मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २५ मार्च, २०२०

Discovery Time




जगावर येणाऱ्या भयावह संकटाच्या संकल्पनेवर बेतलेले अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. जगाचा शेवट जवळ आला आहे, केवळ नायक, मोजकी मंडळी त्या संकटाचा मुकाबला करत आहेत असं काहीसं चित्र ह्यात रेखाटलं गेलेलं असतं. आज आपण ज्या परिस्थितीत सापडलो आहोत ती परिस्थिती काहीशी ह्या चित्रपटांची आठवण करुन देणारी आहे. 


करोना पुर्वीचे जग !

करोनापुर्वीचे जग काहीसं वेगळं होतं. तुमचा पैसा, तुमची पत ह्याचा तुम्हांला गर्व करता येत असे. पैसे खर्च करुन तुम्ही काहीही विकत घेता येण्याची घमेंड बाळगु शकत होता. निसर्गानं सर्व माणसांना एका पातळीवर निर्माण केलं असलं तरी माणसानं कृत्रिम पातळ्या निर्माण केल्या होत्या. आभासी दुनिया निर्माण करुन त्यात आभासी चलनाद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या मागे बहुतांशी मनुष्यजात लागली होती. 

सद्यस्थिती 

आजच्या परिस्थितीत हे सर्व काही नाहीसे झालं आहे. आपला जीव वाचवण्याची काळजी घेणे हा सर्व मानवजातीचा प्राधान्यक्रम झाला आहे. ह्यात राव-रंक सर्वजण एका पातळीवर आले आहेत. 

मनःपुर्वक आभार !

इथं आपल्या सर्वांचा दिनक्रम सुरु ठेवण्यास जी मंडळी हातभार लावत आहेत, त्यांचे मनापासुन आभार मानावेसे वाटतात. किराणामाल दुकानदार, दूधवाला, सफाई कामगार, पोलीस,टोलनाक्यावरील  कर्मचारी हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगा, पिता आहेतच.  आपण साधं थोडा वेळ बाहेर पडलो तर घरात आल्यावर तातडीनं हात स्वच्छ धुण्याच्या मागे लागतो, अंघोळ करतो. ही मंडळी मात्र दीर्घकाळ बाहेर राहत आहेत ते केवळ आपला दिनक्रम सुरळीत चालु राहावा ह्यासाठी! 

इस्पितळात काम करणारे नर्स, डॉक्टर आणि बाकीचा कर्मचारीवर्ग हे तर अधिक धोकादायक परिस्थितीत कार्य करत आहेत. ज्यांना करोनाची लागण झाली आहे अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात ही मंडळी येत आहेत ते केवळ मास्क, बाकीच्या प्रतिबंधात्मक आवरणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवून ! त्यांच्या स्वाथ्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना! 

दृढ मनोबलाची आवश्यकता 

ह्या करोनाने काही वेगळ्या परिस्थिती निर्माण केल्या आहेत. दहावीच्या एस. एस. सी. बोर्डाचा शेवटचा पेपर बाकी आहे. वर्षभर अभ्यास करुन सतत तणावाखाली राहणाऱ्या मुलांना कधी एकदा आपण ह्या तणावातुन मुक्त होऊ असं झालं असेल. परंतु आता त्यांना परिस्थिती निवळण्याची वाट पाहावी लागणार! ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्यावेळी पेपर पुन्हा घेतले जातील त्यावेळी अशा परीक्षांसाठी लागणारी मनःस्थिती पुन्हा आणणे कठीण असणार आहे. एस. एस. सी. परीक्षा हे केवळ एक उदाहरण झाले अशा अनेक परीक्षांत मुलं अडकून बसली आहेत. त्यांनी ह्या काळात आपलं मनोधैर्य शाबुत ठेवावं ! ज्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत त्यांनासुद्धा घरातच बसावं लागणार आहे! वर्षभराच्या अभ्यासाच्या तणावमुक्तीसाठी ज्या काही योजना आखल्या होत्या त्या सर्वांवर पाणी पडलं आहे ! 

परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेल्या तरुण मुला-मुलींसाठी हा कसोटीचा काळ आहे. आपल्या कुटुंबियांपासुन दुर तर राहावे लागणार आहे त्याचवेळी प्रदीर्घ काळ मोजक्या जागेत आपल्या रूममेट्स सोबत एकत्र राहावे लागणार आहे. 

