मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

२०३० सालातील चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याची व्याख्या !



गेल्या काही दिवसातील घटनांमुळे खरा क्रिकेट रसिक हा भारतीय क्रिकेटपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे असे विधान मी फेसबुकवर केले.  मला सडेतोड प्रतिक्रिया देणाऱ्या एका मित्रानं तुला ही जाणीव होण्यासाठी इतका वेळ लागला याविषयी आश्चर्य प्रकट करत हे सारं गेल्या १८-२० वर्षापासून चालू आहे असे विधान केले. आज सकाळी एका निर्भीड मित्रांने  भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेल्या आयपीएल ने त्यांच्यावर लक्ष न देता परदेशी खेळाडूंवर वीस ते चोवीस कोटी रुपयांची गंगाजळी खर्च करणाऱ्या आयपीएल मालकांविषयी मत व्यक्त करा अशी मागणी केली.  त्यामुळे लिहिण्यात आलेली आजची ही पोस्ट!
 
आयपीएल ही भारतीय उदयोन्मुख खेळाडूंना चालना देण्यासाठी निर्माण झालेली  क्रीडास्पर्धा या विधानाशी मी सहमत नाही.  हा एक बाजार आहे हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.  बदलत्या काळात मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणून क्रिकेटकडे बघणारा जो बहुसंख्य क्रिकेट रसिक वर्ग भारतात निर्माण झाला आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आयपीएल हे निर्माण करण्यात आले.  या रसिक वर्गाच्या क्रयशक्तीवर आधारित एक मोठी बाजारपेठ आयपीएल निमित्ताने निर्माण करण्यात आली. स्टेडियममध्ये चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या कोक, बर्गर इत्यादींपासून ते आयपीएल सामन्यात दरम्यान ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये मोजण्यासाठी तयार असलेल्या तंबाखूच्या उत्पादकांपर्यंत या बाजारपेठेचे जाळे पसरले आहे.  त्यात भर पडावी  म्हणून प्रत्येक फ्रेंचाईसीने आपले टी-शर्ट आणि तत्सम वस्तूंची निर्मिती केली आहे. 

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे! गेल्या ४०-५० वर्षांपर्यंत चांगलं आणि सुसंस्कृत वागणं याविषयी प्रत्येक राज्यातील मध्यमवर्गाने आपापल्या विशिष्ट प्रतिमा उभ्या केल्या होत्या. ही चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याविषयीची प्रतिमा त्यांनी स्वतः काही निर्माण केली नव्हती तर ती त्यांना त्यांच्या पूर्वजांपासून मिळाली होती.  त्या प्रतिमेनुसार आपल्या मुलांनी वागत रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पूर्वजांना एक अनुकूल मुद्दा होता. पूर्वजांच्या बाबतीत अवतीभोवतीच्या वातावरणातील बदलांचा वेग नगण्य होता. त्यामुळे या प्रतिमेत काळानुसार बदल घडवून आणण्यास प्रत्येक पिढीला वेळ मिळत असे. परंतु गेल्या वीस-तीस वर्षांत ज्या वेगाने बदल झाले त्या वेगाला अनुसरून चांगलं आणि सुसंस्कृत वागण्याच्या प्रतिमेत / संकल्पनेत बदलत्या कालानुरूप टिकू शकणारं रूप देण्यात भारतीय मध्यमवर्गीय समाज अपयशी ठरला.  या काळात अजून एक घटना घडली ती म्हणजे पुढील पिढीने आर्थिकदृष्ट्या मागच्या पिढीच्या उत्पन्नाइतकीच किंबहुना त्याहून जास्त मजल लहान वयातच गाठली. त्यामुळे मागील पिढी काहीशी अचंबित झाली. त्यांनी आपला पुढील पिढीला उपदेश देण्याचा अधिकार बजावण्याचा आत्मविश्वास काहीसा गमावला. 

मी सद्य समाजातील स्वघोषित सुजाण नागरिक आहे. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यात दोन पिढ्यांमधील संस्कारांचे यशस्वी हस्तांतरण ह्याविषयी माझी मते नोंदवून ठेवणे ह्याचा समावेश होतो असा माझा समज आहे. संस्कारांचे यशस्वी हस्तांतरणासाठी सद्य परिस्थितीत दोन गोष्टी व्हाव्या लागतील.  
१) दोन पिढ्यांमधील संवाद हा सुसंवाद बनायला हवा. हल्ली हा संवाद मोजक्या काही मिनिटांत संपतो. ह्या संवादाची मुख्य जबाबदारी जुन्या पिढीकडे आहे. त्यामुळं कदाचित नवीन पिढीशी संवाद कसा साधावा ह्यासाठी ह्या पिढीला एका  प्रशिक्षण वर्गाची गरज आहे. ह्या प्रशिक्षण वर्गातील अभ्यासक्रमाची योग्य पद्धतीने आखणी समाजातील तज्ञांनी करावी. 
२) पुढील वीस वर्षांसाठी चांगलं आणि सुसंस्कृत ह्यांची कालानुरूप अशी व्याख्या तज्ञांनी बनवून त्यांचं सोशल मीडियावर अधिकाधिक प्रसारण करावं!

