मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ९ मे, २०१८

NPL गाथा - भाग १

२००८ च्या आसपासचा तो काळच झपाटलेला होता. न्यु इंग्लिश स्कूल वसईच्या सर्व बॅचेसमध्ये स्नेहसंमेलनाचे वारे जोरात चालू होते. कालांतराने त्यांचा जोश कमी झाला. परंतु काही बॅच याला अपवाद आहेत जसे की १९८५!  मध्यंतरी तर ह्या बॅचची एका आठवड्यात दोन - दोन स्नेहसंमेलने  झाली होती. त्यांच्या ह्या सातत्याचे मूळ कारण शोधणं हा एका प्रबंधाचा विषय होऊ शकतो!  त्या कालावधीत या सर्व बॅचनी स्नेहसंमेलनाचा सपाटा चालू केला होता. सुरुवातीचा जोश ओसरल्यावर मग त्यातील विविध मंडळींनी विविध उपक्रम चालू केले. काहीजण शाळेसंबंधित कार्यक्रमात, सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात अशा विविध प्रकारच्या उपक्रमात गढुन गेले होते. 

१९८८ बॅचमध्ये मात्र रविवारी सकाळी सुरुच्या बागेमध्ये क्रिकेट खेळण्याचं वेड पसरले होते. हे लोक सुरुवातीला ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असत.  थोड्या दिवसातच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला होता. पुढील दोन-तीन वर्ष काही विशेष घडलं नाही. परंतु २०११  सालच्या आसपास मात्र त्यातील काही जणांची खुमखुमी शांत होत नसल्यामुळे ह्या खुमखुमीचे परिवर्तन १९८५ बॅचसोबत ओव्हरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात झालं. या सामन्यामध्ये १९८५ बॅचचे नेतृत्व टिवळीवाडी येथील प्रसिद्ध खेळाडू संजय राऊत यांनी केलं. या सामन्यात प्रत्यक्ष खेळ चालू असताना १९८५ संघ विजयी होत आहे असा भास होत होता. परंतु स्कोअर लोकांमध्ये काही वेगळंच गणित शिजत होतं. विशाल पाटील आणि १९८५ चे परांजपे हे दोघं स्कोअरर होते.  आणि सामन्याच्या शेवटी अचानक १९८८ संघ विजय झाला ही बातमी घोषित करण्यात आली. ह्या सामन्यात १९८२ चे संजिव पाटील आणि विवेक काणे हे तटस्थ पंच नेमण्यात आले होते. १९८३ ला सहभागी करुन अजुन काही असे आठ षटकांचे ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने झाले. 

२०१२ साली मात्र ही डोकी अजून पुढचा विचार करू लागली. सर्व बॅचना एकत्र आणून बॉक्स क्रिकेट मध्ये सामने खेळवले तर अजुन मजा येईल असा प्रश्न विचार पुढे आला. आणि त्याचंच परिवर्तन झालं ते NPL म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल premier league च्या आयोजनात!
२०१२ साली साधारणतः सहा ते सात संघांच्या सहभागाने या स्पर्धेची सुरुवात झाली. त्यावेळी ही स्पर्धा रविवारी सकाळी सुरू होत असे आणि दुपारी बारा वाजेपर्यंत आटपत असे. पहिल्या वर्षीच्या आयोजनात बऱ्याच प्रमाणात नवखेपणा होता. 





त्यावेळी वयाचा विचार न करता सर्व सहभागी संघांना विविध गटात विभागण्यात आले होते. त्यामुळे २००५ चा संघसुद्धा १९८२ संघासमोर सामना खेळायला उभा ठाकला आहे असे चित्र दिसले होते. पहिल्या वर्षीचा अंतिम सामना २००५ आणि १९८५ या दोन संघात झाला आणि त्यात २००५ संघाने सहजगत्या विजय मिळवला. 

