मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २८ मे, २०१८

आकाश पांघरुनी !!



मुंबईचं आपलं एक महत्त्व आहे, कोट्यावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या महानगराने उचलून धरली आहे. परंतु एका शांत गावातील शांत झोपेपासुन ह्या शहरातील लोक फार फार दुर गेली आहेत.

वसईतील काही भागात या शांत झोपेचा अनुभव आपल्याला अजूनही घेता येतो. दहा वाजता सर्वसाधारणतः सर्व काही सामसुम होते. एकदा का मानवनिर्मित विजेचे दिवे मालवले की निसर्ग आपल्या प्रभेची करामत दाखविण्यास सुरुवात करतो.  आकाशात ढगांसोबत लपंडाव खेळत असलेला द्वादशी त्रयोदशीचा चंद्र खिडकीतून आपली शितल किरणे तुमच्या डोळ्यांना सुखावून टाकतो.  आकाशातील चांदण्या सुद्धा स्पष्ट दिसत असतात. 

इतकी निरव शांतता असते की काही अंतरावरील जाणाऱ्या एकल्या वाहनाचा आवाज देखील या शांततेचा पूर्ण भंग करून जातो.  रात्री क्वचितच दीड वाजता वगैरे झोपमोड झाली तर कधीतरी   मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेले आणि बहुदा भारताच्या पूर्वेकडील भागात जाणारं विमान आकाशातुन जातं. आणि त्याचा तो आवाज संपूर्ण आसमंताला व्यापून टाकतो. आपण ह्या सर्व परिसर, नभ ह्याचा एक नगण्य हिस्सा आहोत आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार आपण बाळगू नये ह्याची जाणीव खरंतर हा रात्रीचा आसमंत करुन देत असतो. पण ह्या जाणिवेचा स्पर्श फक्त काहींच्याच मनाला होतो. 

सध्या एसटी बंद पडली आहे किंवा शेवटच्या घटका मोजत आहे. नाहीतर पूर्वी साडेबारा, सव्वा अशा वेळी अत्यंत नियमाने धावणाऱ्या होळी एस. टी. बसेसचा आवाजसुद्धा यायचा.  

कधीतरी एखादं भटकं  कुत्रं आजूबाजूच्या मोकळ्या वाडीत फिरत जातं. त्याच्या पावलांचा आवाज स्पष्टपणे येत रहातो. एखादा रात्रकिडा सतत किर्रर्र आवाज करीत राहतो. कधीतरी एखादा सुका नारळ गॅरेजच्या पत्र्यावर जोरात आदळतो आणि दचकायला होतं. मे महिन्यात अधून-मधून मग आंबे पडण्याचा आवाज येत राहतो. ह्या परिसरात ज्यांचं बालपण गेलं आहे त्या बहुतेक सर्वांच्या लहानपणी भल्या पहाटे उठुन आंबे गोळा करण्याच्या मनोहर आठवणी आहेत.  आणि  जेव्हा-केव्हा  असे अंगणात झाडाखाली पडलेले  अनेक आंबे दिसतात  त्यावेळी  या मधुर आठवणी  जाग्या होतात. काल युरोपात फिरुन आलेले बाबाकाका आले होते. युरोपच्या आठवणीपेक्षा लहानपणी गोळा केलेल्या आंब्यांच्या आठवणी सांगण्यात त्यांना खूप रस होता!  स्वतः शोधून काढलेल्या  आणि  लपवून ठेवून  बेताबेताने खाल्लेल्या  ह्या आंब्यांच्या आठवणी  विसरणार तरी कसे !! मे महिन्याच्या शेवटी लाईट नियमानं जाते आणि मग अंगणातील काजव्यांची रांग उगाचच मनाला भावुक बनवून जाते. जेव्हा पहिला पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो त्यावेळी एखाद्या रात्री अचानक जमिनीतुन निघालेली पाखरं दिसेल त्या प्रकाशाच्या स्त्रोताच्या दिशेनं झेप घेतात आणि आपलं क्षणभराचं आयुष्य संपवुन टाकतात!

 या रात्रीच्या  शांततेमध्ये  काही अंतरावर असलेल्या  समुद्राची गाजसुद्धा  ऐकायला येते.  ह्या आवाजावरून  पाऊस किती दूर आहे  म्हणजे किती दिवसावर आहे ह्याचा अंदाज अण्णा वर्तवितात.  त्याचप्रमाणे  एखादा  ढग  ज्यावेळी आपल्या जलधारांनी  भूमातेला तृप्त करीत असतो त्यावेळी  त्याच्या सरींचा दुरवरुन आपल्यापर्यंत येणारा  आवाजसुद्धा  या शांततेत  स्पष्ट  ऐकू येतो.  इतकेच काय तर सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या  वसई स्टेशनवरुन जाणाऱ्या गाडीचा  आवाजसुद्धा  हिवाळ्यात  अगदी स्पष्टपणे  येतो.  

पाच वाजता रमेदी चर्चचा घंटानाद होतो आणि एका नवीन दिवसाचा आरंभ होतो! लहानपणापासुन सकाळ आणि ह्या घंटानादेची मनात एक गाठ बसुन गेली आहे! ही घंटा झाली की परिसरातील कुत्री भूकू लागतात , झाडावरील पक्षी ओरडू लागतात. 

हे सर्व  काही अगदी  मनात अलगद जपून ठेवावं असं! आपल्या  आधुनिकीकरणाच्या  हव्यासापायी  हे सर्व काही हळूहळू  अस्तंगत होत चालला आहे ही एक खंत आणि वाहतुकीच्या पुरेश्या सोयीअभावी इथुन दररोज मुंबईला जाता येत नाही ही दुसरी मोठी खंत !!

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...