मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग ३ सम्यक विचार साधी राहणी


कारचे सारथ्य करत महानगरातील सिग्नलवर थांबलेल्या असलेल्या सदानंदची विचारशृंखला कॅव् कॅव् ह्या आवाजानं भंगली. काचेवर तो बसला होता. खरंतर तो सदानंदच्या विचारशृंखलेचा अविभाज्य घटक होता.  सदानंदने काच खाली करुन त्याला आत घेतलं. 

"इतक्या गंभीरपणे कसला विचार करतोयस?"

"ह्यांचा, ह्यांचा !" समोरील बांधकाम सुरु असलेल्या गगनचुंबी इमारतीकडं अंगुलीनिर्देश करत सदानंद म्हणाला. 

"अगदी वखवखल्यासारखं एका चांगल्या शहराला ओरबाडून घेण्याचा चंग बांधला आहे जणू त्यांनी !" 

"संतापण्याचं काही कारण नाही. इतक्या सर्वाना व्यवस्थित पाणीपुरवठा केला जातोय, वाहतुकीसाठी सदैव नवनवीन माध्यमांचा वापर केला जातोय. असलेल्या माध्यमांना सुधारलं जातंय.  घरबसल्या खाद्यपदार्थ, किराणा माल, कपडे इतकंच काय तर मदिरासुद्धा उपलब्ध होत आहे. शहरात राहणाऱ्या माणसाच्या जीवनाच्या दर्जात सदैव सुधारणा होतेय! म्हणून तर तुझ्यासारखी माणसं गावं सोडून शहराच्या दिशेनं धाव घेताहेत" 

सदानंद काहीसा सावध झाला.  त्याच्या बोलण्याचा वरवर दिसतो तसा अर्थ घ्यायचा नाहीये हे त्याला बऱ्यापैकी समजलं होतं. 

"मला कमी वेळ असतो त्यामुळं माझ्याशी प्रदीर्घ संवाद  करुन हळुवारपणे तुला हव्या त्या मुद्द्याकडं मला घेऊन जायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळं तुला हवं ते स्पष्टपणं सांग. मागच्या वेळेसारखं अगदी मुद्द्यांना क्रमांक देऊन सांगितलं तरीसुद्धा चालेल!"

"अगदी कसं शहाण्यासारखं बोललास" ची नजर देऊन तो बोलू लागला. 

"पृथ्वीची  निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी पृथ्वी अगदी संतुलित अवस्थेत होती. मानवजातीच्या उत्क्रांतीतील प्राथमिक टप्प्यापर्यंत  ही संतुलित अवस्था कायम होती. काही कारणास्तव सर्वशक्तिमानानं मनुष्याच्या शरीरात असा मेंदू दिला जो काळानुसार प्रगत होत गेला. ह्या प्रगत मेंदूचा वापर मनुष्यानं प्रारंभींच्या काळात आपल्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी केला . त्यानंतर मात्र  जमीनविस्तार, संपत्तीसंकलन, धर्मप्रसार, शस्त्रास्त्रं अशा दिशेनं  त्याची वाटचाल झाली. आता  त्यात चंगळवादाची भर पडली आहे. "

"आधुनिक काळातील माणूस ज्या ज्या वेळी चंगळवादी गोष्टीचा वापर करतो त्या त्या वेळी तो पृथ्वीला संतुलित स्थितीपासून दूर नेत असतो. पृथ्वीला एका विशिष्ट प्रमाणाबाहेर संतुलित स्थितीपासून  दूर नेल्यास निसर्गचक्र बिघडतं आणि त्याचे दृश्य स्वरूपातील दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतात. सध्यातरी निसर्गाचा कोप स्थानिक पातळीवर दिसतोय. परंतु ज्या वेगानं हे सारं काही ढेपाळत आहे तो वेग पाहता जागतिक पातळीवर निसर्गाचा कोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सारं मानवाला कळतंय . परंतु हे थांबविण्याची इच्छाशक्ती मानवाकडं नाही. काहीजण  आपल्या परीनं प्रयत्न करत आहे. परंतु ते अल्पसंख्य आहेत आणि इतके बलाढ्यसुद्धा नाहीत की हे दुष्टचक्र थांबवू शकतील. "

जोरात सुरु असलेल्या AC मध्ये सुद्धा सदानंदला घाम फुटला होता. 

"ह्यावर काही उपाय नाही का?"

"खात्रीचा असा उपाय नाही. पण गावात जाऊन राहिल्यास जेव्हा केव्हा मोठा नैसर्गिक कोप येईल  तेव्हा तुमच्या वाचण्याची शक्यता अधिक असेल. नैसर्गिक कोप आल्यास शहरातील आपत्कालीन व्यवस्था किती सहजपणे कोलमडून पडते ह्याचा अनुभव तर तू घेतलाच असेल. एकदा का शहरात प्राथमिक सुविधा कोलमडून पडल्या की मानवांनी परिधान केलेले बुरखे कोलमडून पडायला आणि त्यांचे राक्षसी चेहरे बाहेर येण्याची शक्यता दाट आहे. 

गावात मात्र अगदी प्राथमिक पातळीवरील गरजा पूर्ण होण्याची आणि माणसांची माणुसकी टिकून राहण्याची शक्यता अधिक असेल !"

"तुझं काय ?" न राहवून सदानंदने विचारलं. 

"काच वरती कर , येतो मी !" असे म्हणत तो उडून गेला. आपल्या प्रश्नात काही खोट होती का ह्याचा विचार करत सदानंद गाडी पार्क करण्यामागं लागला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...