आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात.
तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत.
ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार
कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व!
मुलांस बोध - रामदास
भुजंगप्रयात
बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला,
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।
सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें,
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें,
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे,
बहू काळ हा खेळ कामा नये रे. ।।२ ।।
दिसामाजि कांहीतरी ते लिहावें,
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावें,
बरें बोलणें नित्य जीवीं धरावें. ।। ३ ।।
बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा.
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।
विवेकेंविणें सर्वही दंभ झाला,
बहु नेटका सज्जला साज केला.
प्रतीतीविणें बोलणें व्यर्थ होतें
विचारेविणें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।
'भला रे भला!' बोलती तें करावें,
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें.
परी शेवटी सर्व सोडून द्यावें,
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।
मुलांस उपदेश
शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।
अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।
खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।
दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।
गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।
चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।
अभंग
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।
वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।
शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।
नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।
बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें ।। ५ ।।
अभंग तुकाराम
आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं नाश, आयुष्याचा ।। १ ।।
सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।
हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।
तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवावें ।। ४ ।।
मुलांस उपदेश
श्लोक - उपेंद्रवज्रा
कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
भुजंगप्रयात
मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।
आर्या
तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।
श्लोक - कामदा
चांगल्यासवें संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।
शुद्धकामदा
धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।
भुजंगप्रयात
स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।
आर्या
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।