मोजक्या जागेत एकत्र राहण्याचा प्रसंग एखाद्या कुटुंबासाठीसुद्धा कठीण ठरु शकतो. संवाद,चर्चा काही काळ ठीक असते परंतु प्रदीर्घ चालत राहिल्यास त्याचं परिवर्तन विसंवादात होऊ शकतं. त्यामुळं ह्या काळात कुटुंबाने संवाद कसा साधायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आखुन घ्यावीत.  आलटुन पालटुन कुटुंबसदस्यांनी संवाद - पर्यवेक्षकाची भुमिका बजावावी. संवाद जराही कटुतेकडे जात असल्याची शक्यता निर्माण झाल्यास टाईमआउट घोषित करावा.

काही कुटुंबांना एकत्र बसुन संवाद करण्याची कदाचित सवयही नसेल. ह्या निमित्तानं जी संवादसंधी निर्माण झाली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवावा. एका घरात वेगवेगळी आयुष्य जगणारी अनोळखी माणसे ह्या निमित्तानं एकत्र येऊ शकतात. माझ्या नोकरीधंद्यात  काय घडत आहे, मला ह्या क्षणी कोणत्या गोष्टींविषयी आशावादी वाटत आहे, कोणत्या गोष्टींविषयी असुरक्षितता वाटत आहे इथुन प्रारंभ करावा ! 

नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर आपलं बोलणं कमी झालं आहे. प्रथम फोन कोणी करावा हा इगोचा भाग सर्वप्रथम आडवा येतो. त्याला सरळ बाजुला सारावे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या मंडळींशी आपण संपर्क गमावलेला असतो तो केवळ वेळ नाही ह्या कारणास्तव ! त्यांचा फोन नंबर चिकाटीनं शोधुन काढुन मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलावं !  

कार्यालयात एकत्र येऊन काम केल्यामुळं संघभावनेस चालना मिळत असे. आता सर्वजण घरुन काम करत असल्यानं केवळ कामासाठी फोन कॉल्स होतात. ह्या रिमोट काम करण्याच्या कार्यपद्धतीत संघभावनेस चालना देण्यासाठी काही नवीन सर्जनशील पद्धतींचा अवलंब करावा लागणार आहे. लंच अवर ऑन व्हिडिओ कॉल  असं काही थोड्याच दिवसात ऐकायला मिळालं तर आश्चर्यचकित होऊ नकात ! 

एकंदरीतच हा काळ सर्वांसाठी कसोटीचा असणार आहे ! ज्यांचं मनोबल चांगलं आहे अशी मंडळी ह्यातुन सहजपणे तावूनसुलाखून बाहेर निघतील. भविष्यात असले प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यामुळं पुढील पिढीला मानसिकदृष्ट्या कणखर बनविणं किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव करोनाने आपल्या सर्वांना करुन दिली आहे. 

करोनानंतरचे जग !

जग करोनामुक्त कधी होईल हे आजच्या घडीला छातीठोकपणे कोणीच सांगु शकत नाही. किंबहुना करोनाचा प्रभाव कमी झाला तरी त्याची भिती सदैव मनुष्यजातीच्या आसपास राहणारच आहे. सध्याच्या काळात आपल्या वागण्यात करोनाने काहीसा बदल घडवुन आणला आहे. जीवनाच्या अशाश्वततेच्या जाणिवेनं आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडलं आहे. 

पण ज्या क्षणी ह्या भयाची तीव्रता काहीशी कमी होईल किंवा पैशाच्या जोरावर करोनापासुन जीव वाचविण्याची हमी माणसाला प्राप्त होईल त्यावेळी माणसांचे वागणं कसे असेल? करोनापुर्वीची मग्रुरी परत त्याच प्रमाणात मनुष्यजातीतील काही लोकांना ग्रासुन टाकेल का?  हल्लीच्या जगाविषयी, त्यातील मनुष्यांविषयी भाबडेपणा बाळगणं फार कठीण आहे. त्यामुळं बहुतांशी मंडळी पुन्हा संपत्तीनिर्मितीच्या मागे लागतील. 

करोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर बरेचसे प्रतिकुल परिणाम होऊ शकतील. ही शक्यता प्रत्यक्षात उतरू शकते ह्याची जाणीव असु द्यात आणि ती प्रत्यक्षात उतरली तर आपल्या बाबतीत जो काही worst case scenario होऊ शकतो ह्याची आधीच अटकळ बांधुन ठेवा, त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तयारी करा ! केवळ चांगला विचार केल्यानं एखादी वाईट गोष्ट घडायची टळत नाही, पण जर वाईट शक्यतेचा आधीपासुन विचार केला तर त्याचा धक्का कमी बसतो. जगात वाईट गोष्टी अहोरात्र घडत असतात त्यातील काही गोष्टी क्वचितच आपल्या वाट्यालाही येणारच. पण वाईट गोष्टी घडल्यानंतर गगनभरारी घेणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते हे ही ध्यानात ठेवा ! 

शनिवार, १४ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - ३



आपण अवेळी विचारलेल्या प्रश्नामुळं आजोबांचे ज्ञानदायी संभाषण अचानक थांबलं ह्याची चुटपुट लागु आजींना लागुन राहिली. तीच चुटपूट घेऊन लागु आजी रात्री झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्या लवकर उठल्या. आकाशवाणीवर मंगल प्रभात हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. भल्या पहाटे "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ! उठी लवकरी वनमाळी " ही शाहीर होनाजी बाळा ह्यांची अमर भुपाळी ऐकुन त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या आपसुकच ओल्या झाल्या. "जुनं ते सोनं" असं पुटपुटतच त्या घराबाहेर पडल्या. 

आसमंतात एक सुखद असा गारवा भरुन राहिला होता. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. लागु आजी प्रसन्न मनानं मंदिराकडील रस्त्यावर चालु लागल्या. 

"गुड मॉर्निंग आजी !" मागुन आवाज आला तशा त्या थांबल्या. 

"सुप्रभात वेदा !" आजींनी सुहास्य मुद्रेनं वेदाला अभिवादन केलं. 

"कशा आहात तुम्ही, आजी?" वेदाने त्यांना विचारलं. 

"मी मजेत आहे ! तू कशी आहेस, जॉगिंग झालं का? " आजी म्हणाल्या. 

"हो, तुम्ही कुठं मंदिरात निघालात का? वेदाने त्यांना विचारलं. 

त्यांची मान होकारार्थक प्रतिसाद देतेय ह्याचा पुसटसा अंदाज येताच "मी सुद्धा येते तुमच्या सोबत !" वेदाने घोषित करुन टाकलं. खरंतर काही वर्षांपुर्वी आजीचे देवळात जाण्याविषयीचे नियम अगदी कडक होते. सकाळची आंघोळ न केलेल्या वेदाला आपल्यासोबत मंदिरात घेऊन जायला त्या कदापि तयार झाल्या नसत्या. पण वयानुसार त्यांच्या स्वभावात बराच फरक पडत चालला होता. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांसाठी आपल्या नियमांत थोडेफार बदल करण्यास त्या अनुभवानं शिकल्या होत्या. 

देवदर्शन झालं. देवापुढं बराच वेळ डोळे मिटुन नमस्कार करणाऱ्या वेदाला पाहुन पुन्हा एकदा लागु आजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. इतक्या तरुण वयात नवऱ्यासोबत न पटल्याने घटस्फोट घेऊन वेदा एकटी राहत होती. व्यवस्थापनाची पदवी घेतलेली वेदा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर होती. आपलं देवदर्शन आटोपलं तसं आजी भिंतीपाशी असलेल्या बाकांवर येऊन बसल्या. मिनिटा दोन मिनिटांनी वेदाही त्यांच्या बाजुला येऊन बसली. का कोणास ठाऊक पण नेहमी उत्साहानं भरलेली वेदा देवळात मात्र अगदी शांत झाली होती. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग अचानक वेदाला न राहवुन तिनं आजींच्या कुशीत आपलं डोकं लपविले. 

"का ग वेडाबाई ! काय झालं ?" आजींनी तिला विचारलं. 

"काही नाही ! -" एका हळव्या क्षणावर मात करत वेदा सावरली होती. 

हिच्याशी आज सविस्तर बोलावंच असा विचार आजींच्या मनात आला. इतक्यात अचानक कालचे आजोबा आजींना दिसले. 

"आजोबा !" आजींनी आपल्या मोकळ्या स्वभावाला  अनुसरुन आजोबांना मोठ्यानं साद दिली. 

