मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १२ जून, २०२५

So what ..अर्थात तर मग काय ?





आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी !

१.  हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक्की कुठं झाला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला आपली विचारप्रक्रिया भरकटत चालली आहे हे जाणवल्यानं मी हा प्रयत्न मी सोडून देतो. 

२. माणसानं महत्वाकांक्षी असणं चांगलं. प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे. फक्त ध्येयापर्यंत मार्गक्रमणा करताना आपण जे काही त्याग करतो, ज्या माणसांना गृहित धरतो / दुखावतो त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा. 

३. ध्येय प्राप्तीनंतर त्याचा आपल्याला कोणत्याही बाह्य घटकांच्या मदतीशिवाय निखळ आनंद व्हायला हवा.  आपल्या आनंदासाठी इतरांच्या कौतुकाची, दाद मिळण्याची अपेक्षा नसावी. आपल्या तोंडावर कौतुक करताना काही खोचक वाक्यं, शब्द वापरण्याची सवय काही जणांना असते. मनुष्यजातीची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्याची जाणीव ठेवावी.  कोणीही किती मोठी प्रगतीची शिखरं गाठली तरी so what हा प्रश्न विचारला जाणार हे अपरिहार्य आहे. 

४. चाळीस, पन्नाशीनंतर माणसं विचित्र वागु लागली आहेत. मी ही वेगळाच वागतो. आपण वेगळं वागतोय हा संदेश आपल्या मेंदूनं आपल्याला द्यावा ह्याची सूचना मेंदूला द्यावी. आपल्याला हे जाणवु देणारी माणसं भोवताली असतील तर आपण सुदैवी आहात. फक्त अशा माणसांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना पुढील प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त करेल अशी आपली प्रतिक्रिया नसावी. 

५. मुद्दा क्रमांक चार मुळे आपण आयुष्यभर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या माणसांपासून काही घटनांमुळं आपण दुखावलं जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. अशावेळी खंत न बाळगता शांतपणे बाजूला व्हावं. आपल्या दैनंदिन, कार्यालयीन कामात व्यस्त करून घ्यावं. जसं त्यांनी आपल्याला दुखावलं असं आपल्याला वाटतं तसंच आपण त्यांना दुखावलं असं त्यांना वाटत असावं ही शक्यता ध्यानात घेऊन गप्प बसावं. 

६. जिथं आपल्या मताला किंमत नाही तिथं व्यर्थ / फुकाची गडबड करू नये. 

७. मर्यादित कार्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दृढ असतो, त्याला दैनंदिन दिवसात तडा जाईल असं काही घडत नसतं. त्यामुळं त्याच्या नादाला लागू नये. सुसरबाई तुझी पाठ मऊ सांगून गप्प बसावं. 

८. समाजातील एकमेकांविषयीचा विश्वास, आस्था झपाट्यानं लयाला जाऊ लागली आहे. ह्यासाठी कदाचित मुद्दा क्रमांक एक कारणीभूत आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या युगाला कलियुग म्हटलं त्यामागं हे मुख्य कारण असावं. 

कालच वसईतील ज्ञानी माणसांनी 'जो पुरुष घरात शांत बसू शकतो तो समाधानी, त्याच्या जीवनात समस्या कमी!' असा संदेश पाठवला. ह्या संदेशाचे अनुकरण करत ऋतूकाळाप्रमाणे निसर्गात निर्माण होणाऱ्या हिरव्या भाज्या, डाळ, भात आणि मोजक्या वेळा सामिष आहार घेऊन सुखी जीवन जगावं! 

बुधवार, ४ जून, २०२५

वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !


मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं.  हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली. 

आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !

१.  आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी. 

२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी. 

३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन. 

४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो.  पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते.  सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!   

गुरुवार, १५ मे, २०२५

आठवणीतील कविता - मुलांस बोध

 


 

आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात. 

तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत. 

ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार 

१. व्हॉइस टायपिंग 
प्रारंभीस मी पुस्तकातील कविता व्हॉइस टायपिंगचा वापर करून लिखित स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जुनी मराठी भाषा आणि माझ्या उच्चारातील त्रुटी ह्यामुळं व्हॉइस टायपिंगनं दिलेलं मूळ रूप दुरुस्त करता करता इतका वेळ लागला की स्वतःच लिहिलं असतं तर नक्कीच लवकर तडीस नेता आलं असतं. तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी नक्की कुठं वापरावं ह्याचं भान असणं आवश्यक ! नाहीतर 'माकडाच्या हाती कोलीत' असला प्रकार व्हायचा. 

तरी देखील व्हाट्सअँपला पुढील सूचना करण्याचा माझा मानस आहे. ज्यावेळी एखादा इसम तुमची मराठी व्हॉइस टायपिंग सुविधा वापरू इच्छितो त्यावेळी त्याला / तिला कोणत्या कालावधीतील मराठी लिखित स्वरूपात आणायची आहे असा प्रश्न विचारून त्या कालावधीतील मराठी उपलब्ध करून द्यावी.  

२. अनुस्वार 
त्या काळातील बहुतेक शब्दांतील अंतिम अक्षरावर अनुस्वार आढळून येतात. त्याकाळातील बोलण्यात देखील ह्या अनुनासिक स्वरांचा वापर आपल्याला जुन्या मराठी चित्रपटात / नाटकात आढळून येतो. परंतु आता बहुदा जुन्या पिढीसोबत हीं अनुनासिकें काळाच्या पडद्याआड गेलीं असावीत असें मानण्यास वाव आहे. 

३. र्हस्व दीर्घ संकल्पना 
दहावीत सुद्धा माझा र्हस्व दीर्घ संकल्पनेबाबत गोंधळ उडायचा. आता तर प्रचंड गोंधळाची परिस्थती आहे. मराठी र्हस्व दीर्घ लिखाणाबाबतीचे सर्व नियम संकलित करून एका जागी प्रसिद्ध करावेत अशी मागणी ह्या पोस्टद्वारे मी करत आहे. 

४. भुजंगप्रयात / आर्या 
ह्या कवितेत काही ठिकाणी भुजंगप्रयात / आर्या वगैरे उल्लेख करण्यात आला आहे. भुजंगप्रयास हा छंद असे ऐकून माहिती आहे. ह्याविषयी तज्ञ मंडळींनी खुलासा करावा अशी मागणी मी करत आहेत. 

५. जामीन
ह्या पुस्तकात दोन तीन वेळा जामीन राहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. जामीन राहून जबरदस्त फटका खाल्ल्याची उदाहरणे त्याकाळी प्रचलित असावीत. 
 
६. रामदास 
रामदासांच्या कवितेतील एक एक ओळी सुवचन म्हणून प्रसिद्ध आहेत. जसे की

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
मरावें परी कीर्तिरूपे उरावे 

ह्या सुवचनांचं स्रोत असलेल्या मूळ कविता वाचनात आल्या ह्याचा मला आनंद झाला. 

७. उपदेश 
ह्या कवितेतील उपदेश मोठ्या माणसांना देखील लागू होतो, अगदी हल्लीच्या काळात सुद्धा ! पुढील काही दिवसात चॅट जीपीटीला ह्या कविता वाचायला देऊन त्यांजकडून ह्या कवितांची सद्यकालीन आवृत्ती लिहून घेण्याचा मानस आहे. 

उदाहरणार्थ 
मूळ पंक्ती  

कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


आधुनिक काळातील उपदेश 

कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा 
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा 

कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।



आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व! 


