मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग ४







मत्स्यालयातील मासे पाहून आम्ही बाहेर पडलो. आता आमची वाटचाल मालगुंडच्या दिशेने होणार होती.  मालगुंड हे गाव गणपतीपुळेपासून साधारणतः चार-पाच किमी अंतरावर असावे. एकंदरीत मालगुंड हे आकाराने गणपतीपुळेपेक्षा मोठं असावं परंतु बहुतांशी लोकांना गणपतीपुळे हे देवस्थानामुळं जास्त माहित आहे. मत्‍स्यालय पहाताना एक गोष्ट ध्यानात आली. पूर्वी इंटरनेटव्याप्ती कमी असल्यामुळं आपली ज्ञानाची जिज्ञासा शमवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने अशा ठिकाणी जात असत. परंतु आता इंटरनेटमुळे सर्व काही घरबसल्या उपलब्ध होत असल्याने आपण एखाद्या विषयाविषयी थोडीफार माहिती करून घेऊन शांत बसण्याची शक्यता जास्त असते. 

मालगुंडला आमच्या निवासस्थानाचे नाव माडाच्या बनात हे होते.  नावानुसार ओळीने लावलेल्या नारळांच्या झाडांच्या सानिध्यात हे हॉटेल वसलेलं आहे. विविध खोल्यांना त्या जवळ लागवड केलेल्या नारळांच्या जातीनुसार नावं देण्यात आली आहेत. आमच्या खोलीचं नाव बनवली असं होतं. या हॉटेलविषयी मी नक्कीच  प्रशंसोद्गार काढून इच्छितो. 






एकंदरीत हॉटेलच्या रूममधील सर्व सुविधा अतिउत्कृष्ट होत्या आणि सर्व कर्मचारीवर्गसुद्धा अत्यंत नम्रतेने आणि तत्परतेने सर्व सुविधा
पुरवीत होता. आम्ही गेलो त्यावेळी तिथं काहीशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथला खानसामा उष्माघातामुळे आजारी पडला होता आणि ॲम्ब्युलन्समधून त्याला गणपतीपुळे इथे घाईघाईने नेणे भाग पडले होते. व्यवस्थापकाने याबाबतीत आमच्याकडे दिलगिरी व्यक्त करून आम्हाला एक किलो मिटर अंतरावर असलेल्या स्वाद या शाकाहारी उपहारगृहाचा पत्ता दिला. 

स्वाद हे उपहारगृह आम्हाला अत्यंत आवडले. साधारणतः ११५ रुपयांमध्ये अत्यंत आरोग्यपुर्ण अशी शाकाहारी थाळी होती. त्यामध्ये गरमागरम चपात्या, पांढराशुभ्र भात, (जो चपात्या संपल्यावर आणला जातो) भोपळी मिरची भाजी, लोणचं,  पापड आणि ताक ( उन्हाळ्यात मराठी माणसाला जे काही सुचू शकतं ते सर्व) उपलब्ध होते.  मनाने तृप्त होऊन आम्ही जेवणानंतर बाहेर पडलो. 

या सहलीचे ज्यावेळी आम्ही नियोजन करीत होतो त्यावेळी खरंतर एखाद्या घरी जाऊन राहून होम स्टेचा पर्याय निवडावा असे माझे म्हणणे होते.  परंतु यावेळी ज्यावेळी माझ्या बहिणीच्या यजमानांनी त्यांच्या मित्राकडे (जो आम्हाला या सहलीचे नियोजन करून देत होता) चौकशी केली त्यावेळी त्यांनी आम्हाला एका गोष्टीचे स्पष्टीकरण दिले. 
तुम्ही ज्यावेळी home stay पर्यायाची निवड करता त्यावेळी तुम्हाला कोकणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी असे चविष्ट जेवण उपलब्ध होण्याची शक्यता वाढीस लागते. परंतु न्हाणीघर आणि तत्सम सुविधांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी standard सुविधा उपलब्ध असतीलच याची हमी देता येत नाही आणि त्यामुळेच त्याने आम्हाला रिसॉर्टचा पर्याय सुचवला होता. 

