मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

मला काहीच प्रॉब्लेम नाही !!



सोनी टीव्हीच्या मराठी वाहिनीवर चित्रपट पाहण्याचा हा तिसरा सलग रविवार!! मुरंबा, आंधळी कोशिंबीर आणि आता मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट! रविवार दुपारची एक वाजताची वेळ आणि जाहिरातीच्या कमी व्यत्ययामुळे रस टिकवून धरणारे नवीन मराठी चित्रपट या योगामुळे हे तिन्ही चित्रपट पुर्णपणे पाहिले गेले ! 

आंधळी कोशिंबीरवर पोस्ट लिहायची राहुन गेले.  दिमाग का भेजा करणारा असा हा चित्रपट! एखादी गोष्ट का होत आहे असा फारसा विचार करण्याची गरज नसणारा हा चित्रपट! चित्रपट पाहून कोणाही माणसाला आपण चित्रपट निर्मिती करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होण्यास हरकत नाही. 

आजच्या पोस्टचा विषय मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपट! चित्रपटाचा विषय दोन्ही बाजूंच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न करणाऱ्या जोडप्याविषयी! घरच्यांच्या विरोधाचे मुळ कारण लग्नाला नसुन लग्नामध्ये मानपान, रितीभाती किती स्वरुपात कराव्यात याविषयी न झालेलं एकमत हे आहे! त्यामुळे हे दोघेजण लग्न करुन मोकळे होतात. घरच्यांचा विरोध इतका कडवा असतो की पुढील सात वर्षे या दोघांशी दोन्ही बाजूचे काही संपर्क ठेवत नाहीत.  एखाद्या कंपनीच्या c.e.o. पदाच्या व्यक्तीला साजेसं असं घर, एक मुलगा आणि सतत कामात व्यग्र असणारे हे दोघं!!

स्पृहाच्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्य ऑटोपायलट मोडमध्ये चालू असतं. आता आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे कारण तुमची जीवनशैली उंचावली आहे, घराचे हप्ते भरायचे आहेत आणि त्यामुळे पैसा कमावणे हे प्राधान्यक्रमावर एक, दोन आणि तीन स्थान पटकावुन बसलेलं असतं.  त्यानंतर हा पैसा मिळवण्यासाठी जे घटक उपयुक्त किंवा सहाय्यक असतात अशा घटकांनासुद्धा ऑफिसाबाहेरील वेळेचा काही हिस्सा देणे क्रमप्राप्त आलेच! त्यामुळे येणाऱ्या पार्ट्या! सर्व आयुष्य कसं एक प्रेडिक्टेबल वळणावर असतं.  दोघांनाही काहीतरी आपल्या आयुष्यात कसली तरी कमतरता आहे हे जाणवत असतं. परंतु प्रत्येक दिवशी येणाऱ्या या कृत्रिम आयुष्यातील कृत्रिम घडामोडींमध्ये इतकं गुंतून जायला होतं की ही कमतरता नक्की काय आहे याचा शोध घेण्याची इच्छा असली तरी संधी मिळत नाही!

त्यात पडला तो स्पृहाचा काहीसा फटकळ आणि वरकरणी संतापी असा वाटणारा स्वभाव! बराच वेळा वापरली गेलेली फणसाची उपमा आपण तिच्या स्वभावाला देऊ शकतो. परंतु तिच्या स्वभावाचं बाह्यकरणी कठोर असं वाटणारं परंतु खरंतर थोड्या प्रयत्नाने भेदू जाऊ शकणारे कवच भेदण्याचा किंचितसा सुद्धा प्रयत्न छोटा महाजनी करत नाही. आजची ही एक सामाजिक समस्या आहे! हल्लीचे तरुण एखाद्या तरुणीच्या फटकळ स्वभावाला किंवा तापट स्वभावाला शांतपणे हाताळू शकतात काय आणि जर बहुतांशी तरुण ही क्षमता बाळगून नसतील तर त्याचे मूळ कारण काय?

