मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

अभिव्यक्ती


एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीच्या प्रमाणामध्ये वयानुसार काही वेळा बदल होताना आपणास आढळतो. माझ्या बाबतीत सुद्धा असं झालं असावं असं मला माझ्या जवळच्या लोकांच्या प्रतिक्रियेवरुन जाणवतं. अगदी अबोल असणारा आदित्य गेल्या काही वर्षात खूपच बोलायला अथवा लिहायला लागला असं ज्यांनी मला लहानपणापासून जवळून पाहिले आहे ती लोक म्हणतात. 

स्वतःकडं निरपेक्ष वृत्तीने पाहण्याची क्षमता विकसित व्हायला हवी हे हल्ली मला उमजलं आहे. ज्यात आपलं अगदी जवळून परीक्षण होईल असे वैयक्तिक अथवा व्यावसायिक अनेक अनुभव आपल्या आयुष्यात वयोमानपरत्वे  येत राहतात. यातील प्रत्येक अनुभवात आपण आणि त्या अनुभवात ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत अशा अनेक व्यक्ती गुंतल्या असतात. यामधील प्रत्येक व्यक्तीचा आणि आपला त्या अनुभवापासून एक विशिष्ट निर्णय अपेक्षित असतो. वेगवेगळ्या व्यक्तींचे अपेक्षित निर्णय वेगवेगळे असले तरी शेवटी प्रसंग आणि त्याचा निर्णय मात्र एकच असतो.  

त्यामुळे होतं काय की ह्या प्रसंगानंतर ज्यांच्या अपेक्षेनुसार निर्णय लागला त्या व्यक्ती त्या प्रसंगाच्या मधुर स्मृती बरोबर ठेवून जातात. परंतु ज्या व्यक्तींच्या अपेक्षेनुसार त्या प्रसंगाचे निर्णय लागत नाही त्या व्यक्ती काहीशा खट्टू होतात.  त्या प्रसंगात सहभागी असलेल्या बाकीच्या लोकांना त्या व्यक्ती त्या विशिष्ट प्रसंगातील आपल्या अनुभवानुसार प्रतिक्रिया देतात. या प्रतिक्रियांना आपण खोलात जाऊन पाहिले असता त्यातील काही प्रतिक्रिया त्या प्रसंगात सहभागी असलेल्या घटकांविषयी असतात तर काही प्रतिक्रिया त्या प्रसंगातील विविध व्यक्तींनी दर्शविलेल्या स्वभाववैशिष्टयांबद्दल असतात.  यामध्ये आपल्याविषयी कोणी प्रतिक्रिया देणे हे साहजिकच होय. इथं आपण स्वतःकडे किती निरपेक्ष वृत्तीने पाहू शकतो या बाबीची परीक्षा होऊ लागते. 

मी जे काही करतो ते सर्वकाही परिपूर्ण आहे ही जी एक विशिष्ट मनोधारणा आहे ही प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कमी जास्त प्रमाणात असते. या मनोधारणेचे अधिक प्रमाण व्यक्तीच्या अहंकारास कारणीभूत होते तर अत्यल्प प्रमाण व्यक्तीच्या आत्मविश्वासास हानिकारक बनू शकते. या चांगल्या प्रकारे जगायचे असेल तर तुमच्या अंगी असलेल्या विविध क्षमतेनुसार या भावनेचे एक विशिष्ट प्रमाण तुम्ही अंगिकारणे सर्वांसाठीच हितकारक असते. परंतु एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी ह्या भावनेचं योग्य प्रमाण नक्की काय हे कोणीच सांगु शकत नाही. 

मी स्वतः कडे तटस्थपणे पाहू शकतो काय?  या प्रश्नाविषयी आपण विविध व्यक्तींची मते लक्षात घेतली असता आपणास वेगवेगळे मतप्रवाह अनुभवयास मिळतात. यातील काही जणांकडून मला त्याची पर्वा / गरज नाही या प्रकारचे उत्तर मिळू शकतं. काही जणांचे उत्तर होय असे असू शकतं आणि माझ्या मते बहुतांशी लोकांना लोकांचे उत्तर होय असेच असते. फारच थोडे असे लोक असतात ज्यांना आपण स्वतःकडे निरपेक्ष वृत्तीने पाहू शकत नाहीत असं वाटतं. 