मुलांस बोध - रामदास 

भुजंगप्रयात

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला, 
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।

सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें, 
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें, 
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे, 
बहू काळ हा खेळ कामा नये रे.  ।।२ ।।

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करा
वें, 
बरें बोलणें नित्य जीवीं धरा
वें.  ।। ३ ।।

बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा. 
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला, 
बहु नेटका सज्जला साज केला. 
प्रतीतीवि
णें बोलणें व्यर्थ होतें 
विचारेवि
णें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।

'भला रे भला!' बोलती 
तें करावें, 
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें. 
परी शेवटी सर्व सोडून द्यावें, 
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।


 मुलांस उपदेश 

शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।

अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।

खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।

दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।

गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।

चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।

अभंग 
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।

वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून  ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।

शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।


नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।

बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें  ।। ५ ।।

अभंग तुकाराम 

आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं  नाश, आयुष्याचा ।। १ ।।

सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।

हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।

तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवा
वें ।। ४ ।।


मुलांस उपदेश

श्लोक - उपेंद्रवज्रा  


कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


भुजंगप्रयात 

मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।

आर्या 

तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें 
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।

श्लोक - कामदा 

चांगल्यासवें  संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।

शुद्धकामदा


धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं 
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।

भुजंगप्रयात 

स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।

आर्या 
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।



गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

जडले नाते ढगांशी !






मागच्या जन्मी मी आदिमानव होतो त्यावेळची गोष्ट! जंगलातून फिरताना अचानक सामोऱ्या येणाऱ्या नदीच्या विस्तृत पात्रातील अत्यंत वेगाने वाहणाऱ्या जलप्रवाहाकडे बघून मी खूप अचंबित होत असे. या जलप्रवाहाचा स्त्रोत म्हणजे आकाशातील ढगातून होणारी पर्जन्यवृष्टी हे समजावयास मला फार वेळ लागला होता.  परंतु त्यानंतर मात्र या ढगांकडे मी मोठ्या आदराने पाहत असे.  पावसाळ्यात हे ढग माझ्या जीवनाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवतील की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत असे.  याउलट उन्हाळ्यात झपाट्याने कोरड्या पडू लागलेल्या नदीच्या पात्राकडे पाहून मी मोठ्या आशेने या ढगांची वाट पाहत असे. 

या जन्मी शहरांच्या काँक्रीट जंगलात आयुष्य व्यतित करत असताना ढगांशी संपर्क होत असला तरी त्यांच्याशी संवाद मात्र फारसा होत नाही.  याला अपवादात्मक असे काही क्षण येतात जसे की कार्यालयातील गवाक्षातून पावसाळ्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ढग दाटून येतात! त्यावेळी कदाचित माझ्या मागच्या जन्मीच्या स्मृती जागृत होत असाव्यात.  परंतु ढगांशी या आयुष्यात अगदी जवळून असा संपर्क म्हणा किंवा संवाद म्हणा होतो असा प्रसंग म्हणजे विमानप्रवास! विमानप्रवासाच्या बाबतीत मी कार्यालयीन कामांसाठी जेव्हा प्रवास करतो त्यावेळी खिडकीची जागा मिळवण्यासाठी माझा मोठा अट्टाहास असतो.  असंच या रविवारी हैदराबादला जाताना सायंकाळच्या विमान प्रवासात अचानक ढगांच्या मोठ्या परिसंस्थेतून प्रवास करण्याचा मोका मिळाला. ही परिसंस्था मोठी क्लिष्ट होती. ढगांची आपण ज्यावेळी छायाचित्र पाहत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपण केवळ द्विमितीय ढगांची कल्पना रेखाटत असतो.  परंतु विमान ज्यावेळी अशा महाकाय ढगांमधून प्रवास करतं त्यावेळी त्यांच्या अवाढव्य पसरलेल्या तिन्ही मितींची आपणास स्पष्ट जाणीव होते. या ढगांची ही रूप अत्यंत लोभसवाणी अशी असतात. या चित्रांमध्ये ढगांच्या बहुधा अशा तीन परिसंस्था दिसत आहे. या परिसंस्था निर्माण होण्यासाठी पर्यावरणातील कोणते घटक कारणीभूत ठरले असावेत हा संशोधनाचा विषय आहे.  परंतु असे उभे आडवे पसरलेले गोलाकार ढग ज्यावेळी मावळत्या सूर्यकिरणांनी उजळून निघतात तेव्हा त्यांची ही रूप अत्यंत मनोवेधी अशी असतात.  ह्या महाकाय ढगांच्या आसपास काहीशे अत्यंत छोटुकले परंतु वेगाने प्रवास करणारे स्लिम आणि फिट ढग सुद्धा प्रवास करत असतात.  मनात वेगवेगळे विचार येतात.  महाकाय ढगांची परिसंस्था कमी वेगाने प्रवास करत आपल्या सानिध्यात येणाऱ्या भूमातेला आपल्या थंडगार जलधारांनी तृप्त करत पुढे जात राहते. याउलट स्लिम व फिट ढग मात्र आपल्याच नादात "मै जिंदगी का साथ निभाता चला गया!' हे गाणे गुणगुणत पुढे जात राहतात.  

हैदराबादचा प्रवास मोजून मापून तासाभराचा!  अशी ही ढगांची परिसंस्था आपल्या सोबतीला वीस पंचवीस मिनिटे असली तर हा प्रवास खूपच मनोरंजक होतो.  वास्तवात यायचं झालं तर हे ढग आपल्या विमानाला हेलकावे देत राहतात.  त्यामुळे त्या तासाभरात आपल्याला मिळणार सँडविच आपल्याला काहीशा विलंबाने मिळतं, पाच मिनिटातच आपल्याला ते संपवावे लागतं. बिचाऱ्या त्या ढगाला त्याच्या मुळे होणाऱ्या माझ्या आयुष्यातील परिणामांची काय कल्पना! हैदराबादच्या प्रवासात दिसलेला हा ढग म्हणून कदाचित याचं नाव काहीसं तेलगू प्रकारात मोडणार असावं असा माझा कयास! 

आता सहजच आठवलं म्हणून लंडनच्या परतीच्या प्रवासात दिसलेल्या जॉन ढग आणि त्याच्या कुटुंबाचे हे एक मोहक दृश्य !


चिंता करू नका मी ठीक आहे.  उद्यापासून येणाऱ्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीच्या विचारामुळे असं काही झालं असेल कदाचित! 

रविवार, २३ मार्च, २०२५

आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ


काल सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून नाटक पाहून बाहेर पडताना मॅजेस्टिकचे पुस्तक प्रदर्शन दिसलं.  'दोन वाजून बावीस मिनिटं' ह्या नाटकानं खूप आनंद दिला. बऱ्याच काळानं खुर्चीला खिळवून ठेवणारं, कलाकारांचा वास्तववादी अभिनय  आणि प्रत्येक प्रसंग अगदी अलगदपणे खुलवत अनपेक्षित शेवटाकडं प्रवास करणारं  असं हे नाटक ! पुस्तक प्रदर्शन पाहून नकळत पावलं तिथं वळली. अर्ध्या तासानं मीना प्रभूंची वाचायची राहून गेलेली काही प्रवासवर्णनाची पुस्तकं, 'आठवणीतील कविता' ह्या  जुन्या काळात शाळेत शिकलेल्या आठवणीतील कवितांच्या संग्रहाचे दोन भाग आणि इतर काही पुस्तकं घेऊन आम्ही बाहेर पडलो.  प्राजक्ताला मराठी कवितांची खास आवड असल्यानं ही कवितासंग्रहांची खरेदी झाली. 

