मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

हूल - भालचंद्र नेमाडे


सद्यकालीन मनुष्यास अतिशय वेगवान जीवन जगण्याची सवय लागली आहे. एखादा तास, एखादा दिवस समजा आपल्या मनासारखं घडलं नाही तर आपण प्रचंड अस्वस्थ होतो. हे मनासारखं म्हणजे नक्की काय ह्याची समज आपणास असतेच असेही नाही. पण आपल्याला गतीमय जीवन जगायचं व्यसन लागलं आहे. अशावेळी मोठ्या शहराच्या बाहेरील  कसे जीवन जगत असतात ह्याचा आपल्यास पुर्णपणे विसर पडलेला असतो किंबहुना त्याची जाणीव आपणास नसते आणि अशाप्रकारे शांतपणे आयुष्य  जगण्याच्या लोकांच्या क्षमतेविषयी आपलं अज्ञान असतं. 
शनिवारी पत्नीसोबत शॉपिंगला गेलो असताना प्रत्येक विक्रेत्यापाशी तिचा चोखंदळपणा पाहून व्यक्त होणाऱ्या माझ्या नाराजीविषयी तात्पुरता उपाय म्हणून मला पुस्तकांच्या स्टॉलवर पिटाळण्यात आलं. तिथं तासभर घालवून मी तीन पुस्तकं घेतली त्यातील हूल हे पहिलं! 
पुस्तकाची कथा चांगदेव ह्या नायकाभोवती फिरते. पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक बनलेला चांगदेव मुंबईतील जीवनाला कंटाळून एका गावातील कॉलेजात नोकरी स्वीकारतो. ह्यात बराच आदर्शवाद असतो. आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे, आपल्याकडे योग्य ते शिक्षण आहे तर मग आपण ह्या देशात कोठेही नोकरी करू शकतो हा तो आदर्शवाद! अडीचशे रुपये पगार - पगार मिळविण्यासाठी सर्व काही सहन करावी लागण्याची मनोवृत्तीअधूनमधून चांगदेवाला मनाला लागून राहत असते. पगार कितीही वाढला तरी हल्लीच्या युगातसुद्धा आपल्या सर्वांना हीच भावना सलत असते ही मात्र खरी गोष्ट!  

सुरुवातीलाच ह्या आदर्शवादाला तडा देणाऱ्या घटना घडत जातात. लेक्चरच्या वेळापत्रकाची आखणी करताना पर्यवेक्षक स्वतःसाठी आणि स्त्री प्राध्यापकांसाठी सोयीच्या वेळा आखून घेतो तर चांगदेवला सकाळचे पहिली आणि सायंकाळची सर्वात शेवटची तासिका देण्यात येते. एखाद्या विषयासाठी पुस्तके लावताना सुद्धा खास ओळखीतील प्राध्यापकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात. बदमाश मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्गावरील तासिका चांगदेवला दिल्या जातात. मुलांना मार्क्स मिळायला सोपे जावे म्हणून नोट्स देण्यास चांगदेवचा तत्वतः विरोध असतो. वर्गात फारच थोडी मुले अशी असतात ज्यांना शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात रस असतो. बाकीची सर्व मुले वर्गात प्रचंड गोंधळ करीत असतात. अगदी चांगदेवला पाठमोरा असताना डस्टर मारण्याइतपत त्यांची मजल जाते. मग मात्र चांगदेव आक्रमक रूप धारण करतो. त्या आणि अन्य मस्तीखोर मुलांस तो चांगलाच चोप देतो. ह्यात गुंड म्हणून ज्याची ख्याती आहे अशा गुंड मुलास सुद्धा तो सोडत नाही
हा गुंड मुलगा कॉलेज बाहेर चांगदेवची वाट पाहत राहतो. बाकीचे प्राध्यापक त्याला सोबत देण्याची इच्छा व्यक्त करतात. पण चांगदेव एकटा जातो आणि मग तो गुंड मुलगा अवसान न दाखवता आल्याने खजील होऊन परततो

अविवाहित पुरुषांना गावात खोली देण्यास तयार नसतात. गावात अविवाहित मुलींचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या पालकांना काळजी वाटत असते आणि त्याचप्रमाणे पाण्याची प्रचंड टंचाई असल्याने आंघोळीला एक अधिक माणूस आल्यास प्रश्न गंभीर होऊ शकतो अशीही मनोधारणा असते. त्यामुळे लॉजवर गायकवाड नावाच्या माणसासोबत राहण्याशिवाय चांगदेव कडे दुसरा पर्याय नसतो. गायकवाड म्हणजे सिगारेटची चिमणी असते. वयाच्या तिशीकडे पोहोचत आल्याने त्याच्या लग्नाचा प्रश्न गहिरा होत चाललेला असतो. गायकवाड आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो म्हणजे चांगला बारा हजाराची शिल्लक बँकेत जमा असते! ह्या वरून आणि अडीचशे रुपये पगारावरून हा काळ बराच जुना असल्याची जाणीव आपणास होते. प्राध्यापक लोक त्यांना कॉलेजातील मुलींशी संपर्काची संधी मिळत असल्याने सुदैवी असे ह्या गायकवाडचे म्हणणे असते


