मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

स्थिर विरुद्ध डायनॅमिक!!


मोठमोठाल्या आर्थिक संस्थांच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात काम करताना सत्वपरीक्षेचे अनेक क्षण येतात. आज्ञावलीचे तुम्ही कितीही परीक्षण केलं असलं तरी ज्यावेळी ही आज्ञावली आणि तिच्यासोबतचे डेटाबेस, इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्व मित्रमंडळी एकत्र प्रॉडक्शनमध्ये जातात तेव्हा ह्या प्रमाणात त्यांना एकत्र नांदायची सवय नसते किंबहुना ज्या क्रमानं ही मंडळी प्रॉडक्शनमध्ये जातात त्यात थोडी जरी गल्लत झाली तर आभाळ फाटू शकतं. आणि त्यामुळं ज्या दिवशी अशी बरीच मंडळी प्रॉडक्शनमध्ये जाण्याचा दिवस येतो त्यावेळी काहीशी धाकधुक मनात असते. 

तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरी एखादी गोष्ट चुकण्याची जर शक्यता अस्तित्वात असेल तर ती गोष्ट केव्हातरी चुकणारच असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे असा प्रसंग केव्हातरी निर्माण होतो. त्यावेळी प्रत्येक क्षणाला त्या आर्थिक संस्थेचं नुकसान होत असतं. बहुतांशी वेळा त्यावेळेच्या ह्या स्थितीला हातभार लावणाऱ्या घटकांचं एक विशिष्ट अशी युती (combination) निर्माण झालेलं असतं जे उपलब्ध लोकांपैकी कोणी आधी अनुभवलेलं नसतं. त्यामुळं हा एक dynamic (अस्थिर) असा प्रश्न सोडविण्याची स्थिती निर्माण झालेली असते. Dynamic प्रश्नाचं उत्तर शोधताना काही गोष्टी ध्यानात असाव्या लागतात. कोणतंही उत्तर हे १००% टक्के परिपुर्ण नसणार हा पहिला भाग, दुसरी गोष्ट म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे विचार केला असता तुमच्यासमोर दोन तीन पर्याय उभे राहतात. त्यातील सर्वोत्तम पर्याय नक्की प्रश्न सोडवेल की नाही ह्याची शाश्वती नसते परंतु क्षणाक्षणाला तुमचं आर्थिक नुकसान होत असतं त्यामुळं सिंहाची छाती दाखवुन एक निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय योग्य ठरला तर तुमच्या निर्णयक्षमतेचं कौतुक होतं, चुकला तरी त्या क्षणी हार न मानता दुसऱ्या क्रमांकाच्या उत्तराकडं धाव घ्यावी लागते. 

अशा माहिती आणि तंत्रज्ञान विभागात दोन प्रकारची लोक असतात किंवा दोन प्रकारच्या वृत्ती दर्शविल्या जातात. 

पहिली वृत्ती, सर्व काही आलबेल असताना मोठमोठाले सिद्धांत मांडणे. इथं कोणताही प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडविण्याची घाई नसते. तुम्ही जगाला परिपुर्ण बनविण्याचे हजारो सिद्धांत कागदावर मांडु शकता. 

दुसरी वृत्ती म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, जखम भळभळून वाहत असताना पुढं सरसावुन ह्या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन, आपण सुचविलेल्या उत्तराच्या विरोधात येणारे सर्व मुद्दे, व्यक्ती ह्यांना तर्कसंगत उत्तर देऊन ठरविलेला पर्याय वेगानं प्रॉडक्शनमध्ये अंमलात आणणं.  

संस्थेला दोन्ही प्रकारच्या माणसांची आवश्यकता असते. प्रत्येक माणसामध्ये ह्या दोन्ही वृत्ती कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात असतात. आपण कशा प्रकारे घडलो आहोत आणि स्वतःला किती बदलू शकतो हे ओळखणं आवश्यक असतं. 

एक मात्र खरं - जेव्हा केव्हा हा प्रॉब्लेम संपतो तेव्हा ह्या अनुभवातून गेलेली व्यक्ती अधिक प्रगल्भ बनली असते आणि दुनियेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदललेला असतो.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...