ह्या कविता संग्रहाचे एकूण चार भाग आहेत. जुन्या काळातील मराठी जीवनाचं प्रतिबिंब घडविणारे असे हे चार भाग. ह्या पुस्तकाच्या संकल्पनेचे बीज कसं रुजलं आणि त्यातून ही एक सुंदर कलाकृती कशी निर्माण झाली हे आपल्याला ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत अगदी सविस्तर वाचायला मिळतं.  पुढील काळात जमेल तसं ह्यातील एकेक कवितेचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करीन.  एक सुवर्णयुग म्हणता येईल असा कालावधी आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी अनुभवला. त्यातील प्रतिभावान कवी, लेखकांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यानं ह्या कालावधीतील काही सुवर्णक्षणांना कागदावर नोंदवलं. प्रत्येक मराठी माणसानं अशा कलाकृती नक्कीच वाचाव्यात. असा सुवर्णकाळ परत येईल अशी भाबडी आशा मनात बाळगावी !

आजची कविता 

कवी - केशवकुमार 
 

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

रसग्रहण 

सर्वप्रथम ह्या कवितेसोबत असलेलं चित्र आपल्याला जुन्या काळात ओढून नेतं. अनेक नातवंडांना आपल्या मायेनं न्हाऊ घालणारी ह्या चित्रातील आजी आपल्याला आपल्या आजीची नक्कीच आठवण करून देते. सर्वात धाकट्या नातवाच्या चेहऱ्यावरील अचंबा चित्रकारानं हुबेहूब टिपला आहे. वयानं थोड्या मोठ्या अशा नाती मात्र आजीच्या सहवासात अगदी निश्चिन्तपणे तिच्या समोर बसल्या आहेत किंवा लाडीकपणे तिला मिठी मारून तिची माया अनुभवत आहेत. आजीच्या कथेत कितीही भय निर्माण झालं तरी शेवट मात्र सुखद असणार ह्याची अनुभवानं त्यांच्याकडे आलेली आश्वासकता बहुदा त्या छोट्या नातवाकडं नाही! 

आजीकडं घड्याळ नाहीच किंबहुना आजी हेच घड्याळ हे सर्व वाचकांना ठाऊक आहे. पण थेट त्याचा उल्लेख न करता आजीचं नातवांप्रती असणारं प्रेम, धाक, त्यांनी शिस्तबद्ध राहावं ही कळकळ कवितेतील विविध उदाहरणांतून आपल्यासमोर येते.  सकाळी पहाटे अभ्यासासाठी मला उठव हे एकदा का आजीला सांगितलं की अगदी बिनधास्त गाढ झोपून जावं हे नातवंडांना ठाऊक आहे. आजी आपल्या नातवंडांवर कसे संस्कार करत असे हे ही ह्या कवितेतून अलगदपणे आपल्यासमोर उलगडत जातं. नातवंडांनी वक्तशीरपणा न दाखवल्यास चिडणाऱ्या आजीचा लटका राग आपल्यासमोर 'घणघणा घंटाध्वनी', 'लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा' ह्या शब्दप्रयोगातून येतो. रूपकातून सारं काही कसं अलगदपणे व्यक्त करावं हे मागच्या पिढीकडून शिकावं. मला तर असं वाटत राहतं की खरी प्रगत तर ती पिढी होती. शेवटच्या कडव्यात आजीचं घड्याळ दैनंदिन नव्हे तर आठवडाभरातील वार, वर्षभरातील सणांचा सुद्धा कसा हिशेब ठेवत असे हे सांगायला कवी विसरत नाही. मग हळूच आठवत येते ती रविवारी संकष्टी आहे हे सांगणाऱ्या आई / ताई / सासूबाईंच्या फोनची ! अशी आजी असेल तर नातवंडाचं भावविश्व समृद्ध होणारच, आयुष्यभरात निराशेला कसं बाजूला सारून आयुष्य जगावं ह्याची शिकवण त्यांना आपसूकच मिळणार !
 
येईल का कधी परत असा काळ आणि ते आजीचं घड्याळ ?

सोमवार, १७ मार्च, २०२५

ती पाच मिनिटं !


प्रसंग १ 

आपण बऱ्याच वेळा अगदी उच्च पदावरील व्यवस्थापकांसमोर एखाद्या विषयावर सादरीकरण करतो. इथं अगदी मुद्देसुद आणि धोरणात्मक असं बोलावं लागतं. अशा वेळी चुकीला वाव नसल्यानं अशा सादरीकरणाची तयारी काही दिवस / आठवडे आधीपासून करावी लागते. एक चांगली किंवा आवश्यक सवय म्हणून काहीजण (त्यात मी समाविष्ट ) अशा सादरीकरणाच्या वेळी वापरण्याची संहिता (स्क्रिप्ट साठी खोलवर शब्द) लिहून काढतात, त्याचा सराव करतात. योग्य शब्द वापरले जावेत, महत्वाचे मुद्दे योग्य क्रमाने यावेत, चेहऱ्यावरील हावभाव / ठासून मांडायचा एखादा मुद्दा ह्यांचा सराव व्हावा हा ह्यामागील हेतू असतो. 

आपण कसून सराव करतो. तो दिवस उजाडतो, आपण त्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करतो. काही ओळखीच्या, काही अनोळखी लोकांना हॅलो म्हणतो. मनात कुठंतरी उजळणी सुरु असते. इथं सर्व स्क्रिप्ट आठवण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. इथं आवश्यक असतं ते महत्वाचे दोन तीन मुद्दे लक्षात ठेवणं. ते महत्वाचे मुद्दे कोणते ह्याविषयी संभ्रम नसावा. बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्याला १० मिनिटं बोलायला मिळेल असं सांगितलेलं असतं पण मिळतात दोन मिनिटं! अशा वेळी हे महत्वाचे मुद्दे कामी येतात. तुम्ही कितीही प्रदीर्घ सराव करा, पण ही महत्वाच्या मुद्द्यांची उजळणी करणारी शेवटची पाच मिनिटं सदैव लक्षात असू द्यात. 

प्रसंग २ 

परदेशी प्रवास करताना आपण आपापल्या सवयीनुसार तयारी करतो. काही लोक आठवडा आठवडा तयारी करतात. माझे एक जेष्ठ सहकारी केवळ अर्धा तासात बॅग्स भरतात, कारण नक्की काय न्यायचं आहे ह्याविषयी असणारी सुस्पष्टता! असो पण आपल्यासारख्या साध्या माणसांसाठी ज्यावेळी विमानतळावर नेण्यासाठी येणारी कॅब यायला पाच मिनिटं उरतात त्यावेळी समोर असणाऱ्या त्या दोन भल्या मोठ्या चेक इन बॅग्स, म्हणायला छोट्या पण ठासून सामान सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या केबिन बॅग्स पाहून उगाचच मन सैरभैर होतं. आपण काही विसरत तर नाही आहोत अशी भिती निर्माण होते. अशा वेळी फक्त आपलं पारपत्र, मोबाईल (ज्याद्वारे आपण तिकीट, आरोग्य विमा वगैरे वगैरे मिळवू शकतो) आणि परकीय चलन घेतलं आहे की नाही हे पाहावं ! ह्या गोष्टी विसरलात तर दुर्धर प्रसंगाला तोंड द्यायला लागेल. 

