मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

चाकोरीबाहेर




चाकोरीबाहेर जगण्याची इच्छा सद्यकालीन बहुतांश जनांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. किंबहुना समाजातील सद्यकाळाला अनुसरुन सर्वसाधारण जगणं म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था ह्यांचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. ह्या व्यक्ती, संस्था ह्यांच्या अनुपस्थितीमुळं आपल्या वागण्यावरील अंकुश नाहीसा होत आहे. त्यामुळं जाणता अजाणता बहुतांश लोक त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जगलेल्या जीवनापेक्षा वेगळं असं जीवन जगत आहेत.  

चाकोरीबाहेरील जगण्याची एक किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीचा असं जगणं जगु इच्छिणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला अंदाज येत नाही. ही किंमत चुकविणे ही काही अगदी अवघड गोष्ट आहे असं नव्हे पण ते सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी तुमच्याकडं खरोखर काही कौशल्य असायला हवं ! नाहीतर मोठ्या उत्साहानं घेतली भरारी, गगनी जाता गोंधळली स्वारी अशी अवस्था होण्याची दाट शक्यता असते. 

उगवणारा दिवस कसा असेल ह्याविषयी खात्री नसणे,  आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे ह्याविषयी विचारांची सुस्पष्टता नसणे, जवळच्या नात्यांना टिकविण्यासाठी जो वेळ खर्च करावा लागतो तो नसणे, गैरसमजांना दूर ठेवण्यासाठी जे भावनिक बंध निर्माण करावे लागतात त्यासाठी  मनाची असणारी आवश्यक प्रगल्भता नसणे हे सारे घटक चाकोरीबाहेर जगण्याच्या निर्णयाच्या सोबत आपल्याला स्वीकारावे लागतात. 

चाकोरीबाहेरील जगणे दोन पातळीवरील आहे.पहिली पातळी आहे ती एक समाज म्हणून आपण मागच्या पिढीच्या तुलनेनं चाकोरीबाहेरील जगणे जगत आहोत; पण ह्यात आपल्या सर्वांचा काही प्रमाणात नाईलाज आहे. आता हे जे काही बदल झाले त्यामुळं आपली जी ठोस नियमांत न बसणारी जीवनशैली निर्माण झाली त्याला पुढील पिढीसाठी चाकोरीतलं जगणं असं म्हणण्याची आपली इच्छा होऊ शकते. 

चाकोरीबाहेरील जगण्याची दुसरी पातळी म्हणजे वरील परिच्छेदातील एक समाज म्हणून निर्माण झालेल्या चाकोरीबाहेरील जगण्याहुन वेगळी अशी काही व्यक्तींनी निर्माण केलेली स्वतःची अशी जीवनशैली ! इथं मी चाकोरीपलीकडील जगणं म्हणजे काय ह्याचं एकही उदाहरण न दिल्यानं काहीशी अस्पष्टता आपल्या मनात राहील. पण हे जाणीवपूर्वक आहे. चाकोरीबाहेरील जगणं म्हणजे काय ह्याचा अर्थ व्यक्तीनुसार बदलतो आणि म्हणूनच मी मला अभिप्रेत असलेला अर्थ इथं नमूद करुन ह्या पोस्टद्वारे तुमच्यामनात येणाऱ्या विचारांना संकुचित करू इच्छित नाही ! 

चाकोरीत जगणाऱ्या लोकांना आयुष्याच्या उत्तरार्धात मनात काहीशी खंत निर्माण होऊ शकते. देवाने दिलेलं एकच आयुष्य, अगदी सर्वसाधारणपणे जगलो, विशेष काही वेगळं केलं नाही ही ती खंत ! स्वकेंद्रित जीवन जगावं ह्या विचारसरणीचा झपाट्यानं प्रसार होत असल्यानं त्याग हे ज्याचं अधिष्ठान आहे अशा चाकोरीतील जगणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत जाणार आहे. आणि आपल्यासमोर येणार आहे तो स्थिर मनाचा अभाव असणाऱ्या लोकांची बहुसंख्यता असणारा एक आर्थिकदृष्टया सबळ समाज ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...