रविवार, २३ एप्रिल, २०२३

Sponge, Fresh Farm Produce वगैरे वगैरे


शनिवारी नियोजित असलेल्या माझ्या उद्योगांमुळं  शुक्रवारी वसईहून कार्यालयीन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी वसईला जाणं हे क्वचितच घडतं. हा एक निश्चितच आनंददायी अनुभव असतो. वसई स्थानकाबाहेर पडलं की शेअर रिक्षा उभ्या असतात. त्यात तिसऱ्या सीटवर बसणं हा मनात विविध विचार निर्माण करणारा प्रसंग असतो. केवळ स्वतः साठी रिक्षा केली तर होणारं भाडं मनाला पटत नाही. लहानपणी नव्वद पैसे होळी आणि एक रुपया रमेदी असं तिकीट काढल्याच्या आठवणी मनात असल्यानं कदाचित असं होत असावं. 

तिथं एक मध्यमवयीन जोडपं तिसऱ्या प्रवाशाच्या प्रतीक्षेत स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे काहीशा आशेनं पाहत होतं. मध्यमवयीन जोडपं, वयस्क जोडपं ह्या संज्ञा नक्की कधी वापराव्यात ह्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं उपलब्ध असल्यास सुजाण वाचकांनी मला नक्कीच त्याची जाणीव करून द्यावी. मी एकंदरीत रिक्षाची पाहणी करत त्यात प्रवेश केला. त्यांनीही मला सरकून खरोखरीच  जागा करुन दिली. खरोखरीच  म्हणण्याचं प्रयोजन असं की काही वेळा लोकं सरकून पुन्हा मूळ जागी येतात किंबहुना त्याहून अधिक क्षेत्र व्यापतात. मग मला उगाचच चीनची आठवण येते. 

रिक्षा भरधाव (?) वेगानं वसई गावाकडं निघाली.  डाव्या बाजूला वसई महानगरपालिकेच्या बसेस उभ्या होत्या. "Look at those buses, how stupid they look!" ह्या बसेसनी काय गुन्हा केला असावा हे मला समजलं नाही. मी काहीशा रागानं त्या दिशेनं रिक्षाबाहेर पाहिलं. ते त्यांना बहुदा समजलं नसावं.  रिक्षात तिसरा माणूस उपस्थित असतांना शक्यतो जोडप्यांनी काही संवाद सुरु करणं हे काहीसं धोकादायक असतं असा माझा समज आहे. परंतु ह्या दोघांमध्ये खूपच सुसंवाद दिसत होता. मी खरंतर माझ्या भ्रमणध्वनीत गुंतलो होतो.

"I have become like a sponge!" रिक्षातील पत्नीचं हे वाक्य अचानक पडताच मी एकदम हडबडलो. परंतु पुढच्याच वाक्यानं मला संदर्भ मिळाला. "I have taken so many things in my stride that I no longer can take anything more. I am saturated" बहुदा मी रिक्षाबाहेर फेकला जाईन इतकं वजनदार वाक्य होतं ते ! "But you can squeeze it and absorb more!" पतीदेव म्हणाले. इतकं धाडशी विधान करणाऱ्या पतिदेवांचे चरण धरावे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली असली तरी रिक्षाच्या आणि त्यातील प्रवाशांच्या आकारमानाचा विचार करता हे शक्य नव्हतं. "Technically I can do it but I don't want to it!" किती हा सुसंवाद !

त्यानंतर चर्चा दुसऱ्या विषयांच्या दिशेनं गेली. "AC Trains are awesome!" वसईतील रिक्षात awesome हा शब्द ऐकायला मिळेल अशी मी कधी अपेक्षा केली नव्हती. शुक्रवारी work from home घेऊन शनिवार - रविवार वसईत राहावं आणि रविवारी रात्री मुंबईला परतावं अशी योजना साकारली जात होती. मी काहीसा बावरलो. आपली योजना ह्यांना कशी कळली ह्याच मला आश्चर्य वाटलं. मध्येच त्यांच्या  चिरंजीवांचा फोन आला. "I will prepare rotis which you can have with Chicken ..." असं काहीसं  बोलणं झालं. 

एव्हाना पापडी आलं. पापडीचा बाजार नुसता पाहणं हे सुद्धा एक आनंददायी अनुभव असतो. तजेलदार पांढऱ्या कांद्याच्या माळी, गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या, विविध गृहोपयोगी वस्तू इत्यादींची विक्री करणारे विक्रेते रस्त्याच्या कडेला बसले होते. बाजारात तर ह्याहुनही अधिक प्रमाणात वैविध्यपूर्ण गोष्टी उपलब्ध असणार. मला ताज्या हिरव्यागार भाज्या अशा एकत्र पाहायला खूप आवडतं. त्यांच्या दर्शनानं डोळे आपसूक सुखावतात. तिथुन निघालेली समाधानाची लहर थेट मनाला स्पर्श करुन जाते. 