प्रसंग ३ 

पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित ह्यातील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश मिळत असे. एक एक गुणांच्या फरकावर तुमचा एखाद्या महाविद्यालयातील / शाखेतील प्रवेश निश्चित होत असे किंवा हुकत असे. अशा परिस्थितीत ह्या विषयांच्या पेपरच्या वेळी परीक्षादालनात प्रवेश करण्याआधीची ती शेवटची पाच मिनिटं अगदी महत्वाची असतात. काहीजण संपूर्ण पुस्तक त्या पाच मिनिटांत चाळण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण डोळे मिटून ध्यान लावून मनातल्या मनात उजळणी करतात. मी मला जे धडे अगदी व्यवस्थित येत असत त्याची डोळे मिटून उजळणी करत असे. ' फील गुड' फॅक्टर (स्वयंम आत्मविश्वासाची भावना) घेऊन परीक्षादालनात प्रवेश करावा हा हेतू असे. 

आपल्या व्यवसायानुसार, आयुष्यानुसार अशी ही महत्वाची पाच मिनिटं वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतील. मी मांडली ती वानगीदाखल काही उदाहरणं ! आता शेवट एक काहीसा भावनात्मक ! आयुष्यातील शेवटची पाच मिनिटं माणसाच्या मनात नेमके काय विचार घेऊन असतील. आपल्याला खरोखर जाणवत असेल का ही आपली शेवटची पाच मिनिटं आहेत ते? जर खरोखरच जाणवले तर आयुष्याची गोळाबेरीज आपण ह्या पाच मिनिटांत मांडू शकू का? आणि ती मांडता आली तर आपल्याला नक्की काय आठवेल?

शनिवार, १ मार्च, २०२५

२०२५ अमेरिका भेट वृत्तांत


या वर्षीची पहिली अमेरिकावारी दिनांक १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडली. अमेरिका भेटीचा हा वृत्तांत!  ह्या वृत्तांतामध्ये प्रामुख्यानं आपणांस  विमानातून आणि हॉटेलच्या खोलीतून टिपलेली छायाचित्रं  आढळतील. कार्यालयीन बाबींचा थेट संदर्भ न देण्याचं धोरण मी कटाक्षानं पाळत असल्यानं तिथं घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्याचं मी टाळतो. 

ह्या पोस्टच्या पुढील भागात छायाचित्रांच्या संदर्भानं वर्णन येईल. त्याआधी भेटीचा आढावा घेणारे काही प्रमुख मुद्दे! ह्या भेटीत विल्मिंग्टन (डेलावेर), जर्सी सिटी आणि प्लेनो, फ्रिस्को (टेक्सास) ह्या ठिकाणांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या,  टीम, सहकाऱ्यांच्या  भेटी, वर्षभराचे धोरण आखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकी हे ह्या भेटीचे मुख्य हेतू होते.  उणे नऊ (थंड वाऱ्यांमुळं उणे सोळा वाटणारं) तापमान, दोन मिनिटं सुद्धा रस्त्यावर चालणं अशक्य करणारे जर्सी सिटीमधील बोचरे वारे,  डॅलसला जाताना वेळीच लक्षात आलेला विमानाचा पंक्चर टायर आणि त्यामुळं निर्माण झालेलं नाट्य इत्यादी  ह्या भेटीतील संस्मरणीय घटना. 

दिनांक १७ फेब्रुवारी 

सकाळी दोन वाजता मुंबईहून उड्डाण करणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान माझं आवडतं!  रात्री दहा वाजता घरातून आपण बाहेर पडलं की घरच्यांना वेळच्या वेळी झोपता येणं, मुंबई ते लंडन आणि लंडन ते फिलाडेल्फिया हे तुलनेनं समान अंतराचे टप्पे, लंडनला असणारा अगदी कमी नाही किंवा अगदी दीर्घ नाही असा तीन तासांचा थांबा आणि बडेजाव नसलेलं पण व्यवस्थित असं जेवण हे माझ्या आवडीमागची मुख्य कारणं.   


मुंबईहून विमानाने अडीच वाजता उड्डाण केले की पुढील नऊ तास हे झोप, दोन वेळची जेवणं,  विमानाचा युरोपकडे जाणारा मार्ग आपल्या समोरील स्क्रीनवर पाहत राहणं  आणि जागं असल्यास वेगवेगळे चित्रपट पाहणे अशा विविध उपक्रमांमध्ये व्यतित करावे लागतात. 

माझ्यासाठी खास भारतीय शाकाहारी जेवण पूर्ण प्रवासासाठी नोंदविलं गेलं होतं. माझी त्याला मान्यता नव्हती. त्यामुळं ह्यातून माझी सुटका होईल का अशी पृच्छा मी प्रवासात नम्रपणे करत होतो.  एक दोन वेळा ती मान्यसुद्धा झाली.  मुंबई ते लंडन प्रवासात विमानानं उड्डाण केल्यानंतर जेवण आणि लंडनला सकाळी उतरण्याआधी नाश्ता असा आपला पाहुणचार केला जातो. जेवणामध्ये सुरवातीला स्टार्टर म्हणून जो प्रकार असतो त्यात भरपूर फळं, हिरवागार पाला असतो. त्यामुळं आपल्याऐवजी ससा आणून आसनस्थ करायला हवा असा विचार क्षणभर माझ्या मनात येऊन गेला. नाश्त्याच्या वेळी समोर उपमा पाहून मी कृतकृत्य झालो. आधीच मुंबई लंडन प्रवासातील विमानातील वातावरण आपण भारतातच आहोत की काय अशी शंका निर्माण करण्याजोगं असतं, त्यात ह्या हिंदू शाकाहारी जेवण पर्यायाच्या निवडीने भर घातली.  





जूनमध्ये लंडनला तुम्ही जात असाल तर उड्डाणानंतर काही तासांतच सूर्योदय झाल्यानं आकाशातील लख्ख प्रकाश आपली सोबत करत राहतो. हिवाळ्यात मात्र तांबडं फुटण्यासाठी आपल्याला अगदी लंडन येईस्तोवर वाट पाहावी लागते. लंडन विमानतळ परिसराची विमानातून टिपलेली नयनरम्य रूपं ! 



भारतातून लंडनला येणारी विमान बऱ्याच वेळा टर्मिनल पाचवर येतात. मग तिथून आपल्याला मेट्रो, बसचा वापर करत टर्मिनल तीनवर येऊन अमेरिकेला जाणारं विमान पकडावं लागतं. सवय असली की हा प्रकार सोपा वाटतो पण नवख्या माणसाला मात्र सूचनाफलकांच्या आणि गरज पडल्यास तेथील अधिकाऱ्यांस विचारत पुढं जावं लागतं. 

लंडन ते फिलाडेल्फिया हा प्रवास अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानानं झाला. तिथं सावळागोंधळ होता. बहुधा त्यांच्या पूर्वनियोजित विमानात काही गोंधळ झाला असावा म्हणून त्यांनी तात्काळ दुसऱ्या विमानाची सोय केली. पण हे जुनाट विमान होते आणि मला मिळालेले आसन गैरसोयीचे होते. अजून त्यांनी मला प्रतिक्रिया विनंती ई मेल पाठवलं नाहीये. जर पाठवलं तर चांगलीच प्रतिक्रिया देईन त्यांना ! इथंही सश्याचा आहार. तरी डावीकडील पालापाचोळा मला नको हे सांगितलं आणि ती डिश तो घेऊन गेल्यानंतर मला छायाचित्र घेण्याची आठवण झाली !

