मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

योग्य - अयोग्य संभ्रम !!

मध्यमवर्गीय माणसे विशेष करून मराठी मध्यमवर्गीय माणसे आपल्या आयुष्यातील जो काही वेळ विचार करण्यात घालवितात त्यातील बराचसा भाग भोवताली घडणाऱ्या घटना योग्य किंवा अयोग्य आहेत ह्याविषयी विचार करण्यात व्यतित करत असावेत असा माझा संशय आहे.

लहानपणी मोठ्या लोकांकडून आपले लाड करून घ्यावेत हे आपल्या नजरेतून योग्य असते. जस जसं आपण मोठे होत जातो तसतसं भोवतालची परिस्थिती आपल्याला घडवत जाते. 

काही जणांच्या बाबतीत जबाबदारी अगदी लवकर अंगावर पडते आणि मग स्वकेंद्री दृष्टीकोन बदलावा लागतो. अशा व्यक्तींना मनातून आपल्याला स्वच्छंदी वागता यावं हे योग्य असे वाटत असतं पण परिस्थितीमुळे आपण जबाबदारी घ्यावी हे योग्य आहे अशी लवचिकता ते दाखवितात. म्हणजे ह्या उदाहरणात मनातील योग्यपणाची व्याख्या आणि व्यावहारिक योग्यपणाची व्याख्या ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी बनतात. 

काही जणांच्या बाबतीत अगदी बरेच मोठे होईपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी पडतच नाही आणि त्यामुळे हा स्वकेंद्री दृष्टीकोन बराचसा कायम राहतो. मनातील योग्यपणाची व्याख्या आणि व्यावहारिक योग्यपणाची व्याख्या सारखी ठेवण्याची चैन अशा व्यक्तींना परवडू शकते. 

विद्यार्थीदशेतील जीवनप्रवासात आईवडिलांच्या योग्यपणाची व्याख्या म्हणजे मुलाने खूप अभ्यास करावा अशी असू शकते आणि सर्वच मुलांना ही अपेक्षा योग्य आहे हे मान्य नसतं. आणि त्यामुळे मग ह्या अवस्थेत आईबाप आणि मुलं ह्यांच्यात खटके वाजण्याची शक्यता वाढीस लागते. 

आयुष्यातील ह्या स्थितीपर्यंत योग्य आणि अयोग्यतेच्या व्याख्या ह्या मेंदूतून नियंत्रित केल्या गेलेल्या असतात. मग अचानक असं वय येतं जिथे माणसं प्रेमात पडण्याची शक्यता वाढीस लागते. आणि मग मेंदूने सांगितलेली योग्य - अयोग्यतेची व्याख्या धुडकावून देणारी अजून एक भावना निर्माण होते. ह्या भावनेस प्रेम असे संबोधून ती हृदयातून निर्माण होत असावी अशी पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. काही लोकांच्या बाबतीत ही प्रेमभावना मेंदूच्या योग्य अयोग्यतेच्या व्याख्येला आवश्यक काळापर्यंत थोपवून ठेवते आणि असे लोक मग प्रेमविवाह करतात. 

विवाहानंतर परिस्थिती काहीशी क्लिष्ट बनते. आपल्यासोबत चोवीस तास वावरणारी अशी एक व्यक्ती येते जिने आपल्यासोबत योग्य अयोग्यतेच्या आपल्या व्याख्या आणल्या असतात. म्हणजे अशावेळी नवऱ्याच्या मेंदूतून येणारी आणि हृदयातून येणारी योग्य अयोग्यतेचि व्याख्या अशा दोन व्याख्या आणि पत्नीने आणलेल्या अजून दोन व्याख्या अशा एकूण चार व्याख्या एकत्र नांदू लागतात. ह्या एकूण चार व्याख्यांचा सारासार अभ्यास करून नव्याने जोडप्यासाठीच्या म्हणून पुन्हा दोन एकत्रित नवीन व्याख्या बनवायची गरज असते. पण बहुदा ह्या विषयावर आपण कधीच विचार करत नाही आणि मग दोन व्याख्यांची एक जोडी एका बाजूला आणि दुसरी जोडी दुसऱ्या बाजूला असा धमाल सामना चालू होतो. एकत्र कुटुंबात तर अन्य सदस्यांच्या ह्या व्याख्यांच्या आवृत्या आजूबाजूला नांदत राहतात आणि मग परिस्थितीत अजून मनोरंजकता वाढीस लागते. 

कालांतराने काही विवाहित जोडपी मग घरात शांतता ठेवेल ते निर्णय योग्य अशी समजुतीची भुमिका घेतात आणि आपल्या मेंदू / हृदयाच्या योग्य अयोग्यतेच्या व्याख्या बासनात ठेवून देतात. 

आतापर्यंत वर्णन केलेला संभ्रम वैयक्तिक आयुष्यातील! सामाजिक जीवनात आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांविषयी सुद्धा योग्य अयोग्यतेविषयी प्रत्येकाची आपली अशी मते असतात. आणि आपली मते सार्वजनिक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवणे योग्य की अयोग्य ह्या विषयी सुद्धा प्रत्येकाची मते असतात. काळ जसजसा पुढे जातो तसतशी लोक बदलत जातात, योग्य अयोग्यतेच्या व्याख्या त्या त्या समाजात बदलत जातात. कोणत्याही समाजात ज्या गटाने हे बदल लवकर अंगिकारले असा एक वर्ग आणि जे अजूनही जुन्या विचारांना कवटाळून बसलेले आहेत असा एक वर्ग एकत्र नांदत असतात. हे गट नांदत असतात पण सुखाने नांदत असतात असे आपण म्हणू शकत नाहीत. अशावेळी ज्यांनी जुन्या विचारांना धरून ठेवले आहेत अशा वर्गाचा बऱ्याच वेळा नव्यांनी अंगिकारलेल्या जीवन पद्धतीविषयी संताप होत असतो. आणि सार्वजनिक समारंभात अशांचा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता कायम अस्तित्वात असते. 

आता जाता जाता थोडं विषयांतर! आपण बाकींच्यापेक्षा काहीसे थोडे वेगळे आहोत अशी भावना सर्वांच्या मनात असते. माझ्या मनात सुद्धा आहे. हे ज्या वेळी मला जाणवलं त्यावेळी मग मी मनातल्या मनात बराच त्रागा केला. यॊग्य अयोग्यतेविषयी बराच उहापोह केला. मग मला जाणवलं की एका विशिष्ट समाजातील , ठिकाणातील व्यक्तींची एक काहीशी सारख्या प्रमाणातील विचारधारणा असते. फरक असतो पण तो दूरवरून पाहता अगदी नगण्य वाटावा असा! म्हणजे एखादा विचार करतो तो ६५.९ च्या पद्धतीने तर दुसरा करतो ६५.८५५ च्या पद्धतीने तर तिसरा ६५.६५ ने! हे सगळे एकमेकाला बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे समजतात ते ०.००५ च्या किंवा ०.२५ वैचारिक वेगळ्या पद्धतीने! पण जो ७५च्या पद्धतीने विचार करणारा असतो तो मात्र ह्या सर्वांना एकाच पातळीवर गणत असतो. आणि ह्यातील प्रत्येकाला वाटणारे वेगळेपण कसे अयोग्य आहे अशी भावना जोपासत असतो! 

शेवटी यॊग्य अयोग्यतेच्या संभ्रमात कितपत पडून राहावं हा ज्याचा त्याचा निर्णय!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...