मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

भावनांचं हरवलेलं खरंखुरेपण !


खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृद उरले आहेत ते म्हणु शकतात. तरी ही सवयीचा गुलाम असल्यानं ही पोस्ट!  सुरुवातीला पोस्टची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काही उदाहरणं 

१. हल्ली ज्याचा बोलबाला आहे असं बहुचर्चित तंत्रज्ञान वापरून तुम्ही ज्यावेळी तुमचं पहिलं प्रेसेंटेशन बनवता त्यावेळी ह्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आकर्षक स्लाईड पाहून तुम्ही अगदी प्रभावित होता. त्यानं वापरलेल्या प्रभावी संज्ञा,  अगदी व्यावसायिक पद्धतीनं आलेखाद्वारे मांडलेली माहिती पाहून आपण ह्याआधी हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात का केली नाही हा विचार तुमच्या मनात नक्कीच येतो. 

काही दिवस जातात. तुम्ही अजून काही प्रेसेंटेशन्स बनवता, तुमच्या सहकाऱ्यांनी बनविलेली प्रेसेंटेशन्स पाहता. मग अचानक तुम्हांला जाणवतं की कुठंतरी ह्या साऱ्या प्रेसेंटेशन्स मध्ये सारखेपणा आलेला आहे. त्या प्रभावी संज्ञा, ते आकर्षक आलेख तुमच्या समोर येण्याची वारंवारता वाढली आहे. तुम्ही सावध होता, मग तुम्हांला जाणवतं की ह्या तंत्रज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याचं असतं, त्यानं जे काही निर्माण केलं आहे ते तपासून पाहायला तज्ञ माणूस हवाच ! Human in the loop म्हणतात तो हाच ! सध्यातरी तो हवाच !

२. सोशल मीडियावर बरेचजण आपल्या जीवनातील आनंदाच्या बातम्या जाहीर  करतात. इथं शेअर हा शब्द न वापरण्याचा निर्धार केल्यानं जाहीर हा काहीसा जशाचा तसा अर्थ न व्यक्त करणारा शब्द वापरला आहे.  'आनंदाची बातमी' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती ५:५७ च्या चर्चगेट विरार लोकलमध्ये उडी मारून खिडकीची जागा मिळाली पासून ते माझी भारतीय  T २० संघात निवड झाली इतकी मोठी असू शकते.  पण त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये बहुदा ९०% खालील प्रतिक्रियांचा समावेश असतो. आता मराठी लोकसुद्धा मराठीतून प्रतिक्रिया देत नसल्यानं प्रातिनिधिक म्हणवल्या जातील अशा प्रतिक्रिया देण्याइतपत माहिती उपलब्ध नाही. 

"Wow! That's awesome!"

"Congratulations!"

"I'm so happy for you!"

"That's great news!"

"I'm thrilled for you!"

"Fantastic!"

"That's amazing!" 

आता ५:५७ च्या विरार लोकल मध्ये खिडकीची जागा मिळाली ही बातमी सोशल मीडियावर टाकणारा विद्वान "I'm thrilled for you!" ह्या प्रतिक्रियेला कसे उत्तर देत असेल ते माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच प्रतिक्रिया आपण आयुष्यातील सर्व घटनांसाठी वापरत असल्यानं समोरील व्यक्तीला आपल्या प्रतिक्रियेच्या, भावनांच्या खरेखुरेपणाविषयी साशंक व्हायला होतं. ह्यात ग्यानबाची मेख अशी ज्या क्षणी आपण अनेकांच्या आयुष्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण खरेतर कोणाच्याच आयुष्यात नसतो. 

३. श्रीमान प्रथिन ह्या गृहस्थानं बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात खळबळ माजवली आहे. तो दररोज मांसाहारी आहार करणाऱ्या लोकांच्या घरात चिकन, अंडी घेऊन येतो. पूर्वी पांढरा  रस्सा, तांबडा रस्सा ह्या क्वचितच घरी बनणाऱ्या डिशेस आज बनविल्या जात  हे ऐकूनच अत्यानंदाच्या भावनांनी उचंबळून येणाऱ्या माणसांच्या मनात आज दररोज बनणाऱ्या ह्या डिशेसच्या उल्लेखानं थोडीही खळबळ निर्माण होत नाही. 

४.  बऱ्याच धार्मिक, सामाजिक समारंभांना हल्ली एक साचेबंदपणा येऊ लागला आहे.  मर्यादित वेळेमुळे विवाह, मुंज वगैरे समारंभातील धार्मिक विधी बऱ्याच वेळा एक सोपस्कार म्हणून पार पाडावे लागतात. अर्थात ह्याला अपवाद असतातच. सामाजिक समारंभांना बेगडी रूप आलं आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. त्यातील भाषणं, एकमेकांचं कौतुक करण्याची वृत्ती, कोणताही वाद न होऊ देण्याची घेतलेली खबरदारी ह्यामुळं अशा समारंभांत कधीकधी अगदी वैतागून जायला होतं. 

