मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

भारत आणि India



आपण दोन वेगवेगळ्या देशात (भारत आणि इंडिया) जगतोय असे विचारवंत अधुनमधून म्हणत रहातात. विचारवंतांना अशी अर्थानी ओतप्रोत भरलेली वाक्यं सोडून सामान्यांना गोंधळवून टाकण्याची सवय आहे. वर्षोनुवर्षे अशा वाक्यांवर विचार करुन गोंधळून  एकदा जवळच्या मित्राजवळ अशा वाक्यांचा अर्थ न कळल्याची खंत मी बोलून दाखवली. तर तो अगदी सहज म्हणाला, "अरे त्यांना देखील त्याचा पूर्ण अर्थ कळला आहे असं थोडंच ! ज्याला जसा कळला तसा त्याचा अर्थ ! जशी हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट होती तसं !" ह्या मित्राचे मी चरण धरण्याचे बाकी होतो ! 

पण एकंदरीत खरं आहे हे विधान! आर्थिकदृष्ट्या, सामाजिक भानाच्या दृष्टिकोनातून आणि अनेक बाबींचा विचार करता प्रत्येक बाबतीत आपल्या भोवताली दोनच नाही तर अनेक प्रकारच्या (spectrum) व्यक्ती आढळतात.  आपण आपला दृष्टिकोन घेऊन सर्वांशी जीवनव्यवहार करत असतो; आपल्या भोवतालचे त्यांचा दृष्टिकोन घेऊन आपल्याशी वागत असतात. त्यामुळं नक्कीच मतभेद होत राहतात. "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" हे देखील मागील पिढीतील लोकांचं आवडतं वाक्य. हल्लीची म्हणजे चाळीशी / पन्नाशीला आलेली पिढी सहसा हे वाक्य बोलताना आढळत नाही. समाज बदलण्याची इच्छा अथवा क्षमता नसली तरी समाजपरिवर्तनाची मोठाली विधानं करण्याची सवय मागच्या पिढीत होती. ऐकून बरं वाटायचं. कधीतरी दुनिया बदलेल अशी आशा वाटायची. हल्लीची पिढी शक्यतोवर ह्या विधानाचा वापर करताना दिसत नाही. इंटरनेट बंद पडायचं सोडून बाकी काहीही झालं तरी दुनियेचं काही बिघडत नाही ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. 

जरा खोलात शिरलं, तर "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" ह्या विधानामागं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भारतीय संस्कृतीच्या जतन करण्याची इच्छा होती. एक व्यक्ती म्हणून जरी शक्य नसलं तरी एक समाज म्हणून आपण ह्या भारतीय संस्कृतीच्या जतनीकरणात हातभार लावु शकू हा ठाम विश्वास होता. दुर्देवानं आजच्या पिढीचा आपण एका समाजाचा घटक आहोत ह्यावरचाच  विश्वास ढळत चालला आहे. हे विधान बहुदा शहरांपुरतं योग्य असावं. शहरात आपल्याला आपला समाज दिसत नाही, जाणवत नाही. इथं समाज म्हणजे एखादा जात, भाषा, धर्म हे अधिष्ठान असलेला लोकसमूह नव्हे तर चांगल्या सुसंस्कृत जीवनाच्या ध्येयासाठी झटणारा लोकसमूह हा अर्थ अभिप्रेत आहे. 

समाजाशी असलेलं आपलं दैनंदिन आणि भावनिक जीवनातील नातं संपुष्ठात आलं की त्याचे अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात. आपण कदाचित कमी संवेदनशील बनत असू, पैसे देऊन सर्व सेवा विकत घेता येतील ह्या तत्वांवर आपला दृढ विश्वास होऊ शकतो. पैसे नसतील तर आयुष्यात चांगलं असं काहीच होऊ शकत नाही असं वाटू लागतं. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान हमीभाव मिळाला पाहिजे ह्या विधानाशी जो थोडासुद्धा मानसिकदृष्टया जुळू शकत नाही, त्या माणसाची समाजापासून दूर जाण्याची प्रक्रिया अगदी पुढील टप्प्यात गेली आहे असे आपण म्हणू शकतो. 

वरील प्रश्न कदाचित India भागात प्रकर्षानं जाणवत असतील. पण हे प्रश्न आहेत हे करण्याची त्यांची कदाचित तयारी सुद्धा नसेल. ह्यापुढील पिढीत हे मुद्दे अजून गहन होत जाणार! एका स्वकेंद्रित समाजाकडे आपली वाटचाल होत राहील. त्यामुळं आपले प्रश्न आपणच सोडविण्याची तयारी करावी लागणार हे खरं ! समाजप्रिय, सणांना महत्व देणारे आपले समाजजीवन कायम कधीच टिकणार नव्हते. कारण आपले समाजजीवन टिकवायचे असेल तर आपली स्वतःची अर्थव्यवस्था बळकट हवी. पूर्वी एखादी संस्कृती जगभर पसरायची ती कदाचित सैन्यबळावर, आज कदाचित त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीवर तिथल्या संस्कृतीचे भवितव्य ठरते. जोवर दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला पूरक म्हणूनच आपली अर्थव्यवस्था कार्यरत राहील तोवर आपल्या संस्कृतीची जोपासना करणे अधिकाधिक कठीण होत राहील! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...