मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २० जून, २०२१

शेरनी !



आपल्या सभोवताली घडणाऱ्या एखाद्या घटनेवर आधारित चित्रपट निर्मिती करताना दिग्दर्शकासमोर दोन पर्याय उपलब्ध असतात. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून वास्तवाला बाजूला सारून चित्रपट निर्मिती करायची. यामध्ये एक दिग्दर्शक म्हणून तुम्हांला जे कलानिर्मितीचे स्वातंत्र्य मिळालेलं असतं त्याचा तुम्ही वापर करत असता.  व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे अशी बऱ्याच निर्मात्यांची बॉलिवूडमध्ये धारणा आहे.  दुसरा दृष्टिकोन म्हणजे ज्या पद्धतीने ही घटना वास्तवात घडत असावी ती त्याच पद्धतीने सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. शेरनी या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि दुसरा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. 

ही कथा उत्तर भारतातील वनखात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या एका जंगलातील वाघिणीची आणि त्या जंगलातील वनअधिकारी असलेल्या विद्या बालनची ! प्रतीकात्मकदृष्टया पाहायला गेलं तर कथेत दोघीही परिस्थितीच्या शिकार होतात. त्यामुळं शेरनी हे  चित्रपटाचं शीर्षक म्हटलं तर दोघींनाही नजरेसमोर ठेवून  देण्यात आलं असावं ! मूळ समस्या - वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी मनुष्यवस्तीनं जंगलांत केलेला शिरकाव, जंगली प्राण्यांच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या मार्गात येणारी गावं, शेतं आणि त्यामुळं बकऱ्यांसारख्या माणसानं पाळलेल्या प्राण्यांच्या शिकारीसाठी चटावलेले रानटी प्राणी.  हा संघर्ष आहे तो मनुष्यांच्या दोन दृष्टिकोनांचा. वनअधिकारी, वनखाते आणि पशुमित्र एका बाजुला तर येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाघिणीने घेतलेल्या मनुष्यबळींचे भांडवल करु पाहणारे राजकीय नेते.  विकास आणि पर्यावरण संतुलन ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे परस्परविरोधी (mutually exclusive) आहेत; त्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदु शकत नाहीत अशा आशयाचं विधान चित्रपटात एकदा येतं ! 

अशा निबिड अरण्यात बहुतांशी पुरुषांचं अधिराज्य असलेल्या वनखात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या स्त्री अधिकाऱ्यांच्या समस्या विविध प्रसंगांमधून आपल्यासमोर येत राहतात. त्यावर ही एक समस्या आहे अशी स्पष्ट टिपण्णी करण्याचा मोह इथं टाळण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडण्याचा आटोकाट प्रयत्न विद्या करते. पण कधीही त्याविरुद्ध ती बंड करुन उठताना दिसत नाही. ह्या सर्व दांभिकपणाला कंटाळून मी नोकरी सोडून मुंबईला येते असंही ती आपल्या नवऱ्याला म्हणते. पण माझ्या नोकरीचं काही खरं नाही त्यामुळं तुझी सरकारी नोकरी कशीही करुन टिकवून ठेव असंच नवरा म्हणतो. 

मनुष्य आणि वन्यप्राणी सहजीवन तत्वांचे पालन करुन राहू शकतात ही विद्या, वन्यमित्र आणि विरोधकांची भावना. ह्याउलट मनुष्याचा जीव महत्वाचा आहे त्यामुळं ह्या वाघिणीला तात्काळ मारलं पाहिजे ही दुसऱ्या बाजूची विचारधारणा ! त्यांच्यासोबत पंचवीस वाघांची शिकार केलेला एक गर्विष्ठ शिकारी! वाघिणीला आपल्या दोन बछड्यांसह एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जायचं असतं. ह्या मार्गात मनुष्यवस्तीसोबतच एक मोठाली खाण सुद्धा असते. काही दिवसांपुर्वी DW ह्या जर्मन वाहिनीवर कोळशांच्या खाणीमुळं भारतातील पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या हजारो लोकांची आयुष्यं कशी उध्वस्त झाली आहे ह्यावर हृदयस्पर्शी माहितीपट पाहिला होता त्याची ह्या निमित्तानं आठवण झाली. 

हा चित्रपट एका संथ लयीत पुढं सरकत राहतो. अनुभवायचा असेल तर त्या आदिवासी पाड्यातील एक रहिवासी म्हणून ह्याकडं पाहावं. काला पत्थरसारख्या चित्रपटात खाण कामगारांच्या मूळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न नसतो.अशा  चित्रपटांत  ह्या समस्येमुळं प्रभावित काही पात्रांची कथा आपल्यासमोर येते. नायक नायिकेसोबत नाचगाणी करत, खलनायकाशी मारामारी करत त्या मोजक्या पात्रांना सुखी करतो आणि आपण आनंदी होतो. चित्रपट संपला की ती समस्या चित्रपटगृहातच ठेवून आपण आनंदी मनानं घरी यायचं असतं. शेरनी चित्रपटातील विद्या ही लौकिकार्थानं नायिका नाही. तिलाही आपल्यासारख्या समस्या आहेत, नोकरी टिकवायची आहे, त्यामुळं ती छोट्या विजयात समाधान मानते. हा चित्रपट आपण घरी पाहतो. चित्रपट पाहून विसरुन जाणं हे दिग्दर्शकाला आपल्याकडून अपेक्षित नाही. पर्यावरण विरुद्ध विकास हा जो काही लढा आहे त्यात माझी भूमिका कोणती आणि त्यासंदर्भात मी कोणते ठोस पाऊल उचलणार हा प्रश्न चित्रपट आपल्याला विचारतो. त्यामुळं घरात बसून शनिवारी सायंकाळी पाहिलेला हा चित्रपट आपल्या मनातच घोळत राहायला हवा हे ह्या शेरनीला आपल्याकडून अपेक्षित आहे ! 

(तळटीप - शेरनी म्हणजे सिंहीण ह्याची खात्री मी घरी विचारुन केली. परंतु चित्रपटात केवळ एकदा दर्शन देणाऱ्या ही शेरनी मराठीत वाघिणच आहे ही माझी समजूत !)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...