माडाच्या बनात दुपारच्या वेळी एक मस्त वामकुक्षी काढून मग आम्ही सायंकाळी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघालो. माडाच्या बनात या रिसॉर्टच्या मालकाची रिसॉर्टच्या मागे बरीच मोठी अशी वाडी आहे आणि आंब्याच्या सुद्धा बागा आहेत.  गणेशगुळे येथील अनुभवानंतर आमचा आत्मविश्वास वाढीस लागला होता.  या मालकाच्या वाडीतील वांग्यांवर आमची नजर पडली आणि मग त्याला आम्ही संध्याकाळच्या जेवणात वांग्यांचं भरीत करण्याचं सुचवलं. आमच्यासाठी ज्या वांग्याचा बळी पडला असावा ते हे वांगं !!



गणपतीपुळे येथील समुद्र किनारा सुंदर आहे याविषयी कोणाचेच दुमत होणार नाही. परंतु तो अत्यंत गर्दीचा आणि commercialized
असा समुद्रकिनारा बनला आहे. त्यामुळं गणपतीपुळे आणि मालगुंड या दोन उपलब्ध पर्यायांपैकी आम्ही मालगुंड किनाऱ्याची निवड केली.  पुढील दोन तासाच्या अनुभवानंतर ही निवड अचूक असल्याचं समाधान वाटलं.  

आपण सुट्टी घेऊन शहरांपासून दूरवर का जातो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. तसं म्हटलं तर शहरापासून दूर जाणे  हे प्रत्येक वेळी शक्य होतं असं नाही. परंतु सुट्टीचा मुख्य उद्देश कोणता मला विचारलं
तर माझं याबाबतीतलं मत सुस्पष्ट आहे. आपण नेहमीच्या आयुष्यात व्यावसायिक तणाव शहरी जीवनातील समस्या यामुळे त्रासलेले असतो.  आणि त्यामुळे आपलं मूळ रुप आपल्यापासून दूर जात असतं अशी आपली धारणा होत असते. आपलं मूळ रुप नक्की कसं आहे हे आपण सांगू शकत नाही पण आपल्या बालपणीच्या अवताराची आपण या मूळ रुपाशी तुलना करू शकतो.  मी आपल्या सुट्टीमध्ये आपलं सद्यकालीन रुप विसरून आपल्याला ज्ञात असलेल्या मूळ रुपाच्या म्हणजेच आपल्या बालपणीच्या रुपाच्या जितकं जवळ जाता येईल तितका जाण्याचा प्रयत्न करतो. समुद्रकिनारा, हिमशिखरे, दाट जंगले ह्यांच्या सानिध्यात आपण हा प्रयत्न अधिक यशस्वीरित्या करु शकतो अशी माझी धारणा आहे. 

मालगुंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा मी नेमके हेच करीत होतो. तिथे असलेल्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीमुळे माझ्या या मनसोक्त वागणुकीला प्रोत्साहन मिळाले. सोहम, संदीपभाई आणि मी समुद्राच्या विविध लाटांशी मनसोक्त खेळलो. 



समुद्राच्या लाटा विविध प्रकारच्या असतात. काही लांबवरुन मोठ्या रुपात येणाऱ्या लाटांचा जोर समुदकिनाऱ्यापाशी येईस्तोवर कमी झालेला असतो याउलट काही लाटा समुद्रकिनाऱ्याजवळ येताना जोर पकडू लागतात. 







ह्या लाटांच्या खेळांमध्ये शंखशिंपल्यांचा खेळसुद्धा पहावयास मिळाला. काही खेकडेसदृश्य जीव ह्या शिंपल्यांच्या आधारे ह्या लाटांसोबत समुद्रकिनाऱ्याच्या जवळ येत होते आणि मग पुन्हा परत नव्या परतणाऱ्या लाटांसोबत समुद्रात फेकले जात होते. 







निसर्गाची करणी अगाध आहे त्याच्या मनात नक्की काय आहे हे समजून घेण्याची ताकद नक्कीच मनुष्याकडे नाही. सव्वासात वाजेपापर्यंत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आमचं वावरणं सुरू ठेवलं होतं. सायंकाळी मस्तपैकी वांग्याचं भरीत खाऊन आम्ही निद्राधीन झालो. 