 
पुस्तकात मग कॉलेजातील राजकारणाचे वर्णन येतं. प्राचार्य तसे चांगल्या स्वभावाचे असतात. विद्यार्थी वर्गाची सबुरीने घेण्याचं त्यांचं धोरण असतं. शबीर नावाचा सहप्राध्यापक मग त्याला काही महत्वाचे सल्ले देतो. मुलांना आपल्याविषयी आपुलकी वाटली पाहिजे असा सल्ला देतो. सतत कडक राहून परिस्थिती सुधारणार नाही ह्याची जाणीव तो चांगदेवाला करून देतो. काही अंशी चांगदेवाला हा सल्ला पटतो. अडीचशे रुपये पगारावर महिन्याचा खर्च चालवणे चांगदेवाला कठीण जात असल्याने तो केवळ दोन शर्टावर दिवस काढत असतो. ही गोष्ट कॉलेजात कशी चेष्टेचा विषय बनली आहे ह्याची जाणीव शबीर त्याला करून देतो. पैशाची अडचण असली तरी उधारीवर कपडे खरेदी करायला काही हरकत नाही असाही सल्ला देतो. केवळ सल्ला देऊन थांबत नाही तर आपल्या ओळखीवर चांगदेवाला उधारीवर कपडे विकत सुद्धा घेऊन देतो. प्राध्यापकाला केवळ अडीचशे रुपये पगार असल्याने त्यांच्यावर अशी परिस्थिती उदभवणार ह्याची गावातल्या लोकांना जाणीव असतेच त्यामुळे उगाचच औपचारीकतेचा बुरखा पांघरण्यात काहीही अर्थ नाही ह्याची शबीर त्याला जाणीव करून देतो.  

पावसाचा अभाव असल्याने गावातील अस्वच्छतेचे वर्णन अधूनमधून येत राहते. अगदी अंगावर येण्याइतपत ते स्पष्टपणे नेमाडे ह्यांनी मांडले आहे. गावातील लोकांचे बोलणेसुद्धा अगदी थेट! मुलींची प्रकरणे वगैरे प्रकार अगदी भीडभाड न ठेवता स्पष्ट शब्दात मांडणारे! चांगदेव प्रमाणे आपल्याला सुद्धा मग ह्या भाषेची हळूहळू सवय होऊ लागते.
शारंगदेव नावाचे ज्येष्ठ प्राध्यापक असतात. ते एका रविवारी चांगदेवाला जेवावयास घरी बोलावतात. सुग्रास जेवणाने चांगदेव सुखावतो तर त्यांची पत्नी विमा पॉलिसीत्याच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करते. खाल्ल्या अन्नाची भीडभाड न बाळगता तो स्पष्टपणे आपल्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून नकार देतो. पुढे हे प्रकरण कॉलेजात बराच काळ चघळले जाते. चांगदेवाला ह्याचे परिणाम भोगावे लागतील असेही बाकीचे सहकारी त्याला सांगतात. 

पवार हा चांगला सहकारी चांगदेवाला भेटतो. चांगदेव मध्ये आजारी पडल्यावर मात्र तो बरीच खटपट करून त्याला आपल्यासोबत राहायला आणतो. त्याच्या सोबत त्याची म्हातारी आई असते. ह्याचेही लग्न जमले नसते त्यामुळे आई बरीच काळजीत असते आणि चांगदेवने ह्यात पवारला मदत करावी अशी तिची अपेक्षा असते. एका स्थळात चांगदेव पुढाकार घेतो सुद्धा! पण वधुपक्ष खूपच चिकित्सक निघतो. पवारच्या पूर्वपिढ्यांची शहानिशा करण्यात त्यांना खूपच रस असतो आणि त्यात खात्रीलायक माहिती न आढळण्याने ते पवारच्या गावापर्यंत चौकशी करत पोहोचतात. पवारच्या भावाला ही गोष्ट फारच अपमानस्पद वाटते आणि मग तो सुद्धा हुंड्याची मागणी पुढे करतो आणि मग लग्न मोडते.