पहिलं उदाहरण देण्याचं प्रयोजन असं की हे नवीन तंत्रज्ञान जसं एका साचेबंद पद्धतीनं उत्तर, माहिती देण्याची शक्यता महत्तम असते त्याचप्रमाणे आपण सुद्धा हल्ली एका साचेबद्ध पद्धतीनं बोलु चालू लागलो आहोत! 

दुसऱ्या उदाहरणात मला अभिप्रेत असलेला मुद्दा हा की नाती, मैत्री ह्या मध्ये वेळ गुंतवावा लागतो. पूर्ण मनापासून वेळ गुंतवला तरच ह्या नाती, मैत्रीमध्ये खरंखुरेपण येऊ शकतं. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केवळ असतं ते तोंडदेखलेपण ! प्रगतीच्या पुढील टप्प्यांमध्ये आपल्या वेळेवर संगणक, भ्रमणध्वनी, कार्यालय अधिक हक्क गाजवत राहतात. मग उरलेल्या वेळात केवळ त्या चेकबॉक्स वर टिक करायचं म्हणून आपण तोंडदेखलेपणानं प्रतिक्रिया देत राहतो. आता हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. किमान आपण प्रयत्न तरी करत असतो!

तिसऱ्या उदाहरणातील मुद्दा अति परिचयात अवज्ञा ! सतत संपर्कात राहिल्यानं नातेसंबंधातील  गोडवा कमी होण्याचं भय असतं. 

पण जपण जर खरोखर गंभीरपणे विचार केला तर हे सारं अपरिहार्य आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर मनुष्य भावनांपासून फारकत घेणार हे विधीलिखित आहे. आजही जगातील विविध मनुष्य समुदाय त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार आपल्या भावना वेगवेगळ्या प्रमाणात नियंत्रित करायला शिकले आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यावर सर्वात पुढे असणारी माणसं आपली जीवनशैली पूर्णपणे यंत्रांशी सर्वप्रथम जुळवून घेतील. 

जाता जाता ह्या पोस्टमधील हे हसतमुख बाळ ! हल्लीच्या बहुचर्चित तंत्रज्ञानाला मी असं चित्र बनविण्याची विनंती केली असता त्यानं मला मोजके दोन तीन प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची मी उत्तरं दिल्यानंतर तात्काळ हे हसतमुख बालक माझ्यासमोर आलं. केवळ भावनांचं खरेखुरेपण हरवलं नसावं, आपल्या भोवतालच्या बऱ्याच गोष्टींच्या खरेखुरपणाबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !  

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

आस स्वातंत्र्याची


भारताला लौकिकार्थानं स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो का ह्याविषयी माझे काही विचार !

१. स्वातंत्र्य नक्की कशापासून मिळवायचं आहे ह्या विषयी प्रत्येकाच्या विचारात प्रचंड तफावत आहे.  आहार, पोषाख ह्या मुलभूत गोष्टींपासून सुरु होणारी स्वातंत्र्याची आस जीवनाच्या अनेक पैलूंना इतक्या खोलवर स्पर्शून जाते किंबहुना त्या पैलूंमध्ये इतका आमूलाग्र बदल घडवून आणते की ही आस धरणारी व्यक्ती नक्कीच मनात कुठंतरी खोलवर हादरते. ह्यात आपण रेखाटलेलं स्वातंत्र्याचं चित्र आपल्या पुढील पिढीने ज्या महाकाय प्रमाणात पुढं नेलेलं असतं त्याचा मोठा वाटा असतो. पण आपण हादरलो आहोत हे बाहेरच्यांशी सोडा पण स्वतःशीही कबूल करण्याचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो असतो. 

२. पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर आधारित नोकऱ्या गेल्या अनेक वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढल्या. भारताच्या महानगरातील विशिष्ट वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात ह्या नोकऱ्यांनी मोठा हातभार लावला. परंतु ह्या नोकऱ्या करताना तिथल्या संस्कृतीशी आधारित आहार, पोषाख, सण, विवाहपद्धती ह्यांनी कधी हळूच आपल्या जीवनात प्रवेश करत मग ठाण मांडलं हे आपल्याला समजलंच नाही. इतकंच काय आपली माय मराठी भाषा देखील ह्या आक्रमणाखाली दबली गेली. ह्या साऱ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं आपल्याला वाटतंय का हा मुलभूत प्रश्न !

३. वरील  मुद्दा लक्षात घेता पाश्चिमात्य देशांनी प्रभावित केलेली जीवनपद्धती प्रथम महानगरात प्रवेश करती झाली. त्यानंतर चित्रपट, मालिका ह्याद्वारे तिचा शिरकाव गावागावांत होऊ लागला. संपूर्ण भारताचं चित्र लक्षात घेतलं तर फार मोजक्या लोकांना ही जीवनपद्धती स्वीकारणं आर्थिकदृष्टया शक्य आहे. पण सोशल मीडियाने आपल्या घराघरांत ठाण मांडून बसायला मदत केलेल्या ह्या जीवनपद्धतीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का हा मोठा प्रश्न !