पुन्हा एकदा वळूयात ते वयोमानानुसार माणसांमध्ये होणाऱ्या अभिव्यक्तीच्या प्रमाणातील बदलाविषयी! माणसाच्या आयुष्यातील जे काही अनुभव येत असतात त्यामुळे माणसाच्या मनामध्ये बहुधा खूपच खळबळ निर्माण होत असावी. ही खळबळ तुम्ही किती प्रमाणात हाताळू शकता हा एक महत्त्वाचा घटक विचारात घेतला पाहिजे. ज्या लोकांच्या मेंदूमध्ये बाह्य जगतातील असंख्य वादळे पचवण्याची क्षमता असते त्या लोकांना आपल्या मनातील स्पंदने अथवा वादळे मनाबाहेर अभिव्यक्तीच्या रुपानं काढणं आवश्यक वाटत नाही. ते अभिव्यक्त होतच नाहीत असे नाही परंतु ही अभिव्यक्ती ते काही विशिष्ट प्रसंगी आपल्या मर्जीनुसार करतात. 

काही एक वर्ग असा असतो ज्याचा मेंदूला बाह्य जगतातून अनुभवयास मिळणाऱ्या घटनांवर प्रक्रिया करणे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे शक्य होत नाही.  ह्या क्षमतेबाहेरील घटना मेंदूला संतृप्ततेला पोहोचू शकतात. या बिंदूपासून पुढे त्यांच्या मेंदूला प्रभावीपणे कार्यरत करायचे असेल तर त्यांना त्यांच्या मेंदूत निर्माण होणारी वादळे अभिव्यक्तीच्या रूपाने बाहेर काढणे आवश्यक बनते. त्यामुळे ही माणसे अचानक बोलू लिहू लागतात. आता हे बोलणे लिहिणे भोवतालच्या कितपत भावते आणि त्यांच्या प्रतिक्रिया कशा होतात यावर तुमचे पुढील अभिव्यक्तीचे प्रमाण अवलंबून असणे योग्य नव्हे. एखाद्या व्यक्तीची मते भोवतालच्या संपूर्ण जनसमुदायाला पटणे अशक्य होय. त्यामुळे आपल्या समविचारी मंडळींकडून आलेली दाद ही महत्त्वाची असते. काही माणसे तर अशी आपणास भेटतात ही त्यांची आणि आपली मते बहुतांशी सर्व प्रसंगी जुळून येतात. आपण दुसऱ्याची अभिव्यक्तीची गरज उत्तम श्रोत्याच्या रुपात कशी पुर्ण करु शकतो हा ही एक महत्वाचा घटक असतो. 

अभिव्यक्तीचे हे प्रमाण वयानुसार वाढतच जाण्याची शक्यता असते. (साधारणतः पस्तिशीनंतर हे प्रमाण अधिक वाढत जाण्याची शक्यता जास्त असते. पस्तिशीपर्यंत बहुदा आयुष्यातील विविध घटना शिक्षण, विवाह वगैरे पार पडलेल्या असतात म्हणुन हे कदाचित होत असावे.  अजुन एक मुद्दा म्हणजे साधारणतः  पस्तिशीच्या आसपास  तुमचे आनुवंशिक गुणधर्म काहीशा जास्त प्रमाणात तुमचा ताबा घेतात असं मला वाटतं . जर ह्यातील काही गुणधर्म तुम्हांला नकोसे वाटत असतील तर त्यांचा आणि तुमचा एक संघर्ष होऊ शकतो . जर तुम्ही खास प्रयत्न केले नाहीत तर by default हे गुणधर्म तुमचा ताबा घेतात . असो  हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे !!)  परंतु काही वेळा अधिकच प्रतिकूल प्रतिक्रिया मिळत गेल्या तर मग माणसे आपल्या भोवती कवच निर्माण करतात. परंतु त्यांच्या मनात होणारी विचारांची वादळे मात्र ते थोपवू शकत नाहीत. त्यामुळं त्यांची मनस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येकाला आपली अभिव्यक्तीची गरज ओळखता आली पाहिजे. या गरजेनुसार या अभिव्यक्तीला बाहेर पडून देण्यासाठी एका योग्य माध्यमाची किंवा मित्रमंडळींची संगत निर्माण करणे हे आपल्या आणि आपल्या भोवतालच्या लोकांच्या हिताचे असते. 

काही दिवसांतच एकटेपण वाटणाऱ्या माणसांशी योग्य संवाद साधणाऱ्या संस्थांची निर्मिती झाल्यास आश्चर्य नाही!!

सरत्या २०१८ वर्षाला निरोप देणाऱ्या कालच्या सायंकाळीची वसईच्या घरुन घेतलेली छायाचित्रे !! 




पुन्हा भेटुयात पुढील वर्षी !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...