मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २६ मे, २०१५

वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!


 
मी जरी शेतकरी कुटुंबातून आलेला असलो तरी प्रत्यक्ष शेती व्यवसायावर मी उपजीविकेसाठी अवलंबून नाही. असं असलं तरी एकंदरीत शेतीव्यवसाय  दिशेने वसईत चालला आहे ते पाहता भविष्यात ह्या व्यवसायाचे अस्तित्व केवळ नाममात्र राहील अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. ह्या ब्लॉग पोस्टचा हेतू हा वसईतील ह्या विषयातील जाणकार व्यक्तींना आपली मत मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे असा आहे. माझे ह्या विषयातील ज्ञान हे केवळ पाहून आणि ऐकीव माहितीवर अवलंबून असल्याने त्यातील त्रुटी तज्ञांनी माफ कराव्यात. 

वसईतील शेतीउद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या 
१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण 
२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
३>  शेतमजुरांची टंचाई 

ह्या तिन्ही समस्यांचा आपण सविस्तरपणे उहापोह करूयात. 

१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण
साधारणतः १९३० - ४० च्या सुमारास वसईतील शेतकऱ्यांकडे दरडोई बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात शेती होती. ह्या शेतीची देखभाल करण्यासाठी म्हणा वा इतर कारणांमुळे ह्या सुमारास कुटुंबाचा आकार सर्वसाधारणपणे मोठा ठेवण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे त्यावेळी शेतीची देखभाल करण्यास जरी घरचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी कालांतराने ह्या सर्वांना शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणे कठीण होऊ लागले. आणि त्यामुळे हळूहळू शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचा कल शेतकरी समाजात दिसून येऊ लागला.
आज बहुतांशी सर्व शेतकरी कुटुंबात तरुण पिढी शेतकी व्यवसायापासून दूर गेली आहे.ह्यातील जे जे लोक आपल्या पर्यायी व्यवसायात यशस्वी झाले त्यांना आपल्या वाट्याच्या शेतीच्या तुकड्यात एक छंद म्हणून काही लागवड करण्याची चैन परवडू शकते. 

परंतु जो काही मोजका तरुण वर्ग उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्यांची मात्र आजच्या घडीला कठीण परिस्थिती झाल्याचं दिसून येते. अर्थात ह्याला अपवाद असतीलच पण त्यांची संख्या मोजकी असावी. तर ह्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या तरुण वर्गास जर शेतीच्या उत्पन्नातून आजच्या काळाशी सुसंगत अशी जीवनशैली अवलंबिता येत नसेल तर तो आपला शेतीचा तुकडा विकण्याचा मोह किती काळ टाळू शकतो? अशा ह्या तरुण वर्गास आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?

२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
इथे मला ज्यांच्याकडे कमी प्रमाणात जमीन आहे असा शेतकरी वर्ग अभिप्रेत आहे. आज बाकीच्या व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमाण भरमसाट वाढलेलं आहे. पण त्या प्रमाणात शेतीचे उत्पन्न वाढलेलं नाही. हल्लीच्या शिकलेल्या मुली कोण्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून आयुष्य काढायला बहुदा तयार होणार नाहीत. वरवर फारसा गंभीर न वाटणाऱ्या ह्या प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. वसईतील लग्न समारंभात इतर व्यावसायिकांना (उदाहरणार्थ बांधकाम व्यावसायिक / परदेशस्थित नोकरी) मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेचे प्रमाण सामान्य शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या अनेक पटीने आहे. अर्थात मोठे शेतकरी ह्याला अपवाद असतील पण त्यांचे प्रमाण कमी आहे. ह्यात अजून पुढचा मुद्दा - आजच्या मुली आयुष्यभर शेतकरीण बनून शेतीचे काम पाहायला तयार का नाहीत?

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे तुम्हांला क्वचितच चैनीचे आयुष्य जगता येतं हे सत्य आहे. त्यासाठी तुमच्याकडे १७ एकर उसाची शेती असावी लागते. होळीबाजारात सकाळी गलका, दुधी, वांगी विकायला येणाऱ्या शेतकरी कुटुंबातील स्त्रिया पाहा. दहा दहा रुपयाला दुधी विकणाऱ्या ह्या स्त्रियांना काय फायदा होत असणार ह्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. 