अमेरिका, युरोपातील नागरिकांना सर्व काही गोष्टी थंड सेवन, प्राशन करण्याची सवय. लंडनहून विमान निघण्याआधी विमानातील वातानुकूलित यंत्रणा अगदी जोरात काम करू लागली. डोक्यावरील थंड हवेचा फवारा मारणाऱ्या छोट्या पंख्याला बंद करत, चेकइन बॅगेतील टोपी डोक्यावर चढविण्याची वेळ आली. पुढील दोन आठवड्यात मुकाबला कराव्या लागणाऱ्या थंड हवामानाची आधीच पूर्वसूचना मिळाल्यानं आणि त्यात तिथं सर्दी, फ्लूची साथ पसरली असल्यानं मी अगदी बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता. 




स्ट्रॉबेरी आणि सफरचंद ज्युस! 


तुलनेनं लंडन अमेरिका प्रवास कमी कालावधीचा! नवीन राजवट असल्यानं इमिग्रेशन अधिकारी थोडे जास्त प्रश्न विचारेल ह्याची जाणीव होतीच. अपेक्षेनुसार त्यानं ९० सेकंद विविध प्रश्न विचारून मग प्रवेश दिला. मनात कितीही इच्छा निर्माण झाली तरीही ह्या अधिकाऱ्यांशी मुद्द्याला सोडून गप्पा मारणं किंवा विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणं टाळावं. 



बॅगा ताब्यात घेतल्यानंतर उबेर टॅक्सीने 350 Rocky Run Pkwy, Wilmington, Delaware इथं असलेल्या होमवूड सुइट्सच्या दिशेनं प्रस्थान केलं. २०१७ सालापासून कोविडचा अपवाद वगळता दर वर्षी इथंच येत असल्यानं हे हॉटेल, परिसर, कर्मचारी वर्ग ओळखीचा आहे. दोन्ही टीव्हीवर माझ्या स्वागताचे संदेश झळकत होते. ग्रबहब ह्या झोमॅटोसारख्या अँपवरून मी माझं जेवण मागवत राहिलो. 

ह्या भेटीत सुद्धा सकाळी एक - दीडच्या सुमारास जाग येण्याचा सिलसिला कायम राहिला. भेटीच्या उत्तरार्धात पुन्हा झोप येण्याच्या शक्यतेत वाढ झाली हीच काय ती प्रगती. अमेरिकेतील बहुसंख्य भागात हवेचा दर्जा अत्यंत चांगला असतो. हॉटेलच्या रूममधून सूर्योदयाच्या आसपास दिसणारी ही सुंदर दृश्यं! पहिल्या फोटोत मराठी भाषेतील तांबडं फुटणं ह्या शब्दप्रयोगाची प्रचिती येते !






गेल्या काही भेटीत मी साखर, चहा पावडर सोबत घेऊन जातो.  सकाळी उठल्यानंतर दुधाळ चहा घेण्यासारखं सुख नाही! 




अमेरिकेतील थंड हवामान आणि मनसोक्त आहार ह्यामुळं चेहरा टवटवीत दिसू लागतो असा माझा (गैर) समज! त्यामुळं दिवसागणिक प्रगती होत आहे का हे जाणून घ्यायला मी जमतील तितके सेल्फी काढत राहतो.  मुख्य फोन साधा असल्यानं आणि केवळ छायाचित्रणासाठी आयफोन घेऊन गेल्यास परतताना कस्टम अधिकाऱ्यांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नावलीला टाळण्यासाठी आयफोन नेला नसल्यानं सर्व छायाचित्रं साध्या फोननेच काढली आहेत. 


सायंकाळीसुद्धा सूर्याची आणि भोवतालच्या परिसराची सुंदर दृश्यं आपल्यासमोर येत राहतात. 






सकाळच्या नाश्त्यात scrambled अंडी,  बटाटयाच्या काचऱ्या हा दररोज असणारा सामायिक मेनू. बाकी फळांचे, ज्यूसचे अनेक पर्याय उपलब्ध ! दुसऱ्या दिवसापासूनच तापमान शून्याखाली गेल्यानं सतत जॅकेट, टोपी घालून राहणं हे ओघानं आलंच. 



खोलीत सकाळी येणारी सूर्याची किरणं मला छायाचित्रणाच्या विविध संधी उपलब्ध करून देत होती. 


१८, १९ ला डेलावेर येथील प्रामुख्यानं आज्ञावली विकसित करणाऱ्या माझ्या संघासोबत भेटीगाठी केल्यानंतर २० तारखेला डाउनटाऊन भागातील प्रामुख्यानं बिझनेस असणाऱ्या कार्यालयातून काम केलं. इथलं कार्यालय आपलं जुनेपण अजूनही काही प्रमाणात टिकवून आहे. इथे वर्षानुवर्षे आमच्या कंपनीत काम करणारी जुनी अनुभवी अमेरिकन मंडळी बहुसंख्येनं आहेत. ह्या लोकांकडे सखोल ज्ञान असतं. त्यामुळं अगदी थोड्या वेळात आपण बरंच काही समजावून घेऊ शकतो. खरंतर २० तारखेला ह्या कार्यालयातून काम करत असताना बराच वेळ भुरुभुरु बर्फ पडत राहिला. कार्यालयातून छायाचित्रण करणं योग्य नसल्यानं मी ही मनोहारी दृश्यं टिपू शकलो नाही. गेल्या पंधरा वर्षात माझ्या कारकिर्दीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा बजाविणारे केन, आनंद आणि अशोक ह्यांच्या सोबत दर अमेरिकेत भेट घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आर्क्टिक  ब्लास्टने निर्माण केलेल्या प्रचंड थंडीला न जुमानता आम्ही यंदाही २० तारखेला रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं भेटलो. जुन्या रम्य आठवणींना  उजाळा मिळाला. वसईतील मित्रांसोबत जशा गप्पा रंगतात त्याची आठवण झाली. 

२१ तारखेला आमच्या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जर्सी सिटीतील कार्यालयात जायचं होते. विल्मिंग्टन रेल्वेस्थानक आमच्या २० तारखेला भेट दिलेल्या डाऊनटाऊन कार्यालयाच्या बाजूलाच आहे. तिथं सकाळी उबेरने गेलो. एक आजोबा प्रचंड थंडीला न जुमानता कार चालवत होते. त्यांनी त्यांची जुनी गाणी बजाविणारे FM रेडिओ स्टेशन सुरु ठेवलं होते. त्यांची परवानगी न घेता त्यांचं घेतलेलं हे छायाचित्र! क्षमस्व आजोबा! जुन्या माणसांचं, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करणं हा माझा आवडता छंद. जुनी माणसं देश, धर्म ह्यांच्या सीमेपलीकडील एक समान वागणं आपल्यासमोर आणतात. वाटेत एक अपघात झालेली कार दिसली. "हल्लीची पिढी कशी गाड्या चालवते?" ह्या भावना व्यक्त करणारे वाक्य आजोबा म्हणाले.    मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडाफार प्रयत्न करून पाहिला. पण त्यांना फारसा रस नसावा असं जाणवताच मी गप्प राहिलो. 




बाहेर असलेल्या वजा सोळा सदृश्य तापमानाला तोंड देण्यासाठी सज्ज असलेला आदित्य.  आपणच करावे आपल्या प्रतिमेचं कौतुक !


