मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ५ मार्च, २०१७

गॅलरी!


खरंतर काही खास विचारशृंखला मनात ठेवून ही पोस्ट लिहायला घेतली नाही. गेल्या दोन तीन महिन्यातील प्रवासातील काही छायाचित्रे भ्रमणध्वनीची गॅलरी धुंडाळताना नजरेत भरली. म्हणताना आपण म्हणतो की वेळ कसा झटकन निघुन जातोय समजत नाहीये पण अशी काही छायाचित्रं पाहताना हे सारं काही गेल्या दोन तीन महिन्यात घडलं हे काहीसं आश्चर्यकारक वाटतं. प्रत्येक छायाचित्र पाहताना मनात त्यावेळी आणि आता आलेल्या काही विचारांना टिपण्णी म्हणून जोडतोय! 

१) सकाळी सूर्योदयाच्या वेळी मुंबई विमानतळाकडं प्रस्थान करताना नजरेस पडलेल्या दिनकराचं हे सुंदर रूप!  सकाळच्या वेळी अजुनही मुंबई माणसांतली वाटते. हवेत थोडाफार गारवा जाणवतो, वाहतूक व्यवस्थित वेगानं पुढं सरकत असते आणि माणसंसुद्धा एकमेकांशी काहीशा ओलाव्याने वागत असतात. किती दिवस टिकतंय हे मुंबईचं सकाळचं माणुसकीचं रूप कोणास ठाऊक!


२ ) बऱ्याच वेळा असं काही होतं की चिंतनासाठी एखादया मनोरम्य ठिकाणी आपल्याला बोलावलं जातं. पण जागृत वेळेपैकी ९०% वेळ बंदिस्त बैठकींच्या खोल्यात, जेवणात जातो. चर्चासुद्धा अगदी गहन आणि मेंदूला ताण देणारी असते आणि हे सर्व आटपुन आपण आपल्या रूमवर परततो.  अशावेळी क्षणभर अशा रुमवरील सुविधांना मनःपूर्वक दाद देऊन आपण निद्राधीन होण्याचा प्रयत्न करतो. 



३ ) बऱ्याच प्रयत्नपूर्वक रात्री कधीतरी झोप लागते. हॉटेलचा Wi-Fi पासवर्ड मिळाला असल्यानं सुरुवातीला झोप लागली नाही तरी थोडा वेळ निघतो. पण त्यामुळं पुन्हा मेंदू सक्रिय होऊन झोप लागण्यास अडथळा येतो. मग कधीतरी झोप लागते. पहिल्या दिवशीच्या धावपळीत लक्ष न दिलेल्या निसर्गाच्या सुंदर रूपांकडं आपलं लक्ष वेधलं जातं. सर्व काही सोडुन देऊन निसर्गासोबत जाऊन राहावं इथून सुरु झालेला विचार मग निवृत्तीनंतर नक्कीच निसर्गासोबत जाऊन राहू  इथपर्यंत येऊन पोहोचतो. आधुनिक भारतासोबत एक समांतर निसर्गरम्य भारत सुद्धा घडविण्यात पुढाकार घ्यायला हवा हा मनोदय पुन्हा उचल घेतो. 




४ ) हॉटेलच्या भल्यामोठ्या आवारात नास्त्यासाठी चालत जाताना आपसूकच मॉर्निंग वॉक होऊन जातो. परिसराचं सौदर्य न्याहाळण्यासाठी आपण सकाळी लवकर उठायला हवं होतं असं वाटून जातं. पक्ष्याचा मधुर किलकिलाट कानी पडतो. निसर्गाच्या निर्मात्यानं विविध पशुपक्ष्यांना एका मूळ रूपात निर्माण केलं. त्यातला एक माणुस सोडून बाकी सर्व आपलं मूळ स्वरुप टिकवून आहेत. त्यांच्याशी आलेला असा संपर्क मनाला नेहमी सुखावून जातो. 

नाश्त्याच्या वेळी, अजुनही भारताच्या बऱ्याच भागात लोकांना पोटभर अन्न मिळत नसताना आपण मात्र तिन्ही वेळ भरपेट खातआहोत ही अपराधी भावना मनात निर्माण होते. 


५ ) दुसऱ्या दिवसापर्यंत आपण सखोल दीर्घ चर्चेला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारा आपल्या मेंदूचा कप्पा सक्रिय करण्यात यश मिळविलेलं असतं आणि त्यामुळं हा दिवस बंद खोल्यांत सुद्धा फारसा कठीण जात नाही. 

रात्रीची तरणतलावाच्या नजीकची पार्टी एक मनोहर नजराणा प्रस्तुत करते. पौर्णिमेचा चंद्र डोळ्यांना सुखावून जातो. मैफिल रंगलेली असते, मंडळी गप्पांत रंगून गेलेली असतात. यशस्वी मंडळींचा आत्मविश्वास आपणास बरंच काही शिकवून जात असतो.  


६ ) काही दिवसांनी पुन्हा एकदा दुसऱ्या एका ठिकाणी चिंतन बैठक! इथं मागच्या अनुभवावरून धडा घेऊन सकाळी लवकर उठण्याची काळजी घेतली जाते. थंडगार वारा चित्तवृत्ती प्रफुल्लित करुन जात असतो. 



७ ) रस्त्यापल्याड डोंगराची एक रांग आताशा स्पष्ट दिसू लागलेली असते. आणि त्या डोंगराच्या कुशीत दडलेल्या गावांना जाग येऊन तिथले मिणमिणते दिवे आपल्याला खुणावत असतात. अशा एखादया गावात छोटंसं घरकुल असावं असंही वाटून जातं. 

पूर्वेला उगवणाऱ्या सूर्याचं आगमन क्षणाक्षणाला जवळ येत असतं. आणि क्रिकेट खेळणारे सहकारी जागृत होऊन फोनाफोनी सुरु झाली असते.  






८ )क्रिकेट मैदानाच्या आसपास असणार हे झाड मला आवडुन जातं. 




अशा अधिकृत वा वैयक्तिक  सहली कुठंतरी मनात चिंतनास प्रवृत्त करतात. आयुष्य एका विशिष्ट दिशेनं चाललेलं असतं. कधीकाळी शाळा कॉलेजात असताना आयुष्याची कल्पलेली दिशा आणि प्रत्यक्षातील दिशा ह्याचा बऱ्याचदा ताळमेळ लागत नसतो. नेहमीच्या आयुष्याच्या रगाड्यात असला काही विचार करायला वेळच नसतो पण असले काही क्षण मात्र ही फुरसत मिळवून देतात. 

फोनची मेमरी भरगच्च झाल्यानं लक्ष गेलेल्या भ्रमणध्वनीच्या गॅलरीची साफसफाई करताना आलेले हे सर्व विचार ह्या पोस्टवर उतरवायला रविवारची ही संध्याकाळ किंचित फुरसत देते!   

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...