मधून झोपे प्रकरण सुद्धा उद्भवते. हा इसम आपल्या शिकवणीला येणाऱ्या मुलीशीच लग्न करून मोकळा झालेला असतो. त्याची मनोवृत्ती अगदी वेगळ्या प्रकारची असल्याने तो चांगदेवाला सतत त्याचप्रकारचे सल्ले देत असतो. स्त्रीमुक्तीवाल्यांच्या हातात हा झोपे सापडला तर त्याचे खरे नाही
 
चांगदेवला एकटेपण खायला उठले असते. आणि मग त्याची भेट सावनुर भगिनीशी होते. ह्या भगिनीतील पारुशी चांगदेवचे सुत जुळू लागते.  गावात आलेला अविवाहित प्राध्यापक एका वर्षापेक्षा जास्त एकटा राहू शकत नाही हा आपला सिद्धांत खरा ठरल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांना आणि गायकवाडला बरे वाटते. पारू काहीशी महात्वाकांशी असते. ह्या असल्या छोट्या गावापेक्षा चांगदेवने मोठ्या गावात नोकरी शोधून चांगल्या भवितव्याचा शोध घ्यावा असे ती चांगदेवला सुचवते. एव्हाना स्थिरावत आलेला चांगदेव स्त्रीहट्टापुढे नामोहरम होऊन सर्वत्र अर्ज करण्यास सुरुवात करतो. त्याच्यात अजूनही शिल्लक असलेला आदर्शवाद त्याला आपण बाहेर नोकरी शोधत आहोत हे सर्वांना उघडपणे सांगण्यास उदयुक्त करतो. पण बाहेर सुद्धा परिस्थिती फारशी चांगली नसते ह्याची जाणीव त्याला होत राहते. एक वेळ तर अशी येते की न घर का न घाट का अशी त्याची स्थिती होईल का अशी शंका निर्माण होते. शेवटी सुदैवाने त्याला नोकरी मिळते पण तोवर महत्वाकांक्षी पारू हवाई सुंदरीचा ध्यास घेऊन त्याची परीक्षा देऊन आलेली असते. त्यामुळे हे प्रकरण असेच अर्धवट सोडून चांगदेव नव्या नोकरीच्या गावी निघतो. पुन्हा एकदा स्थिर आयुष्याच्या शोधात!

एका पूर्णपणे वेगळ्या विश्वात नेमाडे आपल्याला फिरवून आणतात. ह्या विश्वात अजिबात गती नाही. नेमाडे ह्यांनी स्वतःच्या अथवा त्यांच्या परिचयातील कोण्या माणसाच्या अनुभवावरून ही कथा लिहिली का हे समजावयास वाव नाही. कथेच्या शेवटात सुद्धा ठोस असे काही घडत नाही. नायक थोड्या कमी पगाराच्या नोकरीवर दुसऱ्या गावात निघून जातो. जिच्यासाठी ही सारी धडपड केली ते पारू प्रकरण सुद्धा अपूर्णच राहते.  चांगदेवचे आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे अलिप्त राहणे ह्याचा उलगडा मला झाला नाही. पुस्तकाच्या पहिल्या पानावर चांगदेव चतुष्टय :२ असे लिहिले असल्याने बहुदा ह्याचा पहिला भाग वगैरे असावा असे वाटते

आपण आयुष्य "अर्थ" पूर्ण बनविण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करीत असताना आपल्या भोवताली अशी अनेक माणसे असे आपल्या दृष्टीने "अर्थ" हीन जीवन जगत असतात आणि त्यातही समाधान मानून घेत राहतात ही जाणीव हे पुस्तक अधोरेखित करते. हे पुस्तक एकदा घाई घाईत वाचून काढलं आणि ही पोस्ट लिहिली. आता एकदा दिवाळीच्या सुट्टीत जर सवडीने वाचून काढायचं

आधुनिक काळात जीवनानुभवाच्या अगदी मर्यादित मार्गावरून आपण वावरत असताना अशा एका पूर्णपणे वेगळ्या विश्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे हे पुस्तक मला नक्कीच आवडलं. जीवनाचा दृष्टीकोन आपल्याला बदलता आला नाही तरी त्याकडे कधीकाळी जमेल तेव्हा बदलण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे ही जाणीव निर्माण झाली हे ही नसे थोडके!! अगदी संथ जीवनाचे वर्णन ज्या कौशल्याने नेमाडे ह्यांनी हाताळले आहे त्याची दाद द्यावी ती थोडकी. बघायला गेलं तर सर्व पात्रे अगदी सामान्य ; परंतु त्यांना एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा पदर जसजसं पुस्तक पुढे जातं तसा उलगडत जातो. ह्या पुस्तकाविषयी काहीही माहित नसताना केवळ स्वयंस्फुर्तीने हे विकत घेतलं आणि एक वेगळा अनुभव मिळाला

वाचनसंस्कृती जपली पाहिजे हे मात्र नक्की! प्रत्येकाने विकत घेऊन पुस्तके वाचलीच पाहिजेत. ह्या निमित्ताने मला वेळोवेळी उत्तम पुस्तकांचा सल्ला देणाऱ्या अनुपचे आभार मानून ही पोस्ट आवरती घेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...