मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १५ मे, २०२५

आठवणीतील कविता - मुलांस बोध

 


 

आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात. 

तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत. 

ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार 

१. व्हॉइस टायपिंग 
प्रारंभीस मी पुस्तकातील कविता व्हॉइस टायपिंगचा वापर करून लिखित स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जुनी मराठी भाषा आणि माझ्या उच्चारातील त्रुटी ह्यामुळं व्हॉइस टायपिंगनं दिलेलं मूळ रूप दुरुस्त करता करता इतका वेळ लागला की स्वतःच लिहिलं असतं तर नक्कीच लवकर तडीस नेता आलं असतं. तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी नक्की कुठं वापरावं ह्याचं भान असणं आवश्यक ! नाहीतर 'माकडाच्या हाती कोलीत' असला प्रकार व्हायचा. 

तरी देखील व्हाट्सअँपला पुढील सूचना करण्याचा माझा मानस आहे. ज्यावेळी एखादा इसम तुमची मराठी व्हॉइस टायपिंग सुविधा वापरू इच्छितो त्यावेळी त्याला / तिला कोणत्या कालावधीतील मराठी लिखित स्वरूपात आणायची आहे असा प्रश्न विचारून त्या कालावधीतील मराठी उपलब्ध करून द्यावी.  

२. अनुस्वार 
त्या काळातील बहुतेक शब्दांतील अंतिम अक्षरावर अनुस्वार आढळून येतात. त्याकाळातील बोलण्यात देखील ह्या अनुनासिक स्वरांचा वापर आपल्याला जुन्या मराठी चित्रपटात / नाटकात आढळून येतो. परंतु आता बहुदा जुन्या पिढीसोबत हीं अनुनासिकें काळाच्या पडद्याआड गेलीं असावीत असें मानण्यास वाव आहे. 

३. र्हस्व दीर्घ संकल्पना 
दहावीत सुद्धा माझा र्हस्व दीर्घ संकल्पनेबाबत गोंधळ उडायचा. आता तर प्रचंड गोंधळाची परिस्थती आहे. मराठी र्हस्व दीर्घ लिखाणाबाबतीचे सर्व नियम संकलित करून एका जागी प्रसिद्ध करावेत अशी मागणी ह्या पोस्टद्वारे मी करत आहे. 

४. भुजंगप्रयात / आर्या 
ह्या कवितेत काही ठिकाणी भुजंगप्रयात / आर्या वगैरे उल्लेख करण्यात आला आहे. भुजंगप्रयास हा छंद असे ऐकून माहिती आहे. ह्याविषयी तज्ञ मंडळींनी खुलासा करावा अशी मागणी मी करत आहेत. 

५. जामीन
ह्या पुस्तकात दोन तीन वेळा जामीन राहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. जामीन राहून जबरदस्त फटका खाल्ल्याची उदाहरणे त्याकाळी प्रचलित असावीत. 
 
६. रामदास 
रामदासांच्या कवितेतील एक एक ओळी सुवचन म्हणून प्रसिद्ध आहेत. जसे की

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
मरावें परी कीर्तिरूपे उरावे 

ह्या सुवचनांचं स्रोत असलेल्या मूळ कविता वाचनात आल्या ह्याचा मला आनंद झाला. 

७. उपदेश 
ह्या कवितेतील उपदेश मोठ्या माणसांना देखील लागू होतो, अगदी हल्लीच्या काळात सुद्धा ! पुढील काही दिवसात चॅट जीपीटीला ह्या कविता वाचायला देऊन त्यांजकडून ह्या कवितांची सद्यकालीन आवृत्ती लिहून घेण्याचा मानस आहे. 

उदाहरणार्थ 
मूळ पंक्ती  

कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


आधुनिक काळातील उपदेश 

कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा 
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा 

कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।



आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व! 


मुलांस बोध - रामदास 

भुजंगप्रयात

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला, 
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।

सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें, 
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें, 
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे, 
बहू काळ हा खेळ कामा नये रे.  ।।२ ।।

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करा
वें, 
बरें बोलणें नित्य जीवीं धरा
वें.  ।। ३ ।।

बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा. 
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला, 
बहु नेटका सज्जला साज केला. 
प्रतीतीवि
णें बोलणें व्यर्थ होतें 
विचारेवि
णें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।

'भला रे भला!' बोलती 
तें करावें, 
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें. 
परी शेवटी सर्व सोडून द्यावें, 
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।


 मुलांस उपदेश 

शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।

अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।

खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।

दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।

गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।

चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।

अभंग 
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।

वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून  ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।

शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।


नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।

बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें  ।। ५ ।।

अभंग तुकाराम 

आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं  नाश, आयुष्याचा ।। १ ।।

सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।

हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।

तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवा
वें ।। ४ ।।


मुलांस उपदेश

श्लोक - उपेंद्रवज्रा  


कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


भुजंगप्रयात 

मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।

आर्या 

तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें 
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।

श्लोक - कामदा 

चांगल्यासवें  संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।

शुद्धकामदा


धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं 
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।

भुजंगप्रयात 

स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।

आर्या 
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।



वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !

मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घ...