"In our childhood we used to come here for shopping. Lots of fresh farm produce is sold here. It is really fresh!" झालं ! जे काही सर्व गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या ह्यांना मनाच्या समाधानाच्या कप्प्यात साठवलं होतं ते fresh farm produce ने नाहीसं केलं. मन खट्टू झालं. 

दोन मिनिटांतच त्यांचं इच्छित स्थळ आलं. "जरा रिक्षा बाजूला घ्या!" अगदी शुद्ध मराठीत पत्नीनं रिक्षावाल्याला विनंती केली. रिक्षावाल्याचं माहिती नाही पण मी मात्र पुरता गार झालो.  

एक वसई महानगरपालिकेच्या बसेसना stupid म्हणणं वगळलं तर बाकी त्यांचं बोलणं अगदी व्यवस्थित होतं.  त्यांच्यातील सुसंवाद वाखाणण्याजोगा होता. कदाचित पती अमराठी असल्यानं ती इंग्लिश मध्ये बोलत असावी.  तरीही तिनं गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या ह्यांना fresh farm produce संबोधणे मला उगाचच खटकलं. बाकी नवऱ्याचं अजून सोशिक बन हे सांगणं आणि ते शांतपणे ऐकून घेतलं जाणं - Hats off to both of them!! 

बाकी चित्रातील दुधी वाडीतला! मोठ्याआईनं काही वर्षांपूर्वी लावलेला. ह्या वेलीचं दृश्य किती विहंगम ! 

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मावळत्या दिनकरा !


काहीशा अनामिक हुरहुरीनं सरत्या वर्षाचा आपण निरोप घेतो. जाणते झाल्यापासुन प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर आयुष्यातील अंतिम सत्याच्या  आपण अधिक जवळ पोहोचलो आहोत ही भावना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी डोकावते. सार्वजनिकरित्या ती थेट बोलुन दाखविण्याची प्रथा नसल्यानं हुरहूर वगैरे शब्दांचा आधार आपण घेत राहतो. 

हे २०२०! एका नव्या उमेदीनं मी तुझं स्वागत करत आहे ! त्यानिमित्त माझ्या मनातील हे काही विचार !

१) आयुष्यातील तुझ्या आधीच्या साथीदारांनी मला जे काही अनुभवांचे क्षण दिले त्यांना मी संकलित स्वरुपात स्मरणात ठेऊ इच्छितो. 

२) माझ्या आयुष्यातील संकटे, कठीण गोष्टी जितक्या सुस्पष्टपणे मला जाणवतात तितक्याच सुस्पष्टपणे माझ्या आयुष्यातील अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींची, लोकांनी माझ्याशी केलेल्या चांगल्या वर्तवणुकीची मला जाणीव येऊ देत. 

३) माझ्या व्यावसायिक जीवनात मला एका विशिष्ट प्रकारची वर्तवणुक स्वीकारावी लागते. माझ्या मुळ स्वभावापासुन ही काहीशी वेगळी असु शकते. परंतु माझी व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तवणुक, विचारधारा वेगळी ठेवण्याची बुद्धी आणि शक्ती मला लाभो !

४) भोवतालचे लोक विविध ताणतणावाच्या प्रसंगातुन जात असतात. ह्याचा परिणाम त्यांच्या वर्तवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळं प्रसंगी त्यांची माझ्याशी असलेली वागणुक माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी असु शकते, मला क्लेशदायक असु शकते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्या अशा वागणुकीकडे तटस्थ मनोवृत्तीनं पाहण्याची शक्ती दे !

५) मी, माझं वागणं काही लोकांना आवडत / आवडणार नाही ही स्पष्ट शक्यता आहे हे सत्य मी मोकळेपणानं स्वीकारु शकु देत ! 

६) माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडुन शिकण्यासारखं बरंच काही असु शकतं. इतर गोष्टीपेक्षा ह्या शिकण्यासारख्या गोष्टीकडं माझं लक्ष सर्वप्रथम वेधलं जावो !

७) माझ्याकडुन चांगलं वाचन होवो. ह्या वाचनातील सुविचारांचे मला आकलन होवो आणि माझ्या जीवनाशी निगडित सुविचारांचे माझ्याद्वारे अंगिकरण  होवो !

८) स्थानिक, जागतिक पातळीवरील कोणत्याही ताणतणावाला तोंड देण्याची शक्ती माझे नातेवाईक, मित्र मला देतात. त्यांच्याशी मी सदैव संपर्कात राहू शको !

९) माझा निसर्गाशी असलेला संपर्क कायम राहो ! निसर्ग मला माझं जगणं समृद्धपणे जगण्याची प्रेरणा देत राहो !

आणि .... 

सातत्यानं ब्लॉगपोस्ट लिहुन त्यांच्या लिंक्स फेसबुक भिंतीवर, शेकडो व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवुन नातेवाईक, मित्रगणांना त्रस्त करण्याची माझी इच्छाशक्ती कायम राहो !

भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी

मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्य...