मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

अगतिक


गेल्या दोन दिवसांत मन सुन्न करणाऱ्या दोन घटना घडल्या. पन्नाशीतील एक हसतमुख, उत्साही मित्र अगदी अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं गेला. त्यानंतर काल एका शासकीय  कार्यक्रमात ११ जण उष्माघातामुळं मृत्युमुखी पडले. 

मध्यमवर्गीय पुरुष हृदयविकाराच्या धक्क्यानं अचानक मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक बांधिलकी पार पडतांना स्वतःकडे कदाचित दुर्लक्ष होत असावं. स्त्रियांना नैसर्गिक कारणांमुळं बऱ्याच कालावधीपर्यंत  हृदयविकाराच्या धक्क्यापासून उपजत संरक्षण मिळतं असं पत्नी म्हणाली. इथं काही महत्वाचे मुद्दे 

१.  कुटुंबाचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असं कर्त्या पुरुषाला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु कुटुंबासाठी आपलं अस्तित्व त्याहून महत्वाचं आहे. 

२. प्रत्येकाची शरीररचना, क्षमता वेगवेगळी असते. आपल्या मर्यादा वेळीच ओळखायला हव्यात. नाही म्हणायला शिका. आपले मित्र, नातेवाईक तुमच्यावर रागावतील. पण त्यांना शांतपणे मला आरामाची गरज आहे हे सांगा. मी हे वारंवार करतो. 

३. शरीर वेळोवेळी आपल्याला संदेश देत राहतं. त्याकडं लक्ष द्या. 

४. जर का आपल्याला काही त्रास होत असेल तर आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे त्याची जाणीव करून द्या.  आपल्याला आरामाची गरज असेल तर परिवारातील सदस्यांना ते स्पष्ट सांगा. 

५. तेलकट, तिखट, मीठ अधिक असलेल्या पदार्थांना कटाक्षानं टाळा. जिभेवर नियंत्रण ठेवा. 

आता वळूयात ते कालच्या दुर्घटनेकडं. 

१. हा समारंभ भर दुपारी उघड्या मैदानात दीड वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. लाखो लोकांना  ह्या समारंभासाठी बहुदा ट्रकमधून आणण्यात आलं होतं. 

२. ही लोक रात्री कुठं राहिली, त्यांना सकाळी काही खायला देण्यात आलं होतं की नाही ह्याचा अंदाज नाही. 

३. दीड वाजता समारंभ संपल्यानंतर इतक्या सगळ्या लोकांना तिथून बाहेर पडायला अजून एक - दीड तास लागला. इतक्या रखरखत्या उन्हांत ह्या लोकांना पुरेसं पाणी मिळालं की नाही'ह्याचा अंदाज नाही. 

ही लोक स्वतःहून तर नक्कीच आली नसणार. केवळ पैशाची अगतिकता ह्या लोकांना ह्या समारंभात घेऊन आली असणार. व्यासपीठावरील लोकांनी फक्त एकच विचार करायला हवा होता की मी माझ्या आईवडिलांना, पत्नी, मुलांना ह्या उन्हात बसविले असते का? लाखोंचा समुदाय आपल्याला कशासाठी हवा आहे ? ह्या मृत्युमुखी पडलेल्या बिचाऱ्या जीवांच्या नातेवाईकांना मदत देऊन काय साध्य होणार आहे?

सर्वपक्षीय नेत्यांना एकच कळकळीची विनंती - "तुम्ही शपथ घ्या की ह्यापुढं अशा मोठ्या सभांचे आयोजन करण्याचा अट्टाहास मी धरणार नाही !" 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...