याची खरंतर संगती लागत नसते. परंतु केवळ पोलिसांकडे उपलब्ध कारचोरीचं रेकॉर्ड आणि खऱ्याखुऱ्या गुन्हेगाराच्या वर्णनाशी असलेलं रे चे काहीसं साधर्म्य हे घटक त्याच्या विरुद्ध जातात. त्यानंतर पुस्तकात सामोरा येत राहतो तो अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अस्तित्वात असलेला एक अदृश्य भेसुर चेहरा ! रे ने पॉलीग्राफ परिक्षेतुन सिद्ध केलेलं स्वतःचं निर्दोषित्व यंत्रणा पुर्णपणे झाकुन टाकते. रे ला देण्यात आलेला सरकारी वकील आपण १५०० डॉलर्स न्याहारीवर खर्च करतो असं उघडपणे सांगतो. तू निर्दोषी असशीलसुद्धा, पण तू नाही तर दुसरा कोणी कृष्णवर्णीय युवक आम्ही शोधला असता असं त्याला उघडपणे सांगण्यात येतं !

रे ची रवानगी ज्यांना देहांताची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांच्या सोबत दुसऱ्या तुरुंगात होते ! इथं आपल्या कैदेचा बराचसा कालावधी रे घालवतो! सकाळी ३ वाजता नाश्ता, दहा वाजता दुपारचं जेवण आणि दुपारी २ वाजता रात्रीचं जेवण असा दिनक्रम असतो. त्याच्या खोलीपासुन काही मीटर अंतरावर विद्युतखुर्चीत देहांत देण्याची व्यवस्था असणारा कक्ष असतो. ज्यांची देहांताची तारीख पक्की झाली आहे अशा कैद्यांना १ महिना आधी पुर्वसुचना देण्यात येते. त्यानंतर त्या कैद्यांच्या होणाऱ्या मनःस्थितीचं वर्णन वाचुन मन उद्विग्न होते. प्रत्येक शिक्षेनंतर वातावरणात जो एक दर्प भरुन राहतो तो सहन करणं सर्वांना फार कठीण जातं ! ज्यावेळी कैद्याला प्रत्यक्ष देहांतशिक्षेसाठी घेऊन जातात त्यावेळी बाकीच्या कैद्यांना त्याचा सुगावा लागतो. मग संपुर्ण तुरुंग बाकी कैद्यांनी भिंतीवर, गजांवर हात, ताटल्या वाजवुन केलेल्या उच्चरवाने भरुन जातो! तु एकटा नाहीयेस आम्ही तुझ्या सोबत आहोत हाच ह्या कैद्यांनी आपल्या सोबत्याला दिलेला शेवटचा संदेश असतो ! कसा क्षण असेल हा ! 

बराच काळ रे ह्या देहांताच्या शिक्षेच्या सीमारेषेवर  हिंदकोळे घेत असतो. केवळ काही मीटर अंतरावर अनुभवलेल्या आपल्या अशा अनेक सहकाऱ्यांच्या मृत्युच्या वेळी पुढचा नंबर आपला असु शकतो हे कायमचं भय जाणवत राहतं. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मनाचे स्थैर्य शाबुत ठेवण्यात  तो यशस्वी होतो. 

एका काळानंतर सरकारी वकील रे ची बाजु मांडायची असेल तर १५००० डॉलर्सची मागणी करतो. रे च्या आईनं आपलं घर गहाण टाकुन ही रक्कम उभी करावी असं सुचवतो. रे त्यास स्पष्ट नकार देतो ! अशा वेळी मग ब्रायन स्टीवन्सन नावाचा ऍटर्नी आणि त्याची संस्था त्याच्या पाठीशी उभी राहते ! रे च्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण येतो ! योग्य पुरावे गोळा करुन रे चे निर्दोषित्व सिद्ध केलं जाते ! तरीही मग बराच काळ सर्व सोपस्कार पार करत तीस वर्षांनी रे एकदाचा मुक्त होतो! 