चित्रपट या वळणावर या महत्त्वाच्या मुद्द्याचं खूप खोलवर विश्लेषण करेल अशी अपेक्षा निर्माण करीत असताना एखाद्या मराठी मालिकेसारखे न पटणारे, रुचणारे असे वळण घेतो. सात वर्ष दुरावलेली दोन्ही बाजूची मंडळी अचानक या दोघांच्या संपर्कात येतात. त्यानंतर कोकणातील स्पृहाच्या घरी जातात. त्यानंतर हा चित्रपटाचा मूळ गाभा असलेला विषय पोह्यावर पेरलेल्या शेवेसारखा अधूनमधून डोकावत राहतो. कोकणात गेल्यावर दुसऱ्याच कोणत्यातरी समस्यांचं चित्रपटांत आगमन होतं आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथेच चित्रपटाची पकड कमी होते. इथं मराठी चित्रपटाने लक्षात घेण्यासारखा धडा म्हणजे तुम्ही चित्रपटातील मुख्य विषयाची कास अशी अचानक सोडता कामा नये.  विधवा स्त्रियांचे प्रश्न,  घरातील तिशीला पोहोचलेल्या परंतु निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या विवाहित मुलांची होणारी कुचंबणा वगैरे वगैरे!! सर्व सामाजिक प्रश्न तुम्ही एकाच चित्रपटात कोंबण्याचा प्रयत्न करू नये!!

काही वर्षापूर्वी बिफोर द सनराइज्,  आफ्टर द सन सेट तत्सम नावांची तीन चित्रपटांची एक शृंखला पाहिली होती. हे संपूर्ण चित्रपट केवळ एका जोडप्याच्या भावविश्वावर तारुन नेण्याचे सामर्थ्य दिग्दर्शकाने दाखवलं होते.  आपणसुद्धा असा काही प्रयत्न करून बघायला हरकत नाही.  प्रत्येक चित्रपटाचा त्याच्या विषयानुसार मांडणीनुसार एक हक्काचा असा प्रेक्षकवर्ग असू शकतो. परंतु तुम्हाला तो विषय पूर्णपणे खुलवता आला हवा आला पाहिजे.  एकाच चित्रपटात वेगवेगळ्या आवडीच्या प्रेक्षकांना खेचून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील कोणताही वर्ग खुश न होण्याचीच शक्यता जास्त असते. 

मुरंबा काय की मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट काय,  श्रीमंतीकडे झुकलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणारे हे चित्रपट! स्पृहाची आई म्हणते सुद्धा, "आमच्या आयुष्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्या, पण त्या समस्या आहेत हे आम्हांला वाटलंच नाही!" आता कोणी एखाद्या दुष्काळग्रस्त भागातील जोडप्याच्या भावविश्वात कोणते प्रश्न निर्माण होत असतील याविषयी चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा धाडस करेल काय? प्रेक्षकाला चकचकीत घरे, सुंदर कोकण, सुंदर नायिका वगैरे पॅकेज बनवून आकर्षित आपण करू शकतो.  परंतु भयावह वास्तवाचे दाहक चित्रण करून बरीचशी जनता ज्या परिस्थितीचा सामना करत आहे त्यावर सुद्धा चित्रपट बनवण्याचे धाडस आपण करायला हवे. 

बाकी स्पृहाचे छोट्या महाजनीला उद्देशून असलेले आणि लक्षात राहिलेले काही संवाद! "आपल्या दोघांना आयुष्याकडून नक्की काय हवं आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात!!" "तुझ्या मनात नक्की काय आहे हे खणून काढण्याचा मी गेली सात वर्षे प्रयत्न करीत आहे!!" स्त्रियांना असले प्रश्न वीकएंडलाच नवरे मस्त जेवुन ताणुन द्यायच्या तयारीत असतानाच का विचारावे वाटतात हे न उलगडणारं कोडं ! एकदा का भेजा फ्राय झाला की दुपारची झोप उडते हो राव ! बाकीच्या वेळी असल्या प्रश्नांना गंभीर मुद्रा करुन तोंड देण्यात आम्हांला काहीच प्रॉब्लेम नाही !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...