अँमट्रेक ही अमेरिकेतील दीर्घपल्ल्याची रेल्वेवाहतूक करणारी संस्था! ह्या ट्रेनचे तिकीट अरुण आणि मी काढले होते. तळमजल्यावर बैठकीसाठी व्यवस्था होती. दीर्घपल्ल्याच्या विविध गंतव्यस्थळाला जाणाऱ्या गाड्या कोणत्या फलाटावर येणार ह्याची सूचना देणारे इंडिकेटर तिथे होते. आम्ही पाच मिनिटं आधी आमच्या फलाटावर गेलो. ती पाच मिनिटंसुद्धा थंड वारे, तापमान ह्यांचा मुकाबला करताना तासभरासदृश्य वाटली. आम्ही स्थानापन्न झालो. तिकीट तपासनीस आला, त्यानं आमचे अँपमधील QR स्कॅन केले. सर्वजण आपल्या संगणकावर काम करत होते, झूम बैठकीवर हजर राहत होते. 


अगदी वेळेवर गाडी पेन स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पुन्हा उबेर करून आम्ही जर्सी सिटीतील कार्यालयात पोहोचलो. न्यूयॉर्क शहर दूरवरून आपणास खुणावत राहते. दिवसभरात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठकी उत्तमरित्या पार पडल्यानं मनात समाधानाची भावना निर्माण झाली.  कार्यालयाच्या बाजूलाच एक छोटेखानी मॉल आहे. तिथं चहापानासाठी जाताना हडसन नदीवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी माझी त्रेधातिरपीट उडविली.  पुन्हा एकदा अँमट्रेकने आम्ही डेलावेरला पोहोचलो. इथं वाहनतळावर असणारी गर्दी थोडीशी वेगळ्या वर्गातील होती. पण स्थानकावर पोलिसांचा पुरेसा राबता असल्यानं चिंतेचं कारण नाही असं अरुण म्हणाला. सायंकाळची ट्रेन वेळेआधीच डेलावेरला आली. जणू काही आपण आपल्या गावी परतलो असं मला वाटत राहिलं. उबेरमध्ये शिरताक्षणी ग्रबहबवरून होनेस्ट ह्या भारतीय उपहारगृहातून ह्या भेटीत मला आवडू लागलेलं सँडविच मागविलं. आमची आणि त्या सँडविचची  हॉटेलवर पोहोचण्याची वेळ अगदी दोन - तीन मिनिटाच्या फरकानेच होती. जबरदस्त नियोजन आदित्य !!


ताजातवानं  होऊन त्या प्रशस्त खोलीत शुक्रवारी रात्री सँडविचचा आस्वाद घेताना समाधानी म्हणतात ना तसं वाटत होतं. प्रचंड थंडीत पहिला आठवडा कार्यालयीन कामाच्या बाबतीत बराच चांगला गेला होता. 

२२ फेब्रुवारी हा ह्या भेटीतील एकमेव निवांत दिवस असणार होता. सकाळी सवडीने नाश्ता वगैरे करून श्रीकांतसोबत भटकंतीला बाहेर पडलो. शनिवार असला तरीही घरून  Exception Approval घेऊन Scrambled eggs आणि चिकनचा एक चविष्ट प्रकार ह्यांचा आस्वाद घेतला. 






COSTCO,  JCPenny, Macy इत्यादी दुकानांना भेटी दिल्या. घरी उगाचच व्हिडिओ कॉल करून हे घेऊ का ते घेऊ अशी पृच्छा करत शेवटी फार मोजकी खरेदी केली. उपहारगृहात बफे जेवणाचा आस्वाद घेऊन अडीच वाजता मी रूमवर परतलो. दोन तास मस्त ताणून दिली. मग मस्त चहा करून आठवडाभराचे कपडे हॉटेलच्या laundry मध्ये धुतले. हॉटेलच्या स्वागतकक्षात ह्या धुलाईसाठी तिथल्या यंत्रात टाकण्यासाठी आवश्यक असणारी क्वार्टर्सची नाणी मिळतात. प्रथम अर्धा तास धुलाई, मग तासभर वाळविणे असे जवळपास दोन तास ह्या प्रकारात जातात.  रविवारी प्लेनोला जायचं असल्यानं बॅग्स भरण्यात हे दोन तास घालविले. 

ह्या हॉटेलविषयी मला किंबहुना इथं वास्तव्य करणाऱ्या आमच्या कंपनीतील सर्वांनाच  खूप विश्वास आहे. माझ्या दोन्ही चेकइन बॅग्स मी इथेच सोडून जाणार होतो. फक्त लॅपटॉप बॅग आणि एक केबिन बॅग घेऊन मी प्लेनो / डॅलसला निघालो होतो. रविवारी सकाळी चार वाजल्यापासून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाल्यानं त्या दिवशीच्या जेटलॅग विषयी तक्रार नव्हती. विमान साडेबाराचं होतं. आम्ही साडेदहापर्यंत विमानतळावर पोहोचलो. अमेरिकेतील विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था TSA (Total Security Administration) ही संस्था सांभाळते. जर तुमचं  स्टेटस TSA Precheck approved असेल तर तुमच्यासाठी वेगळी रांग असते. जर हे नसेल तर मात्र तुम्हांला सविस्तर सुरक्षातपासणीला सामोरे जावं लागतं जे कधी कधी काहीसं अपमानास्पद पातळीवर जाऊ शकतं. 

साधारणतः पावणेबाराच्या सुमारास प्राधान्यक्रमानुसार विमानात प्रवेश करण्यास सुरुवात झाली. कागदोपत्री फिलाडेल्फिया ते डॅलस हा विमानप्रवास एकंदरीत तीन तास चाळीस मिनिटांच्या आसपास आहे. फिलाडेल्फियाची स्थानिक वेळ डॅलसच्या एक तास पुढे आहे. त्यामुळं आम्ही डॅलसला स्थानिक वेळेनुसार साडेतीनला वगैरे पोहोचणे अपेक्षित होतं.  मी आदल्या दिवशी चेकइन करायला विसरल्याने माझा ग्रुप मागचा होता. 

माझी विमानात प्रवेश करण्याआधी केबिन लगेजमधील जागा संपत आल्यानं आमच्या सर्वांच्या बॅग्स चेक - इन करण्यास बंधनकारक करण्यात आलं. ही शक्यता त्रासदायक आहे. एकतर ही बॅग आपल्यासोबत कायम असेल असं गृहितक असल्यानं आपण तिला लॉक वगैरे केलेलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्यातील सर्व सामान पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं पॅक न केल्याची शक्यता असते. असो ही माझी केबिन बॅग विमानाच्या पोटात जाण्याचा क्षण मला भावनाविवश करून गेला. ही तीच बॅग जी मागच्या वर्षी होमवूड सुइट्समध्ये विसरून आलो होतो.  तू मला प्रत्येकवेळी संकटात टाकतोस असं ती बॅग मला नक्कीच म्हणाली असणार! 

विमानात आम्ही स्थानापन्न झालो. बहुतांश अमेरिकन सहप्रवासी असणाऱ्या विमानातील वातावरण काहीसं वेगळं असतं. सर्व प्रवासी विमानात शिरल्याची घोषणा करण्यात आली.  पण बराच वेळ काहीच होईना तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि मग थोड्याच वेळात विमानाच्या तपासणीत टायर पंक्चर असल्यानं तुम्हां सर्वांना विमानातून बाहेर पडावं लागेल अशी घोषणा केली गेली. संपूर्ण विमान विविध  विस्मयकारक उद्गारांनी भरून गेलं. परंतु नाईलाज असल्यानं आम्ही सर्व बाहेर पडलो. सुदैवानं श्रीकांत सुद्धा माझ्या सोबत होता. विमान उड्डाणाची नवीन वेळ दोन दहा अशी देण्यात आली होती. आम्ही सबवेचे सँडविच घेतले. भारतात आणि अमेरिकेत मिळणाऱ्या सबवे सँडविचमध्ये जमीनअस्मानाचा फरक असतो. तिथलं सँडविच बरंच चविष्ट असतं. 

