मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

२०२१ - दहावी बारावी परीक्षा

 


ह्या आठवड्यातील दोन घटना !  

१) मुलाच्या ११ च्या प्रवेशासाठी मुंबईला फेरी झाली.  ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची तयारी संबंधितांनी का दाखवली नाही ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जिद्द मी दाखवत नाही. त्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तिथलं वातावरण काहीसं असुरक्षित होतं. अधिकृत कागदपत्रं अगदी मोकळेपणानं हाताळली जात होती. सुरक्षित अंतर बाळगण्याचं भान कोणाला राहत नव्हतं. एक दोन मुलींनी तर बोलताना मास्क काढला होता. 

२) काल एका मित्राशी बोलणं झालं. त्याचा मुलगा आणि तो पवईला JEE Mains परीक्षेसाठी जाऊन आले होते. सर्वसामान्य लोकांसाठी लोकल बंद असल्यानं हल्ली रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. परीक्षार्थींना लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्यानं त्या दोघांनी हा पर्याय स्वीकारला. अंधेरी ते पवई कार (बहुदा उबेर / ओला ) केली. इतक्या प्रयत्नानंतर त्याचा मुलगा आयुष्याचं भवितव्य ठरविणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला. त्यानं साधारणतः तीन - चार तास पुर्णपणे अनोळखी मुलांच्या सानिध्यात घालवले. त्या भयाचं दडपण घ्यायचं की इतक्या महत्वाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं ह्या द्विधा मनःस्थितीत तो नक्कीच सापडला असणार !

JEE Mains परीक्षा तुलनेनं कमी विद्यार्थी देत असणार. ह्या वर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी काही बदल घडवुन आणण्याची वेळ निघुन गेली आहे. पण २०२१ साली जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेला बसणार आहेत त्यांच्या मनःस्थितीचा कोणी विचार करेल का? त्यांना किमान दोन मुद्द्यांवर अधिकृत यंत्रणा सुस्पष्टता देऊन त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करु शकतात. 

१) परीक्षेची तारीख जाहीर करणे - १२ परीक्षा  १ मे २०२१ ला आणि १० वी परीक्षा १५ मे २०२१ ला सुरु होतील. (तारखा केवळ उदाहरणासाठी !)  अशी घोषणा शिक्षणखात्यानं आताच करायला हवी !

२) दहावी - बारावी परीक्षा पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होतील. विद्यार्थी घरुन परीक्षा देऊ शकतील. परीक्षा "मुक्त पुस्तक संचार" (Open Book) पद्धतीने आयोजित केल्या जातील. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट वगैरे देऊन त्यांना परीक्षा देण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

घरुन ऑनलाईन परीक्षा आणि ती सुद्धा "मुक्त पुस्तक संचार" पद्धतीनं ! आपल्या भुवया नक्कीच उंचावल्या गेल्या असणार !ही नक्कीच आदर्श परीक्षा व्यवस्था नसणार ! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच ह्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यांना आधीच योग्य मार्गदर्शन मिळत नाही; यंदाच्या वर्षी  त्यात अधिक अडचणींचा मुकाबला करावा लागणार ! सर्व काही मान्य ! 

पण लक्षात ठेवा एका बाजुला ह्या सर्व अडचणी / ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी आणि दुसऱ्या बाजुला ह्या भावी तरुण पिढीची सुरक्षितता ! ह्या दोन पर्यायांची आपण तुलना करत आहोत. आपण एका अभुतपुर्व परिस्थितीत वावरत आहोत. परीक्षापद्धतीतील परिपुर्णतेपेक्षा माझी पसंती केव्हाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच राहील ! हवं तर टक्के देण्याऐवजी ग्रेड्स द्या ! ९० च्या वर A+ , ७५ च्या वर A, ६० च्या  वर B वगैरे ! म्हणजे कदाचित एकेक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कदाचित कमी होईल ! 

वरील विचार परिपुर्ण आहेत असा माझा दावा नाही !  परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संबंधितांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि त्या दिशेनं पावलं उचलावीत ! आपल्या नागरिकांचं जीवन आपण ईश्वराच्या हवाली करुनच चालत आहोत ! त्याबाबत असणारी सरकारची अपरिहार्यता आपण समजु शकतो पण आपल्या भावी पिढीच्या स्वास्थ्याची आपण पुर्ण जबाबदारी उचलायला हवी ! 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...