"अरे वा तुम्ही आज मंदिरात सकाळीच भेटलात !" आजोबांनी त्यांचे स्वागत केले! 

"या बसा ना इथं ! आजींनी वेदाच्या बाजुला त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली. जणू काही आपण आजोबांना गेले कित्येक वर्षे ओळखत आहोत ह्या थाटात आजीबाईंनी वेदाला आजोबांचा परिचय करुन दिला. आजोबांना वेदाने पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेल्या विषयाची बरीच माहिती होती. त्यामुळं त्या दोघांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या. लागु आजी आपल्या परीनं त्या संभाषणात सहभागी होत होत्या. 

"सर्वतोपरी प्रयत्न करुनसुद्धा सुखाचं माप सर्वांच्या पदरात देव का देत नाही? " वेदाच्या तोंडुन अचानक आलेल्या ह्या  प्रश्नानं आजी जरी दचकल्या तरी आजोबा मात्र स्थितप्रज्ञ होते. 

"तु एक गहन प्रश्न विचारलास मुली ! आपण सर्वांनी आपल्या सुखाच्या झोळ्या इतक्या मोठ्या बनवुन ठेवल्या आहेत की बिचारा भगवंत आपल्या सर्वांसाठी पुरेनासा झाला आहे !" आजोबा उत्तरले. 

"असं नाही हो आजोबा ! माझ्या अगदी किमान माफक अपेक्षा होत्या! त्याच्यासाठी सर्व करिअरचा त्याग करण्याची माझी तयारी होती. पण का कोणास ठाऊक, आमच्या तारा  कधी जुळल्याच नाहीत ! " अचानक स्वतःभोवती घातलेले सर्व बांध झुगारुन देऊन वेदा बोलली. 

"मुली, आपण सर्वांनी आपली आयुष्य ना खुप क्लिष्ट बनवुन ठेवली आहेत ! पुर्वी कसं साधं सोपं असायचं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी  चांगलं आणि वाईट अशी दोन वर्तुळं बनवलेली असायची. समाजाला तुमच्यासाठी जे काही चांगलं वाटतंय त्या वर्तुळात तुम्हांला सक्तीनं ढकललं जायचं ! वडीलधारी माणसांचा, समाजाचा हा निर्णय पटला नाही तरी सर्वजण स्वीकारत असत. आयुष्य जरी परिपुर्ण नसलं तरी केवळ आपल्या बाबतीतच असं घडत नाहीए, आपल्या सोबत बरेचजण आहेत केवळ ह्या गोष्टीवर सारेजण समाधान मानुन आयुष्य कंठीत करत असत. 

आता ना  चांगलं, वाईट अशी दोनच पर्यायांची वर्तुळं राहिली नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी आपल्याभोवती  पर्यायांची अनेक वर्तुळं बनली आहेत.  प्रत्येक वर्तुळात चांगलं, वाईट वेगवेगळ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहे. पुर्वी समाजासाठी ग्राह्य असलेली चांगल्या वाईटाची व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष बनली आहे. त्यामुळं तुझं बरोबर की माझं ह्याच्या पलीकडं जाऊन एकत्रितपणे आयुष्य व्यतित करण्याची दोघांकडे असलेली इच्छाशक्ती हाच सर्वात महत्वाचा घटक ठरत चालला आहे !" 
आजोबांनी आपलं लांबलचक बोलणं एका दमात सांगुन टाकलं. 

वेदा आणि आजी दोघीही अगदी एकाग्रचित्तानं  त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचं बोलणं संपलं तरीही त्यांची भारावलेली अवस्था कायम होती. अचानक वेदाचा फोन वाजला तसं ती फोन घेऊन थोडी बाजुला गेली. आजीची तंद्री काही काळ कायमच होती. एका मिनिटातच वेदा परतली तर आजीला एकटीलाच पाहुन आश्चर्यचकित झाली. 

"आजी! आजोबा कुठं गेले? " वेदाने विचारलं. 

"अगंबाई कुठं गेले असतील ! " आजी दचकल्याच !

काहीवेळानं दोघीही मंदिराबाहेर पडुन इमारतीच्या दिशेनं चालु लागल्या. वेदाशी बोलत असल्या तरी आजीबाईंच्या मनात मात्र आजोबांचे काल आणि आज अचानक नाहीसे होणे हा निव्वळ योगायोग असणं कितपत शक्य आहे ह्यावर विचारमंथन सुरु होते. 

