मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ४ जानेवारी, २०१५

नववर्षचिंतन !


 
नवीन वर्षाचा काळ एक मैलाचा दगड असतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरलं. विविध लोक आयुष्याच्या विविध टप्प्यात एकंदरीत आयुष्याची दिशा आणि मार्ग ठरून गेला आहे हे मानतात. निवडलेला नोकरी - व्यवसाय, विवाह हे घटक ह्यात विशेष हातभार लावतात. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत; पण आपल्यातीलच काही लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ह्या विश्वाच्या, पृथ्वीच्या, मानवी जीवनाच्या अगाध पैलुंमधील जमतील तितकी रहस्य उलगडून पाहण्याच्या प्रयत्नात असतात. नवीन वर्षाच्या क्षणी मग मानवाने आखलेल्या पुढील टप्प्यातील म्हणजेच पुढील वर्षातील आपल्याला जमण्यासारखी उद्दिष्टे ठरवतात. 
मी आपला साधा माणूस! जीवनाची दिशा, मार्ग बऱ्यापैकी आखली गेली आहे असं मानणारा. त्यामुळे काही मोठा फेरबदल जीवनात संभवत नाही. तरीसुद्धा आता छोट्या वाटणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात हे मागच्या काही वर्षात अनुभवाने शिकलो. त्यामुळे त्या संदर्भात काही निर्धार करणे चांगले असते. आता निर्धार हा शब्द अगदी अचूक आहे असे म्हणता येणार नाही. प्रामाणिक प्रयत्न हा चांगला शब्द असू शकतो. येत्या वर्षात काही चांगल्या गोष्टी नव्याने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. खरं म्हणजे ह्यात गाजावाजा न करता हा सुद्धा भाग यायला हवा. ह्या पोस्टमुळे गाजावाजा न करता हा भाग मात्र चुकला जाणार. तर मग मूळ मुद्द्याकडे - ह्या वर्षी ज्या गोष्टींचे प्रामाणिक प्रयत्न करायचं ठरवलं आहे त्या अशा,
१> शांत राहण्याची सीमा विस्तारित करायचा प्रयत्न करणे. वर्षात अनेक प्रसंग असे येतात जे तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. त्या क्षणानंतर चांगली वाट आपल्यापुढे येईल असा विश्वास मनात बाळगणे आणि ही शांत राहण्याची आपली क्षमता अधिक सक्षम करणे. 
२> क्रोधाच्या प्रसंगी शांत राहणे आणि एकंदरीत आपली मनःस्थिती चांगली ठेवणे ह्या म्हटल्या तर एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. कार्यालयात तुमच्यावर जर जबाबदारीचं काम असेल तर तुमची मनःस्थिती चांगली असायला हवी. जबाबदारीचं काम म्हणजे नक्की काय? ज्या कामामध्ये तुम्ही बुद्धीचा वापर करता किंवा अनेकजणांच्या कामावर देखरेख ठेवता; ते जबाबदारीचं काम! थोडक्यात म्हणजे तुम्ही ह्या कामात उपलब्ध माहितीचा उपयोग करून निर्णय घेत असता. ह्यातील काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन असतात. काही धोरणात्मक असतात. तर असे महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी मनःस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीन. मनःस्थितीबरोबर उपलब्ध माहितीविषयी माझे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करीन; जेणेकरून चांगले निर्णय घेण्याची माझी क्षमता वाढीस लागेल. 
३> गेल्या आठवड्यात वाचलं, की लोकांचं एकंदरीत ब्लॉगिंग ह्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे मांडायचं झालं तर गंभीर, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून मांडलेले विचार ब्लॉगद्वारे कमी प्रमाणात हाताळले जातात. हा मुद्दा माझ्याही मनाला पटला. त्यामुळे ह्या वर्षी खरोखर विचारपूर्वक, मानवी स्वभावाचा अभ्यास करून मगच पोस्ट्स टाकत जाईन. बहुदा कथा हा प्रकार अगदी कमी होईल. आणि पोस्ट्स टाकायची घाई करणार नाही. लिहिलेली पोस्ट पुन्हा वाचून, गरज असल्यास त्याची पुनर्मांडणी करून मगच टाकीन. आणि हो पुन्हा एकदा एकंदरीत वाचकसंख्येच्या मागे लागून लोकप्रिय विषयावर लिहीण्याचा अट्टाहास धरणार नाही. 
४> बोलताना, लिहिताना विशेषकरून दुसऱ्या व्यक्तीविषयी आपली मते व्यक्त  करताना शब्दांचा सुयोग्य वापर केला आहे की नाही ह्याची पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेईन. एकंदरीत सभोवतालच्या भारतीय समाजाची आक्रमक वृत्ती वाढत चालली आहे. आत्मविश्वास आणि अहंकार ह्यातील सीमारेषा धुसर होत चालल्या आहेत. पारंपारिकतेच्या एका टोकाला बसून सभोवतालच्या बदलत्या दुनियेला ज्ञान देण्याचा आव कमी आणीन!
५> माझी सामाजिक जीवनात प्रत्यक्ष कृतीचे प्रमाण नगण्य आहे. ह्या गोष्टीला प्राध्यान्यक्रमात कसे वरचे स्थान देता येईल ह्याचा विचार करीन. 

एक गोष्ट मात्र जी गेली काही वर्षे करत आहे ती करणे चालूच ठेवीन! आणि ती म्हणजे मुलाच्या मागे अभ्यासासाठी लागणे! एका मल्लाची गोष्ट आहे. तो मल्ल एकदा रिंगणात सर्वांसमोर मोठ्या बैलाला अगदी सहजासहजी उचलतो. सर्वजण अगदी अचंबा व्यक्त करतात. त्यातील एकजण त्या मल्लाला विचारतो, "इतका मजबूत बैल; त्याला तू कसे उचलु शकलास?" मल्ल म्हणतो, "हा बैल जेव्हा छोटे वासरू होते; तेव्हापासून त्याला मी दररोज उचलतो आहे! त्याचे वजन जसे वाढत गेले तसा मी माझा व्यायाम आणि आहार वाढविला!" 
सात - आठ वर्षांनी बारावीचे पाटील क्लासेस निघतील, तेव्हा लोक सुद्धा मला असाच प्रश्न विचारतील, "अरे आदित्य, बारावीचा इतका कठीण अभ्यासक्रम तू इतका कसा सहजासहजी शिकवू शकतोस?"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...