खरंतर सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर मी हे पुस्तक पुर्ण वाचलं नाही. हळुहळू वाचीन ! मी हे पुस्तक वाचायला का घेतलं? आयुष्याकडं बघण्याचा एक पुर्ण नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देतं. संपुर्ण यंत्रणा एकत्र येऊन आपल्याविरुद्ध कसं धडधडीत षडयंत्र रचु शकते आणि एका उभारु लागलेल्या जीवनाला कसं नष्ट करु शकते ह्याचा अनुभव आपल्याला ह्या पुस्तकातुन येतो !  आपण किती साध्या गोष्टींनी निराश होतो, आपल्याजवळ असलेलं स्वातंत्र्य, असलेल्या किती छोट्यामोठ्या गोष्टी ह्याचं आपल्याला कधीच महत्व कळत नाही ! पुस्तकात एक वाक्य आहे - स्वातंत्र्याचं  खरं महत्व आपल्याला ते गमावल्यानंतर कळतं!

२०१५ साली सुटलेला रे आता आपलं आयुष्य पुन्हा उभारु पाहतोय ! एक यशस्वी वक्ता म्हणुन गणला जाऊ लागला आहे ! Hats off to you Anthony Ray Hinton! 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

दो आँखें बारह हाथ आणि शांताराम

शनिवारी रात्री लोकसभा वाहिनीवर दो आँखें बारह हाथ हा १९५७ सालचा व्ही. शांताराम यांचा गाजलेला चित्रपट पाहण्याचा योग आला. ह्यात योग येण्यासारखं काही विशेष असले प्रश्न मनात उपस्थित होऊन देऊ नकात ! हा चित्रपट तज्ञ मंडळींसोबत पाहत असल्यानं काही वेगळी माहिती सुद्धा मिळाली, त्यामुळं चित्रपटाची लज्जत अजुनच वाढली! 

चित्रपटाचं शीर्षक "दो आँखें बारह हाथ" च का ह्यावर मिनिटभर चर्चा झाली! मोठ्या आईनं हा चित्रपट १९५७ साली पाहिला असल्यानं ह्या चित्रपटातील अट्टल गुन्हेगारांची संख्या किती ह्याबाबतीत तिच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. पण मग बारह हाथ वरुन गुन्हेगार सहाच असावेत असा निष्कर्ष तिनं काढला ! माझं मन क्षणभर कार्यालयीन कामकाजात गेलं. शांताराम व्यवस्थापक आणि सहाजण  म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ! पण व्यवस्थापकानं केवळ डोळयांची भुमिका बजावता कामा नये त्यानं Hands-on असायला हवं ! त्याला प्रोग्रॅमिंग सुद्धा करता यायला हवं. हा विचार मनात आलाच होता.  पण चित्रपटात नंतर शांताराम प्रत्यक्ष स्वतः कामासाठी ह्या सहाजणांसोबत उतरतो. त्यावेळी चित्रपटाचं शीर्षक दो आँखें चौदा हाथ असायला हवं होतं असा मनात विचार आलाच !

ह्या सहा बेरड गुन्हेगारांच्या मानसिकेत बदल घडविण्याचा निर्धार व्ही. शांताराम आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करतात. आपल्या अधिकाऱ्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांची परवानगी घेऊन एका ओसाड भागात ह्या सहा जणांना घेऊन येतात. मग सुरु होतो तो एक मोठा प्रवास ! ह्या गुन्हेगारांच्या सवयी सहजासहजी बदलणाऱ्या नसतात! परंतु माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वेळोवेळी शांताराम त्यांना जाणवुन देत राहतात. कुठंतरी ह्या बाह्यरूपी पाषाणहृदयी वाटणाऱ्या बेरड गुन्हेगारांच्या मनात ओलावा निर्माण होत जातो. चित्रपटात मग संध्या प्रवेश करते. 

हा चित्रपट १९५७ सालचा ! शांताराम ह्यांचा जन्म १९०१ सालचा ! म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं वय ५५ च्या आसपास असावं ! पण चित्रपटातील त्यांच्या रंगरुपावरून ते खुप तरुण वाटत राहतात! शांताराम ह्यांनी एकंदरीत तीन लग्न केली ही माहिती मला काल कळली ! त्यांच्या प्रथम पत्नी विमलाबाई ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी, जयश्री सौहृदाचे संबंध कायम ठेवले. १९५० ते १९६० कालावधीत शांताराम आणि संध्या ह्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि कालांतरानं विवाहबद्ध झाले. संध्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होते ! विमलाबाई ह्यांनी संध्या हिच्याशी सुद्धा आयुष्यभर चांगले संबंध ठेवले ! ही सारी माहिती माहितीमायाजालावरुन साभार ! 