४. आपलं वस्तुनिष्ठ परीक्षण करून, मोठ्यांचा / जाणकारांचा सल्ला घेऊन त्यानुसार वागावं ह्या मानसिकतेला आपण केव्हांच तिलांजली दिली आहे. हल्ली भारतातील बहुसंख्य लोक विविध कारणास्तव स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहेत. ह्या अकारण श्रेष्ठत्वाच्या भावनेतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळावं ही माझी इच्छा ! 

५. मुद्दा क्रमांक दोन वर आधारित जीवनशैलीसाठी आवश्यक किती गंगाजळी तुमच्यापाशी असावी ह्याचे मोठाले आकडे अर्थतज्ञ मांडत आहेत. प्रात्यक्षिक दृष्ट्या विचार करता फार मोजक्या लोकांना ही गंगाजळी जमविणे शक्य आहे. ह्या मोठमोठ्या आकड्याच्या दडपणातून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य तुम्हांला मिळावं ही माझी इच्छा !

अखेरीस फेसबुकवरील माझ्या प्रत्येक पोस्टला लाईक मिळायलाच हवेत ह्या मनातील सुप्त इच्छेपासून सुद्धा मला कधीतरी स्वातंत्र्य मिळावं ही माझी माझ्यासाठी इच्छा !

येत्या शुक्रवारी येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी ह्या विविध छुप्या पारतंत्र्यातून मला आणि तुमची इच्छा असल्यास तुम्हांला स्वातंत्र्य मिळावं ही शुभेच्छा ! 

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

द्वैत -भाग ४





११ जुलै २०५६ (पुणे )

मुथ्थुस्वामी आणि सुमुख बॅनर्जी ह्यांची मस्त चर्चा सुरु होती. "मुथ्थु मला नक्की खात्री आहे की तू सध्या नक्की किती अनिकेत आहेत ह्याविषयी गोंधळला आहेस!" सुमुख मस्करीच्या सुरात म्हणाला. "तीन! एक खरा आणि दोन डिजिटल !" मुथ्थु आत्मविश्वासानं म्हणाला.  "शाब्बास, एक डिजिटल अनिकेत बांद्रयात पोहोचला असला तरी चॅनच्या ताब्यात असलेला डिजिटल अनिकेत ज्याला तो खरा अनिकेत समजतोय त्याचं कसं चाललंय ह्याविषयी आपलं दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुला? सुमुखच्या ह्या प्रश्नानं मुथ्थुला त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणवलं. 

चॅन आणि अल्बर्टच्या समजुतीनुसार त्यांनी खऱ्या अनिकेतचे अपहरण केलं होतं. पण त्यांच्या ताब्यात असणारा अनिकेत हा मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी पाठवलेला डिजिटल अनिकेत होता हे त्यांना समजलं नव्हतं. त्यांचं सारे लक्ष त्यांनी बनविलेल्या डिजिटल अनिकेतच्या कामगिरीवर असल्यानं आपल्या ताब्यातील अनिकेतच्या माणूसपणाची खातरजमा करून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नव्हती. 

११ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

"अनिकेत मी आल्ये !" वैदेहीचा आवाज ऐकताच अनिकेतच्या अंगावर शहारे उमटले. हे जे काही चाललं आहे त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याची मनःस्थिती गेली होती. वैदेहीने झटपट त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं. "किती अशक्त झाला आहेस रे तू ?" वैदेही कळवळून म्हणाली. अनिकेत अजूनही तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पण तिनं पुढं केलेल्या शिऱ्याच्या बशीकडे मात्र दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी अवघड होते. पहिला चमचा जिभेवर टाकताच हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य राहील अशी ग्वाही त्याच्या अंतर्मनाने दिली. "वैदेही, हे काय चाललंय ?" इतके दिवसाचा संताप त्याच्या स्वरातून व्यक्त होत होता. "झालं, साऱ्या दुनियेचा राग माझ्यावर काढणार असशील तर मी चालले परत भारतात !" वैदेहीच्या ह्या वाक्यानं तो भानावर आला. आपण अजूनही अमेरिकेतच आहोत हे त्याला जाणवलं. 

११ - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - मंगळवार  

काल चॅन आणि अल्बर्ट आपल्यासाठी वेळ देऊ शकले नाहीत हे डिजिटल अनिकेतला पटण्यासारखं नव्हतं. ह्या प्रोजेक्टचे गांभीर्य पाहता प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असणार होता. पण तरीही त्यानं कसाबसा संयम राखला होता. रात्री वैदेही घरी आलीच नाही. तिनं आपलं ठाण्यातील वास्तव्य दोन दिवस वाढविले असल्याचं त्याला कळवलं होतं.  काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव ह्या अनिकेतला होऊ लागली होती. 