(क्रमशः)

आधीच्या भागांच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post_10.html


मंगळवार, १० मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - २





अरविंद गोखले आणि विनायक राऊत चालत चालत जवळच असलेल्या उद्यानात  येतात. प्रत्यक्षात होळी सुरु असताना मालिकेतसुद्धा होळी सुरु असायलाच हवी असा काही नियम नसल्यानं इथं इस्त्री केलेल्या शुभ्र कपड्यांमध्ये मंडळी होळी खेळताना आढळत नाहीत. एका दाट छाया देणाऱ्या वडाच्या झाडाखाली दोघेजण बैठक मारतात.  हवापाण्याच्या गप्पा सुरु होत असतानाच त्यांच्या बाजुला काही अंतरावर एक आजोबा  येऊन बसतात. त्यांच्याकडे  एक नजर टाकुन दोघेजण गप्पा सुरु ठेवतात. 

विनायक - "लेका अरविंद ! तुला खरोखरीच सुदैवी म्हणायला हवं !"

अरविंद - (काहीसा दचकुन ) "का रे बाबा ? अचानक तुला काय झालं?"

विनायक - "अरे मस्त प्राध्यापकाची नोकरी ! सकाळ संध्याकाळ मस्त नोकरीच्या वेळा ठरलेल्या ! संध्याकाळी येऊन चांगली घासाघीस करुन भाज्या खरेदीला पण तुला वेळ मिळतो ! अमेयने सुद्धा चांगला IT मधला जॉब शोधला. नाहीतर आमची मानसी बघ ! कसलं संतसाहित्याचा अभ्यास करण्याचं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे ! राहता राहिलो मी ! इंटरनेटवर वेळच्या वेळी भाजीपाला मागविण्यासाठी सुद्धा मला रिमाइंडर ठेवावा लागतो

अरविंद - "अरे किती बोललास एकदम ! असं एकदम काही बोलण्याचं तुला सुचतंच कसं ?

विनायक - (चेहऱ्यावरील मिश्किल भाव लपविण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता !) "महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयावर तासंतास डोस देतो तेव्हा रे ?"

"आयुष्यातील यश म्हणजे नक्की काय हो? " अचानक बाजुनं आवाज येतो. दोघेही दचकुन पाहतात. प्रश्न बाजुला बसलेल्या आजोबांनी विचारलेला असतो. 

" मुबलक पैसाअडका, सुखी कुटूंब, अंगणात चारचाकी वाहन वगैरे वगैरे !" आपला मिश्किल स्वभाव परक्या माणसासमोर सुद्धा लपवुन ठेवणं विनायकाला आवडत नसे ! 

आजोबा - "बाळा, तु फारसं गंभीरपणे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही हे ठाऊक आहे मला ! पण अरविंद आणि अमेयच्या यशाची व्याख्या तु कोणत्या मापदंडावर केली आहेस हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक आहे!"

विनायक - (प्रकरण काहीसं गंभीर वळण घेत आहे असा सुप्त संदेश त्याच्या मेंदुने एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचवला होता !) "नाही म्हणजे अरविंदकडे आयुष्याच्या योग्य टप्प्यावर असलेली फुरसत  आणि अमेयकडं आयुष्याच्या उमेदीच्या काळात असलेला उज्ज्वल भवितव्याचा मार्ग विचारात घेऊन मी हे म्हणालो !"

अरविंद, विनायक आणि त्यांच्यासोबत एक वयस्क गृहस्थ वडाच्या झाडाखाली बसले आहेत, विनायकाच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव आहेत हे पाहुन उद्यानात नुकत्याच प्रवेश करत्या झालेल्या लागुआजींना राहावेनासे झाले. विनायक कधी संकटात सापडला असेल तर त्याला मदत करण्याचा आव आणुन त्याला अधिक संकटात टाकणे त्या आपले परमकर्तव्य समजत असत. त्यांना येताना पाहुन अरविंदने सरकुन त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली !

आजोबा - "तुझा विचार काही प्रमाणात योग्य आहे. आयुष्यात यश म्हणजे काय ह्याचा आपण बऱ्याच वेळा खोलवर विचार करतच नाही. आपणासमोर असलेली यशाची काही उदाहरणं म्हणजेच यशाच्या सर्व उपलब्ध शक्यता अशी समजुत आपण करुन घेतो."

