मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

जीवना कसा मी असा !


सद्यकाळात माणसं आपापल्या कोशात जाऊ लागली आहेत. माणसांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती पुर्वापार अस्तित्वात होत्याच. सध्या त्यात काहींची भर पडली आहे तर काही अस्तित्वातील प्रकारांना सद्यकालानं नवीन पैलू प्राप्त करुन दिले आहेत. 

आशावादी आणि निराशावादी हा पूर्वापार चालत आलेला माणसांच्या वर्गीकरणाचा प्रकार! सध्या आशावादींना आपली मनोवृत्ती कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत तर निराशावादींना आपल्या स्वभाववैशिष्ट्यांना अनुकूल असे वातावरण सापडलं असल्यानं ते निराशेच्या गर्तेत खोलवर जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आशावादी माणसांनी मनुष्यजातीच्या दृष्टिकोनातून पाहता एक अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी ती म्हणजे ही सकारात्मकता आपल्या भोवतालच्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांत पसरवायला हवी. ही सकारात्मकता पसरविताना समोरच्या माणसाचा विश्वास बसेल असे स्पष्टीकरण, अशी उदाहरणं द्यायला हवीत. मनुष्यजातीच्या बाबतीत सदैव चांगल्याच घटना घडतील असे नाही. मनुष्याचा इतिहास पाहता ह्याहून अधिक खडतर काळाला आपल्या पूर्वजांना सामोरे जावे लागले आहे; तेही तंत्रज्ञान इतके प्रगत नसताना. त्यावेळच्या माणसांना बहुदा जीवनाकडून सदैव आनंद अपेक्षित नव्हता. आपण मात्र सदैव आनंदी राहण्याची अपेक्षा करतो आणि तिथंच जीवन आपला वारंवार अपेक्षाभंग करतं. 

परत एकदा कोशात जाण्याकडं वळून माणसांच्या वर्गीकरणाचा एक नवीन प्रकार पाहुयात. पहिला प्रकार म्हणजे सदैव आपल्या भ्रमणध्वनीमध्ये / गॅझेटमध्ये गुंतून राहणारी, तिथे भेटणाऱ्या आभासी किंवा खऱ्या माणसांशीच जोडली जाणारी माणसं. ही माणसं अनुकूलतेच्या शोधात वेगवेगळ्या मालिका, चित्रपट धुंडाळत राहतात, किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या माणसांशीच संपर्क जोडत राहतात. ह्या विश्वातून प्रत्यक्ष जीवनात जो काही थोडा काळ ते येतात त्या वेळी ते कमीतकमी संवाद साधत असतात. ह्याउलट काही माणसांनी अजूनही स्वतःला ह्या मोहापासून दूर ठेवले आहे. प्रत्यक्ष जीवनातील वैविध्यपूर्ण माणसांसोबत संवाद साधणे किंवा आयुष्यातील खडतर प्रसंगाना स्वतःहून सामोरे जाणे असले प्रकार ही माणसे स्वखुशीने करत असतात. 

माणसांचा प्रकार कोणताही असो पण आपल्या नकळत आपल्या मेंदूत एक स्वतःविषयी आपल्याला कसं वाटत आहे / आपण कितपत आनंदी आहोत  ह्याचा एक निर्देशांक वावरत असतो. माणसं आपल्या अर्थाजनासाठी जो नोकरी व्यवसाय करतात त्यावेळी हा निर्देशांक बासनात गुंडाळून ठेवला जातो. दिवसातील ज्या क्षणी आपण त्या दिवशीची नोकरी व्यवसायाची आणि कौटुंबिक जबाबदारी आटपतो त्यावेळी हा स्वखुशीचा, आत्मसन्मानाचा निर्देशांक उसळी मारुन बाहेर येतो आणि माणसं ह्या निर्देशांकाच्या इच्छेनुसार वागू लागतात. ह्या अनुषंगानं माणसांचा एक नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे.  जीवन ज्यांना ह्या निर्देशांकाच्या मर्जीनुसार काही काळ व्यतीत करण्याची संधी देते अशी काही माणसं तर ज्यांना देत नाही ती उरलेली माणसं !

कोणत्याही कोशाचा अतिरेक वाईटच ! प्रत्येक दिवस आपल्याला आयुष्य नव्या पद्धतीनं जगण्याची संधी देत असतो. आपल्या मागील आयुष्याच्या जीवनपद्धतीला कुरवाळून बसण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण नव्या पद्धतीनं दैनंदिन जीवनाकडं पाहण्याचे कष्ट क्वचितच घेतो. 

मनुष्यांच्या जीवनात हल्ली जास्त ताणतणाव का निर्माण झाला आहे ह्याचा मला प्रश्न पडतो. पण बहुदा ह्याचं उत्तर सोपं असावं असं मला वाटत रहातं. मनुष्यांची संख्या तर वाढलीच आहे; त्याचबरोबर स्वतःविषयी भ्रामक आत्मसन्मानाच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. ह्या आत्मसन्मानाच्या कल्पना आपल्या सभोवतालच्या वास्तविक आणि आभासी जीवनात विशिष्ट लहरी सोडत राहतात. जेव्हा दोन भिन्न व्यक्तींच्या भिन्न ध्येयाने प्रेरित लहरी एकमेकांवर आदळतात तेव्हा तणावनिर्मिती होते. काही काळानंतर मनुष्यांचा अवास्तव वाढलेला आत्मसन्मान हीच मनुष्यांची सर्वात मोठी समस्या बनणार आहे! मला माझ्या एका ज्येष्ठ अमेरिकन सहकाऱ्याने दिलेला सल्ला मी वारंवार वापरतो. तो म्हणाला होता, "आदित्य, कधीकधी स्वतःकडे गांभीर्यानं पाहणं सोडून दे! आयुष्य सोपं होईल ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...