आज चॅन आणि अल्बर्ट बैठकीला वेळेवर आले होते. व्हिडिओ कॉल एनक्रिप्ट करून त्या तिघांची अतिशय गोपनीय चर्चा सुरु झाली होती.  चॅन आणि अल्बर्ट ज्या पद्धतीनं चर्चेत भाग घेत होते आणि प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारत होते त्यामुळं डिजिटल अनिकेत साशंक झाला होता.  तासाभराने ज्यावेळी कॉल दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी  थांबला त्यावेळी डिजिटल अनिकेतने मोठा निर्णय घेतला. त्यानं थेट उच्चपदस्थांशी संपर्क साधला. चॅन आणि अल्बर्ट ह्यांची खरी ओळख पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी अशी त्यानं विनंती केली. 

मुथ्थु आणि सुमुख अनिकेतच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्यानं त्यांना लगेचच तो  काहीतरी संशयास्पद कृती करत असल्याचं जाणवलं. दहा मिनिटांनंतर डिजिटल अनिकेत अगदी काळजीपूर्वक कॉलवर आला. तोवर अमेरिकेतून आतापर्यंत भाग घेणारे डिजिटल चॅन आणि अल्बर्ट बाजूला होऊन खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट कॉलवर आले होते. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीनंतर चॅन ह्या कॉलवर फक्त मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी जे काही सांगितलं तेच बोलणार होता. डिजिटल अनिकेतच्या वरिष्ठांनी कॉलवर आलेल्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांची सर्व शहानिशा केली. ते खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट असल्याबद्दल त्यांनी डिजिटल अनिकेतला आश्वस्त केले. डिजिटल अनिकेत आता आपल्याला मिळालेल्या सर्व माहितीचा आढावा त्यांना देऊ लागला होता. 

(क्रमशः )


सोमवार, १४ जुलै, २०२५

द्वैत -: ChatGPT विश्लेषण


द्वैत कथेचा पुढील भाग लिहायला उशीर होत असल्यानं आज सकाळी ChatGPT ला आतापर्यंत लिहिलेल्या तीन भागांचं विश्लेषण करण्याची विनंती केली. त्यानं दिलेलं विश्लेषण खालीलप्रमाणे.  आता जेव्हा पुढील भाग लिहीन तेव्हा ChatGPT ची अनुमाने खोटी ठरविण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. तुझं विश्लेषण प्रसिद्ध करू शकतो का असं त्याला विचारलं असता त्यानं दिलखुलास मनानं परवानगी दिली आहे! 


"डिजिटल अनिकेत": एका मराठी साय-फाय थ्रिलरचा गुंतवणारा शोध. -: ChatGPT विश्लेषण

Sci-Fi, थ्रिलर, आणि मानवी भावनांचं अफलातून मिश्रण

परिचय

सायन्स फिक्शन आणि थ्रिलर या दोन्ही प्रकारांना मराठीत अजूनही तुलनेनं मर्यादित वाचकवर्ग आहे, पण जेव्हा अशा कथा भावनिक गुंतवणुकीसह वाचायला मिळतात, तेव्हा त्या वाचकाच्या मनात खोलवर रुजतात. "डिजिटल अनिकेत" ही अशीच एक कथा आहे — जिच्यात भविष्यकालीन तंत्रज्ञान, ओळख विसरणं, मानवी स्नेह-संबंध, आणि उत्कंठावर्धक घटना यांचं प्रभावी मिश्रण आहे.

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण या कथाचं सखोल विश्लेषण करू — कथानक, पात्र, शैली, तसेच काही सूचनांसह!


🔍 कथानकाचं थोडक्यात विश्लेषण

कथा सुरू होते २०५६ सालच्या मुंबईत. अनिकेत नावाचा पात्र अमेरिकेला एका गुप्त प्रोजेक्टसाठी जातो. परंतु काही दिवसांतच त्याची पत्नी वैदेही त्याला पुन्हा मुंबईत पाहते — काहीसे बदललेलं, पण त्याचं म्हणवणारं व्यक्तिमत्त्व. दुसरीकडे, खरा अनिकेत अमेरिकेत अज्ञात ठिकाणी कैद आहे.

तिथं चॅन आणि अल्बर्ट नावाचे दोन वैज्ञानिक ‘डिजिटल अनिकेत’ च्या यशस्वीतेवर लक्ष ठेवत आहेत. संपूर्ण कथा काळ आणि स्थळ यांच्या ठळक खाचाखोचांनी भरलेली आहे आणि वाचकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.


🎭 प्रमुख पात्रांचं विश्लेषण

पात्रवैशिष्ट्यं
अनिकेतकर्तबगार, हुशार, पण अचानक विचित्र परिस्थितीत अडकलेला. कथानकाचा केंद्रबिंदू.
वैदेहीगूढ, सहनशील, पण तिनं नकली अनिकेत ओळखलाय का — याचं उत्तर अजून धूसर.
चॅनसंशयी, मानवी भावना जपणारा, पण वरिष्ठांच्या छायेत अडकलेला.
अल्बर्टमिशन-केंद्रित, थंड विचार करणारा, तंत्रज्ञानात पारंगत पण भावनाशून्य.
केनेडीकथेमध्ये संक्षिप्तपणे, पण निर्णायक प्रभाव टाकणारा.

