मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

वेगवान मार्गिका !!

 
पुन्हा एक रविवार संध्याकाळ, पुन्हा एक वसईहून बोरीवली परतीचा प्रवास! दहिसर चेकनाक्याच्या साधारणतः १ किमी आधीपासूनच वाहनांची कोंडी! मग कोणती मार्गिका पकडायची हा नेहमी सतावणारा प्रश्न ! मध्येच एक उजवीकडे वळायचा सिग्नल येतो. तिथे बऱ्याच वेळा वाहनं खोळंबून राहतात हे अनुभवाने मिळालेलं ज्ञान! त्यामुळे आपण ही मार्गिका टाळायची हे आधीपासून ठरविलेलं! परंतु प्रत्येक वेळी हा अनुभव, हा ज्ञान प्रथमच अनुभवणारा कोणीतरी ह्या मार्गिकेत असतोच आणि मग त्याची आणि त्याची गाडीची नाक खुपसून बाजूच्या मार्गिकेत घुसण्याची धडपड! 
ह्या सर्व खटाटोपीत बऱ्याच वेळा आपली मार्गिका सोडून बाकीचीच वेगाने जात असल्याचा अनुभव येतो. सोबत सोहम, प्राजक्ता असले की मग "तुम्हांला तरी मी सांगितलं होतं!" हे वाक्य हमखास ऐकायला मिळणार! मग न राहवून मार्गिका बदलण्याची माझीही धडपड! त्यामुळे अचानक मागच्या चालकाचा रोष, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, मग त्याने बाजूने जाताना दिलेला मस्त लुक, क्वचितच दोन्ही कार एकमेकाला घासण्याचा दुर्धर प्रसंग ओढविण्याची शक्यता! 
डिस्कवरी वाहिनीवर एक तासाचा कार्यक्रम अशाच संबंधित विषयावर दाखविला गेला होता. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका मोठ्या वाहतूक कोंडीत सापडतो. "पुढे एखादं वाहन बिघडून बंद पडलं असेल किंवा खड्डा पडला असेल!" असेच काही विचार करीत वाहन चालवत राहतो आणि मग ज्या ठिकाणापर्यंत वाहतूककोंडी झाली असेल तिथे पोहोचतो.  आणि पाहतो तर काय अहो आश्चर्यम!  तिथे काहीच झालेलं नसतं आणि वाहतूक पुढे व्यवस्थित चालू असते. डिस्कवरीवाल्यांचं म्हणणं होतं की हा सर्व खोळंबा बऱ्याच वेळा अधूनमधून मार्गिका बदलायचा प्रयत्न करणाऱ्या उतावळ्या चालकांमुळे होतो. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे मागचा चालकाला ब्रेक मारावा लागतो आणि मग त्याची साखळी प्रतिक्रिया होत राहते. डिस्कवरवाल्यांचा सिद्धांत असा की जर कोणीच मार्गिका न बदलता व्यवस्थितपणे आपली मार्गिका पकडून गाड्या चालवल्या तर सर्व मार्गिकाच वेगवान राहू शकतील! 


चेकनाक्याच्या वाहतूककोंडीने अस्वस्थ असलेलं मन डिस्कवरीचा कार्यक्रम पाहून विचार करू लागलं. स्वाभाविकपणे मनात विचार आला, की हा वेगवान मार्गिकेचा अट्टाहास कशासाठी! काही मिनिटं घरी लवकर पोहोचण्यासाठीच ना! ह्या वाचविलेल्या काही मिनिटांचा जर आपण सदुपयोग करणार असू तरच मग ह्या धडपडीला अर्थ आहे. 

तसं पाहिलं तर वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे नक्की काय करणं ह्याविषयीचा माझा संभ्रम वाढत्या वयानुसार वाढतच चालला आहे. नियमित अभ्यास करून मग खेळणे म्हणजे वेळेचा सदुपयोग ही शालेय जीवनातील अगदी सोपी व्याख्या आता काहीशी क्लिष्ट बनत चालली आहे. कुटुंबासोबत गुणात्मक वेळ (Quality Time) - हयात 
१) मुलाचा अभ्यास, त्याच्याशी खेळणं, त्याच्यासोबत टीव्ही बघताना त्याला बातम्यातील / खेळातील अधिक संदर्भ देणे ह्यांचा समावेश होतो. 
२) पत्नीशी गप्पा - हे सांगायला अगदी भारदस्त वाटत असलं तरी प्रामुख्याने ह्यात श्रोत्याची भूमिका चांगली वठवता आली पाहिजे. 
३) आई वडिलांसोबत शांत बसणे - ह्यात त्यांच्यासोबत तासभर टीव्ही पाहत बसलं आणि त्यात दोन मिनिटं त्यांच्याशी बोललं तरीही ते खुष असतात. 
४) भाऊबहिण, आणि नातेवाईकांना फोन करणे - ह्या बाबतीत माझी कामगिरी अगदी सुमार आहे.
४) कार्यालयातील उरलेल्या कामात अधिकाधिक कशी परिपूर्णता आणता येईल ह्याचा विचार करणे!
५) शालेय / जुन्या मित्रांना फोन मन रिझविणे!
६) पुस्तके वाचणे, ब्लॉग द्वारे लोकांना ज्ञान देणे!
७) क्रिकेट / चित्रपट संगीत पाहणे

ह्या झाल्या काही अगदी पटकन आठवणाऱ्या गोष्टी! 

हल्लीच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला मिळालेला मोकळा वेळ कसा योग्य प्रकारे व्यतीत करायचा! वेगवान मार्गिका आयुष्यातसुद्धा आपल्यासमोर येतात! तरुणाईची खुमखुमी असल्याने आपण त्या स्वीकारतो सुद्धा आणि मग आपली ध्येय कधीकधी खूपच आधी प्राप्त होतात. असतं एक शिखर आणि काहीसा एकटेपणा! इथं पोहोचल्यावर काय करायचं ह्याचा विचार आधीपासूनच करून ठेवायला हवा!

मग आठवलं ते पूर्वी कधी वाचलेलं वाक्य! "केवळ ध्येयाकडे लक्ष ठेवून प्रवास करू नका! प्रवासाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करा!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...