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही लवकर उठून गणपतीपुळे येथील गणेशाच्या दर्शनासाठी निघालो. हा आठवड्यातील मधला दिवस असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे गणेशाचं आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आले. गणपतीपुळे येथील गणेशाभोवतालची प्रदक्षिणा ही मला खूप आवडते. निसर्गरम्य परिसरातून साधारण एक किलोमीटर अंतर आपण अनवाणी पायाने चालत असतो. शक्यतोवर मौन बाळगून ही प्रदक्षिणा करावी आणि गणेशाचं चिंतन करावे.  देवाकडे मागावं की न मागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न! एकंदरीत प्रदक्षिणा वीस मिनिटांत सावकाश पार पाडून आणि गणेशाच्या प्रसादाचे भक्षण करून आम्ही प्रसन्न मनाने ह्या मंदिराच्या आवारातून बाहेर पडलो. 


ह्यानंतरचा आमचा टप्पा होता तो म्हणजे प्राचीन कोकण हे एक ठिकाण प्राचीन कोकण हे ठिकाण एका छोट्या टेकडीवर बसवलं आहे असं म्हणता येईल. या उद्यानाचा हेतू अत्यंत उदात्त असा आहे. मराठी माध्यमाच्या झपाट्याने कमी होणाऱ्या प्रमाणामुळं आपल्या संस्कृतीशी असणारी नवीन पिढीची नाळ तुटत चालली आहे. त्यामुळं त्यांना आपल्या संस्कृतीशी ओळख ही शाळेबाहेरच्या माध्यमातून करून द्यावी लागणार आहे. प्राचीन कोकण ह्या उद्यानात नेमकं हेच केलं गेलं आहे. पूर्वापार कोकणात अस्तित्वात असलेल्या विविध पेशांतील जोडप्यांच्या जीवनसरणीचे दर्शन घडवून देण्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न ह्या उद्यानातून घडवण्यात आला आहे. 

ह्या उद्यानाचे फोटोच इतके सविस्तरपणे आपल्याला या जीवनसरणी विषयी सांगतात की मी त्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही.  या फेरफटक्यात त्यासोबत आमच्यासोबत असणारी गाईड आम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती देत होती. परशुरामाची मूर्तीसुद्धा इथे होती परशुराम जिंकलेली सर्व पृथ्वी दान करून टाकली होती. त्यामुळं स्वतःला वास्तव्य करण्यासाठी म्हणून त्यांनी समुद्राशी लढाई करून समुद्राला काही अंतर मागे लोटलं आणि स्वतःच्या वास्तव्यासाठी भूमी निर्माण केली आणि हीच ती कोकण भूमी असं गाईड म्हणाली असा मला पुसटसं आठवतं.  पुढं ती विविध व्यावसायिकांच्या घराच्या रचनेविषयी आणि त्यांच्या आयुधांविषयीसुद्धा उत्कृष्ट माहिती देत होती. आपण जर ह्या भागात ह्या भागाला भेट दिलीत आणि आपल्यासोबत शालेय जीवनात असणारं  एखादा बालक असेल तर प्राचीन कोकण ह्या उद्यानाला भेट देणे अत्यंत उचित ठरेल. 






















कोकणातील उष्ण हवामानाला तोंड देण्यासाठी बनवण्यात आलेली कौलारू छपरांची संरचना! 

या संरचनेमुळे किंवा त्यातील द्विस्तरीय कौलामुळे बाहेरील उष्ण हवामानापासुन घराचे काही प्रमाणात संरक्षण होते. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे या भेटीत काही नवीन शब्दांचा मला उलगडा झाला. चव्हाटा म्हणजे कोकणातील गावातील एक दैवत असून कोकणात वास्तव्य करणाऱ्या भूतांपासून हे गावातील लोकांचं संरक्षण करतं. आता इथे जी काही माहिती दिली आहे त्या माहितीची वैधता त्याच्या गाईडच्या ज्ञानावर आणि माझ्या स्मरणशक्तीवर अवलंबून असल्याने त्यात काही चुका आढळल्यास तज्ञानी दुर्लक्ष करावं. 

प्राचीन कोकण मधुन बाहेर आल्यावर आदित्य नामाचा महिमा !



(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...