मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

माझी दिनचर्या





मनात ठाम निर्धार करुन मी हिमालयाची त्या पायवाटीचा मार्ग धरला होता. बोचरे वारे, दूरवर दिसणारी हिमालयीन रानटी जनावरे ह्यांना न भीता मी शेवटी एकदाचा त्या महर्षींच्या गुहेसमोर पोहोचलो. माझ्या सुदैवानं काही वेळातच महर्षींची समाधी समाप्त झाली. 

स्मित हास्य करत महर्षी मला म्हणाले, " वत्सा, वसई क्षेत्री सर्व काही कुशल आहे ना ? 
मी - "हो महर्षी !"
महर्षी - "भोवताली इतके निर्बंध असताना तू इथंवर कसा काय येऊन पोहोचलास ?"
मी - "महर्षी,  मी स्वनिर्मित संकटात सापडलो आहे.  आपल्या मदतीसाठी इथंवर धाव घेतली आहे !"
इतक्यात टिंग असा आवाज येताच माझं लक्ष भ्रमणध्वनीकडं गेलं. 
महर्षी - "हा ध्वनी कसला?"
मी - (काहीशा अपराधी भावनेनं) - "माझ्या शनिवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टला लाईक आणि कमेंट आली आहे "
महर्षी (काहीसे प्रक्षुब्ध होऊन) :- "आपण इथल्या संवादाकडे लक्ष केंद्रित करुयात का ?"
मी - "हो महर्षीं. प्रमादाबद्दल क्षमा असावी"
महर्षी - "तुझी नक्की समस्या काय आहे ?"
मी - "हीच ती समस्या "
महर्षी - "नक्की समजेल असं बोलशील का "
मी - "कोणतेही काम एकाग्रतेनं करण्याची माझी क्षमता प्रत्येक दिवसाला कमी होत चालली आहे"
महर्षी - "हे असे का व्हावं ?"
मी - "मघाशी जे घडलं ते सदैव होत राहतं. हा भ्रमणध्वनी विविध संदेशांची सूचना देत राहतो आणि मी माझं मुख्य कामातील लक्ष गमावून बसतो !"
महर्षी - "ह्यावर उपाय काय असं तुला वाटतंय ?"
मी - "काही उपाय लागू पडतील असे मला वाटतंय, पण खात्री नाही"
महर्षी - "उदाहरणार्थ ?"
मी - "एक दररोजचं वेळापत्रक आखावे आणि त्यानुसार दिवस व्यतित करावा "

मान डोलावून संमती दर्शवित महर्षीनी मला अर्धा तास दिला.  महत्प्रयासाने मी खालील मजकूर नोंदविला 

पहाटे सूर्योदयाच्या किमान पंधरा मिनिटं आधी उठावं. ब्रश करुन एका प्रसन्न मनानं सूर्योदय पहावा. अशा ह्या प्रसन्न वेळी किमान दहा सूर्यनमस्कार, पाच उठाबशा आणि पाच सीटअप्स असा निसर्गाशी नातं जोडणारा व्यायाम करावं. सूर्यनमस्कार जसे जमतील तसे काढावेत. उगाचच त्यातील प्रत्येक स्थितीच्या अचूकतेविषयी साशंक होऊ नये. नाहीतर दुसऱ्या दिवसापासून हे सूर्यनमस्कार काढण्याची इच्छाशक्ती झपाट्यानं कमी होऊ शकते.  आपण अगदी तंदुरुस्त दिसावं असा स्वार्थी विचार करुन व्यायाम करु नयेत. आनंदी मनासाठी हा सकाळचा व्यायाम आपण करत आहोत ही भावना मनात ठेवावी. उठल्यापासून एका तासाच्या आत स्नान आटोपून घ्यावं. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सकाळच्या प्रत्येक क्षणाचा दर्जा, त्या क्षणातील तुमची एकाग्रता ह्यात कमालीची सुधारणा होते. स्नानानंतर पाठांतरशक्ती / इच्छाशक्तीनुसार मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्र पठण करावे. स्नानानंतर एक चषक धारोष्ण दूध प्राशन करावं. दूध प्राशन केल्यावर वाय फाय सुरु करावे पण ते केवळ कार्यालयीन ई - मेल्स तपासून पाहण्यासाठी. कार्यालयीन ई - मेल्समधील अगदी महत्वाच्या मेल्सना उत्तर द्यावं. बाकीच्यांचे वर्गीकरण करुन दिवसभरात त्यावर योग्य कार्यवाही करावी. ह्या नंतर शिरा, पोहे, उपमा असा गरमागरम नाश्ता घेत असताना दारी आलेल्या वर्तमानपत्रांचे वाचन करावे. ह्यातील मनाला क्लेशदायक बातम्या जसे की बेजबाबदार फटका मारुन पंतचे बाद होणे किंवा भारतीय गोलंदाज व फलंदाज ह्यांना एकत्रितपणे चांगली कामगिरी न करता येणे जमतील तितक्या टाळाव्यात. अग्रलेखाकडे नजर फिरवावी आणि न समजणारे तीन शब्द सापडल्यावर अग्रलेख वाचणे थांबवावे. नाश्ता आटोपल्यावर स्वयंपाकघरातील हिरव्यागार भाज्यांकडे लक्ष देऊन प्रसन्न व्हावं. ह्या क्षणी पंधरा मिनिटं सोशल मीडियाला बहाल करावीत पण ती केवळ वाचकाच्या भूमिकेत. कोणत्याही विषयावर आपले मतप्रदर्शन करणे प्रकर्षानं टाळावे. ह्यानंतर सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असल्यानं कार्यालयीन कामात शिरण्याची मानसिक तयारी करावी. शर्टाला इस्त्री करणे हा ह्या मानसिकेत शिरण्याचा जालीम उपाय आहे. लॅपटॉप, मोबाईल ही सर्व आयुधं विद्युतप्रभारीत करून ठेवावीत. पुढील नऊ तास फेसबुक लाईक, टिपण्णी, व्हाट्सअप चर्चा आणि ब्लॉग हिट्स संख्या ह्याकडे दुर्लक्ष करावे. रात्रौ नऊच्या आसपास कार्यालयीन कामं आटोपल्यावर जेवण आटोपून मगच मोबाईल हाती घ्यावा. जो काही धुमाकूळ, वादविवाद घालायचे असतील ते ह्यावेळी घालावेत. पार्श्वभूमीवर जुनी हिंदी गाणी सुरु ठेवावीत. रात्री दहा वाजता वाय फाय बंद करावे ! 

महर्षीनी त्या कागदावर नजर फिरवली आणि म्हणाले - "शुभस्य शीघ्रम !" 

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...