मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

केळीचे सुकले बाग

ह्या आठवड्यात घेतलेल्या सुट्टीत वर्षभरात whatsapp वर जमवलेली मराठी गाणी निवांतपणे ऐकत होतो. काही मराठी गीतांमध्ये रूपकात्मक अलंकार अगदी खुबीने वापरण्यात येत असे. मनातली खंत अगदी साध्या शब्दात सांगितली तर मग ते गीत कसलं? साध्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाने लेख लिहावा. गीत लिहायचं झालं तर आजुबाजूला असणारा निसर्ग पाहावा. तो तर इतका सर्वव्यापी की आपल्या मनीची खंत त्यातल्या एखाद्या उदाहरणात तर दिसणारच. 

लक्ष वेधून घेणारे पहिलं गीत होतं, केळीचे सुकले बाग! लौकिकार्थाने तरारून वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही गोष्टी मिळून सुद्धा हे केळीचं बाग मात्र सुकत चाललं आहे. त्याला पाणी, सावली देऊन सुद्धा त्याची भरभराट होत नाहीये. 

एखाद्या बाह्यरूपाने सुखी दिसणाऱ्या संसारात अंतर्मनाने दुःखी असणाऱ्या स्त्रीची व्यथा सांगणारं हे गीत आहे हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी केवळ तिला घर, पैसा, कपडालत्ता देऊन भागत नाही तर तिच्या मनाला समजून घेणारा साथीदार हवा असा हा ह्या गीताचा आशय! 

ही व्यथा व्यक्त करणारी स्त्री काही वर्षापूर्वीची असावी. केवळ गीत जुने आहे म्हणून मी असे म्हणत नाही, पण मला क्षणभर असं वाटून गेलं. थोडसं मला सुधारून मी असे म्हणतो की अशी स्त्री हल्ली शहरात आढळण्याची शक्यता कमी झाली आहे. काही वर्षे , दशके मागं गेलं की मनीच्या व्यथा मनी बाळगण्यात समाधान मानण्याची मानसिकता बाळगणारा एक वर्ग होता. जसा हा वर्ग स्त्रियांमध्ये होता त्याचप्रमाणे तात्कालीन मराठी मध्यमवर्गसुद्धा हीच मानसिकता बाळगून होता असं माझं मत आहे. 

संसारात स्त्रीची मानसिक घुसट व्हायची कारणं काय असावीत ? ह्यासाठी केवळ तिचा नवरा, तिची सासरची मंडळीच जबाबदार असायची का? ह्यावर थोडा विचारविनिमय करणे हा ह्या पोस्टचा हेतू.
पूर्वीची परिस्थिती पाहता काही मुख्य मुद्दे समोर येतात 
१> अगदी ८० वर्षापूर्वी वगैरे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणं आणि ज्यामुळे तिला आर्थिक स्वावलंबन नसणं. संसारासाठी लागणाऱ्या प्रत्येक रुपयासाठी नवऱ्यापुढे हात पसरावा लागणं. 
२> त्यानंतरच्या काळात शिक्षकी पेशात नोकरी करण्यासाठी जरी स्त्रिया पुढे सरसावल्या तरी स्वतः कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा ह्याचं स्वातंत्र्य त्यांना नसे. 
३> केवळ आर्थिक स्वातंत्र्य ही एक बाब झाली पण घरात मिळणारी वागणूक, घरात घेतल्या जाणाऱ्या निर्णयात मतप्रदर्शनाचा हक्क ह्या बाबतीत सुद्धा स्त्रियांना फारसा वाव नसे आणि त्यामुळे भरल्या संसारात उपरेपणाची भावना निर्माण होई. 
४> लहानपणी ज्या आवड, छंद जोपासले त्यांच्याशी लग्नानंतर अचानक फारकत घ्यावी लागे. आणि मग आयुष्यभर केवळ ही खंत मनी बाळगावी लागे.
५> आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नवऱ्याशी भावनिक संवादाचा अभाव! ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचं त्याच्याशी जर संवाद साधता येत नसेल तर मग परिस्थिती कठीणच! आणि बालपणीच्या मैत्रिणी दुरावल्या की आयुष्यात निखळ मैत्रीला सुद्धा वाव कमीच राहणार! 

ही झाली पूर्वीची परिस्थिती. अजूनही गावात ही परिस्थिती असण्याची शक्यता आहे. ह्यात स्त्रीच्या ह्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीत एक स्त्रीच म्हणजे तिची सासू, लग्न न झालेली नणंद असण्याची शक्यता जास्तच! अजून एक महत्वाचा मुद्दा. संवाद साधून परिस्थिती बदलण्याची जिद्द दाखविण्याचा. ह्या बाबतीत ह्या स्त्रिया काहीशा कमी पडल्या असाव्यात. 

काळ बदलत गेला. आपल्या आईची ही घुसमट पाहत मुली मोठ्या होत गेल्या. मुलींच्या प्रत्येक पिढीनं आपल्याला जमतील तितके बदल घडवत आणले. काहींनी शिक्षण, उद्योग ह्याद्वारे आर्थिक स्वावलंबन प्राप्त केलं. ह्या आर्थिक स्वावलंबनाचा आधार घेत त्यांनी आपल्या कुटुंबात आपलं स्थान निर्माण केलं आणि मग आपली घुसमट थांबवली. 
काहीजणींनी भोवतालच्या परिस्थितीचे नीट निरीक्षण केलं. काळ बदलत चालला होता. एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कालबाह्य ठरत चालली होती. राजाराणीचा संसार अस्तित्वात आला होता. इथं ह्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात वेळ घालवला. त्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी कोणत्या, त्याची कमकुवत स्थाने कोणती ह्याचा त्यांनी अचूक वेध घेतला आणि संसारातील आपलं स्थान व्यवस्थित प्रस्थापित केलं. 

पोस्टच्या ह्या वळणावर ज्यामुळे ही पोस्ट सुचली ते हे गीत!

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पानं असुनि निगराणी

अशि कुठे लागली आग जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण बघुनि भवताली


पुन्हा विचार करता ह्यात नवऱ्याबरोबर संवादाचा अभाव असल्याने निर्माण झालेल्या खंतीमुळं हे गाणं सुचलं असावं असं वाटून गेलं. 

पुढे गाणी ऐकत गेलो आणि अजून त्याच धर्तीवर अजून एक गीत ऐकायला मिळालं. ह्या गीताचं विवेचन करायला नकोच. सर्व भावना अगदी समर्पकरीत्या मांडण्यात आल्या आहेत.

सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी

माझ्या सभोंती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी


आता पुन्हा एकदा स्त्रियांच्या विशेषतः शहरी स्त्रियांच्या बदलत्या मानसिकतेकडे! संसारातील आपलं स्थान स्थापित करून काहीजणी थांबल्या नाहीत तर त्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा काहीसा गैरवापर करून परिस्थिती पालटवली. मी एका माजी शालेय विद्यार्थी संघाच्या whatsapp मंडळाचा सदस्य आहे. तिथल्या पुरुष मंडळीना लग्नाच्या वाढदिवशी 'शहीददिन' अशा स्वरूपाचे अभिनंदनाचे संदेश येतात. आता मी वाट पाहतोय ती "सुकला नारळ तो , उंच वाढून सर्वांहुनी" अशा गीताची. 

एक आशास्थान . . ज्याप्रमाणे काही काळ पूर्वीच्या मुलींनी परिस्थितीचे निरीक्षण करून बाजी पालटली तसंच काही हल्ली वाढणाऱ्या मुलांच्या बाबतीत होत असावं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...