मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

दो आँखें बारह हाथ आणि शांताराम

शनिवारी रात्री लोकसभा वाहिनीवर दो आँखें बारह हाथ हा १९५७ सालचा व्ही. शांताराम यांचा गाजलेला चित्रपट पाहण्याचा योग आला. ह्यात योग येण्यासारखं काही विशेष असले प्रश्न मनात उपस्थित होऊन देऊ नकात ! हा चित्रपट तज्ञ मंडळींसोबत पाहत असल्यानं काही वेगळी माहिती सुद्धा मिळाली, त्यामुळं चित्रपटाची लज्जत अजुनच वाढली! 

चित्रपटाचं शीर्षक "दो आँखें बारह हाथ" च का ह्यावर मिनिटभर चर्चा झाली! मोठ्या आईनं हा चित्रपट १९५७ साली पाहिला असल्यानं ह्या चित्रपटातील अट्टल गुन्हेगारांची संख्या किती ह्याबाबतीत तिच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. पण मग बारह हाथ वरुन गुन्हेगार सहाच असावेत असा निष्कर्ष तिनं काढला ! माझं मन क्षणभर कार्यालयीन कामकाजात गेलं. शांताराम व्यवस्थापक आणि सहाजण  म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ! पण व्यवस्थापकानं केवळ डोळयांची भुमिका बजावता कामा नये त्यानं Hands-on असायला हवं ! त्याला प्रोग्रॅमिंग सुद्धा करता यायला हवं. हा विचार मनात आलाच होता.  पण चित्रपटात नंतर शांताराम प्रत्यक्ष स्वतः कामासाठी ह्या सहाजणांसोबत उतरतो. त्यावेळी चित्रपटाचं शीर्षक दो आँखें चौदा हाथ असायला हवं होतं असा मनात विचार आलाच !

ह्या सहा बेरड गुन्हेगारांच्या मानसिकेत बदल घडविण्याचा निर्धार व्ही. शांताराम आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करतात. आपल्या अधिकाऱ्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांची परवानगी घेऊन एका ओसाड भागात ह्या सहा जणांना घेऊन येतात. मग सुरु होतो तो एक मोठा प्रवास ! ह्या गुन्हेगारांच्या सवयी सहजासहजी बदलणाऱ्या नसतात! परंतु माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वेळोवेळी शांताराम त्यांना जाणवुन देत राहतात. कुठंतरी ह्या बाह्यरूपी पाषाणहृदयी वाटणाऱ्या बेरड गुन्हेगारांच्या मनात ओलावा निर्माण होत जातो. चित्रपटात मग संध्या प्रवेश करते. 

हा चित्रपट १९५७ सालचा ! शांताराम ह्यांचा जन्म १९०१ सालचा ! म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं वय ५५ च्या आसपास असावं ! पण चित्रपटातील त्यांच्या रंगरुपावरून ते खुप तरुण वाटत राहतात! शांताराम ह्यांनी एकंदरीत तीन लग्न केली ही माहिती मला काल कळली ! त्यांच्या प्रथम पत्नी विमलाबाई ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी, जयश्री सौहृदाचे संबंध कायम ठेवले. १९५० ते १९६० कालावधीत शांताराम आणि संध्या ह्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि कालांतरानं विवाहबद्ध झाले. संध्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होते ! विमलाबाई ह्यांनी संध्या हिच्याशी सुद्धा आयुष्यभर चांगले संबंध ठेवले ! ही सारी माहिती माहितीमायाजालावरुन साभार ! 

चित्रपटातील गाणी मोजकी पण सुरेख! 

सैंया झूठों का बड़ा सरताज निकला

ह्या गाण्यात वाद्य वाजवत जाणारी संध्या - आणि तिच्या मागं वाजत जाणारं ते छोटेसे शानदार वाद्य - ताशा ! हे पाहुन मोठी आईने अजुन आठवणी काढल्या. प्रकाशमामाला हा असा ताशा आणला होता. तिचे काका शांताराम ह्यांच्या अभिनयाचे मोठे चाहते होते वगैरे ! संध्या मोठी धीराची मुलगी ! इतक्या ओसाड भागातुन खेळणी विकायला जाताना तिला भय हा प्रकार माहिती नव्हता. ह्या बेरड गुन्हेगारांचा खट्याळपणा जागृत झाल्यावर ते तिची चेष्टामस्करी करीत. पण ही धीट मुलगी त्यांचा चांगलाच समाचार घेई ! 

ऐ मालिक तेरे बंदे हम 

हे एक अत्यंत अर्थपूर्ण गाणं !  

हे सर्वशक्तिमाना ! आयुष्यातील आमच्या सर्व चुका माफ कर ! आमच्याकडुन चांगली सत्कर्मे घडोत, आमचा जीवनप्रवास प्रामाणिकतेच्या मार्गानं होवो ! ज्या वेळी सर्व काही वाईट घडत असतं, आमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो अशावेळी तुच आमच्या मदतीला धावून येतोस आणि आमच्या जीवनातील अंधःकार नाहीसा करतोस ! मनुष्याच्या अंगी अनेक कमतरता आहेत; त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक दुःख निर्माण होतात! पण तु ही सारी दुःख दूर करतोस ! सध्याच्या करोनाच्या काळात अंगी धीर येण्यासाठी हे एक उत्तम गाणे ! 

संध्याने ह्या चित्रपटात आणि नवरंग मध्ये अत्यंत सुरेख नाच केलेत. परंतु ह्या काठिण्यपूर्ण नाचांमुळं तिला नंतर पाठीचा त्रास जडला ही जाणकारांनी दिलेली माहिती ! शांताराम ह्यांचं आडनाव कठीण असल्यानं त्यांनी व्ही शांताराम असं सुटसुटीत नाव स्वीकारलं ! पहिल्या बायकोपासुन चार आणि दुसरी बायको जयश्री हिच्यापासुन तीन अशी एकूण सात अपत्यं होती. संध्यानं सर्वांना आपलीच मुलं मानलं ! सध्या संध्या आपल्या मुलांच्या आधाराने जीवन व्यतित करत आहे ही माहिती कळली ! 

पुढं चित्रपटात मंडईतील भाजीविक्रेत्याला ह्या नव्या भाजीउत्पादकांपासुन स्पर्धेचं भय वाटु लागतं. खरंतर त्या मंडईतील दलालाचा समाचार घेण्यास ही मंडळी समर्थ होती! परंतु आपण कोणावरही हात उगारणार नाही ह्या शांताराम ह्यांना दिलेल्या वचनामुळं ते मुकाट्यानं मार सहन करतात. नंतर ह्याच दलालाच्या नीच कृतीमुळं शांताराम एका बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. परंतु ही मंडळी त्यांचा वारसा चालविण्याचा निर्धार व्यक्त करतात ! आणि आकाशातुन पाहणाऱ्या शांताराम ह्यांच्या दोन डोळ्यांच्या साक्षीनं चित्रपट संपतो ! 

ह्या काळातील जीवनातील साधेपणा त्याकाळातील चित्रपटांत सुद्धा उतरला आहे. साधी सरळ कथा, नितांत सुंदर अभिनय करणारे कलाकार, अर्थपुर्ण गाणी, जीवन उत्कटतेने जगणारी चित्रपटातील पात्रं ह्यामुळं हा चित्रपट प्रेक्षणीय बनतो ! मान हलवत, नजर डोळ्याच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात वेगानं हलविणारी संध्या लक्षात राहिली. पुर्वीच्या छायागीतमध्ये वारंवार प्रक्षेपित होणारं "आधा हैं चंद्रमा रात आधी " हे गाणं सुद्धा आठवलं ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...