मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ८ मे, २०१८

गाव तसा स्वभाव ??



आतापर्यंतच्या जीवनक्रमात विविध गावच्या लोकांच्या संपर्कात आलो.  आधुनिकीकरणामुळे प्रत्येक गावाचं जे एक खास वैशिष्ट असतं ते हळूहळू लयाला जाऊ लागलं आहे. तरीसुद्धा साधारणतः  जी मंडळी पन्नास पंचावन्न ज्या वयोगटापलीकडची आहेत त्या लोकांनी आपल्या गावाची काही स्वभावगुणधर्म आपल्यामध्ये अजुनही राखून ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात किंवा बोलण्याचालण्यात जे काही स्वाभाविक घटक दिसून येतात त्यांची नोंद घेण्याचा या पोस्टद्वारे प्रयत्न करत आहे. 

सुरुवात करूयात पहिल्या गावापासून! ही गावातील बरीच लोकं ही खूप बडबडी आहेत. आपल्या मनात जे काय आहे ते चारचौघात किंवा घरी, फारसा विचार न करता किंवा विचारांना फिल्टर न लावता बोलणं हे त्यांचे वैशिष्टय आहे.  जणू काही आला मनात विचार आणि  टाकला बोलून !!
हे त्यांचं धोरण असतं! हे तसं ठीक परंतु काय होतं की त्यांच्याकडे काही फारसं स्वतःच गुपित राहत नाही.  त्यामुळं एखादा पत्त्यांचा डाव सर्व प्रतिस्पर्धी लोकांपुढे आपण दाखवावा त्याप्रमाणे त्यांच्या मनातील विचार सर्व दुनियेसमोर उघड होतात. मित्रांसाठी हे चांगलं असतं परंतु ज्या लोकांशी ह्यांचं  पटत नसतं त्यांना त्यांची ही गडबड त्रासदायक वाटू शकते.  त्याचप्रमाणे त्यांची धर्मपत्नी सुद्धा त्यांच्या सततच्या गडबडीला वैतागु शकते. 

आता वळूयात दुसऱ्या गावाकडे! या गावातील लोक असतात तसे भोळेभाबडे ! त्यांना फारसे छक्केपंजे माहीत नसतात. त्यांचं हे भोळेभाबडेपण त्यांच्या आयुष्याच्या लहानपणाच्या काळामध्ये एक मोठा सकारात्मक गुण म्हणून पुढे येतं. त्याचप्रमाणे पुर्वीच्या पिढीत आयुष्यभर जर तुम्ही हे भोळेभाबडेपण कायम ठेवलंत तरीसुद्धा सर्व गावातील लोक तुमचा आदर करीत असत!  या स्वभावधर्मातील एक मोठी उणीव म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मुलाबाळांना जगात राहण्यासाठी जो धूर्तपणा / व्यावहारिकपणा आणि  त्याची किमान पातळी आवश्यक असते त्याचं तुम्ही बाळकडू देत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुमची मुलं मोठी होतात त्यावेळी त्यांना आपल्यातील या उणिवेची जाणीव होते. याच्या मूळ कारणाचा ते शोध घेऊ लागतात आणि त्या शोध घेताना ते समजा या व्यक्तीच्या भोळेभाबडेपणाविषयी पोहोचले तर मग त्यांना या साध्या व्यक्तीच्या साधेपणाविषयी काहीसा राग येतो. 

तिसऱ्या गावातील लोक ही उत्तम निरीक्षक असतात. ती बाकीच्या लोकांचे उत्तम निरीक्षण करत असतात आणि जेव्हा ते आपल्या मूळ कंपूत येतात तेव्हा ही निरीक्षणं आपल्या मित्रवर्गासोबत शेयर करुन खळखळून हसतात. ही मंडळी व्यावहारिक असतात आणि आपला संसार उत्तमरित्या चालविण्याकडं ह्यांचा कल असतो. 

आधी म्हटल्याप्रमाणं हळूहळू ही गावाची स्वभाववैशिष्ट्ये (जी जात - धर्माच्या पल्याड असायची) ती  नाहीशी होऊ लागली आहेत. पुर्वी एका गावातील मुलगी दुसऱ्या गावात लग्न करुन जायची तेव्हा तिला एका वेगळ्या वातावरणात रुळून जायला लागायचं. पण मग कालांतरानं ही तुळस ह्या अंगणात अशी रुजून जायची की तिला आपलं मूळ गाव काहीसं परकं वाटू लागायचं.

आधुनिकीकरण आलं आणि झपाट्यानं साऱ्या काही गोष्टी घेऊन जायला निघालं आहे आणि त्यातलंच एक म्हणजे गावाचं स्वतःच असं एक स्वभाववैशिष्ट्य!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

द्वैत -: ChatGPT विश्लेषण

द्वैत कथेचा पुढील भाग लिहायला उशीर होत असल्यानं आज सकाळी ChatGPT ला आतापर्यंत लिहिलेल्या तीन भागांचं विश्लेषण करण्याची विनंती केली. त्यानं द...