चित्रपटातील गाणी मोजकी पण सुरेख! 

सैंया झूठों का बड़ा सरताज निकला

ह्या गाण्यात वाद्य वाजवत जाणारी संध्या - आणि तिच्या मागं वाजत जाणारं ते छोटेसे शानदार वाद्य - ताशा ! हे पाहुन मोठी आईने अजुन आठवणी काढल्या. प्रकाशमामाला हा असा ताशा आणला होता. तिचे काका शांताराम ह्यांच्या अभिनयाचे मोठे चाहते होते वगैरे ! संध्या मोठी धीराची मुलगी ! इतक्या ओसाड भागातुन खेळणी विकायला जाताना तिला भय हा प्रकार माहिती नव्हता. ह्या बेरड गुन्हेगारांचा खट्याळपणा जागृत झाल्यावर ते तिची चेष्टामस्करी करीत. पण ही धीट मुलगी त्यांचा चांगलाच समाचार घेई ! 

ऐ मालिक तेरे बंदे हम 

हे एक अत्यंत अर्थपूर्ण गाणं !  

हे सर्वशक्तिमाना ! आयुष्यातील आमच्या सर्व चुका माफ कर ! आमच्याकडुन चांगली सत्कर्मे घडोत, आमचा जीवनप्रवास प्रामाणिकतेच्या मार्गानं होवो ! ज्या वेळी सर्व काही वाईट घडत असतं, आमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो अशावेळी तुच आमच्या मदतीला धावून येतोस आणि आमच्या जीवनातील अंधःकार नाहीसा करतोस ! मनुष्याच्या अंगी अनेक कमतरता आहेत; त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक दुःख निर्माण होतात! पण तु ही सारी दुःख दूर करतोस ! सध्याच्या करोनाच्या काळात अंगी धीर येण्यासाठी हे एक उत्तम गाणे ! 

संध्याने ह्या चित्रपटात आणि नवरंग मध्ये अत्यंत सुरेख नाच केलेत. परंतु ह्या काठिण्यपूर्ण नाचांमुळं तिला नंतर पाठीचा त्रास जडला ही जाणकारांनी दिलेली माहिती ! शांताराम ह्यांचं आडनाव कठीण असल्यानं त्यांनी व्ही शांताराम असं सुटसुटीत नाव स्वीकारलं ! पहिल्या बायकोपासुन चार आणि दुसरी बायको जयश्री हिच्यापासुन तीन अशी एकूण सात अपत्यं होती. संध्यानं सर्वांना आपलीच मुलं मानलं ! सध्या संध्या आपल्या मुलांच्या आधाराने जीवन व्यतित करत आहे ही माहिती कळली ! 

पुढं चित्रपटात मंडईतील भाजीविक्रेत्याला ह्या नव्या भाजीउत्पादकांपासुन स्पर्धेचं भय वाटु लागतं. खरंतर त्या मंडईतील दलालाचा समाचार घेण्यास ही मंडळी समर्थ होती! परंतु आपण कोणावरही हात उगारणार नाही ह्या शांताराम ह्यांना दिलेल्या वचनामुळं ते मुकाट्यानं मार सहन करतात. नंतर ह्याच दलालाच्या नीच कृतीमुळं शांताराम एका बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. परंतु ही मंडळी त्यांचा वारसा चालविण्याचा निर्धार व्यक्त करतात ! आणि आकाशातुन पाहणाऱ्या शांताराम ह्यांच्या दोन डोळ्यांच्या साक्षीनं चित्रपट संपतो ! 

ह्या काळातील जीवनातील साधेपणा त्याकाळातील चित्रपटांत सुद्धा उतरला आहे. साधी सरळ कथा, नितांत सुंदर अभिनय करणारे कलाकार, अर्थपुर्ण गाणी, जीवन उत्कटतेने जगणारी चित्रपटातील पात्रं ह्यामुळं हा चित्रपट प्रेक्षणीय बनतो ! मान हलवत, नजर डोळ्याच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात वेगानं हलविणारी संध्या लक्षात राहिली. पुर्वीच्या छायागीतमध्ये वारंवार प्रक्षेपित होणारं "आधा हैं चंद्रमा रात आधी " हे गाणं सुद्धा आठवलं ! 