लागु आजी - "विनायक मी ही तेच म्हणत होते. तु उगाचच अंतिम निष्कर्षाकडं लगेच धाव घेतोस ! "

आपली खोडी काढण्याची खुमखुमी आजींना आली असावी असा निष्कर्ष विनायकाने काढला. इथं आपण गप्प राहणं इष्ट असा अजुन एक संदेश त्याच्या मेंदूनं त्याला पाठवला. 

आजोबा - "तरुणपणी असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी ही तुमच्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी ! पण ह्या आणि त्यापुढील पायरीवर पोहोचण्यासाठी आणि टिकुन राहण्यासाठी तुम्ही आयुष्यातील कित्येक महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते.  शालेय / 

महाविद्यालयीन जीवनातील खेळण्यात व्यतित केलेला वेळ हा तुमच्या पुढील आयुष्यातील उत्तम तब्येतीसाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असते. 

एखादी कला विकसित करणे म्हणजे ताणतणावाच्या प्रसंगातुन मुक्त होण्यासाठी तुमच्याकडं असणारा हुकमी एक्का असतो. 

तुम्ही जोडुन ठेवलेली मित्रमंडळी, नातेवाईक म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा भारी गुंतवणूक ! 

मुलांवर केलेल्या संस्कारांतून जर तुम्हांला एक संतुलित व्यक्तिमत्व घडविता आलं तर आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना ही मुलं सामोरी जाऊ शकतात. "

आजोबांना अजुन बरंच काही बोलायचं होतं बहुतेक ! पण विनायकाचे विस्फारलेले डोळे पाहुन आजींना राहवलं नाही. 

आजी - " अहो आजोबा तुम्ही मंदिरात कीर्तन वगैरे करता का हो?"  

आजींचा हा अवेळी प्रश्न ऐकुन अरविंदच्या तोंडातुन आपसुक चकचक असा आवाज आला. 

आजोबा - (सस्मित चेहऱ्यानं !) "नाही मी इतका ज्ञानी माणुस नाही !"

अचानक समोर आलेल्या वडापावच्या गाडीमुळं ह्या तिन्ही लोकांची ज्ञानलालसेची स्थिती भंग झाली. वडापाववाल्याकडं फेरी मारुन आजोबांना तुम्ही वडापाव घेणार का असं विचारण्यासाठी म्हणुन ही मंडळी परत आली तोवर आजोबा अचानक गायब झाले होते. ह्या तिघांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि काहीसे अपराधी भाव होते. आजोबांना किमान नाव तरी विचारायला हवं होतं ही भावना त्यांच्या मनात दाटुन आली होती. आजीनी कीर्तनाचा प्रश्न विचारायला नको होता ह्याविषयी आजींसकट तिघांचेही एकमत झालं. 

(क्रमशः )
आदित्य पाटील 

रविवार, ८ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - १






एक मराठी मालिका ब्लॉग द्वारे ....   

विजयनगर एका महाराष्ट्रीयन नगरातील एक वसाहत. ह्या वसाहतीमधील काही कुटुंबांच्या जीवनासोबत फुलणारी ही  एक कथा !

श्री. गोखले - "सीमा तुला काही मदत हवी आहे का? मला दहा मिनिटात निघावं लागेल. आज सकाळी सात वाजताचे लेक्चर आहे."

सौ. गोखले - "मदत  वगैरे नको , झालाच हा डबा तयार ! "

सीमानं दिलेला डबा घेऊन अरविंद महाविद्यालयात जाण्यासाठी आपली कार सुरु करतात. इतक्यात त्यांना आपल्याच इमारतीतील राऊत दिसतात. त्यांच्या एकंदरीत जोशावरुन हे मॉर्निंग वॉकला निघाले असावेत असा कयास गोखले बांधतात.  

श्री. गोखले - "गुड मॉर्निंग राऊत! अहो आश्चर्यम ! आज तुम्ही इतक्या भल्या पहाटे ! "

श्री. राऊत  - "कसलं आश्चर्य न कसलं काय ! सध्या वर्क फ्रॉम होमचे दिवस आले आहेत त्यामुळं प्रवासाचा वाचलेला वेळ इथं मॉर्निंग वॉकसाठी सत्कारणी लावावा असा निर्धार केला आहे ! बघुयात किती दिवस टिकतो तो !

श्री. गोखले - "अरे वा चांगला निर्धार केला आहे ! असाच चालु ठेवा ! येतो मी !"

गोखलेंचा महाविद्यालयातील दिवस सुरळीत पार पडतो. संध्याकाळी साडेचार वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहापोहे घेऊन ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरण्याच्या तयारीत असतात. 

सौ. गोखले - "अहो ऐकलं का ! जरा थोडं पुढं जाऊन अमेयसाठी थोडे आवळे घेऊन या! रात्रीच्या घरी येण्याच्या वेळेचा पत्ताच नाही ! चांगलं आवळा सरबत करुन ठेवते म्हणजे ऍसिडिटी कमी व्हायला थोडीफार मदत होईल! 

श्री. गोखले - "ठीक आहे !"

सौ. गोखले - "आणि हो मी जिमला जाणार आहे ! जर मला यायला उशीर झाला तर कुकरला भात लावून ठेवा ! म्हणजे मी आल्यावर लगेच जेवायला बरं !

अरविंदच्या कपाळावर उठू पाहणारी आठी प्रयत्नपुर्वक टाळुन तो खाली उतरतो. वरच्या मजल्यावरुन येणाऱ्या लिफ्टमध्ये आधीच मानसी असते. 

मानसी - "काका कसे आहात तुम्ही ? "

श्री. गोखले - "मी कसा असणार ? मी मजेत आहे . तू कशी आहेस?"

मानसी - " मी ही मजेत आहे ! आम्ही कलाशाखेच्या वीसजणी ज्ञानेश्वरांच्या आणि महाराष्ट्रातील इतर संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी म्हणुन आळंदी आणि काही गावांना भेट देणार आहोत !"

श्री. गोखले - (अत्यंत कौतुकाच्या स्वरात !) अरे वा ! मानसी खुप छान ! कधी वेळ मिळाला तर घरी ये ना ! तुम्ही केलेल्या संतसाहित्याच्या अभ्यासाविषयी मला बरंच काही जाणुन घ्यायचं आहे ! 

मानसी - "नक्की काका ! येते मी !"

बराच वेळ अरविंदच्या  (अर्थात श्री. गोखलेंच्या ) मनात मानसीविषयी विचार घोळत राहतात. राऊत इतका IT मधला यशस्वी व्यावसायिक पण त्याच्या मुलीने, मानसीने जाणीवपुर्वक कलाशाखेची निवड केली होती ! आणि आपण मात्र विज्ञानाचे प्राध्यापक असुन मात्र अमेयच्या संशोधनाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं नाही !

विचाराच्या तंद्रीतच अरविंद भाजीवाल्याच्या ठेल्यावर पोहोचतो. आवळ्याच्या भावाची चौकशी करत असतानाच त्याला पुन्हा एकदा राऊत दिसतो! त्याच्या पाठीवर थाप देत हसत हसत अरविंद म्हणतो - "लेकाच्या तुझं वर्क फ्रॉम होम मस्त चालू आहे हे दिसतंय !" विनायक राऊतच्या चेहऱ्यावरील काहीसे ओशाळल्याचे भाव बघुन अरविंदला उगाच ह्याची थट्टा केली असे वाटतं ! "अरे ते जाऊ दे ! तुझ्या मानसीचे कौतुक करावे तितकं थोडं ! हल्लीच्या पिढीत आपल्या परंपरांचा अभ्यास करण्याची वृत्ती फारच क्वचित दिसते !

श्री. राऊत  - "अरे परंपरा वगैरे आपल्या जागी ठीक आहेत! पण हिच्या नोकरीचं काय होणार ह्याचीच मला चिंता लागुन राहिली आहे ! बाकी तुझी खरेदी झाली का? तुला वेळ असेल तर मस्त आपण ह्या पार्कात बसुयात का? दिवसभराचं काम आटपुन टाकलंय मी !"

"ही काय विचारायची गोष्ट झाली?" आपण आवळे योग्य किमतीत घेत आहोत ना ह्याविषयी अजुनही साशंक असलेला अरविंद विनायकला म्हणाला !

(क्रमशः )

आदित्य पाटील 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...