मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं. हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली.
आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !
१. आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी.
२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी.
३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन.
४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो. पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते. सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!
अत्यंत अप्रतिम लेखन
उत्तर द्याहटवा