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

२०२१ - दहावी बारावी परीक्षा

 


ह्या आठवड्यातील दोन घटना !  

१) मुलाच्या ११ च्या प्रवेशासाठी मुंबईला फेरी झाली.  ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची तयारी संबंधितांनी का दाखवली नाही ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जिद्द मी दाखवत नाही. त्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तिथलं वातावरण काहीसं असुरक्षित होतं. अधिकृत कागदपत्रं अगदी मोकळेपणानं हाताळली जात होती. सुरक्षित अंतर बाळगण्याचं भान कोणाला राहत नव्हतं. एक दोन मुलींनी तर बोलताना मास्क काढला होता. 

२) काल एका मित्राशी बोलणं झालं. त्याचा मुलगा आणि तो पवईला JEE Mains परीक्षेसाठी जाऊन आले होते. सर्वसामान्य लोकांसाठी लोकल बंद असल्यानं हल्ली रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. परीक्षार्थींना लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्यानं त्या दोघांनी हा पर्याय स्वीकारला. अंधेरी ते पवई कार (बहुदा उबेर / ओला ) केली. इतक्या प्रयत्नानंतर त्याचा मुलगा आयुष्याचं भवितव्य ठरविणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला. त्यानं साधारणतः तीन - चार तास पुर्णपणे अनोळखी मुलांच्या सानिध्यात घालवले. त्या भयाचं दडपण घ्यायचं की इतक्या महत्वाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं ह्या द्विधा मनःस्थितीत तो नक्कीच सापडला असणार !

JEE Mains परीक्षा तुलनेनं कमी विद्यार्थी देत असणार. ह्या वर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी काही बदल घडवुन आणण्याची वेळ निघुन गेली आहे. पण २०२१ साली जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेला बसणार आहेत त्यांच्या मनःस्थितीचा कोणी विचार करेल का? त्यांना किमान दोन मुद्द्यांवर अधिकृत यंत्रणा सुस्पष्टता देऊन त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करु शकतात. 

१) परीक्षेची तारीख जाहीर करणे - १२ परीक्षा  १ मे २०२१ ला आणि १० वी परीक्षा १५ मे २०२१ ला सुरु होतील. (तारखा केवळ उदाहरणासाठी !)  अशी घोषणा शिक्षणखात्यानं आताच करायला हवी !

२) दहावी - बारावी परीक्षा पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होतील. विद्यार्थी घरुन परीक्षा देऊ शकतील. परीक्षा "मुक्त पुस्तक संचार" (Open Book) पद्धतीने आयोजित केल्या जातील. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट वगैरे देऊन त्यांना परीक्षा देण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

घरुन ऑनलाईन परीक्षा आणि ती सुद्धा "मुक्त पुस्तक संचार" पद्धतीनं ! आपल्या भुवया नक्कीच उंचावल्या गेल्या असणार !ही नक्कीच आदर्श परीक्षा व्यवस्था नसणार ! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच ह्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यांना आधीच योग्य मार्गदर्शन मिळत नाही; यंदाच्या वर्षी  त्यात अधिक अडचणींचा मुकाबला करावा लागणार ! सर्व काही मान्य ! 

पण लक्षात ठेवा एका बाजुला ह्या सर्व अडचणी / ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी आणि दुसऱ्या बाजुला ह्या भावी तरुण पिढीची सुरक्षितता ! ह्या दोन पर्यायांची आपण तुलना करत आहोत. आपण एका अभुतपुर्व परिस्थितीत वावरत आहोत. परीक्षापद्धतीतील परिपुर्णतेपेक्षा माझी पसंती केव्हाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच राहील ! हवं तर टक्के देण्याऐवजी ग्रेड्स द्या ! ९० च्या वर A+ , ७५ च्या वर A, ६० च्या  वर B वगैरे ! म्हणजे कदाचित एकेक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कदाचित कमी होईल ! 

वरील विचार परिपुर्ण आहेत असा माझा दावा नाही !  परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संबंधितांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि त्या दिशेनं पावलं उचलावीत ! आपल्या नागरिकांचं जीवन आपण ईश्वराच्या हवाली करुनच चालत आहोत ! त्याबाबत असणारी सरकारची अपरिहार्यता आपण समजु शकतो पण आपल्या भावी पिढीच्या स्वास्थ्याची आपण पुर्ण जबाबदारी उचलायला हवी ! 

 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...