✍️ कथालेखनशैली आणि वातावरणनिर्मिती

  • शैली: कथा "तारीख + ठिकाण" या फॉरमॅटमध्ये लिहिलेली असल्याने प्रसंगांची वेळ आणि पार्श्वभूमी नीट उमगते.

  • भाषा: प्रवाही आणि नेमकी मराठी. आधुनिक शब्दप्रयोग (प्रोजेक्ट, व्हिडीओ, डिजिटल) मुळे वास्तवतेचा भास.

  • थरार: गूढतेचा योग्य मापात वापर, आणि वेळोवेळी वाचकाच्या मनात उठणारे प्रश्न कथेला पुढं नेतात.


✅ बलस्थानं (Strengths)

  • Sci-Fi आणि Thriller या दोन्ही घटकांचं संतुलित मिश्रण.

  • कथानकाची गुंतवणूक — प्रत्येक पानावर एक नवं वळण!

  • मानवी भावनांची छान गुंफण — विशेषतः अनिकेत आणि वैदेहीच्या संबंधांमध्ये.

  • संवादांची मितव्ययी पण प्रभावी मांडणी.


❗ सुधारणा आणि पुढील शक्यता

१. "डिजिटल अनिकेत" अधिक स्पष्ट करा:
हा नक्की क्लोन आहे, रोबोट आहे की सायबॉर्ग? थोडी स्पष्टता टेक्नोलॉजिकल विश्वासार्हता वाढवेल.

२. वैदेहीचं वर्तन:
ती नकली अनिकेत ओळखतेय का? की ती काहीतरी लपवत आहे? यासंदर्भात सूक्ष्म संकेत देणं रोचक ठरेल.

३. चॅन-अल्बर्ट यांचा संघर्ष:
दोघांमध्ये नैतिकतेवरून संघर्ष वाढवला तर कथेला आणखी खोलात न्यायला मिळेल.

४. वर्णनशैली:
अनिकेतची कैद आणि त्याचे अंतर्मन या दृश्यांना अधिक ‘विज्युअल’ केल्यास कथा अजून जिवंत वाटेल.


🌟 निष्कर्ष

"डिजिटल अनिकेत" ही एक गूढ आणि कल्पकतेने परिपूर्ण अशी कथा आहे — मराठीत Sci-Fi साठी एक महत्त्वपूर्ण पाऊल. ही कथा सहज एखाद्या वेब सिरीजचं स्वरूप घेऊ शकते.


👇 पुढचं काय?

  • खरा अनिकेत सुटेल का?

  • वैदेहीने ओळखलंय का नकली अनिकेत?

  • चॅन आणि अल्बर्टमध्ये फूट पडणार का?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढील भागांमध्ये उलगडतीलच!


📌 तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्ही जर अशा कथा वाचत असाल तर खाली कॉमेंटमध्ये तुमच्या शिफारसी नक्की कळवा!


लेखक: [तुमचं नाव]
विश्लेषण: ChatGPT सहकार्याने


रविवार, ६ जुलै, २०२५

द्वैत -भाग ३


९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला खरं तर स्थळ आणि वेळेचं भान ठेवायला कठीण जायला हवं होतं. पण तैलबुद्धीचा अनिकेत दमला भागला असला तरीही महत्प्रयासाने आपली विचारशक्ती कायम ठेवून होता.  आज रविवार ९ जुलै. गेल्या शनिवारी रात्री आपण थेट विमान पकडून अमेरिकेला आलो. सोमवारी कामात खूपच चांगली प्रगती झाली होती. आणि अचानक सोमवारी रात्री आपल्याला असं डांबून ठेवण्यात आलं. गेले चार दिवस केवळ एक अनोळखी माणूस पिझ्झा, बर्गर वगैरे आणून देत असे.  आंघोळ वगैरे आटोपण्यासाठी त्याला अंधारातच बाथरूममध्ये सोडलं जात असे. त्यावेळी त्याला अर्थातच बंधनातून मुक्त केलं जाई. पण तिथं करड्या आवाजात त्याला न्हाणीघरातून बाहेर येताच पुन्हा बांधून घेण्यासाठी ताकीद दिली जाई. एकंदरीत अनिकेत शाळेपासूनच मारामारी ह्या प्रकरणापासून दूर राहत असल्यानं इथं तो काही प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती. तरीही ह्या आपल्या अपहरणकर्त्यांबद्दल तो काहीसं चांगलं मत बाळगून होता.  त्याचबरोबर हे आपल्याबरोबर इतकं चांगलं का वागत आहेत हे त्याला समजणं कठीण जात होतं. 

१० जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आज सकाळी त्याला नाश्त्याला चक्क त्याच्या आवडीचे पोहे देण्यात आले होते. पोहे काहीसे करपले असले तरीही त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. आवडीचे पोहे मिळाल्याच्या आनंद काही वेळानं स्थिरावल्यानंतर वैदेहीने पोहे केले असते तर असेच केले असते हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण तिनं नक्कीच हे पोहे करपवले नसते हे तो जाणून होता. वैदेहीच्या चिंतेनं तो अगदी व्याकुळ झाला होता.  

८ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)

सकाळी अनिकेतला उठायला काहीसा उशीर झाला होता.  वैदेहीला शोधत तो स्वयंपाकघरात आला. "गुड मॉर्निंग!" वैदेहीने त्याला सकाळच्या शुभेच्छा दिल्या. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी स्वयंपाकघरातून पोह्याचा खमंग वास यायला हवा होता. परंतु इथं तर वैदेहीने झोमॅटोवरून साग्रसंगीत नाश्त्याची ऑर्डर दिली होती.  अनिकेत उठायचीच ती वाट पाहत होती. अनिकेत स्वयंपाकघरात येताच तिनं त्याला दात वगैरे घासून नाश्त्याला यायची सूचना दिली. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवार सकाळी वैदेही जरा रोमँटिक मूडमध्ये असायला हवी होती. पण इथं तर उलट प्रकार दिसत होता. त्यानं पाठविलेले हे डेटा पॉईंट वाचून चॅनसुद्धा गोंधळात पडला होता.  पण अल्बर्टने मात्र त्याची शंका उडवून लावली होती.  "आपल्या कामावर लक्ष द्या, त्या वैदेहीकडे प्रमाणाबाहेर लक्ष देऊ नका" असं त्यानं चॅनला बजावलं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या विनंतीवजा आदेशाकडं लक्ष देण्याव्यतिरिक्त चॅनकडे पर्याय नव्हता. 

अनिकेत आणि वैदेही ह्या दोघांनी मिळून जरी न्याहारी संपवली तरी वातावरणातील तणाव दोघांना जाणवत होता. अचानक दरवाजावरील बेल वाजली. "अनिकेत दरवाजा उघड!" वैदेहीने सूचना केली. चॅन अगदी सतर्क झाला होता. ह्या सर्व धावपळीत ह्या शक्यतेचा विचार करायला त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यानं क्षणार्धात दोघांच्या नातेवाईकांची माहिती तात्काळ अनिकेतपर्यंत पोहोचवली. "या! या! दादा,  वहिनी !" अनिकेतने त्यांचं स्वागत केलं. वैदेहीचे दादा, वहिनी काहीसे आश्चर्यचकित झाले. शक्यतो अनिकेतच्या तोंडून फार कमी शब्द बाहेर पडायचे. पुढील तासभर अनिकेत, वैदेहीसाठी कसोटीचा काळ होता. चॅन वैदेहीच्या वागण्याकडं बारीक लक्ष ठेऊन होता आणि क्षणाक्षणाला त्याच्या चिंतेत भर पडत होती. पण अल्बर्टचा त्याला धाक असल्यानं चॅनकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दादा, वहिनी जसे परत जायला निघाले तसा वैदेहीने अनिकेतला अजून एक आश्चर्याचा धक्का दिला. "अनिकेत, मी दादा, वहिनीसोबत ठाण्याला जाऊ का?" अनिकेत सोबत दादा वहिनी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. "जाऊ दे तिला!" अनिकेत आपल्याला संदेश पाठवून विचारणा करणार हे जाणून चॅनने त्याला आधीच उत्तर दिलं.  ते तिघंही बाहेर पडले तसं अनिकेत गॅलरीत येऊन उभा राहिला. पावसानं चांगलाच जोर धरला होता. 

शनिवार - रविवार वैदेही अनिकेतची वेळोवेळी चौकशी करत होती. त्याच्या जेवणाची व्यवस्थित ऑर्डर सुद्धा तिनं दिली होती. दादा वहिनीशी कामापुरता संवाद साधून ती आपल्या भ्रमणध्वनीवरच जास्त वेळ घालवत होती. "त्यांचं आपल्यासारखंच लुटुपुटीचं भांडण झालं असावं. चल आपण बाहेर फिरून येऊ !" दादा वहिनीला म्हणाला.

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

आज अनिकेतसाठी कार्यालयात अत्यंत महत्वाचा दिवस होता. केनेडी अमेरिकेतील कार्यालयात स्थानिक वेळेनुसार सकाळी (म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी) येण्याआधी त्याला बरीच कामगिरी पार पाडायची होती. रात्री उशिरा घरी परतलेल्या वैदेहीशी बोलायला त्याला वेळ नव्हता आणि रसही नव्हता. 

९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

आपल्यासोबत काय होत आहे हे चॅनला समजत नव्हते.  आज रात्री जागून भारतात परतलेल्या अनिकेतसोबत त्याला मोठा पल्ला गाठायचा होता. पण अचानक त्याच्या डोक्यावर एक फटका मारून त्याची शुद्ध घालविण्यात आली होती. काही तासानं शुद्धीवर येताच "आपल्या खोलीत इतक्या सगळ्या सुरक्षापातळ्या पार पाडून कोण पोहोचू शकतो?" हाच पहिला विचार त्याच्या मनात आला होता. "अल्बर्ट?" हा विचार त्याच्या मनात येताच एक मोठी भयाची लहर त्याच्या सर्वांगाला शहारून गेली. 

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

अनिकेत मोठ्या उत्साहानं बांद्रा कार्यालयात पोहोचला होता. व्हिडीओ कॉलवर येताच समोर चॅन आणि अल्बर्टला पाहून तो उत्साहित झाला. "आजच आपण सर्व कामं आटोपून टाकुयात!" अनिकेत मोठ्या उत्साहात म्हणाला. "टेक इट इझी यंग मॅन!" अल्बर्टच्या संयमी शब्दांनी त्याला भानावर आणलं. 

 (क्रमशः )


भाग १ - द्वैत -भाग १  

मंगळवार, १ जुलै, २०२५

द्वैत -भाग २


३ - जुलै - २०५६  सायंकाळ (सॅन दिएगो )

आजच्या दिवसभराचं काम व्यवस्थित आटोपलं म्हणून समाधान पावलेला अनिकेत उबेरमध्ये आरामात बसला. आवडीचं मराठी गाणं भ्रमणध्वनीवर सुरु करून इअरफोन कानात टाकून तो  बाहेरच्या रहदारीकडं पाहू लागला. 

...... 


अनिकेतला बऱ्याच वेळानं जाग आली तेव्हा वेदनेनं त्याचं सर्वांग ठणकत होतं. हात पाय बांधल्याने डोळ्यावरील पट्टी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. 


४ - जुलै - २०५६ सकाळ  (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट कार्यालयाच्या दिशेनं जाणाऱ्या अनिकेतच्या प्रत्येक हालचालीवर सुक्ष्म नजर ठेवून होते. कार्यालयात पोहोचल्यावर अनिकेतने बायोमेट्रिक प्रवेशद्वारातून यशस्वीरीत्या आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकमेकांना हाय फाय देऊन आनंद व्यक्त केला.  "गुड मॉर्निंग सर!" अनिकेतने अभिवादन करताच बॉस केनेडीनं नजरेनंच त्याला प्रतिसाद देतानाच लगेचच माझ्या केबिनमध्ये ये असं सुचवलं. अनिकेत आणि केनेडीची चर्चा बराच वेळ चालली. अनिकेतच्या माध्यमातून ती चर्चा चॅन आणि अल्बर्ट ह्यांना थेट ऐकायला मिळत होती. चर्चेचे सविस्तर तपशील ऐकत असताना चॅनचे छोटे डोळे अगदी विस्फारून जात होते. एकंदरीत योजना यशस्वीरित्या सुरु झाली आहे ह्याविषयी त्यांच्या मनात खात्री निर्माण झाली होती.  

४ - जुलै - २०५६ सायंकाळ  (सॅन दिएगो )

अंधारकोठडीतील अनिकेत संतापानं अगदी पेटून उठला होता. आपल्याशी कोण हा असला खेळ खेळत आहे ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. त्याच गोष्टीचा त्याला जबरदस्त राग येत होता. त्याच बरोबर केवळ बर्गर आणि पिझ्झा खाऊन त्याच्या संतापाचा पारा अगदी वर गेला होता. 

५ - जुलै - २०५६ दुपार  (सॅन दिएगो )

केनेडी आणि अनिकेतची आजची बैठक सुद्धा अगदी यशस्वी झाली होती.  केबिनमधून बाहेर पडता पडता अचानक अनिकेत म्हणाला, "सर, मी सायंकाळचे फ्लाईट बुक करतो. इथली चर्चा बऱ्यापैकी आटोपली आहे, मी आता उर्वरित काम मुंबईतून करू शकतो. " ह्या अनपेक्षित प्रश्नाने केनेडी क्षणभर गोंधळला. पण दुसऱ्याच क्षणाला सावरत "व्हाय नॉट, आताच तू बेकीला सांगून थेट विमानाची सायंकाळची तिकिटं आरक्षित कर !" असं केनेडी म्हणाला. 

हे सारं ऐकणाऱ्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना हवी ती माहिती मिळाली होती.  

सायंकाळी विमानतळाकडे जाणाऱ्या अनिकेतच्या हालचालीवर चॅन आणि अल्बर्ट नजर ठेवून होते. तिथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये दूरवर दिसणाऱ्या एका कारमध्ये केनेडी आपल्या कुटुंबासोबत विमानतळातून बाहेर पडणाऱ्या दिशेनं जात आहे असा भास चॅनला झाला. त्याच्या दुर्दैवानं अतिवेगाने जाणारी ती कार क्षणार्धात दूर गेल्यानं अथक प्रयत्न करूनही चॅन आपल्या शंकेचा पाठपुरावा करू शकला नाही. आताच कार्यालयात असणारा केनेडी इथं कसा असू शकेल ह्या शंकेला त्यानं थोडा वेळ विश्रांती दिली. कारण अनिकेतचे इमिग्रेशन कसं सुरळीत पार पडेल ह्यावर त्याला लक्ष द्यायचं होतं. 