३>  शेतमजुरांची टंचाई 
पारंपारिक दृष्ट्या  ज्या समाजाने वसईतील वाडीत मजुरीचे काम केले त्या वर्गाची पुढची पिढी आज शेतीचे काम करण्यास तयार नाही. आज आपण वसईतील उरल्या सुरल्या वाड्यांना भेट दिलीत तर साठीच्या आसपास आलेले  मजूर आपणास काम करताना दिसतात. ह्यात दोन समस्या आहेत. एक तर नवीन पिढी शेतीकामास येत नाही ही पहिली आणि ह्या जुन्या पिढीस ह्या वयात सुद्धा हे काम करावं लागतं ही दुसरी समस्या. ह्या समस्यांपायी वसईत घेतल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे प्रकार हळूहळू बदलत जाणार. पूर्वी वसईची पानवेल ही वसईची शान होती. आज फार आतल्या भागात ह्या पानवेली राहिल्या असाव्यात. हल्ली शेतमजूर कमी प्रमाणात मिळतात म्हणून केळी लावण्याचे प्रमाण वाढीस लागलं आहे. एकदा लहान रोपे लावली आणि नियमितपणे पाणी देत राहिलं की बिचाऱ्या केळी आपसूक वाढत राहतात. त्या केळी  लावाव्यात जेणेकरून त्यांना योग्य महिन्यात लोंगर येतील ह्याचं सुद्धा एक शास्त्र आहे. माझ्या एका जाणकार नातेवाईकाने ते मला समजावून सांगितलं होतं.  

पुढील काही वर्षात शेतमजुरांच्या अभावी वसईतील शेतीव्यवसाय नामशेष होईल काय अशी भिती वाटू लागली आहे. ह्या समस्येवर उपाय म्हणून समजा एखाद्या धडाडीच्या व्यावसायिकाने शेतमजुरांचा पुरवठा करणारी संस्था स्थापन केली तर? ह्या शेतमजुरांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. नारळाच्या झाडावर चढून नारळ पाडू शकणारा तज्ञ समजला जाईल आणि त्याला जास्त मजुरी मिळेल. ह्या सर्वांना आरोग्यविमा, पगार अशा सुविधा उपलब्ध केल्या जातील. त्यांचा पुर्वेइतिहास तपासून घेतला जाईल. अगदी कल्पनाविलास पूर्ण करायचा झाला तर हा व्यावसायिक एक संकेतस्थळ उभारेल. त्यात आपल्या कर्मचाऱ्यांची आगाऊ तारखांसाठी नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. जितक्या आधी नोंदणी कराल आणि जितक्या मोठ्या प्रमाणात नोंदणी कराल तितकी अधिक सवलत. 
कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांना वर्षभर पगाराची शाश्वति मिळेल. ह्या कर्मचाऱ्यांना असणारे दारूचे व्यसन ही एक मोठी समस्या आहे. ह्या संस्थेद्वारे समुपदेशन सुद्धा करता येईल. 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने भविष्यात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशी कोणती पिके घ्यावीत ह्या विषयावर चर्चा होणे आहे. पारंपारिक  भाज्या घेणे जर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसेल तर दुसरे कोणते पर्याय समोर आहेत ह्यांचा विचार करायला हवा. सामुहिक शेतीचा प्रयोग वसईत करता येईल का हा सुद्धा अभ्यासून पाहण्याजोगा विषय आहे. 

अजून एक मुद्दा! वसईतील मुळची शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या पण इतर व्यवसायानिमित्त शेतीपासून आयुष्यभर दूर गेलेल्या लोकांनी निवृत्तीनंतर परत शेतकी व्यवसायात येण्याच्या शक्यतेचा विचार करावयास हवा. अशा लोकांवर शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे दडपण नसल्याने ही लोक शेतीत विविध प्रयोग करू शकतील.

एक गोष्ट लक्षात ठेवा; दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच जाणार आहे पण शेतजमिनेचे प्रमाण मात्र कायम अथवा कमीकमी होत जाणार आहे. एक काळ असा येणार आहे की शेती हा एक किफायतशीर व्यवसाय बनू शकतो पण त्या दिवसाचा फायदा उठवण्यासाठी आपण तयार असू का हा महत्त्वाचा मुद्दा आहे! ह्या समस्येचा वैयक्तिक पातळीवर मुकाबला करण्याऐवजी एकत्रितपणे बौद्धिक चर्चा करून त्यातून मार्ग काढणे आवश्यक बनले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...