२:१०, २:४०, ३:१० अशा नवनवीन वेळा येत राहिल्या. नक्की काय होत आहे ह्याविषयी कोणतीच माहिती पुरवली जात नव्हती. मागच्या जूनमध्ये आपल्या एअर इंडियाने तीन चार तासाचा विलंब होताच लगेचच नाश्त्याची कुपन्स सर्व प्रवाशांना दिली होती. ज्या प्रवाशांना डॅलसहुन दुसरं विमान पकडून पुढं जायचं होतं त्यांची काय हालत झाली असेल देव जाणे. त्यांना कस्टमर केयर केंद्राकडे जाण्याची सूचना देण्यात येत होती. शेवटी पुन्हा साडेतीन वाजता आम्ही विमानात प्रवेश केला.  सर्व प्रवाशी आले आहेत आता थोड्या वेळात आपण उड्डाण करू अशी घोषणा सुद्धा करण्यात आली. पण पुन्हा एकदा पंधरा वीस मिनिटं काहीच झालं नाही. आता मात्र प्रवाशांचा संयम सुटत चालला होता. विमानाला रनवे वर खेचून घ्यायला आवश्यक असणारी मंडळी उपलब्ध नाहीयेत असं न पटणारं कारण वैमानिकाने दिलं. आता मात्र दोन प्रवाशांचा संयम पुरता सुटला किंवा ते पुरते घाबरले. आम्हांला ह्या विमानातून प्रवासच करायचा नाही, आम्हाला उतरू द्या असे ते म्हणाले. हे दोघे उतरत आहेत, तुम्हांला उतरायचं आहे का असे वैमानिकाने सर्वांना विचारलं. आता मात्र विमानात भीतीची अदृश्य लहर पसरली. माझ्या समोरील सीट्सवर एक तरुण, त्याची मैत्रीण आणि बहुदा तिची आई असे तिघे बसले होते. तो तरुण अगदी संतप्त झाला. त्यानं हवाईसुंदरीला नक्की काय होत आहे असा प्रश्न विचारला. तिच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यानं दुसऱ्या वयस्क हवाईसुंदरीकडे पृच्छा केली. नक्की काय झालं माहिती नाही पण ती पहिली हवाईसुंदरी आली. माझ्याकडं रोखून का पाहतोयस, attitude का दाखवतोयस असं तिने त्याला विचारलं. प्रसंग हाताबाहेर जाईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली. सुदैवानं तसं काही झालं नाही. विमान नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा निघाल्यास पूर्ण पैसे परत द्यावे लागतात असे माझ्या समोरील युवक मोठ्यानं बोलत राहिला. कदाचित त्याच्या बोलण्यात तथ्य असावं. विमानानं साडेचारला उड्डाण केलं. डल्लासला उतरताना टायरने नीट राहावं ही प्रार्थना मारुतीरायाकडं करत मी मारुतिस्तोस्त्र बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर दररोज प्रार्थना करत असलेल्या देवांचे, ब्रह्म्याचं स्मरण केलं.  विमान व्यवस्थित उतरलं, बॅगसुद्धा  व्यवस्थित आली. 

हेच ते विमान आणि तो दिसणारा त्याचा टायर !



डॅलस निवू, निशांकचे गांव. पण निऊ सध्या भारतात आली असल्यानं निशांक मला भेटायला हॉटेलवर आला. एका भारतीय उपहारगृहात आम्ही अत्यंत चविष्ट चिकन बिर्याणी आणि तंदुरी चिकन खाल्लं. गप्पांना पुरेसा वेळ मिळाला नाही, पण चांगली चर्चा करून त्यानं मला परत हॉटेलवर सोडलं. इथलं हॉटेल Hyatt Regency फ्रिस्को. हॉटेल आलिशान, माझी खोली चौदाव्या मजल्यावर. तिथून शहराचा सुंदर नजराणा दृष्टीस पडत होता. 




सोमवारी कार्यालयातून परत आल्यानंतर रुमवरून घेतलेली ही छायाचित्रं !




हॉटेल आलिशान असलं तरी माझ्या प्राथमिक गरजा जसे की सकाळी गरम पाणी करण्यासाठी गॅस, मायक्रोवेव्ह, इस्त्री  वगैरे खोलीत उपलब्ध नव्हते. क्लिष्ट सूचना असणारे कॉफी मशीन होते. ह्याआधी अशा मशिनमधून मी पाणी गरम केलं आहे पण ह्यावेळी माझ्याकडं तितका संयम नव्हता. 



डेलावेर हे एक तास पुढं असल्यानं आम्ही साडेसात वाजता कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करणार होतो. सकाळी पाच वाजता उठल्यावर त्रयोदशीच्या चंद्रकोरीचे विहंगम दर्शन झाले. "आदित्य तू आयफोन आणायला हवा होता!" मला अंतर्मनाने सुनावलं. दहा मिनिटांनी चंद्राला पुन्हा पाहायला गेलो तर संपूर्ण परिसराला धुक्यानं वेढलं होतं. चंद्र सोडा समोरील रस्ता, त्यावरील वाहनं देखील गायब झाली होती. एखाद्या हॉलिवूड थरारपटात परग्रहवासीयांनी पृथ्वीचा ताबा घेतल्यावर ज्या काही अनाकलनीय घटना घडतात त्यापैकी हा प्रकार असावा असं वाटून गेलं. 

इथं आमच्या कॉर्पोरेट नोंदणीमध्ये नाश्ता समाविष्ट होता. जरी प्रत्यक्ष मांडून ठेवलेल्या नाश्त्याची छायाचित्रं घेतली नसली तरी प्लेटमध्ये घेतलेले हे काही पदार्थ. एकंदरीत उच्चभ्रू म्हणता येईल असा हा प्रकार होता. 


हॉटेल ते ऑफिससाठी शटलसेवा होती. साडेसात वाजता सुद्धा धुक्याचा विळखा शहराभोवती होता. त्यात परग्रहवासीयांना शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करत राहिलो. 


प्लॅनोची आमची टीम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय आहे. इथिओपिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, व्हिएतनाम, अमेरिकन आणि एक भारतीय असे वेगवेगळ्या देशातील सदस्य ह्या संघात आहेत. त्यांच्याशी दीड दिवस सविस्तर चर्चा केली, टीम लंच केलं. ह्या ऑफिसात माझी भाची इशा सुद्धा काम करते. तिची भेट घेतली. सायंकाळी संकल्प ह्या भारतीय उपहारगृहात पुन्हा एकदा चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. 

मंगळवारी सकाळी चेक आऊट करायचं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा लवकर उठलो. चतुर्दशीची चंद्रकोर उगवत्या सूर्याच्या सोबतीनं  दर्शन देत होती. अमेरिकेत मंगळवारी महाशिवरात्री असेल असं आधी घोषित करण्यात आलं होतं. बऱ्याच वेळा अमेरिकेत भारतापेक्षा एक दिवस आधी हिंदू सण साजरे करण्यात येतात असं मला श्रीकांतने सांगितलं. पण जर आपल्याला चंद्रकोर दिसली तर मग महाशिवरात्री कशी काय असू शकते हा प्रश्न मला पडला. श्रीकांत मला भेटताच महाशिवरात्री उद्या असेल असं सांगण्यात आलं आहे असं तो म्हणाला. बुधवारी सकाळी इथं असायला हवं होतं असं मला वाटून गेलं, अमावास्येचा पूर्ण अंधारा चंद्र कदाचित दृष्टीस पडला असता. 