हळूहळू संघांची संख्या वाढू लागली आणि २०१४ साली ही स्पर्धा दिवस-रात्र स्वरूपात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहभागी संघांना ज्युनियर लीग आणि सीनियर लीग या दोन गटात विभागण्यात आलं होतं. ह्या स्पर्धेच्या प्रवासाविषयी आपण पुढील काही भागात पाहुयात. आजच्या या भागात NPL मध्ये भाग घेण्यात आलेल्या विशेष काही विशेष खेळाडू आपण पाहूयात. सुरुवातीच्या काही वर्षात गोलंदाजाच्या action वर काही बंधनं नव्हती. त्यामुळे हात कसाही वळवून चेंडू लेग स्पिन अथवा ऑफस्पिन करण्यास गोलंदाजास परवानगी होती.  या काळात १९८२ चे संजीव पाटील हे प्रभावी गोलंदाज म्हणून पुढे आले होते.  त्यांच्यासोबत निरंजन सावंत हे प्रसिद्ध खेळाडू सुद्धा एनपील मध्ये भाग घेत आणि त्याने सुद्धा ही स्पर्धा उद्घाटनाच्या वर्षात गाजवली होती.  १९८२ संघ १९८५ संघासोबत एका अटीतटीच्या सामन्यात उपांत्य फेरीत हरला होता. १९८२ संघाचे नेतृत्व करणारे विवेक काणे आपल्या शालेय जीवनात एक शैलीदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. परंतु त्यांच्या फलंदाजीची फार मोजकी झलक एनपील मध्ये पहावयास मिळाली.  1981 च्या संघात डॉक्टर विजय फडके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन राऊत, श्री. जयकर यासारखी मोठी मंडळी समाविष्ट असतात. विजय फडके यांनी काही सामन्यांत चांगली फलंदाजी केली. या संघाने २ वर्षांपूर्वी एनपीएलमध्ये एक चित्तथरारक विजय सुद्धा मिळवला होता. १९८० ची बॅच मात्र स्पर्धेची स्पर्धा फी भरूनसुद्धा एका वर्षी सहभागी झाली नव्हती.  त्याची कसर त्या बॅचचे मिलिंद म्हात्रे सर यांनी प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होऊन भरून काढली. यावर्षीच्या एनपील मध्ये १९७८ च्या दिलीप राऊत आणि मित्रमंडळींनी १९९४ च्या बॅचवर चित्तथरारक विजय मिळवला. दिलीप राऊत ह्यांना ह्या विजयानंतर अनेक तास उत्साहाचं भरतं आलं होतं. ह्या बॅच मध्ये जेकब हे माजी प्रसिद्ध खेळाडू आहेत. ह्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्या फलंदाजीच्या तंत्रशुद्धतेची झलक दाखवली. 

एनपीएलच्या सामन्याच्या दिवशी जी धावपळ असते तीच धावपळ, तोच उत्साह यांच्या काही दिवस आधीसुद्धा दिसून येतो. १९८३ सारख्या उत्साही बॅच मोठ्या जोमाने रविवारी सकाळी, शनिवारी संध्याकाळी सराव करत असतात. २००२ बॅच जी गेले पाच वर्ष सातत्याने NPL चषक जिंकत आहे ती मात्र उमेळेसारख्या दुर्गम ठिकाणी जाऊन आपला सराव करत असते.  NPL ने  गेल्या काही वर्षात आपले ब्रँड तयार केले आहेत. जसे की कागदी चिठ्ठ्यांवर एक आठवडाआधी NPL चा draw  पाडणे, विविध बॅचना रंगीबेरंगी t-shirt देणे, (यावर्षी आम्हाला पोपटी हिरव्या रंगाचा टी-शर्ट मिळाला आणि त्यात भर म्हणुन टी-शर्टच्या मागील बाजूस आमची बॅचसुद्धा ठळक अक्षरात छापण्यात आली होती),  स्पर्धा चालू असताना मध्यंतरात सर्व बॅचचा म्हणून एक फोटो काढण्यात येतो. हा फोटो सुद्धा आयकॉनिक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. सर्व उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांना कोकम सरबत व बिर्याणी देण्यात येते. राहुल ठोसर हे गेले कित्येक वर्ष उत्साहाने या स्पर्धेच्या छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना २००२ बॅचचा व्यवस्थापक सुद्धा मानले जाते. यंदाच्या वर्षी त्यांनी आपल्या देहयष्टीला न साजेशा अशा चपळाईने क्षेत्ररक्षण करून एक धावचीत केला. दुर्दैवाने सर्वांचे फोटो काढणाऱ्या त्यांचा फोटो  मात्र कोणी काढला नाही. आणि ह्या दुर्मिळ क्षणाचा पुरावा आपल्याकडे आज नाही! सुगंधाताई आणि उमाताई पाटील (वसईतील नामवंत वकील) या सर्व उपस्थितांना वडापावचा नाश्ता प्रायोजित करतात. 

या NPL ने बर्‍याच आठवणी निर्माण केल्या आहेत. संदेशभाऊ वर्तक यांनी २०१४ साली लेग अंपायर म्हणून कार्यरत असताना जो एक धावचीतचा निर्णय दिला. त्यावेळी मुख्य अंपायर असलेले सुजित देवकर आणि संदेश यांच्यात एकमत न झाल्याने बराच काळ वादंगाची परिस्थिती निर्माण झाली होती. NPL च्या इतिहासातील हा एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग आहे. काही बॅच  गेल्या वर्षात बऱ्याच वेळा समोरासमोर ठाकल्या आहेत आणि भारत - पाकिस्तान, इंग्लंड - ऑस्ट्रेलिया ह्या सारख्या परंपरागत लढतींचं स्वरुप त्यांना प्राप्त होऊ लागलं आहे. ह्या बॅचमधील जो संघ विजेता होतो तो संघ पुढील वर्षभर वसईत दुसऱ्या बॅचचा कोणीही भेटला तरी त्याची खिल्ली उडवत असतो.  त्या दिवशी उज्ज्वल म्हणाला तसे जेव्हा आम्ही म्हातारे होऊन तेव्हा संज्योतला २०१७ साली १९८३ च्या बॅचने  १९८७ ला अंतिम सामन्यात कसे पराभूत केले हे ऐकवू आणि आमच्या नातवंडांना सुद्धा या गोष्टी सांगू असे म्हणाला. 

संज्योतवरुन लक्षात आले की हा एकहाती आणि थोडीफार विकास राऊत ह्याची मदत घेऊन आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातो. संज्योत हा संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध आहे असे कधीच होत नाही. मला लग्नाला जाऊन यायचे आहे, वास्तुशांतीला हजेरी लावायची आहे अशी अनेक कारणे त्याच्याजवळ असतात. हे सर्व उद्योग पार पडून तो कसाबसा ठरलेल्या वेळी मैदानात हजर होतो. तो मैदानात हजर झाला की त्याचे निष्ठावंत शिलेदार अभिजीत पाटील आणि पराग पाटील हे त्याच्या सूचना ऐकण्यासाठी सज्ज होतात. हे दोघे विचारे वर्षभर क्रिकेटपासून कोसभर दूर असतात आणि ऐन सामन्याच्यावेळी क्षेत्ररक्षणात थोडीदेखील चूक झाली की संज्योतच्या रागीट शब्दांना त्यांना तोंड द्यावे लागते. एखाद्या सामन्यात संज्योतचा संघ हरला तर पुढील पाच मिनिटं तो आणि त्याचा संघ जिथे उभे असतील तिथे जाण्यात काही अर्थ नसतो.  तू असा शॉट कसा मारला, तुला साधा बॉल अडवता आला नाही!! अशी काही ठेवणीतली वाक्य त्याचे सहकारी सहन करीत असतात.  मग थोड्यावेळाने तो शांत होतो आणि आपलं दिलदार रूप आपल्या सहकाऱ्यांना परत एकदा दाखवतो. धीरज वर्तक आणि अमित दुबे हे दोन वयाला चाळिशीला पोहोचलेले नवतरुण आपल्याला सीनियर लीगमध्ये घ्यावे यासाठी गेली कित्येक वर्ष आयोजक समितीच्या मागे लागले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांची ही मनिषा पूर्ण झाली. दुर्दैवाने स्पर्धा जिंकण्याचं  त्यांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकलं नाही. पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा!!

NPL च्या अजून काही गाथा पुढील काही भागात!! तोवर ह्या स्पर्धेच्या मागील काही वर्षातील संस्मरणीय क्षण !!






































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...