मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मेरी आवाज ही पहचान हैं


लता मंगेशकर! आयुष्यभर सदैव सोबत असलेल्या लतादीदी.  लहानपणी विविधभारतीवरील मंगलप्रभात हा कार्यक्रम ऐकत सकाळची सुरुवात व्हायची. त्यावेळी बऱ्याच वेळा लतादिदींच्या स्वर्गीय आवाजानं घरातील वातावरण मंगलमय होत असे. त्यातील काही  मोजकी गाणी सांगायची झाली तर 

गणराज रंगी नाचतो 

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 

भेटी लागी जीवा लागली से आस

विठ्ठल तो आला आला मला 

भावनांचा तु भुकेला रे मुरारी 

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला - पंडित नगरकर आणि लता मंगेशकर  

ह्यातील घनश्याम सुंदरा श्रीधरा हे गाणं तर सकाळच्या पावित्र्याला अगदी पुरेपूर शब्दांत सामावून घेणारं.  लताजींच्या त्या स्वर्गीय आवाजानं लहानपणी मनावर खूप खोलवर संस्कार होत गेले.  अनेक शतकांपासून चालत आलेल्या संस्कृतीचा आपण भाग आहोत ही भावना ही सकाळची भक्तिगीतं ऐकत दृढ होत गेली. ह्या गीतांनी मनाला दिलेल्या स्थिरतेचे वरदान अजूनही वेळोवेळी उपयोगी येते. 

घरगुती गणपतीसोबत अतूट नातं असणारी अनेक पिढ्यांतील मराठी बालमंडळी ! गणराज रंगी नाचतो ,  गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ह्या गाण्याचे सूर कानावर पडले की लहानपण कसं अगदी नाचत बागडत आपल्याजवळ येतं. त्या न विसरण्याजोग्या सात दिवसांच्या गणेशोत्सवात लतादीदी सदैव आपल्यासोबत राहिल्या, अजूनही राहतात आणि सदैव राहतील. 

मराठी मनाचा एक संस्कृतीमय कप्पा म्हणजे ज्ञानेश्वरी ! लतादिदींच्या आवाजातील ज्ञानेश्वरीतील रचना ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव! 

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले 

अजि सोनियाचा दिनु 

अरे अरे ज्ञाना झालासी पावन 

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा 

अवचिता परिमळू 

पैल तो गे काऊ 

पसायदान 

संभ्रमात पडलेल्या मनाला शांतीच्या भावनेची अनुभूती देणारी ह्या ज्ञानेश्वरांच्या कालातीत रचना ! ह्या रचनांचा अर्थ समजणं हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडील, पण लतादीदींच्या आवाजानं ह्या रचनांना सामान्य माणसांच्या हृदयात कायमचं बसवलं. 

त्या काळातील मराठी कुटुंबाचा अविभाज्य घटक असलेला रेडिओ आमच्या घरातही होता. सकाळी भक्तिगीतांनी वातावरण मंगलमय करणाऱ्या लतादीदी नंतर हिंदी गाण्यांच्या माध्यमातून वेगळ्या रुपात भेटायच्या. रात्री छायागीत मध्ये त्यांची गाणी ऐकताना स्वरांच्या माध्यमातून भावना कशा थेट हृदयापर्यंत पोहचू शकतात ह्याची पुरेपूर जाणीव होते. 

लतादीदींनी देशभक्तीपर काही अविस्मरणीय गीतं गायली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी "ऐ मेरे वतन के लोगों" हे  गीत सदैव प्रेरणादायक राहील.  त्यांच्या आवाजातील "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत" हे गाणं ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असा माणुस विरळाच ! "वंदे मातरम" हे ही एक संस्मरणीय देशभक्तीपर गीत ! भीमसेन जोशी रचित "मिले सूर मेरा तुम्हांरा" ह्या गाण्यात संपुर्ण देशाला एकत्र जोडण्याची ताकद आहे. ह्या गाण्यात लतादीदींनी सहगायकांसमवेत आपल्या स्वरांची जादू आपल्यासमोर साकार केली आहे. 

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!

श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ही देशभक्तीपर रचना दीदींच्या आवाजात ऐकून स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना ह्या काळात सुद्धा आपल्यापर्यंत अगदी यथार्थपणे पोहोचतात. 

लतादिदींनी जवळपास सात दशकं अनेक भाषांतून अविस्मरणीय गीतं गायली. त्याचा आढावा घेण्याची माझी कुवत नाही. त्यांनी एकल आणि पुरुष गायकांसोबत मिळून अनेक गाणी गायली. त्यातील माझी आवडती ही काही गीतं !

आयेगा आयेगा आयेगा आयेगा आनेवाला 

अजीब दास्तां हैं ये 

अल्लाह तेरो नाम 

फैली हुई हैं सपनों की बाहें 

आप की नजरों ने समझा प्यार के काबील मुझे 

लग जा गले के फिर ये रात 

तू जहाँ जहाँ चलेगा 

प्यार किया तो डरना क्या 

सीने में सुलगते हैं अरमान 

ये दिल और उनकी निगाहो के साये 

बीती ना बिताई रैना 

चलते  चलते युंही कोई मिल गया था 

इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा 

अपलम चपलम चपलायी रे 

आजा रे परदेसी 

हम चूप हैं के दिल सून रहें हैं 

लिखनेवाले ने लिख डाले 

चाँद फिर निकला मगर तुम ना आये 

तेरा जाना दिल के अरमानोका 

मोरा गोरा रंग ले ले 

मैं तो भूल चली बाबुल का देश 

दिल की नजर से ये बात क्या हैं 

कहीं दीप जलें कहीं दिल 

धीरे धीरे चल 

सरसे सरके सरकी चुनरिया 

नैना बरसे रिमझिम 

तुने ओ रंगीले कैसे जादू किया 

दो नैनो में आंसू बसे हैं 

आप यूं फासलों से चलते रहें 

ये रातें नयी पुरानी 

ये कहाँ आ गये हम 

जिया जले जाँ  जले 

खुद् से बातें करती रहती हैं 

ये शहर बडा अजनबी हैं 

अखेरचा हा तुला हा दंडवत 

मोगरा फुलला 
मी रात टाकली मी कात टाकली 
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 
विसरु नको श्रीरामा मला 
झुलतो बाई रास झुला 
सख्या रे घायाळ मी हरिणी 

ह्या गाण्यांची यादी न संपणारी आहे. ह्या गाण्यातीलच नव्हे तर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यातील प्रत्येक शब्द, सूर अगदी मनात साठवून ठेवावा असा! प्रणयाधीन नायिकेच्या प्रत्येक भावनेला अगदी पुरेपूर न्याय देण्याची जादू दिदींनी सर्वच गाण्यांत केली आहे.  

लतादिदींनी साधारणतः १९५० सालापासून आपल्या स्वरांची जादू संपूर्ण भारतदेशावरच नव्हे तर जगभर पसरवली.  संपूर्ण मनुष्यजातीच्या इतिहास भारतखंडातील अविस्मरणीय गायिका म्हणून लतादिदींचे नांव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. लतादीदी आज लौकिकार्थानं जरी आज आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून सदैव आपल्यात राहतील. आपण ह्या बाबतीत अगदी सुदैवी ठरलो. एका ईश्वरी अवताराचे प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. आपण हा संगीताचा हा अमुल्य ठेवा जर आपल्या पुढील पिढीला त्यांच्यात ह्या गीतांची आवड निर्माण करुन देऊ शकलो तर ही लतादिदींना खरी श्रद्धांजली ठरेल ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...