Croissant, बटाटे आणि फळांचा आस्वाद घेणारा मी! ह्यानंतर भरभरून फळांची प्लेट मी घेतली. अमेरिकेतील बेरी वर्गातील फळांना तुलना नाही! अत्यंत सुंदर चव असते त्यांची ! 


२००२ साली फिनिक्स मध्ये सहकारी असणारा अजय भेटायला आला. त्याच्याबरोबर भोजन जरा जास्तच रंगले. त्यामुळं ३:२० चे परतीचे विमान पकडण्यासाठी थोडी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी व्यवस्थित विमान मिळाले. रविवारच्या अगदी उलट अनुभव इथं आला. विमानाने वेळेवर उड्डाण केले, वेळेत डेलावेरला अलगदपणे उतरले. चेक-इन बॅग्स नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पुन्हा उबेर आणि पुनश्च: ते सँडविच. ह्यावेळेला गणित चुकलं, सँडविच जरा आधीच येऊन स्वागतकक्षात माझी वाट पाहत राहिलं. 


हॉटेलवाल्यांकडून माझ्या दोन चेक-इन बॅग्स ताब्यात घेऊन पुन्हा एकदा चेक-इन केलं.  रात्री किचन भागात थोडं छायाचित्रण केलं.












बुधवारी डेलावेर मध्ये पुन्हा बैठकींना हजेरी लावली. गुरुवारी सकाळी चेक आउट केलं. त्या आधी काढलेला हा सेल्फी! काहीशा दगदगीच्या वेळापत्रकामुळं आणि जेट लॅगमुळे ह्या भेटीत चेहरा फारसा जास्त काही टवटवीत झाला नाही. गुरुवारी तीन वाजता ऑफिसातून विमानतळासाठी उबेर केली. अशा प्रकारे रविवार, मंगळवार आणि गुरुवार असे तीन दिवस फिलाडेल्फिया विमानतळावर मी हजर होतो. 


ब्रिटिश एअरवेजचे हे विमान अगदी आलिशान होते. बहुतांश सहप्रवासी उच्चभ्रू अमेरीकन, ब्रिटिश होते. लंडनला पोहोचण्यासाठी केवळ सहा तास लागतील असे वैमानिकाने सांगितलं. हीथ्रो विमानतळावर सकाळी सहा आधी अधिक ध्वनीप्रदुषण करणाऱ्या विमानांना उतरण्यास परवानगी नसल्यानं वैमानिकाने फिलाडेल्फियाला थोडा टाईमपास केला असावा. परतीच्या प्रवासात अनुकूल अशा tailwind मुळे विमानं कमी वेळात लंडनला पोहोचतात. हा प्रवास उत्तर ध्रुवीय प्रदेशातून होत असतो. ह्या सहा तासात मला मोजकी झोप लागली. 


लंडनला सहाच्या आसपास उतरल्यानंतर साडेनऊला मुंबईचे विमान होते. अमेरिकेला गुरुवारी सायंकाळी सहा चाळीसला निघालेलं विमान लंडनला स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता उतरलं. लंडनहून शुक्रवारी सकाळी साडेनऊला निघालेलं विमान मुंबईत खरंतर शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजता उतरणार होतं. पण बहुदा शेपूटवाऱ्यांनी जास्तीच जोर लावल्यानं ते शुक्रवार रात्री ११:५० लाच मुंबईत उतरलं. पण मी विमानातून बाहेर पडेस्तोवर शनिवार उजाडला होता. अशा प्रकारे ह्या आठवड्यात मी रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार विमानात होतो असे मी सांगू शकतो! 

लंडन ते मुंबई प्रवासात खिडकीची सीट मिळाली किंवा मिळवली होती. लंडनला उड्डाण केल्यानंतर काही सुरेख छायाचित्रं मिळाली. 







ढगांच्या घनदाट अशा थराच्या वरील पृष्ठभागावर कोण्या कलाकारानं केलेलं हे अप्रतिम नक्षीकाम पहा! 



समुद्राच्या निळ्याशार पाण्यावर पडलेल्या ढगांच्या सावल्या किती मनोहर दिसत आहेत. 








आता वेळ होती भोजनाची. पुन्हा एकदा भारतीय शाकाहारी आहार! लंडन ते अमेरीका प्रवासात माझ्या विनंतीचा मान राखत माझ्यासाठी खास मागविलेल्या शाकाहारी भोजनाला डावलून त्यांनी मला चिकनची चविष्ट डिश आणून दिली होती.  इथं मात्र असं काही घडलं नाही. कक्षात सहकुटुंब भारतीय प्रवास करत होते. लहान मुलं गडबड करत वावरत होती. भारतात परतण्याची जाणीव इथूनच होत होती. 










आखातात असताना सूर्य मावळला. 


मुंबईला दोन तास असताना अशी दिव्यांची रांग दिसली. नक्की काय असावं ह्याचा उलगडा झाला नाही. 
पुन्हा एकदा मला भारतीय नाश्त्याचा आग्रह करण्यात आला. मी निग्रह दाखवून फक्त ब्रेड आणि चहा आणून देण्याची विनंती केली. त्या दोन एअरहोस्टेसना बहुदा वाईट वाटत राहिलं. त्यांनी पुन्हा एकदा तुझं मत बदललं तर नाही ना असं विचारलं. मी माझ्या मतावर ठाम राहिलो. शेवटी त्यांनी मला दोन ब्रेड, चहा आणि चविष्ट स्वीट डिश आणून दिली. संपूर्ण प्रवासात त्यांनी मला ज्या ज्या वेळी ड्रिंक्स घेणार का विचारलं त्या त्या वेळी मी कायम लिंबूपाणी सांगितलं. त्यामुळं उतरताना त्या माझ्याकडं आदरानं पाहत असल्याचा भास मला होत राहिला.



अमेरिकेतील आहाराने जरा तंदुरुस्त झालेला मी विमानातून बाहेर पडणाऱ्या पहिल्या दहा प्रवाशांमध्ये होतो. इमिग्रेशनपर्यंत असणारा जवळपास एक किलोमीटरचा पल्ला मी जोरजोरात पार केला तेव्हा मी बहुदा दुसरा होता. बॅग्स यायला दहा पंधरा मिनिटं लागली. मी एक वाजून वीस मिनिटांनी घरी पोहोचलो आणि दोन वाजून दहा मिनिटांनी निद्राधीन झालो. रात्री आणि दुपारी चांगली झोप झाल्यानं आजच्या दिवसातच हा वृत्तांत लिहून झाला. 

उद्यापासून कार्यालयीन कामावर लक्ष ! ह्या भेटीत सकाळी प्रसन्न चित्तानं कार्यालयात जाऊन काम करण्याचा आनंद लुटला. प्रदूषणमुक्त वातावरणाचा माणसाच्या कार्यक्षमतेवर किती अनुकूल परिणाम होतो ह्याची पुन्हा एकदा प्रचिती घेतली. एक सकारात्मकता घेऊन मी परतलो आहे. मुंबई मला कसं वागवते ते पाहुयात. पण एक गोष्ट खरी कसाही असला तरी आपल्या देशात परतण्याची प्रत्येक वेळ पुन्हा मनात समाधानाची एक लहर निर्माण करून जाते! 

आता भारतात मला जेट लॅगने सतावू नये ह्यासाठी कृपया परमेश्वराकडे प्रार्थना करा. 

So what ..अर्थात तर मग काय ?

आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी ! १.  हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक...