मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १९ मार्च, २०१८

कार्तिक महिमा


लहानपणी मी क्रिकेटर बनायची स्वप्ने पहायचो. ह्या स्वप्नांच्या दुनियेतील अविभाज्य घटक म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात जसं की विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची दाणादाण उडाली असताना मी एकहाती सामना फिरवून आणत असे. अशा अनेक स्क्रिप्टस् मी कल्पून ठेवल्या होत्या. पण काल दिनेश कार्तिकनं जी काही खेळी केली ती माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडेची होती. 


एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ३४ धावांची गरज असताना मैदानात खेळण्यास येणं हेच भल्या भल्या लोकांसाठी भंबेरी उडविणारे असू शकतं. आणि त्यात दुसऱ्या टोकाला विजय शंकरसारखा महान फलंदाज असताना एकेरी धाव घेणं म्हणजे सरासरी धावांची गती प्रति षटकामागे ३६ वर आणुन ठेवण्यासारखीच गोष्ट झाली. पण दिनेश कार्तिकने ही गोष्ट साध्य केली. पहिल्या तीन चेंडूवर १६ धावा काढून त्यानं बांगलादेशी खेळाडूंना प्रचंड हादरवुन टाकलं. आणि मग शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार निव्वळ अप्रतिम ! 

क्रिकेट खेळात तुमची गुणवत्ता ही static बाब, तुम्हांला ती एका विशिष्ट पातळीपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. भारतीय राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांविषयी योग्य आदर बाळगुन, तुमच्याकडे केवळ गुणवत्ता असेल तर तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवु शकता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी तुमचं match temperament आवश्यक असतं. नेट प्रॅक्टिसमध्ये तासंतास चेंडू टोलवणे आणि प्रत्यक्ष सामन्यात असे लागोपाठ आठ चेंडू टोलवून २९ धावा टोलवणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. काल कार्तिकने हे  match temperament भरभरुन दाखवलं. ह्या एका खेळीने कार्तिकच्या कारकिर्दीला पुनर्जीवन मिळालं असं म्हणता येईल का? बहुतांशी ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल ! तरीपण ह्या घडीला तो भारतभर हिरो बनला आहे. 

आता विजय शंकरकडे वळूयात ! १८ व्या षटकात सतत चार चेंडू पुढं येऊन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील हे नक्की ! आता इथं  match temperament चा मुद्दा येतो. पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर पुढील चेंडू नुसता तटवून एक धाव काढण्याचा प्रयत्न करायला हरकत नव्हती.  असो अशी परिस्थिती मी कॉलेज सामन्यात स्वतः अनुभवली आहे. काही कारणास्तव मला सलामीला पाठवलं जायचं आणि बारा षटकांच्या सामन्यात साधारणतः पहिली चार षटक बळी जाऊ न देणं ही अपेक्षा असायची आणि मी बऱ्याच वेळा ती पार पाडायचो. पण चार षटकांनंतर माझा  विजय शंकर व्हायचा. पण कप्तानाशी असलेल्या दोस्तीखातर हा प्रकार चार वर्षे चालला. पण २० -३० लोकांसमोर अशी फजिती होणं आणि १०० कोटी क्रिकेटवेड्या जनतेसमोर होणं नक्कीच वेगळं  !!

जाता जाता बांगलादेशविषयी! का कोणास ठाऊक पण आपल्या मैदानावरील वर्तनामुळं ते आपला चाहतावर्ग निर्माण करत नाहीत. उगाचच आक्रस्ताळेपणा करणं आणि केवळ उपखंडातील कामगिरीच्या जोरावर मोठमोठया वल्गना करणं ह्या गोष्टीचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. काही अंशी हेच घटक भारतीय संघाला लागू होतात पण हल्ली काही प्रमाणात आपली सुधारणा दिसून येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...