मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १० जून, २०१६

मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघात


मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा २००२ सालापासुन कार्यान्वित झालेला देशातील पहिला सहा मार्गिकेचा द्रुतगती महामार्ग आहे. ह्या महामार्गावर ठिकठिकाणी टोल गोळा केला जातो. ह्या टोलची एकंदरीत रक्कम किती ह्याविषयी एकंदरीत गुप्तता पाळण्याचेच धोरण दिसुन येतं. ह्या महामार्गाने मुंबई पुणे प्रवासाचे अंतर हे सरासरी दोन तासावर आणलं आहे असं म्हणता येईल.

ह्या महामार्गावरील टोलच्या उत्पन्नामुळे शासनासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग ठरतो. पण ह्या महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केल्या गेल्या आहेत कि नाहीत हे पाहणं महत्वाचं ठरतं. ह्या महामार्गावरील कमाल वेगमर्यादा ८० किमी आहे. ही वेगमर्यादा जगातील बहुतांशी महामार्गांवरील वेगमर्यादेपेक्षा कमी आहे. परंतु ह्या महामार्गावरील चालक ह्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचच आढळून येतं. आणि त्यामुळेच ह्या महामार्गावरील मृत्यूंचे प्रमाण हे जागतिक संख्यावारीच्या मानाने बरंच जास्त असल्याचं आढळून येतं.

१) ह्या महामार्गावरील चालकांची इतक्या वेगाने वाहन चालविण्याची पात्रता - अशिक्षित चालक आपल्या अज्ञानाने बाकीच्या लोकांच्या जीवनाला धोका पोहोचवतात. इतक्या वेगात वाहन चालवत असताना लेन कशा प्रकारे बदलावी, बिघाड झालेलं वाहन कोठे थांबवायचे ह्याविषयी योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. Blind Spot ह्या संकल्पनेविषयीचे अज्ञान  सुद्धा बऱ्याच चालकांत दिसुन येतं !  
शासनाकडून अपेक्षा - ह्या महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चालक परवान्याचे (License) निर्माण. ह्या महामार्गावर वाहन चालविण्यासाठी प्रत्येक चालकाकडे हे License असणे आवश्यक! 

२) महामार्गावरील इतर नियमांविषयीचे ज्ञान - इतक्या वेगाने वाहन चालवायचं असेल तर आपलं वाहन योग्य स्थितीत आहे किंवा नाही ह्याची तपासणी करुन घेणे. नाहीतर इतक्या वेगाने वाहन चालवत असताना गाडीचा टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढीस लागते. 

शासनाकडून अपेक्षा - ह्या महामार्गावर येणारं प्रत्येक वाहनाचा नमुद केलेल्या निकषावरील maintenance गेल्या सहा महिन्यात केला गेला असणे आवश्यक! त्याशिवाय वाहन ह्या महामार्गावर येऊ शकत नाही!



३) वेगमर्यादा / चालकाची शारीरिक परिस्थिती - पुरेशी विश्रांती न घेता मोठी वाहने वेगाने चालविणारे चालक - 
शासनाकडून अपेक्षा - मोठ्या मालवाहू ट्रक, बस ह्यासारखी वाहने चालविणाऱ्या चालकाची ड्युटी किती तास झाली आहे ह्याचा रेकोर्ड त्यांच्या मालकाने नमूद करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी इथली वेगमर्यादा ६० वर आणावी. वेगमर्यादा भंग करणाऱ्या चालकांना जबरी दंड बसवला जावा त्यांचं License किमान सहा महिने रद्द केलं जावं. 



४) महामार्गाची देखभाल - पावसाळ्यात दरड कोसळुन अपघात होतो अशा वेळी पूर्वकाळजी घेऊन महामार्गाच्या दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी प्रतिबंधक उपाय योजणे.
काही अपघात अतिवेगाने जाणारं वाहन दोन दिशांनी जाणाऱ्या मार्गीकांमधील Divider तोडून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या वाहनांशी Head on collision होऊन होतात. हे divider अगदी Best-in-the-class असायला हवेत.
शासनाकडून अपेक्षा -क्रमांक चार मधील सर्व मुद्दे ही शासनाची जबाबदारी! 

५) अपघात उपचार  केंद्र -

शासनाकडून अपेक्षा - योग्य अंतरावर Trauma Care Center ची स्थापना 

मेहनतीने आपलं जीवन जगणाऱ्या कित्येक मध्यमवर्गीयांचा जीव ह्या एक्प्रेस वे ने गेल्या काही वर्षात घेतला आहे. ह्यातील बहुतांशी अपघात किमान खबरदारीच्या उपायांनी वाचू शकले असते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण ह्या बाबतीत पुढाकार घेऊन हे किमान प्रतिबंधक उपाय तातडीने लागु करावेत ही कळकळीची विनंती!



मागच्याच आठवड्यात पुन्हा एकदा ह्या महामार्गावर भीषण अपघात होऊन १६ जणांचा जीव गेला. ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे ह्यांनी ह्या बाबतीत शासनाकडे जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना पाठींबा म्हणून मी त्यांना वरील मुद्द्यांचे पत्र लिहित आहे. तुम्हांला जर पटलं तर तुम्ही सुद्धा त्यांना ponkshesharad@gmail.com वर पत्र लिहा.

1 टिप्पणी:

  1. आपण सुचविलेले सगळेच उपाय योग्य आहेत. पण त्याची अंमल बजावणी हि फार मोठी समस्या आहे. खरतर स्वय शिस्त हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. पण आमच्याकडे अशी शिस्त आहे कुणाला ? बर्याचदा माझ्यासारखा सुशिक्षित मनीशी बेशिस्त होतो.

    उत्तर द्याहटवा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...