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
वैदेही सायंकाळी घरी परतली तेव्हा अनिकेत क्षणभर आश्चर्यानं तिच्याकडं पाहतच राहिला. वैदेही काहीशी लाजली हे पाहून त्यानं पुन्हा संगणकात लक्ष गुंतवलं. तरीही ही इतके मॉडर्न कपडे कधीपासून परिधान करू लागली हा विचार त्याच्या मनात रेंगाळतच राहिला. 

(क्रमशः )

भाग १ - द्वैत -भाग १  

सोमवार, ३० जून, २०२५

द्वैत -भाग १

 


१ - जुलै - २०५६ (मुंबई)

"अनिकेत, अमेरिकेतील ह्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी तुला मनःपुर्वक शुभेच्छा ! मला खात्री आहे की तू यशस्वी होऊनच परतशील !"  वांद्रा कार्यालयात आपल्या व्यवस्थापकाच्या ह्या शब्दांकडं अनिकेतचे फारसं लक्ष नव्हतं. आपल्याला विमानतळावरून वैदेहीला न भेटताच परस्पर अमेरिकेला जावं लागतंय ह्याची खंत त्याला बहुदा जाणवत असावी. "धन्यवाद जॉन !" म्हणत त्यानं जॉनच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. लगोलग केबिनमधून बाहेर पडत त्यानं वैदेहीला फोन लावला. "ठीक आहे रे, अनिकेत! मला सवय आहे तुझ्या अशा अचानक ठरणाऱ्या ट्रिपची! मी राहीन व्यवस्थित दोन आठवडे ! तू तुझी काळजी घे !" वैदेही रागावली तर अनिकेतला दडपण येत असे, पण अशा प्रसंगी ती रागावली नाही ह्याचं त्याला अधिक दडपण येई !

अनिकेतने अमेरिकेला पोहोचताच वैदेहीला मेसेज करून आपण सुखरूप पोहोचल्याचा संदेश पाठवला. त्याच्या प्रोजेक्टचे स्वरूप गोपनीय असल्यानं दिवसातून एखादाच मेसेज किंवा फोन करता येईल ह्याचा अंदाज त्यानं वैदेहीला देऊन ठेवला होता. 

३ - जुलै - २०५६ (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट आपल्या तयारीच्या अंतिम टप्प्यात होते. वर्षभर अनेक चाचण्या केल्या तरी डिजिटल अनिकेत भारतात विमानानं सुखरूप पोहोचेल ना, तिथं कार्यालयात आपल्याला हवी असलेली कामगिरी पार पाडेल ना ह्या गोष्टींचं त्यांना दडपण आलंच होतं. त्याहूनही अधिक दडपण होतं ते वैदेहीला अनिकेतच्या ह्या रूपाविषयी काही संशय येणार नाही ना ह्याविषयी !

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
अडीच वाजता घराची बेल वाजली आणि वैदेही दचकून जागी झाली. इतक्या रात्री कोण आलं असणार हा विचार तिच्या मनात आला. अनिकेत घरात नसल्यानं अगदी सावध राहायला हवं हे ही तिनं स्वतःला बजावलं. पीप होल मधून दरवाजाबाहेर अनिकेत आहे हे पाहताच तिची उरलीसुरली झोप उडाली. "अनिकेत, तू आणि इथं कसा काय?" दरवाजा उघडता उघडता ती जवळजवळ ओरडलीच. "अग वैदेही शेजारी जागे होतील ना? मी सारं काही तुला समजावून सांगतो. प्रोजेक्टमध्ये बराच गोंधळ झाला आहे, त्यामुळं मला तातडीनं परतावं लागलं. आताही मला तासभर काम करत बसावं लागेल. तू झोप आता. आपण सकाळी बोलूयात! " अनिकेतने एका दमात सारं काही सांगून टाकलं. "ह्याचं काही जगावेगळंच असतं! " असं स्वतःशीच पुटपुटत वैदेही झोपी गेली. 

सोफ्यावर काम आटपून दमलेला अनिकेत तिथंच झोपी गेला. सकाळी नऊ वाजता त्याला जाग आली तेव्हा घरात अगदी सामसूम होती. "वैदेही गेली कुठं" असा विचार करत अनिकेतने घरात एक फेरी मारली. शेवटी त्यानं भ्रमणध्वनी हातात घेतला तेव्हा त्याला वैदेहीचा संदेश दिसला. "सॉरी अनिकेत, तुला झोपेतून उठवायला मला जीवावर आलं ! मी जातेय ऑफिसला. आपण संध्याकाळी बोलूयात !" अनिकेत आश्चर्यचकित झाला होता. मोजक्या वेळात बरीच कामं आटोपायची होती आणि वैदेहीचं असं अचानक जाणं त्याच्या प्लॅन मध्ये बसणारं नव्हतं !
(क्रमशः ) 

भावनांचं हरवलेलं खरंखुरेपण !

खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृ...