मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २७ जून, २०२१

पाऊस कोसळतच असतो ..







रविवार सकाळ.पावसाला वाटतं म्हणून तो कोसळू लागतो. रविवार सकाळी अंघोळ आटपुन निवांत बसल्यावर पाऊस सुरु होण्यासारखं सुख नाही. पाऊस आकाशातून लक्षावधी थेंबांना घेऊन धरतीमातेकडे येत राहतो. त्यातील बरेचसे थेट धरतीमातेच्या कुशीत विसावतात. पण काही मात्र झाडापानांवर विसावतात, नाखुशीने मग धरणीमातेकडं झेपावतात. थेट धरणीमातेच्या कुशीत सामावणाऱ्या अथवा प्रथम झाडापानांवर विसावणाऱ्या थेंबांच्या मनात आपल्या बाबतीत भेदभाव झाला आहे ही भावनाच मुळी नसते. पाऊस कोसळतच असतो ... 

पाऊस माणसांत भावनांची वादळं निर्माण करतो. माणसं विचारात गढून जातो. ह्या विचारांत काही सुसूत्रता नसते. विचार उगम पावतात, मेंदूपर्यंत पोहोचतात. काही मनाला सुखावतात, काही कष्ट देतात. मनाला रविवारी सकाळी कष्ट देणाऱ्या विचारांचा राग येतो. मेंदू त्यांना प्रयत्नपूर्वक दूर सारतो. समोर गच्चीवर कावळा पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बसलेला असतो. कावळे सकाळी शांत असतात, पण सायंकाळी मात्र खूप कावकाव करतात.  पावसात आपल्याला स्वतःचं हक्काचं घरटं नसल्यानं दुसऱ्यांच्या गच्चीवर आश्रय घ्यावा लागतोय ही अपराधी भावना मुळी त्या कावळ्याच्या मनात नसते !पाऊस कोसळतच असतो ... 

मन मग मागच्या काही पावसाळ्यांच्या आठवणीत गुंततं. मनाला गुंतण्यासाठी काहीही चालतं. कारण मन सध्या काहीसं हळुवार बनलेलं असतं. मनालाच प्रश्न पडतो की आज आपलं हळवं रुप का सामोरं यावं? मन ह्यासाठी पावसाला जबाबदार धरतं. पाऊस सांगतो, "अरे सध्या माझे दिवस आहेत, मी रिपरिप करत पडीन किंवा धोधो कोसळेन. माझ्या आगमनानं बरेच लोक उत्साहित झाले आहेत, निसर्गाच्या हाकेला ओ देत बाहेर पडले आहेत" मनाला पावसाचं हे म्हणणं पटतं. आपल्या मनस्थितीबद्दल कोणाला जबाबदार धरणं चुकीचं आहे हे मनच मनाला समजावत राहतं. पाऊस कोसळतच असतो ... 

मनाला अचानक एक उक्ति आठवते.  "Life is about becoming better version of yourself!" मन बंडखोरीच्या पवित्र्यात असतं. सुधारित ह्या संज्ञेचा अर्थच सापेक्ष नाही का?  जर ह्या संज्ञेचे विविध अर्थ शक्य असू शकतात तर त्यातील एकाच अर्थाच्या अनुषंगानं सतत स्वतःच्या सुधारित आवृत्तीचा ध्यास का धरावा? पाऊस कोसळतच असतो ... 

कसोटीच्या मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला आपलं better version का सादर करता आलं नाही ? आठवड्यातील सर्वच दिवशी तुला स्वतःच्या better version च्या स्थितीत का पोहोचता आलं नाही? मनाचं बहुदा बंडखोर रुप जागृत झालं होतं. भोवतालच्या परिसंस्थेतील असंख्य घटक तुझ्या सादर होणाऱ्या रुपावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात. तुझं better version सादर व्हायचं असेल तर त्यातील महत्वाच्या काही घटकांशी होणारा तुझा संबंध सकारात्मक असायला हवा ! जसं परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षभराच्या अभ्यासासोबत शेवटच्या काही दिवसातील / आदल्या दिवशी केलेली  उजळणी, पुरेशी झोप, आहार महत्वाचा असतो. मन का कोणास ठाऊक समाजावणीच्या रुपाकडे पोहोचले होते.  पाऊस कोसळतच असतो ...

हे सारे लाड आहेत. एकदा का कर्मभूमीवर पोहोचले की प्रत्येक वेळी better नव्हे तर best version देता यायलाच हवं. बहुदा मन sinusoidal स्थितीतून जात असावं. कर्मभूमीवर पोहोचल्यावर त्याआधी काही घडलं ते सारं विसरता यायला हवं आणि उपलब्ध माहितीआधारे सर्वोत्तम कामगिरी बजावता यायला हवी !  पाऊस कोसळतच असतो ...

मनाला विचारांचं द्वंद्व झेपेनासं होतं. कावळा उडून दिसेनासा होतो. उरलेसुरले थेंब धरणीमातेच्या कुशीत आपल्या सवंगड्यांना भेटून सुखावलेले असतात. रविवार आता दुपारकडे झुकलेला असतो. एव्हाना पाऊस थांबलेला असतो ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...