मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १६ मे, २०१६

बावखल

वसई गेले काही वर्षांपासुन सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. हे स्थित्यंतर जसे वसईतील नागरिकांच्या व्यवसायातील / राहणीमानाच्या बदलांच्या स्वरुपात आढळुन येतं त्याचप्रमाणे ते त्यांच्या विचारसरणीत होणाऱ्या बदलांच्या स्वरुपात देखील आढळुन येतं. 

वसईतील बराचसा समाज हा काही काळापुर्वी शेतीप्रधान होता. वाडवडिलार्जित शेतीवाडीवर उपजिवीका करणे हा बऱ्याच समाजाचा मुख्य व्यवसाय होता. वाडीतील पिकांच्या सिंचनासाठी त्यावेळी बैलजोडीवर हाकले जाणारे रहाट असत आणि विहिरीऐवजी छोटी तळी ज्यांना बावखल म्हणुन संबोधिले जाते त्यांचा वापर केला जात असे. त्याकाळी विहिरीऐवजी बावखलांची प्रथा वसईत रूढ का झाली असावी ह्याविषयी अधिकृतरित्या माझ्याकडे संदर्भ उपलब्ध नाहीत. पण जमिनीची मुबलकता आणि कदाचित विहिरी खणण्यासाठी / तिला बंधारा घालण्यासाठी बाह्य घटकांवर असणारी अवलंबिता ही मुख्य कारणे बावखलांची लोकप्रियता वाढीस लागण्यासाठी कारणीभूत असावीत. 

वसईतील घराच्या आसपास असणारी वाडी ही उपजिवीकेचे जरी साधन होऊ शकत असली तरी ती तुम्हांला चैनीचे जीवन जगण्यासाठी बहुतांशी उदाहरणात असमर्थ होती. त्यामुळे साधारणतः बहुदा १९५० च्या नंतरच्या काळात सरकारी नोकरीकडे समाजाचा कल वाढू लागला. सरकारी नोकरी ह्या एकतर शिक्षकीपेशातील किंवा कार्यालयीन स्वरूपाच्या होत्या. ह्या काळात वसईत डॉक्टर अथवा अभियंते झाले नाहीत असे मी म्हणत नाहीये. मी एक सर्वसाधारण समाजाविषयी विधान करतोय. जसजसं हे सरकारी नोकऱ्यांचे / शिक्षकी पेशाचे प्रमाण मूळ धरु लागलं तसतसं हा समाज काही प्रमाणात शेती व्यवसायापासून मुख्य व्यवसाय म्हणून दुरावला गेला. काहीजण अजुनही शेतीवर मुख्य व्यवसाय म्हणून विसंबून आहेत. त्यांना सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळायला हवं हा स्वतंत्र पोस्टचा विषय! 

१९९० च्या सुमारास काही बदल होत गेले. सरकारी नोकऱ्या मिळविणे पूर्वीइतके सोपे राहिले नव्हते. लोकलचा प्रवास काहीसा कठीण होऊ लागला होता. वसईत स्थानिक पातळीवर नोकऱ्या निर्माण झाल्या नव्हत्या आणि अजूनही नाहीत. वसई पूर्वेला असलेला औद्योगिक पट्टा अजूनही नोकऱ्यांचे वैविध्य देऊ शकत नाही. त्याचसुमारास नियमात झालेल्या बदलामुळे वसईत इमारतींचे प्रमाण अचानक वाढीस लागलं. आणि त्यामुळे पर्यायी उपजीविकेच्या साधनाच्या शोधात असलेल्या वसईतील काही नागरिकांनी शेतजमिनी विकून इमारती बांधणे हा पर्याय स्वीकारला. 


सुरुवातीला इमारती बांधण्यासाठी आवश्यक असणारी जमीन मुबलकतेने उपलब्ध होती. पण जसजशी वर्षे गेली आणि अधिकाधिक लोक बांधकाम व्यवसायात येऊ लागले तसतशी जमीन दुर्मिळ होत गेली. लोकांनी केवळ इमारती बांधल्या असे नव्हे तर अलिशान बंगले बांधण्यासाठी सुद्धा ह्या जमिनीचा वापर होऊ लागला. जमिनीचे हे दुर्भिक्ष्य एका क्षणी लोकांची नजर ह्या बावखलांकडे जमिनीचा एक संभाव्य स्त्रोत म्हणुन गेली. ही बावखले भराव टाकुन बुजविल्यास इमारतीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते हे ह्या लोकांनी ताडले. आणि काही जणांनी ह्या मार्गाचा अवलंब केला. 


त्याचसुमारास इतर काही घटना होत गेल्या. 
१> इतर ठिकाणांप्रमाणे वसईत सुद्धा काही प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवु लागले. परंतु ज्या ज्या ठिकाणी ही बावखले आहेत त्याच्या आसपासच्या विहिरीत मात्र पाण्याची पातळी अगदी कमी पर्जन्यमानाच्या वर्षात सुद्धा बऱ्यापैकी टिकून राहिली. आमच्या पाटील घराण्यात असलेली बावखले हे सुद्धा ह्याचे उदाहरण. 
२> वैचारिकदृष्ट्या समाजाची प्रगल्भता वाढीस लागली. माझ्या वाडवडिलांनी ज्या जमिनीचा वारसा मला दिला तो मला टिकविता आला पाहिजे आणि माझ्या पुढील पिढीस सुद्धा तो मला हस्तांतरित करता आला पाहिजे हा विचार मूळ धरु लागला. 


आणि ह्याचमुळे वसईतील बावखलांविषयी जनतेची जागरुकता आता वाढीस लागली आहे. केवळ बावखले टिकविणे हेच नव्हे तर उन्हाळ्यात त्यातील गाळ काढून ती अधिक खोल करायला हवीत ह्याविषयी सुद्धा चर्चा होऊ लागल्या. मुळगाव येथील कुंभारवाडीतील रहिवाश्यांनी ह्या चर्चेला पुढील रुप देत त्यांच्या गावातील बावखल खोल करण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु केले आहे. धीरज वर्तक, प्रशांत म्हात्रे आणि समस्त कुंभारवाडी नागरिकांचे ह्या निमित्ताने अभिनंदन! 

हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे आणि वसई परिसरातील बाकीचे नागरिक ह्यापासून प्रेरणा घेत आपली बावखले टिकवतील आणि पावसाळा सुरु होण्याआधी स्वच्छ / खोल करतील अशी आपण आशा आणि त्यासोबत कृतीही करूयात!


कुंभारवाडीतील ह्या उपक्रमाला खारीचा वाटा म्हणुन न्यु इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे काल प्रतीकात्मक श्रमदान करण्यात आलं त्याचे हे छायाचित्र!





शेवटी जाता जाता वसईतील जी पिढी आता तिशीच्या पलीकडे आहे त्यांच्या भावनिक आठवणी सुद्धा ह्या बावखलांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या विषयीची ही एक जुनी पोस्ट!

http://nes1988.blogspot.in/2010/07/blog-post_16.html 
 

२ टिप्पण्या:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...